अध्याय सतरावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


जनक पवन धांवे ते समयीं ॥ आत्मज धरिला दृढ हृदयीं ॥ म्हणे बारे शरण लवलाहीं ॥ रामचंद्रासी जाईं कां ॥५१॥

हा अवतरला शेषशायी ॥ जाण क्षीराब्धीचा जांवई ॥ दृढ लागें त्याचे पायीं ॥ कायावाचामानसें ॥५२॥

मग श्रीरामासी हनुमंत ॥ येवोनी लोटांगण घालित ॥ मागुती उठोनि धरित ॥ श्रीरामचरण सप्रेमें ॥५३॥

उठोनियां रघुवीर ॥ हृदयी धरिला वायुकुमर ॥ एक जाहले हरिहर ॥ जयजयकार करिताती ॥५४॥

श्रीराम म्हणे हनुमंता ॥ जोंवरी शशी आणि सविता ॥ तोंवरी अक्षयी हो तत्वतां ॥ बलार्णव अद्भुत तूं ॥५५॥

कैकयीहस्तींचा पूर्ण पिंड ॥ अंजनीहातीं पडला अखंड ॥ तो हा वीर जन्मला प्रचंड ॥ राघवाहून पूर्वीच ॥५६॥

असो जोडोनि दोनी कर ॥ हनुमंत उभा राहे समोर ॥ म्हणे हे राम करुणासमुद्र ॥ जगदुद्धार दीनबंधु ॥५७॥

हे राम भुवनसुंदरा ॥ हे राम जनकजावरा ॥ हे राम नवपंकजनेत्रा ॥ पुराणपुरुषा जगदात्मया ॥५८॥

परम भक्त जाणोन ॥ हनुमंतासी भेटला लक्ष्मण ॥ करीं धरून वायुनंदन ॥ सीतावल्लभें बैसविला ॥५९॥

रामचरण चुरी मारुति ॥ म्हणे रघुवीरा ऐक एक विनंती ॥ पैल ऋष्यमूक पर्वतीं ॥ वसे कपिपति सुग्रीव ॥६०॥

अभयवर देशील त्यातें ॥ तरी आतां भेटवीन तयातें ॥ बहुत कार्य तयाचेनि हातें ॥ पुढें साधेल श्रीरामा ॥६१॥

मग बोले रघुनंदन ॥ सुग्रीव हा कोणाचा कोण ॥ हनुमंत सांगे पूर्वकथन ॥ सावधान परिसावें ॥६२॥

कमलोद्भव करितां ध्यान ॥ प्रेमोदकबिंदु नेत्रींहून ॥ अंजुळींत पडतांचि पूर्ण ॥ ऋक्षरजा जन्मला ॥६३॥

तो ब्रह्मयाचा प्रियनंदन ॥ वानरवेष बळ गहन ॥ हिंडतां वनोपवन ॥ शिवलोकाप्रति गेला ॥६४॥

तंव देखिलें रम्य सरोवर ॥ भोंवते सदाफळ तरुवर ॥ परी तेथें शाप दुर्धर ॥ अपर्णेचा होता पूर्वीं ॥६५॥

जो नर सेवील येथींचें पाणी ॥ तो नारी होईल तत्क्षणीं ॥ हें ऋक्षराजें नेणोनी ॥ उडी जीवनीं घातली ॥६६॥

स्नान करून निघतां बाहेर ॥ जाहलें स्त्रियेचें शरीर ॥ रंभेहून परम सुंदर ॥ होय विचित्र ते काळीं ॥६७॥

तों मित्र इंद्र दोघेजण ॥ आले सुंदर स्त्री वरूं म्हणोन ॥ तंव तो ब्रह्मपुत्र लाजोन ॥ स्त्री होऊन बैसला ॥६८॥

न घडे तयेसीं सुरत ॥ मग दोघीं त्यागिलें रेत ॥ आधीं शक्रवीर्य मस्तकीं पडत ॥ वाळी तेथें जन्मला ॥६९॥

मागून सूर्यवीर्य पडलें ग्रीवेवरी ॥ तेथें सुग्रीव जन्मला ते अवसरीं ॥ विरिंचि पातला झडकरी ॥ तों पुत्र नारी जाहला असे ॥७०॥

मग तेणें प्रार्थोनि पार्वती ॥ उःशाप मागे पुत्राप्रती ॥ कामिनीभाव हरोनि मागुती ॥ पुत्र केला पूर्ववत ॥७१॥

दोघे पौत्र आणि सुत ॥ घेवोनि चालिला पद्मजात ॥ मग मृत्युलोकीं अद्भुत ॥ किष्किंधा नगर रचियेलें ॥७२॥

धाकुटा सुग्रीव वडील वाळी ॥ ऋक्षरजा घेऊनि ते काळीं ॥ किष्किंधाराज्य भूमंडळीं ॥ केलें तेणें बहुकाळ ॥७३॥

वाळी सुग्रीवासी तत्वतां ॥ ऋक्षरजा मातापिता ॥ पुढें वाळीस देऊन राज्यार्था ॥ धरिलें छत्र सुमुहूर्तें ॥७४॥

करोनियां योगसाधन ॥ ऋक्षरजा पावला ब्रह्मसदन ॥ पुढें वाळी सुग्रीव दोघेजण ॥ बंधु समान सारिखे ॥७५॥

इंद्रे वाळीस विजयमाळ ॥ दीधली म्हणोनि तो सबळ ॥ समरीं शत्रु होय निर्बळ ॥ वाळीप्रताप देखतां ॥७६॥

सूर्यें सुग्रीव करीं धरिला ॥ आणोन माझे हाती दीधला ॥ तूं सांभाळीं यासी दयाळा ॥ म्हणोनियां प्रार्थिलें ॥७७॥

सुग्रीव आणि वाळीमध्यें ॥ वैर लागलें राज्यसंबंधें ॥ पुढें वाळी सुग्रीवासि क्रोधें ॥ वधावयासी धांविन्नला ॥७८॥

सुग्रीवाची स्त्री रुमा रूपवंत ॥ वाळीनें घातली घरांत ॥ सुग्रीवें धरिला ऋष्यमूक पर्वत ॥ युद्ध होत षण्मासां ॥७९॥

माझी सूर्यें घेतली भाक ॥ तूं सुग्रीवाची पाठी राख ॥ ऐसें ऐकतां अयोध्यानायक ॥ काय बोलता जाहला ॥८०॥

हनुमंता भाक घे पूर्ण ॥ मज अत्यंत प्रिय सूर्यनंदन ॥ सत्वर आणि बोलावून ॥ भेटीस मन उताविळ ॥८१॥

तयाचा शत्रु वधोन ॥ त्यासी देईल छत्र सिंहासन ॥ याउपरी जानकी चिद्रत्र ॥ शोधूनि काढूं साक्षेपें ॥८२॥

ऐसें बोलतां जनकजामात ॥ तेथून उडाला हनुमंत ॥ येऊनि सुग्रीवास सांगत ॥ भाग्य अद्भुत उदेलें ॥८३॥

सीतावियोगें दुःखी रघुराज ॥ रुमावियोगें दुःखी तूं सहज ॥ तरी एकमेकाचें पूर्ण काज ॥ करा आतां परस्परें ॥८४॥

एकोनि मारुतीचें वचन ॥ आनंदें नाचे सूर्यनंदन ॥ हनुमंतातें आलिंगून ॥ पाठी हातें थोपटी ॥८५॥

रघुनाथप्राप्तीसी तत्वतां ॥ तूं सद्रुरु होय हनुमंता ॥ उतराई काय होऊं आतां ॥ उपकार तत्वतां न विसरें ॥८६॥

दशरथामज रघुपति ॥ त्याची किर्ति पूर्वीं ऐकिली होती ॥ पंचवटीस करोनि वस्ती ॥ पिशिताशन मारिले ॥८७॥

असो घेऊन वानरांचे भार ॥ नळ नीळ जांबुवंत वीर ॥ सुग्रीव आला जेथें रघुवीर ॥ त्रिभुवनसुंदर देखिला ॥८८॥

कोट्यानुकोटी मीनकेतन ॥ ज्यावरून सांडावे ओंवाळून ॥ तमालनीळ स्वरूप सगुण ॥ सुग्रीवें नेत्रीं विलोकिला ॥८९॥

लोटांगण घाली सुग्रीव ॥ नळ नीळादि वानर सर्व ॥ ऐसें देखोनि सीताधव ॥ पुढें धांवत भेटावया ॥९०॥

धरोनियां दोनी कर ॥ उठविला स्वयें भानुकुमर ॥ हृदयीं धरितां रघुवीर ॥ सुख अपार सुग्रीवा ॥९१॥

अत्यंत जाहला क्षुधातुर ॥ तया भेटला क्षीरसागर ॥ कीं दरिद्रियासी अपार ॥ द्रव्य घरीं सांपडलें ॥९२॥

कीं आळशाचें गृह शोधित ॥ कल्पवृक्ष आला अकस्मात ॥ की चुकलें बाळक भेटत ॥ जननीयेसी प्रीतीनें ॥९३॥

कीं तृषाक्रांत पडिला वनीं ॥ त्यापुढें लोटे मंदाकिनी ॥ तैसा सुग्रीवाचे मनीं ॥ ब्रह्मानंद उचंबळला ॥९४॥

जीव शिव एक भाव ॥ तैसें भेटीचें वैभव ॥ तेव्हां विमानारूढ देव ॥ सुमनसंभार वर्षती ॥९५॥

नळ नीळ जांबुवंत ॥ आणिक वानर समस्त ॥ तयांसी रघूत्तम आलिंगित ॥ आनंद गगनीं न समाये ॥९६॥

हनुमंतें तये वेळे ॥ पसरिले वृक्षडाहाळे ॥ मध्यें अग्नीसि साक्ष ठेविलें ॥ दोहींकडे बैसविले दोघेजण ॥९७॥

सुग्रीव आणि रघुनाथ ॥ उभयतांस म्हणे हनुमंत ॥ एकमेकांचा कायार्थ ॥ साह्य होऊनि साधावा ॥९८॥

रघुवीर म्हणे राज्य आणि दारा ॥ सोडवूनि देतों रविकुमरा ॥ हा माझा निर्धार खरा ॥ उदयीकचि पहाल ॥९९॥

अर्कज म्हणे जेणें नेली सीता ॥ त्यासी संहारून तत्वतां ॥ अयोध्येसी नेईन रघुनाथा ॥ मंगळभगिनीसहित पैं ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP