मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'

मी जातां राहिल कार्य काय ? ध्रु०

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;

तारे अपुला क्रम आचरतिल,

असेच वारे पुढे वाहतिल,

होईल कांहिं का अंतराय ? १

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,

गर्वानें या नद्या वाहतिल,

कुणा काळजी कीं न उमटतिल

पुन्हा तटावर हेच पाय ? २

सखेसोयरे डोळे पुसतिल,

पुन्हा आपल्या कामिं लागतिल,

उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल,

मी जातां त्यांचें काय जाय ? ३

रामकृष्णही आले; गेले !

त्याविण जग का ओसचि पडलें ?

कुणीं सदोदित सूतक धरिलें ?

मग काय अटकलें मजशिवाय ? ४

अशा जगास्तव काय कुढावें ?

मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?

हरिदूता कां विन्मुख व्हावें ?

कां जिरवुं नये शांतींत काय ? ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - तोडी

ठिकाण - अजमेर

दिनांक -१८ ऑगस्ट १९२१

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP