अध्याय १५ वा - श्लोक ४५ ते ५२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गताध्वानश्रमौ तम मज्जनोन्मर्दनादिभिः । नीवीं वसित्वा रुचिरां दिव्यस्रग्गंधमंडितौ ॥४५॥
जनन्युपहृतं प्राश्य स्वाद्वन्नमुपलालितौ । संविश्य वरशय्यायां सुखं सुषुपतुर्व्रजे ॥४६॥

गाईंमागें फिरतां रान । मार्गीं श्रमले रामकृष्ण । म्हणोनि करिती श्रमापहरण । अतिसज्ञान जननी या ॥५१॥
केशरकस्तूरीजवादिरोळा । उटणें उटिती उभय बाळां । सुगंध तैलें माखिती मौळां । कुटिल कुंटलां सस्निग्ध ॥५२॥
अमला अंगीं कैचा मळ । परी मायामोह मोहनशीळ । स्नेहें माखूनि म्हणती बाळ । करूनि निर्मळ निजप्रौढी ॥५३॥
सकळ तीर्थां जन्मस्थान । पूज्य पावन जे श्रीचरण । त्यांसि उष्णोदकें स्नान । उद्वर्तनपूर्वक ॥५४॥
उदक वोवाळूनि माथां । दीर्घायुर्भव म्हणती माता । सदीप कुरवंडिया त्वरिता । प्रेमभरिता उजळिती ॥२५५॥
अक्षवाणें लिंबलोण । कर्पूरदीपाचें उजळण । देती आंगें परिमार्जून । दिव्यपरिधान पदकुलें ॥५६॥
दिव्यगंधें अनुलेपनें । आपादमाळा दिव्य सुमनें । सुगंध द्रव्यांचीं उधळणें । धूपार्पणें दीपादि ॥५७॥
इत्यादि उपचार अर्पून । माता करिती श्रमापहरण । सालंकृत रामकृष्ण । स्वेच्छा भोजन सारिती ॥५८॥
स्वादुस्निग्धहृद्यरुचिद । ज्याहूनि अमृत विटकें मंद । ऐसीं अन्नें नानाविध । दोघे बंधु जेविती ॥५९॥
गंडूषपात्रीं उष्णोदकें । प्रक्षालिती करपदमुखें । करोद्वर्तनपूर्वकें । फळें अनेकें स्वादिती ॥२६०॥
दुग्धपक्क क्रमुक फोडी । पर्णें सुपक्क नागरखंडी । खादिर शोधिला केवडीं । चूर्ण आवडी मुक्तांचा ॥६१॥
जाजिपत्रें जाजिफळें । एलदोडे सकंकोळ । कर्पूर कस्तुरी आमोद बहळ । घेती तांबूल उभयतां ॥६२॥
यशोदा रोहिणी स्नेहाळा । आलिंगिती उभय बाळां । करीं कुरवाळूनियां मौळां । वदनकमळां चुंबिती ॥६३॥
मधुरोत्तरीं गुणवर्णन । सकौतुकें उपलालन । ऐसें करूनि श्रमापहरण । मृदुआस्तरण पर्यंकीं ॥६४॥
अंतर्गृहीं सुखशेजारीं । पौढती सुमनशेजेवरी । ऐसे सदैव गोपांपरी । राममुरारि वर्तती ॥२६५॥

एवं स भगवान् कृष्णो वृंदावनचरः क्कचित् । ययौ राममृते राजन् कालिंदीं सखिभिर्वृतः ॥४७॥

ऐसा षड्गुणैश्वर्यपति । वृंदावनीं गोपाकृति । धरूनि विचरे कृपामूर्ति । स्वजनप्रीति वाढवित ॥६६॥
शुक म्हणे गा परीक्षिति । एके समयीं तो श्रीपति । आला यमुनातीराप्रति । स्वसंपत्ति समवेत ॥६७॥
एक नसेचि संकर्षण । येर अवघे गोपगण । स्वगोधनें पुरस्करून । वेणुवादनपूर्वक ॥६८॥
गाई चरती कोमळ तृण । सखयांमाजि खेळे कृष्ण । क्रीडेमाजिं गुंतला पूर्ण । झाले उष्ण कडतर ॥६९॥
सूर्य पातला मध्याह्नीं । गाई पोळल्या तीव्रकिरणीं । क्षुत्पिपासा गोपगणीं । कडकडूनि जाकळिती ॥२७०॥

अथ गावश्च गोपाश्च निदाघातपपीडिताः । दुष्टं जलं पपुस्तस्यास्तृषार्ता विषदूषितम् ॥४८॥

कालियाचें सांडूनि स्थळ । आणीक रानीं निर्मळ जळ । घेऊं न शकती व्याकुळ । केलीं तत्काळ निदाघें ॥७१॥
यानंतरें गाई गोप । उष्णें पावूनि संताप । यमुनातीरां आले कळप । प्याले आप विषदुष्ट ॥७२॥
तें यमुनेचें दुष्ट जळ । तृषार्त प्याले गोगोपाळ । विपरीत दैवें ते तत्काळ । पडिले व्याकुळ भूतळीं ॥७३॥

विषांभस्तदुपस्पृश्य दैवोपहतचेतसः । निपेतुर्व्यसवः सर्वे सलिलांते कुरूद्वह ॥४९॥

ऐसें कुरुकुळचूडामणि । अदृष्टाची विचित्र करणी । मोहितचित्तें गोगोपगणीं । विषजळपानीं प्रवृत्ति ॥७४॥
विषोदकाचें संस्पर्शन । होतांचि अवघे गतप्राण । यमुनेनिकटीं पडिले जाण । पाहे कृष्ण आश्चर्यें ॥२७५॥

वीक्ष्य तान्वै तथाभूतान् कृष्णो योगेश्वरेश्वरः । ईक्षयाऽमृतवर्षिण्या स्वनाथान्समजीवयत् ॥५०॥

गोगोपाळ प्रेतरूप । देखूनि अत्यंत सकृप । कृष्ण योगेश्वरांचा बाप । ससाक्षेप कळवळिला ॥७६॥
गोगोपांच्या रक्षणार्थ । मज अवतार धरणें येथ । तो मी शिरीं असतां नाथ । केंवि अनर्थ यां बाधी ॥७७॥
ऐसें विवरूनि श्रीहरि । कृपामृताची  सुरसरी । करुणापांगें वर्षोनि वरी । प्रेरी शरीरीं चैतन्य ॥७८॥

ते संप्रतीतस्मृतयः समुत्थाय जलांतिकात् । आसन्सुविस्मिताः सर्वे वीक्षमाणाः परस्परम् ॥५१॥

भगवत्कृपाअवलोकनें । समस्त गोपाळ गोधनें । तत्काळ लाहोनि पूर्वस्मरणें । तीरींहूनी ऊठिलीं ॥७९॥
अवघीं विस्मय पावोनि चितीं । परस्परें अवलोकिती । अभ्यंतरीं तर्क करिती । अनुभव पुसती एकमेकां ॥२८०॥

अन्वमंसत तद्राजन् गोविंदानुग्रहेक्षितम् । पीत्वा विषं परेतस्य पुनरुत्थानमात्मनः ॥५२॥

राया अवघे मानिती मनीं । श्रमें पातलों होतों वनीं । तें हें विषोदक प्राशूनी । आम्हीं मरोनि पडलों रे ॥८१॥
गोविंदानुग्रहावलोकनें । पुन्हां अमुचें झालें उठणें । ऐसें बोलूनि अनुमानें । म्हणती कृष्णें वांचविलें ॥८२॥
गोग्रामाचा जो गोपक । तो हा श्रीकृष्ण सर्वात्मक । त्यावीण अवघेंचि मायिक । हा विवेक विवरिला ॥८३॥
धेनुक मारूनि महाखळ । गोपगोधनें विषाक्त जळ । पिऊनि प्रेत झाले सकळ । जीववी गोपाळ कृपादृष्टीं ॥८४॥
इतुकी कथा पंचदशीं । शुकें कथिली परीक्षिति । कालियनिग्रह षोडशीं । परिसावयासि अनुमोदी ॥२८५॥
एकनाथाचें पायवणीं । चिदानंदें घेतली धणी । तेणें स्वानंद भरूनी । गोविंदभाजनीं सांठविलें ॥८६॥
तेथींचा रसाळ बोलावा । प्राप्त झाला दयार्णवा । श्रोतयांच्या सदैव दैवा । दशमस्कंधीं अंकुरला ॥८७॥
इति श्रीमद्भागवत । दशमस्कंध हा विख्यात । बादरायणि नृपा कथित । तो अध्याय समाप्त पंधरावा ॥८८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे दयार्णवानुचरविरचितायां हरिवरदाटीकायां धेनुकवधो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५२॥ टीका ॥ ओंव्या ॥२८८॥ एवं संख्या ॥३४०॥ ( पंधरावा अध्याय मिळून ओवीसंख्या ॥९००२॥ )

पंधरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP