अध्याय सतरावा - श्लोक १५१ ते २१५

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


हिरोनि घेतली बळेंचि दारा ॥ नित्य येऊनि करी मारा ॥ मग ऋष्यमूकपर्वतीं सीतावरा ॥ केला थारा आम्ही येथें ॥५१॥

वाळीस असे येथें शाप ॥ यालागीं राहों सुखरूप ॥ सामासां युद्ध अमूप ॥ दोघांसी होत रघुत्तमा ॥५२॥

आम्हां दोघां समान बळ ॥ परी त्याचे गळां विजयमाळ ॥ तेणें त्याचा प्रताप सबळ ॥ शत्रूंसी पळ सुटतसे ॥५३॥

विकट विषम ताल सात ॥ एकेच बाणें जो छेदी निमिषांत ॥ त्याचे हातें वाळीस मृत्य ॥ भविष्य पूर्वीं केलें हें ॥५४॥

ऐसें बोलतां सूर्यसुत ॥ धनुष्य योजी अवनिजाकांत ॥ अर्धचंद्र बाण त्वरित ॥ आकर्णवरी ओढिला ॥५५॥

मांडी दृढ देहुडें ठाण ॥ पाठीसी उभा लक्ष्मण ॥ त्याचा चरणांगुष्ठ रघुनंदन ॥ पायांखालीं रगडीत ॥५६॥

दडपितां शेषचरणांगुष्ठ ॥ सप्तही ताड जाहले नीट ॥ एकाचि बाणें सपाट ॥ सातही केले राघवें ॥५७॥

सात ताड शेषपृष्ठीवरी ॥ यालागीं निटावले झडकरी ॥ तों दुंदुभीचें प्रेत ते अवसरीं ॥ मित्रसुतें दाखविलें ॥५८॥

हें जो उचलील पुरुषार्थी ॥ वाळीचा मृत्य त्याचे हातीं ॥ चरणांगुष्ठें रघुपति ॥ प्रत ढकली तेधवां ॥५९॥

तेंही तृणप्राय उडोन ॥ पडिलें दिगंतरीं जाण ॥ अद्भुत प्रताप देखोन ॥ सुग्रीव चरणीं लागला ॥१६०॥

मग म्हणे चापपाणी ॥ सुग्रीवा तूं किष्किंधेसी जाऊनि ॥ वाळीतें पाचारूनि आणीं ॥ समरांगणीं युद्धातें ॥६१॥

ऐसें ऐकोनि यथार्थ ॥ सुग्रीवासी आवेश बहुत ॥ म्हणे त्यासी वधील हा निश्र्चित ॥ यदर्थीं संशय असेना ॥६२॥

कमलदलाक्ष कृपाघन ॥ वर्षे स्वानंदामृत जीवन ॥ तें कर्णद्वारें सेवून ॥ सूर्यसुत तृप्त जाहला ॥६३॥

रामचंद्रें अमृताबिंदु टाकिले ॥ तेणें सुग्रीवकर्णचकोर धाले ॥ कीं ते कर्णयाचकतृप्त जाहले ॥ श्रीरामवचननिधानें ॥६४॥

मग तो घासरमणीचा सुत ॥ दशकंठरिपूस विनवित ॥ म्हणे विषकंठवंद्या एक हेत ॥ पूर्ण माझा करीं कां ॥६५॥

तरी अकस्मात टाकोनि बाण ॥ घ्यावा जी वाळीचा प्राण ॥ अवश्य म्हणे जगन्मोहन ॥ भक्त वचनपाळक जो ॥६६॥

मग किष्किंधेसमीप सूर्यकुमर ॥ करीत थोर भुभुःकार ॥ दणाणिलें अवघे नगर ॥ इंद्रपुत्र दचकला ॥६७॥

गळां घालोनि विजयमाळ ॥ वेगीं धांविन्नला वाळी सबळ ॥ म्हणे अरीचा आजि थोर कल्लोळ ॥ कोण साह्य जाहला असे ॥६८॥

तारा म्हणे स्वामी परियेसीं ॥ अंगद गेला होता पारधीसी ॥ तेथें बोलत होते ऋषी ॥ राम सुग्रीवा साह्य जाहला ॥६९॥

तरी राजेंद्रा अवधारा ॥ आपण न जावें समरा ॥ म्हणोन चरणीं लागली तारा ॥ परी शक्रकुमर न माने तें ॥१७०॥

ऐकोनि कुंजराचें गर्जन ॥ कैसा उगा राहे पंचानन ॥ मृग बळेंचि आला चालोन ॥ मग शार्दुळ कैसा स्थिरावे ॥७१॥

शुष्क काननीं प्रळयाग्नी ॥ कैसा राहील शांति धरून ॥ असो सहस्राक्षनंदन ॥ तारेप्रति बोलिला ॥७२॥

म्हणे प्राणप्रिये परियेसीं ॥ षण्मासां येतो युद्धासी ॥ आजि आला तिसरे दिवशीं ॥ उल्हासेंसी गर्जत ॥७३॥

घायीं शरीर त्याचें जर्जर ॥ तैसें माझेंही जाहलें चूर ॥ त्यासी साह्य वायुकुमर ॥ तेणें वीर आणिला कोणी ॥७४॥

तरी तारे तूं आणि अंगद ॥ सुखें भोगा राज्यपद ॥ आजि सुग्रीवाचा करीन वध ॥ तरीच येईन माघारा ॥७५॥

नाहीं तरी भेठ हेचि ॥ बोलोन वाळी उठे तैसाचि ॥ जैसी उडी पंचाननाची ॥ मातंगासी लक्षोनियां ॥७६॥

जैसा पर्वतावरी पर्वत पडला ॥ तैसा सुग्रीवावरी आदळला ॥ आवेशें झगडती ते वेळां ॥ कांपों लागली धरित्री ॥७७॥

मल्लयुद्ध होता अनिवार ॥ गुप्त पाहे अवनिजावर ॥ तों दोघे सारिखे दिसती वीर ॥ कोणावरी शर टाकावा ॥७८॥

मारुति म्हणे अयोध्यापति ॥ हे दोघे एकसारिखे दिसती ॥ मग सुमनहार त्वरितगती ॥ समीरसुतें गुंफिला ॥७९॥

सुग्रीवाचे गळां घालीं ते क्षणीं ॥ विलोकित कैवल्यदानी ॥ दोघे हांक देत गगनीं ॥ प्रतिध्वनी उठताती ॥१८०॥

वज्राऐसे कठोर ॥ हाणिती तेव्हां मुष्टिप्रहार ॥ भूगोळ कांपत समग्र ॥ दणाणित पाताळें ॥८१॥

शत योजनें झाडें उपडोनि ॥ निजबळें घालिती उचलोनि ॥ उसळें तरू धांवती गगनीं ॥ विमानें पळविती देव पैं ॥८२॥

चक्राकार फिरविती पर्वत ॥ न कळतां टाकिती अकस्मात ॥ क्षणक्षणां भूकंप होत ॥ ग्रीवा सरसावी भोगींद्र ॥८३॥

हृदयीं समर्पित वज्रमुष्टी ॥ तेणें उडुगणांची होत वृष्टी ॥ गगनीं देवांचियां थाटी ॥ युद्ध दृष्टीं विलोकिती ॥८४॥

असो सहस्राक्षाचा सुत ॥ सुग्रीवासी हाणी मुष्टिघात ॥ कासावीस सूर्यसुत ॥ मागें पाहत रामाकडे ॥८५॥

वीर सांपडतां रणमंडळीं ॥ बंधूची वाट पाहे ते वेळीं ॥ तैसा सुग्रीव हृदयकमळीं ॥ दीनबंधूतें आठवी ॥८६॥

म्हो कां न सरे माझा भोग ॥ कृपा न करी अवनिजारंग ॥ जो विषकंठहृदयपद्मभृंग ॥ दशकंठदर्पदमन जो ॥८७॥

असो इकडे कौसल्यानंदन ॥ तूणीरांतून काढी दिव्य बाण ॥ जैसी कल्पांत मेघांतून ॥ चपळा बाहेर निघे पैं ॥८८॥

धनुष्यावरी लावून बाण ॥ लक्ष साधिलें दुरोन ॥ वाळीचे हृदयीं येऊन ॥ अकस्मात खडतरला ॥८९॥

बाण लागला सतेज ॥ जैसी गिरिवरी पडे वीज ॥ कीं काद्रवेय देखतां अरुणानुज ॥ येऊन झडपी जैसा कां ॥१९०॥

कीं अभाग्यावरी धाड पडे ॥ राहुमुखीं शशी सांपडे ॥ कीं तपस्वियावरी सांकडें ॥ व्यसन नसतेंचि आदळे ॥९१॥

कीं तृतीयनेत्रींचा अग्न ॥ मन्मथावरी पडे येऊन ॥ तैसा वाळीचे हृदयीं बाण ॥ एकाएकीं संचरला ॥९२॥

महावृक्ष उन्मळिला ॥ कीं पर्वत भूमीवरी आदळला ॥ तैसा वाळीनें देह टाकिला ॥ भूमंडळीं ते काळीं ॥९३॥

वाळीचा देहांत जाणोनी ॥ जवळी आला चापपाणी ॥ इंद्रतनुज ते क्षणीं ॥ काय बोलता जाहला ॥९४॥

तूं क्षत्रिय एकपत्नीव्रती ॥ दुसरी वरिली कां अपकीर्ति ॥ अन्याय नसतां रघुपती ॥ बाण कां व्यर्थ टाकिला ॥९५॥

तूं सत्यवचनी यशवंत ॥ महाप्रतापी रणपंडित ॥ तुझी अपकीर्ति त्रिभुवनांत ॥ जाहली सत्य राघवेशा ॥९६॥

न हटकितां टाकिला शर ॥ मग बोले जानकीवर ॥ मर्कटा तूं केवळ वनचर ॥ तुज कासया हटकावें ॥९७॥

वीर असेल त्यासि हटकावें ॥ वनचरांसी गुप्तचि वधावें ॥ पारधियें मृग साधावे ॥ पाचारावें कासया ॥९८॥

तूं परम अन्यायी वानर ॥ बंधुस्त्रीअभिलाषी अनाचार ॥ म्यां दुष्ट दंडावया अवतार ॥ घेतला असे मर्कटा ॥९९॥

ऐसें ऐकतां ते काळीं ॥ हृदयीं सद्रद जाहला वाळी ॥ म्हणे मी पावन झालों ये वेळीं ॥ तुझेनि हस्तें राघवा ॥२००॥

थोर सुकृताचे पर्वत ॥ दृष्टीभरी देखिला रघुनाथ ॥ माझें सार्थक झालें यथार्थ ॥ नाहीं अंत निजभाग्या ॥१॥

येच मार्गीं जनकनंदिनी ॥ दश्ग्रीव गेला घेउनी ॥ मी त्यासी आणितों बांधोनी ॥ एक क्षण न लागतां ॥२॥

कक्षेमाजीं दाटून ॥ चतुःसमुद्रीं केलें स्नान ॥ पालखावरी आणोन ॥ अंगदाच्या बांधिला ॥३॥

मग पौलस्तीनें भिक्षा मागून ॥ नेला दशकंठ सोडवून ॥ त्या मशकाचा पाड कोण ॥ काय उशीर आणावया ॥४॥

माझें कर्म परम बळी ॥ तुझी सेवा नाहीं घडली ॥ राजीववाक्ष ते वेळीं ॥ स्नेहाळपणें बोलिला ॥५॥

तुझे हृदयींचा उपटोनि बाण ॥ आतां तुज सावध करीन ॥ मग म्हणे इंद्रनंदन ॥ ऐसें मरण पुढें नये ॥६॥

तुझेंनि हातें देहांत ॥ तूं दृष्टीपुढें रघुनाथ ॥ ऐसें बोलतां शक्रसुत ॥ सुग्रीव जवळी पातला ॥७॥

नेत्रीं स्रवती जळबिंदु ॥ उचंबळला शोकसिंधु ॥ मग वाळीनें तो कनिष्ठबंधु ॥ प्रीतीनें जवळी बैसविला ॥८॥

काढोनियां विजयमाळा ॥ घातली सुग्रीवाचे गळां ॥ म्हणे धन्य धन्य अनुजा वेल्हाळा ॥ दृष्टीं दाविला श्रीराम ॥९॥

धन्य धन्य तुझें वैर ॥ अंतीं दाविला रघुवीर ॥ वैर नव्हे हा स्नेह थोर ॥ मजलागीं तुवां केला ॥२१०॥

आतां रघुनाथसेवा प्रीतीं ॥ तुम्ही करावी अहोरातीं ॥ साह्य होऊनि सर्वाथीं ॥ सीतासती सोडविजे ॥११॥

ऐसें शक्रतनुज बोलोन ॥ विलोकिलें राघवध्यान ॥ तात्काळ देह सोडून ॥ वाळी जाहला विदेही ॥१२॥

विष्णुदूत येऊन ॥ नेला विमानीं बैसवून ॥ याउपरी तारेचें समाधान ॥ रघुनंदन करील पैं ॥१३॥

ते सुरस कथा अपार ॥ संतीं परिसावी सादर ॥ ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग चरित्र वर्णील हें ॥१४॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

सप्तदशाध्याय गोड हा ॥२१५॥

ओंवीसंख्या ॥२१५॥

॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP