बालकांड - श्रीरामचरितमानसमधील शिवपार्वती संवाद

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


रामकथा ही मजला वाटे सुंदर करताली ।
उडवीत दूर संदेहखगा मोहिनी मना घाली ॥
रामकथा ही  कलिविटपाला तोडिल अशी कुर्‍हाड ।
सादर परिसे गिरीराज कुमारी अशी कथा गोड ॥१॥
अर्थ - ही रामकथा मला सुंदर टाळीच वाटते. ती संदेहरूपी पक्षाला दूर उडवून लावते व सर्वांच्या मनाला मोहिनी घालते ही रामकथा कलिरूपी वृक्षाला तोडेल अशी कुर्‍हाड आहे. हे गिरीराजकन्यके अशी ही रामकहाणी मधुर आहे. ही कथा तू आदराने श्रवण कर असे श्री शंकर पार्वतीला म्हणाले.

रामनाम गुणचारित्र सुंदर गाती नित्य श्रुती ।
जन्मकथा ती कर्मकहाणी अगणित त्या वदती ॥
रामभगवंत जसे अनंत तशी गुणांची कथा ।
अनंत असे रामकीर्ति ती अनंत जयगाथा ॥२॥
अर्थ - रामाचे नाव गुण व सुंदर चरित्र श्रुती नेहमी गात असतात. रामाची जन्मकथा ही एक कर्मकहाणी आहे. अशा अगणित कथा श्रुति सांगतात. भगवान श्रीरामाचे स्वरूप जसे अनंत आहे तशीच त्याच्या गुणांची गाथा सुद्धा कधीही न संपणारी आहे, असे श्रीशिवजी म्हणाले.

सगुण आणि निर्गुण यात ना कधी कांहि भेद ।
वदती मुनिजन पंडित आणि पुराणात वेद ॥
निराकार निर्गुण असे तो अन्यक्त अजन्मा जाण ।
भक्तप्रीतिने होत मोहवश घेई रूप सगुण ॥३॥
अर्थ - सगुण आणि निर्गुण यामधे कांहीही फरक नाही, असे मुनी व पंडितजन सांगतात. आणि तसे वेदपुराणातूनही संगितले जाते. श्रीराम हे निराकार आहेत तसेच निर्गुणही आहेत. ते दिसत नाहीत व त्यांना जन्मही नाही परंतू भक्तजनांच्या प्रेमाने मोहवश होऊन ते सगुणरूप घेतात.

भ्रमविनाशी वचन शिवाचे परिसे गिरिबाला ।
कुतर्क सकल मनातील तव जाती विलयाला ।
रघुनाथाचे चरण होई बहु प्रेम विश्वास ।
निघून गेली असंभावना जी कठीण जाण्यास ॥४॥
अर्थ - भ्रमाचा नाश करणारे भगवान शंकराचे हे शब्द पार्वतीने ऐकले आणि तिच्या मनातील सर्व कुतर्क निघून गेले. तिच्या मनात श्रीरामचरणी प्रेम उत्पन्न झाले. तिचा श्रीरामचरणावर विश्वास दृढ झाला व नाहींसा होण्यास कठीण असा तिच्या मनातील संभ्रम निघून गेला.

हे प्रभू जरि प्रसन्न आपण झाला माझ्यावर ।
प्रथम शिवजी विचारिते द्या प्रश्नाचे उत्तर ॥
सत्य असे हे श्रीरामब्रह्म चिन्मय आविनाशी ।
सकल रहित सकल हृदय नगरीत निवासी ॥५॥
अर्थ - नंतर पार्वती शंकराला म्हणाली, ''जर आपण माझ्यावर प्रसन्न झाला आहात तर मी जो प्रश्न विचारते त्याचे आपण उत्तर द्यावे. हे श्रीरामब्रह्म सत्य आहे. तसेच चैतन्यमय व आविनाशी आहे. ते सर्वांपासून अलग असूनही सर्वांच्या हृदयात रहात असते.''

हे नाथ नरतनू धारण केली काय कारणानी ।
वृषकेतू हे सांगा मजला आपण समजाऊनी ॥
अतिविनित शुद्ध उमेचे परिसुनि शिव शांत ।
पुनीत प्रेम रामकथेवर पाही मनि हर्षित ॥६॥
अर्थ - ''हे देवा अशा श्रीरामानी मानवी शरीर का धारण केले? हे वृषकेतू आपण मला हे समजाऊन सांगावे. ''हे पार्वतीचे अतिशय विनयशील शब्द ऐकून श्रीशंकर स्तब्ध झाले. उमेचे रामकथेवर असलेले पवित्र प्रेम पाहून त्यांचे मन आनंदाने भरून गेले.

जसे समजले मला वदेन प्रभूजन्ममूल ।
सुवेदने एक सांगतो कारण तेच असेल ॥
ज्या ज्या समयी स्वधर्माची होई हानि जगात ।
अधम असुरांची वाढते तिथे शक्ति अनंत ॥७॥
अर्थ - श्री शंकर म्हणाले, ''मला जसे समजले तसे मी तुला श्रीरामाचे जन्माचे कारण सांगतो व ते व खरे कारण असेल हे. सुवदने पार्वती ऐक. ज्या ज्या वेळी जगामधे स्वधर्माचा नाश होऊ लागतो व क्रूर राक्षसांची शक्ति अतिशय वाढू लागते."

अन्याय असा जगती वर्णन करू शकेना कुणी ।
कष्टी होती देवदेवता ब्राह्मण धेनु धरणी ॥
तेव्हां करी कृपानिधी प्रभु विविध तनु धारण ।
सुजनाना देई धीर राम करि पिडा हरण ॥८॥
अर्थ - त्यावेळी लोकांच्यावर जो अन्याय केला जातो त्याचे वर्णन करणे कुणालाही शक्य नाही. त्यावेळी ब्राह्मण दु:खी होतात. देवदेवता ब्राह्मण गाई पृथ्वी यानाही अतिशय दु:ख सहन करावे लागते. अशावेळी कृपासागर भगवंत वेगवेगळी शरीरे धारण करतात व सज्जनांच्या मनाला धीर देतात. त्यांचा त्रास नाहीसा करतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP