सुभद्राचंपू - सर्ग पांचवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


॥श्रीकृष्णाय सत्यभामाप्रियाय नम: ॥
तालांक तो अंकित त्यासि झाला । काळत्रयीं सेवितसे यतीला ।
ठेवी तयातें अती गुह्यठायीं । जेथें जनाची गति फार नाहीं ॥१॥
पूजी श्रीधर त्या यतीस विभवें ब्रह्मेंद्र ते आपणा ।
जैसे पूजिति त्या परीचं करितो पादाब्जप्रक्षाळणा ॥
ज्याचें श्रीपदतोय देव शिरसा वंदोनियां तोषती ।
तो लक्ष्मीसह पादतोय यतिचें वंदी प्रमोदें अती ॥२॥
या रीतीं प्रतिवासरीं करितसे सद्भक्तिनें सेवना ।
सायंप्रात अविस्मरेंचि करितो येवोनि सव्दंदना ।
अंत: प्रेमरसांतरें प्रतिदिनी भिक्षान्न दे आदरें ।
सानंदे अवलोकितां विजय त्या सौख्याब्धि चित्ती भरे ॥३॥
ऐसे व्दारवतीनिवास समुदे देखोनि भोजांधकीं ।
नाना यादव शूरसेन करिती पूजेसि मोहांध कीं ॥
गेले दीस कितेक राम वदतो भावें सुभद्रेप्रती ।
बाले भक्तिमती  सदां सुविनयें सेवीं त्रिकाळीं यती ॥४॥
हा तों पूर्ण विरक्त साधु सुगुणी सद्भर्मवेत्ता असे ।
काहींही अणुमात्र दुर्गुण यया स्पर्शीच ना मानसें ॥
याचें सेवन तूं करोनि लभसी तो चक्रवर्ती पती ।
ऐशा त्या बलभाषणा परिसतां संतोषली सन्मती ॥५॥
लागे ते निशिवार भक्तिपरमें भिक्षूचिया सेवना ।
त्या कार्यांतचि काळ सर्व खपवी कांहीं न लागे मना ॥
काळीं दे जळ शौचमज्जनतृषानाशाथ अत्यादरें ।
काषायांबर धौत निर्मल करी कौपीन दे सत्करें ॥६॥
यीचें पाहुनि रुप तापितमनीं कंदर्प कांडे व्यथा ।
पावे पार्थ म्हणे कधीं हरिन मी साध्वी मना संमता ॥
हेही पाहुनि त्या यतीस सुदती आश्चर्य मानी मनीं ।
चित्रीं म्यां अवलोकिला विजया तो तद्रूप हाहीं मुनी ॥७॥
होता धर्मनृपासंमीप म्हणुनी हेही गिरा ऐकिली ।
सेवाअ नित्य करी समीप वसतां ते भीडहीं फीटली ॥
तेव्हां ते पुसते यतीस सगुणां संतुष्ट पाहोनियां ।
इंद्रप्रस्थपुंरीत धर्मनिकटीं होतां कधीं स्वामिया ॥८॥
तुम्ही अर्जुन लक्षिला निजदिठीं आहे बरा कीं सुखी ।
त्याचें तें गुणरुप वर्णन करा विश्रांति द्या या मना ।
त्याचें श्रीमुखपद्म लक्षिन कधीं वाटे असी कामना ॥९॥
तो भेटेल कधीं मला गुणनिधी तो कांत मातें घडो ।
आशीर्वाद करा मुला गुरुकृपें मद्भाग्य हें ऊघडो ॥
नेच्छी हें मन अर्जुनाविण पती ऐका यती सांगते ।
साचें हें तुमच्या पदाब्जयुगळीं मी आण ते वाहतें ॥१०॥
ऐशी प्रेमरसांतरा प्रतिदिनी बोले गिरा भामिनी ।
जैसें नारदभाषणा परिसिलें आले तसें या मनीं ॥
बोले तीप्रति कुंतिभोजकुमरीगर्भाकरींचा मणी ।
तेव्हां अर्जुन ऐक वो म्हणतसे पार्थप्रिये कामिनी ॥११॥
बंधू पांचसमेत अर्जुन असे संपत्ति कांहीं नसे ।
ऐशाचा तरी हेतु काय तुजला त्वां कामिला मानसें ॥
पृथ्वीमंडण राजराजमुकुटालंकार चूडामणी ।
तो दुर्योधन तूं वरीं सुललने संपत्ति भोगीं जनीं ॥१२॥
ज्याचे बांधव सत्पराक्रम पहा दु:शासनासारिखे ।
तेही शंभर शंबरारिसम ते रुपें महानेटके ॥
माता आणि पिता बहूत कुळही स्वाधीन त्या मेदिनी ।
सेनानायक कर्णसैंधव असे साहाय वीराग्रणी ॥१३॥
भोगी सांप्रत सर्व हे वसुमती तो चक्रवर्ती असे ।
नाहीं त्यासम अन्य भूप दुसरा जो योग्य तूला दिसे ॥
हे तों पार्थ पार्थ समर्थ नोहति कदां वित्तें तथा वैभवें ।
त्याला तूं वरिसी न तोष तुजला चितांत या संभवे ॥१४॥
ऐसें ऐकूनि पार्थभाषण वदे मंदाक्षरें सुंदरी ।
तुम्ही जो कथिला सुयोधन पती मीं त्याजला ना वरीं ॥
माझा एकचि भाव अर्जुनविन नेच्छी कदां मीं पती ।
देवेंद्रादिक अष्ट दिक्पति तरी मीं नांगिकारी यती ॥१५॥
होती पांडव पाच साच परि ते पंचाननासारिखे ।
एकाहोनि विशेष एक बलधी यांसीं न कोणी तुके ॥
एका भीमबलासि शंभर तरी येती न ते साम्यता ।
पार्थाच्या धनुटंकरा परिसतां ते पावती मूढता ॥१६॥
हे सारे पुरुषार्थवंत जिणती एकेक ते मेदिनी ।
पृथ्वीच्या भणगासि पूर्ण करिते आहेति रत्नीं धनीं ॥
आतेचा सुत कामसुंदर तसअ कोदंड दीक्षागुरु ।
कृष्णाचा अतिमित्र अर्जुन मला सर्व प्रकारें वरु ॥१७॥
एकानें द्रुपदात्मजा सकळहीं पृथ्वीभुजांमंडळी ।
मच्छा भेदुनि कर्णमुख्य असतां वीरांतरीं जिंतिली ॥
जेणें खांडवदाह तो विरचिला देवेंद्रहीं पाहतां ।
केलीं आणिक दुष्करें बहुतसीं कर्में सुरांदेखतां ॥१८॥
तो हो कां धनहीन संपति नसो कांहीच त्याचे घरीं ।
तत्रापी धनदांदिकां न करवे त्या अर्जुनासीं सरी ।
ज्याचा मित्र अनंत त्यासि समते देवेंद्रही नातुळे ।
तेव्हां पामर कौरवेश्वर कसा दुर्बुध्दि त्यासीं तुळे ॥१९॥
सूर्याच्या समतेसि कीटक कसा खद्योत येऊं सके ।
झाला पुष्ट अतीव सूकर तर्‍हीं कैं दिग्गजासी तुके ॥
सिंहा श्वान समान होयिल कसा सांगा तुम्ही हें बरें ।
त्या उचैश्रवसासि साम्य करिजे कोणा उपायें खरें ॥२०॥
शेषासीं अलगर्द येयिल समा कैं कूप ये सागरा ।
चांफ्यासीं तरि किंशुकें मग किजे स्पर्धा कसी नागरा ॥
जोडावें कमळासि काय सुमनें उन्मत्तवृक्षोद्भवें ।
काका कोकिलसाम्यता तरि कसी लोकांत या संभवे ॥२१॥
मूर्खालागि सुरेंद्रदेशिक तया पंक्ती कसें आणिजे ।
तैसा पार्थसमान केंवि चतुरीं अंधात्मजा मानिजे ।
जो सर्वज्ञ बलाढय रुपसगुणी शस्त्रास्त्रवेत्ता जनीं ।
त्यासीं कोण तुळेल साच न कळ हे शोधितां मेदिनी ॥२२॥
आहे पार्थ तसा सुरांत हरिसा तीर्थांत काशीपुरी ।
तेजोवंत तयांत भास्कर तसा, गंगा नदीभीतरीं ॥
पाषाणांत मणी, चतुष्पद‌गुणीं ते कामधेनू गुणी ।
पक्षांमाजि समर्थ त्यासि म्हणिजे जो राजहंसाग्रणी ॥२३॥
धातूमाजि सुवर्ण त्या वनमृगीं पंचास्य जैसा बळी ।
देहीं मस्तक पूज्य चंद्र मिरवे तारागणीं सोज्वळीं ॥
माधुर्यांत सुधा, मनुष्यनिवहीं राजा यती आश्रमीं ।
यज्ञामाजि तुरंगमेध न तुळे वर्णांत विप्रोत्तमीं ॥२४॥
ऐशी सुभद्रामुख - कमळनिर्गत - हंसकलनिनदसमान हंसवाहिनी । एकोनि चतुरतर समाज मुकुटरत्नें कानीं । परम विस्मय मानोनि मनीं । पुन्हां सस्मित सुवचनीं । नारी वचनसरणी पडताळी ॥२५॥
ह्मणे तूं पराधीन वो राजबाळी । अत्याग्रही बळिराम महाबळी । निग्रहें सुयोधनासि तुज देयील तयाकाळीं । यत्न काय तुझा चालेल वद वो वेल्हाळी । चातुर्यमणी चंद्रवदने ॥२६॥
मायबाप बंधूजन । सर्व वर्तई हलायुधाधीन । तो तंव आग्रही दारुण । तूं तव अबळा सुलीन ।कैसोनि पावसी वीराग्रेसर अर्जुन । अर्जुना अर्जुनवत गणोनि तुज वरील कौरवेश्वरसुयोधन । रामपक्षपातें निश्चयें ॥२७॥
तेव्हां वदे सुभद्रासती । सस्मित - विकसित - रदरत्नदीप्ती । मज जरि राम अर्पील दुर्योधना निश्चिती । तदां धाडीन निजपत्रिका पार्थाप्रती । जैशी रुक्मिणी एकांतीं । संदेश - वचनें विप्राहाती । पाठऊनि नेला यादवपती । अंबिकालयीं भूपाळपंक्ती । संनद्भ असतां हंसगती । वरिती झाली कृष्णासि निरगुती । तैसीच मीही पृथानंदन वीर फाल्गुन सुमती । वरीन निश्चिती यतीवर्या ॥२८॥
तोही गांडीवधन्वा महाबळी । उडी घालील मज निमित्तें तात्काळीं ।चक्रवाकीसंकटीं अंशुमाळी । कुपेनें उदय करी प्रात:काळीं । तद्‍वत तमप्राय कौरवमंडळी । मथोनि मज हरील वीरमौळी । तालांकसहित यादवफळी । भेदोनि नेयील सकळीं । अवलोकितां मृगराज स्वभाग बस्तमेळी । हरी तैसा निजप्रतापें ॥२९॥
कदाचित न येतां राहील मज उपेक्षून । जरि मम प्राणप्रिय वीर अर्जुन । तरि निजदेहस्थित भूतांश तत्सेवना धाडीन । विभाग जेथील तेथें मेळवीन । प्राण प्राणीं मनीं मन निजजीववृत्तीसहवर्तमान । तेहीं विंदाण परिसिजे ॥३०॥
पृथ्वी धाडिन ज्या स्थळीं नर असे पृथ्वीस भेटावया ।
आपीं आप मिळेल अर्जुन जया प्राशील तोया तया ॥
माझें तेज मिळो तदीय मुकुरीं लक्षी मुखालागुनी ।
वायू राहिल तालवृंत उदरीं आकाश त्या आंगणीं ॥३१॥
राहे हे तनुमात्र एक वडिलाआधीन सर्पत्वचा ।
जैसी ते जड काय तीस करिती रामादि हें निर्वचा ।
माझें जीवित साच जाइल यती जेथें अस तो पती ।
त्या अंगासि अलिंगितील सहसा हे इंद्रियें निश्चितीं ॥३२॥
तेव्हां काय करील राम कथिजे माता पिता कायसीं ।
मानी कोण सुहृज्जना विजय तो म्यां कामिला मानसीं ॥
आतां एक तुह्मासि मी विनवितें कीजे कृपासागरीं ।
चातुर्मास सरेल जाल पुढती त्या इंद्रप्रस्थांतरीं ॥३३॥
सांगावें मम मानसांतर तया वीरास अत्यादरें ।
यावें तां समयीं स्वयंवर घडे माझें तदां सुंदरें ॥
न्यावें तां मज कोटिवीर मथुनी कृष्णें जसी आणिली ।
देवी भीमकनंदिनी मज तसें त हीं हरावें बळीं ॥३४॥
आहे रैवतकीं मला नवस तो देवीचिया पूजना ।
तेव्हां तां हरिजे मला गुणवता वीरांशिरोमंडणा ।
हा संकेत तयासि पूर्ण कथिजे तो पार्थ मातें वरीं ।
ऐसा हा उपकार पूर्ण करिजे मातें यतीशेखरीं ॥३५॥
आले गृहासि अतिथी अतिमानदानें । अत्युत्सवें करुनि पूजन अन्नदानें । केला असेल जरि तोष तया महंतां । तैं पार्थ होयिल मला अनुरुप भर्ता ॥३६॥
जे भारपीडित निवारुनि भात त्यांचा । म्यां घेतला असल बोलुनि रम्यवाचा । देखोनियां क्षुधित अन्न दिल्हें तयाला । म्यां पाजिलें असल तोय तृषातुरांला ॥३७॥
म्यां दीधली असल ठाव यथेच्छ पांथा । जे उष्ण-शीत -जळपीडित त्यां अनाथा । कष्टी विलोकुनि निवारण कष्ट केले । ते अंध पंगु परिपाळुनि तुष्ट केले ॥३८॥
रोगी निरीक्षुनि तयां उपचार केला । ठेवोनियां स्वसदनांतरिं वेळवेळां । देवोनि रोगहर औषध दिव्यमात्रा । धर्मार्थ जाणुनि यथाविध आर्तमाता ॥३९॥
केली असेल गुरुवृध्दजनासि पूजा । धर्मासि साह्य करि वेचुनि देह माझा । तीर्थेव्रतें सुनियमें उपवास योग । म्यां अर्जिले असति टाकुनि देहभोग ॥४०॥
म्यां दिधलें असल दान अशक्त दीनां । जे कां विपन्न गति ज्यां दुसरी असेना । लोकीं अनेक असती अति सूक्ष्म धर्म । आपूर्त इष्ट म्हणिजे परसौख्य कर्म ॥४१॥
निष्काम आचरुनि तोषविला हरी तो । पुण्यें तया वरील पार्थ यथार्थ मीं तो । म्यां पूजिली असल शंभुसती भवानी । तैं तो वरील मज गांडिवचापपाणी ॥४२॥
ब्रह्मेश मुख्य मशकांत समस्त भूतें । मानोनि कृष्ण अतिभाव धरोनि त्यातें । म्यां वंदिलें असल जन्मशतीं यती हो । तैं तो धनंजय गुणाढय मला पती हो ॥४३॥
ऐशी केवळ एकनिष्ठ घडली माझे स्थळीं हे प्रिया ।
चित्तीं जाणुनि सूचवी मग कथा सांगोनि कांहीं तिया ॥
ज्यासाठीं धरितेसि हे इतुका तो पार्थ तीर्थाटणा ।
गेला टाकुनि आपुली निजपुरी धर्मादि बंधूजना ॥४४॥
आला व्दारवतीसमीप विपिनीं ऐसें अम्हीं ऐकिलें ।
कृष्णें भेटुनि मंत्र त्यास कथिला संन्यास घॆयीं बळें ॥
नेतां तो बळिराम ये निजपुरीं अंत:पुरीं राहिजे ।
तव्दाक्यें यदुमंदिरीं वसतसे कोठें तुवां पाहिजे ॥४५॥
ऐसें अर्जुनभाषणा परिसतां साशंक चित्तातरीं ।
झाली हर्षित मुग्धभाव म्हणुनी कांहीं घडे घाबरी ॥
तेव्हां वृत्त समस्त सांग कथितां तैं ते मनीं लाजिली ।
आला प्रत्यय पूर्ण सर्व विषयीं जाणॊनि विश्वासली ॥४६॥
वंदी पादसरोज फार विनयें साष्टांग भावें सती ।
प्रार्थी म्यां तुज नेणतां सलगिनें सेवांतरीं सन्मती ॥
केलासे जरि अंतराय तरिहीं कीजे क्षमा वत्सला ।
आतां काय वदूं विशेष सगुणा हा देह म्यां अर्पिला ॥४७॥
संबोखी अति पार्थ भक्तिमति तूं मत्प्रेम तूं शुध्द तूं ।
तूं विज्ञान विवेक शील शुचिता येणें णगुं पूर्ण तूं ।
तूझाही मज वेध लागुनि सय आलों अशा संकटें ।
जेव्हांपासुनि नारदें निगदिलें मी सर्व सौख्या विटें ॥४८॥
ऐसें चित्त परस्परें मिसळलें पुष्पायुधें व्यापिलें ।
नेत्रप्रांत विलोकनें स्मितमुखें सस्नेह मोहाकुलें ॥
एकाएक निरीक्षणा न करितां कल्पांत होतीं पळें ।
याचें अंतर सर्व हृद्रत तया गोविंदजीला कळे ॥४९॥
कांहीसें गुज देवकीस कळलें जाणे हरी सांवळा ।
कांहीसें वसुदेवहीं उमजला नेणे हळी बाबळा ॥
कांहीं यादव मंडळीस कळलें पैं कृष्णमाया असी ।
बोलों ना सकती उगेच असती ठेवोनियां मानसीं ॥५०॥
चूर्णिका.
एकेदिनीं एकांती घनसांवळा । मायाधारी अनंतकळा । हलायुधासि विनवी सद्‍गुणशीला । माझी हे विनती अवलीला । परिसिजे अत्यंत सोज्वळ । हा त्रिदंडधारी कोठुनि आणिला । तरुण रुपस सकळकळा । त्रिभुवनवनिता देखतां डोळां । तात्काळ होती स्मरविव्हळा । चातुर्यसिंधु परम मला प्रौढ प्रतापी दिसतसे ॥५१॥
तथापि वास अंत;पुरी । एकांतीं वसे कन्यकागारीं । परम वैराग्यवंत तरीं । विष्णुमाय देखतां नारी । संयोग सन्निकर्ष पावतां परी । कोण चित्तीं धैर्य करी ऐसा तपस्वी तरीं । विरळ जगीं मीं मानीं ॥५२॥
सुभद्रा तारुण्यमदमंडिता ।ते एकांती यतिसेवेमाजि निरता । नियत वसे अखंडिता । जैं तां आज्ञापिली भूभृता । तेव्हांच मज गमली मानसव्यथा । हे गोष्ट उचितीं न पडे पाहतां । परि न बोलूं सकवे तुज समर्था । कूळदूषण सत्कुळप्रसूतां । लोकापवाद लांछन झगटतां  । मग न जाय सकळ तीर्थसलिलीं धूता । लोकीं प्रकटली निंद्यता । जगव्दंद्यकुळीं कज्जलप्राय मलिनता । आणों सके हे तात्काळ ॥५३॥
घृतभांड अग्रीसमीप । ठेवितां काय न पवे ताप । वायुयोगें प्रदीप । तोही पावेल चळकाप । योगी ज्ञानी तपस्वी निर्विकल्प । असेही कामिनीवाग्जल्प । एकांतीं परिसतां कुसुमायुधप्रताप । न सहोनि भ्रष्टले अमुप । असती ऐकिले परिसिजे ॥५४॥
योषिता म्हणिजे मदनज्वाळा । स्वरुपेंधनप्रदीप्त विशाळा । ते पुरुष- चित्त. चंचळ - पतंगकुळा । न जाळितां राहील या बोला । केंवि मानिजे सर्वज्ञ शिखामणी ॥५५॥
विश्वामित्रपराशरादिमुनिजन । प्रमदासहवासें पावले चलन । दीर्घ तपासि घडलें विघ्र । अनर्थ उदेला दारुण । इतर पामर मानवां लेखी कोण । देव दैत्य परमबळसंपन्न । परि अबळाविलासें भ्रष्टले । प्राणांत पावोनि नष्टले । सर्व सुकृता वीटले । महावैभवा रुष्टले । नरकदु:खें कष्टले । लोटले अपार संसारसागरीं ॥५६॥
अहिल्याकामी पाकशासन । भगांक वाहे आझुण । कळंकी अद्यापि तारारमण । सीताभिलाषें रावण । विसर्जोनि गेला राज्य- प्राण । तिलोत्तमाव्याजें मरण । सुंदोपसुंद पावले दारुण । अन्य राजऋषी गणी कोण । सदाशिव मोहनी विलासगुणें मोहित घडला तेधवां ॥५७॥
ब्रह्मा कन्याभिलाषी । धरुं धावें शारदेसी । विष्णु वृदास्मशानवासी । आठवोनि तद्‍गुण मानसीं । वृंदावनासि नुपेक्षी ॥५८॥
अद्यापि महादेव धूर्जटी । गंगा वाहे जटाजूटीं । अर्ध्दांगीं असतां पार्वती कंबुकंठी । पद्मनेत्रा सुवर्ण  गोरटी । मोहनांगी प्रियतमा ॥५९॥
ऐसे महानुभव जगत्कारण । तेहीं जिंकिले मदनबाणें । पामरां मानवांची धृति वानी कोण । तात्काळ भ्रष्टती नियमापासुन । तूं सर्वतेत्ता प्रवीण । म्यां काय विनविजे अल्पज्ञें अल्पवचनें । तथापि याचा विश्वास मानणें । अयोग्य ऐसें मजवाटे ॥६०॥
शील स्वभाव बहुत दिवसां व्यक्त । सहवासियां होती यथास्थित । ते आपातमात्रें न कळत । मनुष्यस्वभाव - गुण असती असंख्यात । अविद्या त्रिगुण जनित । यास्तव विचार करोनि बहुत । संग्रह करितां अप्रमत्त । तरीच सुखावह होयील निश्चित । नातरि कर्म अविचारकृत । प्राणियां हृदयीं आमरणांत । शल्य- तुल्य घडत सर्वज्ञा ॥६१॥
परंतु चातुर्मास संकल्पित यतिवरां । स्थानचलन योग्य नव्हे ऐशी श्रुतिगिरा । यास्तव परम सावधपणें अंत; पुरचर- नारीनरां । शासनापूर्वक प्रतिक्षणीं निरीक्षण करिजे धुरा । आंतर विचारा न कळवितां ॥६२॥
हें रहस्य तया यतीस न कळविजे । तो क्षोभ पावतां सहजें । सकळ कुळासहित ऐश्वर्य वोजें ।भस्म करील ऐसें समजें । तपोनिधि प्रतापी यतिराणा ॥६३॥
एकचि असे विश्वासाचि कारण । युधिष्ठिर ज्ञानवैराग्यसंपन्न । तत्सन्निधानीं ययासि काळहरण । बहूकाळ घडलें म्हणोनि वैराग्यदीप प्रकाशमान । यया हृदयमंदिरीं प्रकाशे ॥६४॥
तयासि अनेक - विकल्प - पतंग - पतनें । अथवा प्रमदाविलास - वातस्पर्शनें । तो विझों न सके ऐसें ही मानी माझें मन । याचें पुण्याचरण अवलोकितां ॥६५॥
ऐसा श्रीकृष्ण जगन्नाटक - चक्रवर्ती एकांतीं । भाषण करोनि अग्रजाप्रती । पुन्हा मायामोह विचचोनि यती । पूजनी करोनि सादर मती । पूर्वपध्दति यथास्थिति । अंदरसा भाषाणहास्यविनोदभावसानंदप्रीती । अविकळ करवी जगत्कर्ता ॥६६॥
इति श्रीसुभद्रास्वयंवरचंपुकाव्ये अर्जुन सुभद्रासंभाषणकृष्णबलभद्रं संवाद स्वाधीनकरणं नाम पंचम : सर्ग: ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP