अध्याय सतरावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

संत आणि इतर जन ॥ दिसती समसमान ॥ परी संत आनंदघन ॥ ब्रह्मानंदें डुल्लती ॥१॥

बकासंगे असतां मंराळ ॥ दिसती सारिखे शुद्ध धवळ ॥ परी क्षीर आणि जळ ॥ करिती वेगळें हंसचि ॥२॥

वायसांत वसे कोकिळ ॥ त्यांच्या सारखी दिसे केवळ ॥ परी प्रवर्ततां वसंतकाळ ॥ पंचमस्वरें आवळी ती ॥३॥

जंबुकवनांत वाढला केसरी ॥ परी त्याची कैसी पावेल सरी ॥ क्षणमात्रें गज विदारी ॥ हांकें भरी निराळ ॥४॥

स्फटिकांत मुक्ताफळ जाण ॥ दिसे सारिखें समसमान ॥ मुक्त जोहरी काढिती निवडोन ॥ करिती जतन जीवेंसीं ॥५॥

पाषाणांत परिस असे पूर्ण ॥ दिसे तैसाचि जड कठिण ॥ परी तो करी लोहाचें सुवर्ण ॥ कृष्णवर्णा लपवोनि ॥६॥

कस्तुरी आणि मृत्तिका ॥ दिसे रंग एकसारिखा ॥ परी मृगमद सुवासें सकळिकां ॥ श्रीमंतांसी नीववी पैं ॥७॥

तक्र दुग्ध एकवर्ण ॥ परी दुग्ध गोड सकळांसी मान्य ॥ तैसीं संतांचीं रूपें जाण ॥ इतरांसमान न म्हणावीं ॥८॥

ऐसें संत आनंदघन ॥ रामविजय परम पावन ॥ करावया बैसले श्रवण ॥ अतिआदरें करोनियां ॥९॥

आतां किष्किंधाकांडकमळावरी ॥ क्रीडेल वाग्देवी भ्रमरी ॥ तरी तो सुरस अंतरीं ॥ सदा चतुरीं सांठविजे ॥१०॥

षोडशाध्यायीं कथा परिकर ॥ पंपासरोवरासी रघुवीर ॥ आला सजलजलदगात्र ॥ ध्याय त्रिनेत्र जयातें ॥११॥

तों ऋष्यमूक पर्वतावरी ॥ उभे पांच वानर ते अवसरीं ॥ किंवा ते पांच केसरी स्वलीला उभे ठाकले ॥१२॥

कीं कनकाद्रीचीं रत्नें मांडित ॥ पंचश़ृंगें विराजित ॥ कीं उगवले पंच आदित्य ॥ उदयाचळीं एकदां ॥१३॥

कीं साह्य व्हावया रघूत्तमातें ॥ अवतरलीं पंचमहाभूतें ॥ कीं तें पंचायतन शोभतें ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥१४॥

ते पंपासरोवराचे तीरीं ॥ श्रीराम स्फटिकशिळेवरी ॥ सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून पहुडला ॥१५॥

देखतां सौमित्र राघव ॥ भयभीत जाहला सुग्रीव ॥ म्हणे वालीनें हे दोघें मानव ॥ वीर येथें पाठविले ॥१६॥

माझा घात करावया ॥ शत्रूनें दिधले पाठवूनियां ॥ म्हणोनि सुग्रीव तेथोनियां ॥ जाता जाहला सत्वर ॥१७॥

चौघांस न पुसतां तेथून ॥ पळे वेगें मित्रनंदन ॥ वनोपवनें लंघोन ॥ समीरवेगें चालिला ॥१८॥

मग सवेग धांवोनि हनुमंत ॥ उभा केला सूर्यसुत ॥ म्हणे तूं कां भितोसि येथ ॥ काय विपरीत देखिलें ॥१९॥

सुग्रीव म्हणे दोघे धनुर्धर ॥ दिसती परम प्रचंड वीर ॥ त्यांसी विलोकितां भय अपार ॥ माझे हृदयीं संचरलें ॥२०॥

आजि म्यां स्वप्न दिखिलें ॥ दोघे धनुर्धर साह्य जाहले ॥ वालीस वधोनि राज्य दिधलें ॥ किष्किंधचें मजलागीं ॥२१॥

अरुणोदयीं देखिलें स्वप्न ॥ सवें पातले दोघेजण ॥ परी मज धीर न धरवे जाण ॥ भयेंकरून व्यापिलों ॥२२॥

यावरी बोले वायुनंदन ॥ आम्ही असतां चौघे प्रधान ॥ कृतांतासी शिक्षा लावून ॥ तुजला रक्षूं सर्वदा ॥२३॥

तरी हे पंपातीरी दोघेजण ॥ बैसले वीर दैदीप्यमान ॥ कीं बृहस्पति आणि सहस्रनयन ॥ तैसे दोघे दिसती ॥२४॥

कीं एक तपस्वी एक उदास ॥ एक औदार्य एक धैर्य विशेष ॥ कीं एक पुण्य एक यश ॥ तैसे दोघे दीसती ॥२५॥

कीं एक ज्ञान एक विज्ञान ॥ एक आनंद एक समाधान ॥ कीं एक सगुण एक निर्गुण ॥ दोनी स्वरूपें हरीचीं ॥२६॥

एक साधक एक सिद्ध ॥ एक वैराग्य एक बोध ॥ एक मोक्ष एक ब्रह्मानंद ॥ तैसे दोघे दीसती ॥२७॥

यांचिया आगमनें पाहीं ॥ आनंद दाटला माझे हृदयीं ॥ यांचा समाचार लवलाहीं ॥ जाऊन आतां आणितों ॥२८॥

त्यांचिया बोलावरून ॥ कळेल त्यांचें अंतःकरण ॥ स्वाद घेतां रस पूर्ण ॥ चतुर जैसा ओळखे ॥२९॥

अरुणोदयावरून ॥ रजनी सरली कळे ज्ञान ॥ कीं दाहकत्व निरसतां अग्न ॥ शांत जाहला जाणिजे ॥३०॥

कीं संकटसमयावरून ॥ जाणिजे बंधु मित्रजन ॥ कीं इंद्रियनियमनें पूर्ण ॥ योगाचरण जाणिजे ॥३१॥

कीं दयेवरून कळे शांति ॥ कीं तर्कावरून कळे धृती ॥ कीं वेदांत श्रवणें निवृत्ती ॥ दशा बाणली जाणिजे ॥३२॥

कीं प्रेमरसावरून भक्ति ॥ कीं निरपेक्षेवरून विरक्ति ॥ कीं पावला अद्वय मुक्ति ॥ इहपरत्रीं जाणिजे ॥३३॥

तैसें त्यांचें अंतर समस्त ॥ मी आणितों तूं राहें स्वस्थ ॥ जरी तेथें असेल विपरीत ॥ हस्तसंकेत दावीन तूतें ॥३४॥

ऐसें बोलोनि हनुमंत ॥ पंपातिरासी आला त्वरित ॥ वटवृक्षातळीं रघुनाथ ॥ पहुडलासे श्रमोनियां ॥३५॥

स्फटिकशिळा दैदीप्यमान ॥ जेवीं शेषतल्पक शुभ्रवर्ण ॥ त्यावरी श्रावणारिनंदन ॥ विराजमान दिसतसे ॥३६॥

तंव त्या वटावरी हनुमंत ॥ कौतुकें करोनि उड्डाण करीत ॥ लक्षोनियां रघुनाथ ॥ हर्षें दावी वांकुल्या ॥३७॥

ऐसा देखानि वानर ॥ सौमित्रासी दावी रघुवीर ॥ पैल पाहें तो कपिवर ॥ पंचशर तोडरीं असे ॥३८॥

झळकताहे हेमकौपीन ॥ वज्रबंधन च चळे मदन ॥ माझें चित्त स्नेहेंकरून यासी देखोन भरलें असे ॥३९॥

मातेचें वचन हनुमंत ॥ आठवी तेव्हां हृदयांत ॥ जो ओळखे कौपीन गुप्त ॥ तोचि स्वामी तुझा असे ॥४०॥

तो प्रत्यया आला सकळ ॥ परी माझें अद्भुत बळ ॥ हा दिसतसे कोमळ ॥ तमाळनीळ साजिरा ॥४१॥

शिष्यापरीस आगळें बळ ॥ गुरूस असावें बहुसाल ॥ मग वटशाखा मोडोनि सबळ ॥ रामावरी टाकिली ॥४२॥

तें देखतां उर्मिलाजीवन ॥ चापासी वेगें चढविला गुण ॥ मग बोले कौसल्यानंदन ॥ स्थिर राहें नावेक ॥४३॥

बाळकौतुक पाहें साचार ॥ त्यावरी काय टाकिसी शर ॥ तों उताणा पहुडला रघुवीर ॥ तंव शाखा सत्वर आली वरी ॥४४॥

कोदंडदंडे ते अवसरीं ॥ शाखा ताडिती वरच्यावरी ॥ ते उडोनि गेली अंबरीं ॥ तृणतुल्य तेधवां ॥४५॥

आणीकही वृक्ष पाषाण ॥ वरी टाकी वायुनंदन ॥ तेही कौसल्यागर्भरत्न ॥ कोदंडेंकरून उडवित ॥४६॥

मग गर्जोनियां हनुमंत ॥ सोडी तेव्हां पंच पर्वत ॥ परी न उठेचि रघुनाथ ॥ कौतुकें हांसे ते काळीं ॥४७॥

मग रघुनाथें एक बाण ॥ चापासी लाविला न लागतां क्षण ॥ पांच पर्वत पिष्ट करून ॥ बाणें गगन भेदित ॥४८॥

शरपिसारा लागला किंचित ॥ तेणें उडोनि गेला हनुमंत ॥ गगनीं गरगरां भोंवत ॥ प्राण होत कासाविस ॥४९॥

वातचक्रीं पडतां तृण ॥ तें भूमीस न पडे मागुतेन ॥ त्यापरी वायुनंदन ॥ कासाविस होतसे ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP