अध्याय सतरावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ऐसें ऐकतां उत्तर ॥ भुभुःकारें गर्जती वानर ॥ तेणें नांदें अंबर ॥ दणाणलें ते समयीं ॥१॥

सुग्रीव म्हणे रघुनंदना ॥ कालचि एक सुंदर ललना ॥ राक्षस घेऊन गेला जाणा ॥ निराळमार्गें त्वरेनें ॥२॥

आम्ही समस्त देखिली नयनीं ॥ आक्रंदत करुणावचनीं ॥ म्हणे रामा धांव निर्वाणीं ॥ चापपाणि करुणाकरा ॥३॥

क्षणभरि म्हणे सौमित्रा ॥ धांव धांव परम पवित्रा ॥ मागुती म्हणे स्मरारिमित्रा ॥ राजीवनेत्रा धांव वेगीं ॥४॥

तिनें उत्तरीय वस्त्र फाडोनी ॥ आभरणें टाकिलीं बांधोनी ॥ आम्हीं तीं ठेविलीं जतन करूनि ॥ राम ऐकोनि विस्मित ॥५॥

म्हणे नवल सांगती वानर ॥ सत्वर आणिले अलंकार ॥ घेऊनि आला वायुकुमर ॥ देत रघुवीराकरीं तेव्हां ॥६॥

तंव लवलाहें ग्रंथि सोडित ॥ आभरणें ओळखिलीं समस्त ॥ अहा प्रिये म्हणोनि रघुनाथ ॥ टाकी शरीर धरणीवरी ॥७॥

हृदयीं धरोनि अलंकार ॥ शोकार्णवीं पडला रघुवीर ॥ सद्रद होती समस्त वानर ॥ नयनीं नीर लोटलें ॥८॥

आठवोनी सीतेचे गुण ॥ विलाप करी रघुनंदन ॥ धांवोनियां लक्ष्मण ॥ धरी चरण रघुपतीचे ॥९॥

सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ सखया ओळखें अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकजा आंगीं होते ते ॥११०॥

सौमित्रें अलंकार घेऊनि ॥ सादर होऊनि पाहे नयनीं ॥ म्हणे हीं नेपुरें सीतेचे चरणीं ॥ ओळखलीं म्यां साच पैं ॥११॥

नेपुरें ओळखिली साचार ॥ वरकड नेणें मी अलंकार ॥ राम म्हणे निरंतर ॥ जनकात्मजा लेत होती ॥१२॥

सौमित्र म्हणे सीता माउली ॥ म्यां कधीं नाहीं विलोकिली ॥ त्रिकाळ नमनाचे वेळीं ॥ नेपुरें चरणीं देखिली म्यां ॥१३॥

ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ आनंदला रघुनंदन ॥ म्हणे बा रे तूं दिव्य रत्न ॥ वैराग्यवैरागरींचें ॥१४॥

तूं भक्तसरोवरींचा राजहंस ॥ कीं ज्ञानमुक्ताफळमांदुस ॥ कीं शत्रुविपिनहुताश ॥ सदा निर्दोष सूर्य जैसा ॥१५॥

सुग्रीव म्हणे रविकुळमंडणा ॥ जरी जानकी तुज भेटवींना ॥ तरी मी भोगीन यमयातना ॥ कल्पपर्यंत निर्धारें ॥१६॥

नळ नीळ जांबुवंत ॥ माझे प्रधान जगविख्यात ॥ भूगोल हा क्षण न लागत ॥ उचलोनि घालिती पालथा ॥१७॥

आतां रघुपति तुझी आण ॥ स्वर्ग मृत्यु पाताळ शोधून ॥ जानकी आणीन हें प्रमाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१८॥

मग बोले मखपाळण ॥ तुज तारा राज्य दिधल्यावांचून ॥ सीताशुद्धि न करीं आण ॥ श्रावणारीची जाण पां ॥१९॥

तुझें कार्य न होतां आधीं ॥ कदा न करीं मी सीताशुद्धि ॥ ही माझी प्रतिज्ञा त्रिशुद्धि ॥ ती काळत्रयीं टळेना ॥१२०॥

गुरुकृपेंवीण ज्ञान ॥ कीं आवडीविण भजन ॥ कीं प्रेमाविण कीर्तन ॥ स्नानेंविण अनुष्ठान जैसें ॥२१॥

कीं अतिथीविण भोजन ॥ कीं वीरश्रीविण रण ॥ कीं विप्र जैसा विद्येविण ॥ सर्व जन निंदिती ॥२२॥

तैसें तुझें कार्य न होतां ॥ सीताशुद्धि न घें सर्वथा ॥ ऐसें बोलतां रघुनाथा ॥ वीरश्री आंगीं दाटली ॥२३॥

चढविला चापासी गुण ॥ म्हणे बोलावी शक्रनंदन ॥ सुग्रीव धांवोनि धरी चरण ॥ कर जोडोनि विनवित ॥२४॥

म्हणे वाळीचा मार अनिवार ॥ आपण युद्ध न करावें समोर ॥ अकस्मात टाकिजे शर ॥ तरी संहार होय पैं ॥२५॥

मंगळजननी जामात ॥ सुग्रीवासी पुसे वृत्तांत ॥ वाळीसी तुज वैर अद्भुत ॥ काय कारण पडावया ॥२६॥

सुग्रीव सांगे पूर्व वृत्तांत ॥ म्हैसासुर नामें दैत्य अद्भुत ॥ त्याचा दुंदुभि वीर्यजात ॥ परम बलिष्ठ जन्मला ॥२७॥

महा उन्मत्त मद्यपानी ॥ कलह माजवावया हिंडे वनीं ॥ परी त्यासी समरांगणीं ॥ युद्धा कोणी भेटेना ॥२८॥

मग दैत्य गेला यमाजवळी ॥ म्हणे मजसीं मांडी युद्धफळी ॥ येरू म्हणे किष्किंधेसीं वाळी ॥ त्याजवळी जाय वेगीं ॥२९॥

ऐकोनि आला किष्किंधेजवळी ॥ जैसा मूषक निघे व्याळबिळीं ॥ कीं व्याघ्राची पहावया जाळी ॥ जंबुक जैसा पातला ॥१३०॥

दैत्य हांक फोडी तयेवेळीं ॥ ऐकतां धांविन्नला वीर वाळी ॥ जैसा मृगेंद्र कव घाली ॥ मातंग दुरी देखतां ॥३१॥

शत योजनें शरीर विशाळ ॥ वाळीनें पदीं धरिला तात्काळ ॥ भूमीवरी आपटिला सबळ ॥ भूमंडळ दणाणिलें ॥३२॥

कायेंतून गेला प्राण ॥ मग प्रेत त्याचें परम पवित्रा ॥ भवंडोन ॥ रागें दिधलें भिरकावून ॥ ऋष्यमूक पर्वतावरी ॥३३॥

शतयोजनें कलेवर ॥ ऋषीचें आश्रम मोडले समग्र ॥ तेथें मुख्य मातंग ऋषीश्र्वर ॥ तेणें शाप दीधला ॥३४॥

या पर्वता स्पर्शतां शक्रनंदन ॥ तात्काळ जाईल त्याचा प्राण ॥ दुंदुभीचें प्रेत जाण ॥ पडलें आहे अद्यापि ॥३५॥

मग मयासुर दुंदुभीचा सुत ॥ पितृसूड घ्यावया त्वरित ॥ पतंग अग्नीस मागत ॥ सूड खांडववनाचा ॥३६॥

सर्पाचा सूड समूळभं ॥ सुपर्णासी मागे अळी ॥ तैसा मयासुर ते काळीं ॥ बाहे वाळीस युद्धातें ॥३७॥

शक्रसुत धांविन्नला त्वरित ॥ जैसे पर्वतावर वज्र पडत ॥ तैसा मयासुर मुष्टिघात ॥ देतां वर्मित रक्तासी ॥३८॥

पाताळविवरद्वारें ॥ मयासुर पळाला त्वरें ॥ त्याचे पाठीमागें शक्रकुमारें ॥ धांव घेतली पाताळा ॥३९॥

विवरद्वारीं मी रक्षण ॥ राघवा बैसलों बहुत दिन ॥ तों यक्ष गंधर्व मिळून ॥ किष्किंधा घेऊं धांविन्नले ॥४०॥

रायाविण कोण राखे पुरी ॥ धाकें दुर्ग ओलांडिले वानरीं ॥ प्रधान प्रजा ते अवसरीं ॥ मज सांगती गाऱ्हाणें ॥४१॥

मग विवरमुखीं ठेविला पर्वत ॥ किष्किंधेस पातलों त्वरित ॥ शत्रु आटोनि समस्त ॥ प्रजा सुखी राखिल्या ॥४२॥

विंशति मासपर्यंत ॥ वाळी विवरीं जाहला गुप्त ॥ मग प्रधान प्रजा समस्त ॥ म्हणती शक्रसुत निमाला ॥४३॥

सकळीं आग्रह करून बळें ॥ राजछत्र मज दिधलें ॥ तों मयाचें शिर घेऊनि ते वेळे ॥ वाळी वीर पातला ॥४४॥

वीस मास तो निराहार ॥ दृष्टीं न दिसे विवरद्वार ॥ परम उतरला मुखचंद्र ॥ घाबरा वीर जाहला ॥४५॥

उगवला असतां उष्णकर ॥ किंचित् दिसों लागलें द्वार ॥ मग नखाग्रेंच नग समग्र ॥ उलथोनियां पाडिला ॥४६॥

हर्षें गर्जना केली थोर ॥ तेणें नांदावलें अंबर ॥ परी मजलागीं चिंता अपार ॥ बहु जाहली ते काळीं ॥४७॥

म्हणे बंधु दैत्यांनीं मारिला ॥ घाबरा किष्किंधेसी पातला ॥ तों मज राज्यपदीं देखिलें डोळां ॥ परम क्षोभला ते काळीं ॥४८॥

गुरु त्यजिजे ज्ञानहीन ॥ प्रीतीविणें मित्रजन ॥ ऐसें बोलोनि शक्रनंदन ॥ शस्त्र घेवोनि धांविन्नला ॥४९॥

मग हे नळ नीळ जांबुवंत ॥ प्राणसखा माझा हनुमंत ॥ मज घेऊन पळाले त्वरित ॥ ठाव निश्र्चित नेदी कोणी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP