समिधाच सख्या या

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता

वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,

खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे

परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता !

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली

पथ शोधित आली रानातून अकेली,

नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट

तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,

होईल सावली कुणा, कुणास कहाली,

तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,

"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,

तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - पुणे

सन - १९४०

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP