श्रीकृष्ण कथामृत - चौदावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( संकट निवारण )

कैलासेऽतिमनोहरे निजपदन्यासैर्महीं पावयन्
नृत्योत्क्षेपविकीर्णपिंगलकचैःसंवेष्टयन्नम्बरम्
उच्चैस्तालमृदङ्गवादनरतैः संस्तूयमानः सुरैः
कुर्वन् ताण्डवमीश्वरो विजयतां नः श्रेयसे प्रेयसे ॥१॥
वेणा कर्मा कान्हो केरी भागू स xx मिरा बहिणा
मुक्ता जणु नवभक्ती या माझे नमन त्यांचिया चरणा ॥२॥
केवळ भक्तिबळाने परमेशा जी सती जनाबाई
बसवी जात्यावरती ठेवित मी तत्पदावरी डोई ॥३॥
देवी वंद्य अहल्या पावनचरिता सती रमाबाई
वंदन नम्र तयासी इहपर मार्गी जया तुला नाहीं ॥४॥
देवांचे अधिदेव उमाधव
येत दया ज्या तप करिता लव
वर मिळवाया त्यांचे पासुन
शाल्व दुर्मती करि तप दारुण ॥५॥
त्याचे सगळे प्रिय सहकारी
कंसादिक त्या वधी मुरारे
म्हणुन हरिवर जय लाभाया
यत्न करी हा दुर्जन वाया ॥६॥
प्रसन्न होउन पिनाकपाणी
विमान देई सौभ म्हणोनी
चढुन बळावर ज्या, आकाशीं
फेकाया ये आयुधराशी ॥७॥
गर्वानें मग ताठुन जाई
जणु ना उरले दुर्धट कांहीं
प्रचंडसेना घेउन संगे
द्वारेवर ये चालुन वेगे ॥८॥
कृष्ण नसे नगरीत अशी ती संधी दुर्जन साधी
बघुन विगुणता तनुची जेवी आक्रमितो का व्याधी ॥९॥
सन्मुख व्हावे श्रीकृष्णासी
सौभबळेही धीर न त्यासी
र्पद्युम्नासी गु प्त च रा नी
वार्ता ही कळविली त्वरेनी ॥१०॥
घरी कुणाच्या शिजते कायी
ज्ञान असावे भूपतिठायी
चार जयाचे असतिल मंद
जमजावा तो नृपती अंध ॥११॥
चतुर वीर तो तनय रमेचा
बळकट करि तट शीघ्र पुरीचा
हुंडीं चढविल्या थोर शतघ्नी
फेकिताति ज्या सुदूर अग्नी ॥१२॥
झणी मिळविली यादव सेना
दक्ष करी युद्धास तयाना
बंद करविल्या सर्वहि वेशी
जा ये, केवळ होत खुणेसी ॥१३॥
दूर करी नट नर्तक गायक
वर्ज्य ठरविले मद्य नि मादक
तहान भूक न झोप तयासी
विशेष जपले स्त्री - बालासी ॥१४॥
राहूच्या ग्रहणातुन सुटला सूर्य दिवस मावळला
द्वारकेस तइ, केतकीस जणु अहिचा, वेढा पडला ॥१५॥
घोर निशा की अवसेची ती
अंधाराने भरली होती
मेघामागे दडल्या तारा
भये जाहला स्तंभित वारा ॥१६॥
रेघ तमीं काढणें काजळे
गृहगिरि तरु त्यासम, न वेगळे
विषण्ण हृदया येत निराशा
दिशा जाहल्या उदास तैशा ॥१७॥
विपदे माजी दुर्जन - वाचा
तेवि ध्वनि - कटु ये घुबडाचा
कोल्हे गाती स्मशानगाणी
टिटवी रडते केविलवाणी ॥१८॥
निःशब्दाच्या भयाण नाचा
चाळ बांधिला रातकिड्यांचा
हिंस्त्र पशूंचे जळते डोळे
कामास्तव या हिलाल झाले ॥१९॥
रात्रीसी त्या जन शाल्वाचे जमले नगरी भवती
पापे बहुधा अंधारातचि अपुली कामे करिती ॥२०॥
सुसज्ज पाहुन परी द्वारका
खल हृदयासी बसला चरका
तोंड रणा लागले प्रभाती
रक्ते रंगित झाली माती ॥२१॥
क्षेमवृद्धि वेगवान् विविन्ध
शाल्वाचे हे वीर मदान्ध
क्रोधे भिडले यदुवीरासी
चारुदेवष्ण मुख, जे बलराशी ॥२२॥
श्रीहरि ज्या रण - विद्या शिकवी
स्तुती तयांची किती करावी
सिंहासम ते करिती विक्रम
विरले रिपु रविपुढे जसा तम ॥२३॥
प्रद्युम्नाच्या श र सं धा ना
मेघवर्षही तुळू शकेना
पक्कफलापरि रि पु शि र रा शी
सहज तये रचियली महीसी ॥२४॥
निजसेनासंहार पाहुनी शाल्व चढे क्रोधाते
प्रद्युम्ने परि सवेच त्यासी लोळविले शरघाते ॥२५॥
हर्षे गर्जे यादवसेना
अरि सैन्याचा पाय ठरेना
शाल्व तोच की सावध झाला
क्रोध येत अनिवार तयाला ॥२६॥
म्हणे कुठे तो तुमचा राजा
पहा पराक्रम आता माझा
भ्याडपणे का बसला दडुनी
मित्रांची मम घेतो उसनी ॥२७॥
सौभामाजी बसे त्वरेने
युद्ध करी तेथुन मायेने
शास्त्रांचा वरुनी भडिमार
व्याकुळ झाले बहु यदुवीर ॥२८॥
वीरवर प्रद्युम्ना वरती
खले सोडिली अमोघ शक्ति
श्रांत वीर तो त्या आघाते
मूर्च्छित होउन पडे रणाते ॥२९॥
सेनानी घायाळ जाहला पाहुन यादव सारे
विह्वल झाले धैर्य गळाले गर्जति हाहाःकारे ॥३०॥
रिपुसैन्याने मग धरिले बळ
अधोर झाले रण ते तुंबळ
वीर शोणिते माखुन गेले
प्रलय पातला जणु त्या वेळे ॥३१॥
अजुन वीर तो पाहुन मूर्च्छित
रणातुनी ते दूर सूतरथ
जल शिंपी प्रद्युम्न - मस्तकी
सावध करण्या कुशल दारुकी ॥३२॥
घाय बांधिले नीट पुसोनी
वारा घाली आतुरतेनी
तदीय यत्नाप्रति यश आले
रौक्मिणेय तो उघडी डोळे ॥३३॥
बघता निज रथ नसे रणासी
राग येत त्या वीरवरासी
यशास हा मम कलंक आहे
मूर्खा केले काय तुवा हे ॥३४॥
पाठ देऊनी रणा, पळावे शील न हे वृष्णीचें
भूषण वाटे रणी कराया स्वागत ही मृत्युचे ॥३५॥
सूत जुना तूं असुनी केवी
भुरळ अशी ही तुला पडावी
काय बोलतिल यादव माते
कसे दाखवूं मुख ताताते ॥३६॥
तयीं सोडिले पुर मम हातीं
काय तयाचे या अपघातीं
धिक् पौरुष म्हणती अबला जन
छे छे लज्जास्पद हे जीवन ॥३७॥
आयुष्मन् व्हा नच चुकलोसे
कर्तव्या मी नच चुकलोसे
मूर्च्छित वीरा सांभाळावे
हेच सारथी - धर्मा भावे ॥३८॥
जाइल कोठें शाल्व अता तो
बघा त्वरे रथ रणांत नेतो
वदुन असे प्रेरिले हयासी
स्फुरण पुनः ये यदु वीरासी ॥३९॥
प्रद्युम्नाने अद्भुत केला विक्रम समरावेशी
प्रलयकाळचा रुद्र भयंकर भासे शाल्वजनासी ॥४०॥
कमलनयन ते प्रद्युम्नाचे
जणूं जाहले कोकनदाचे
तप्तसुवर्णासम मुख सुंदर
वृत्रवधोद्यत जसा पुरंदर ॥४१॥
वीरामागुन वीर रिपूंचे
बघते झाले सदन यमाचे
शाल्वा बसुनहि सौभामाजी
सहन न होई ती शरराजी ॥४२॥
रणविद्येतिल त्याची माया
अता जाहली अगदी वाया
शस्त्र शिलांचा वर्ष करी तो
परी न पोंचत असे महीतों ॥४३॥
पाहुन हरले सर्व उपाय
शाल्व घेतसे मागे पाय
द्वारवतीची केली दैना
कृष्णकरी वर मुख आताना ॥४४॥
समाधान मानुन निजचित्ती असें, ससैन्य पळाला
मृत्यु असे पाठीस परी की तो चुकला कवणाला ? ॥४५॥
शाल्व पळाला सौभासंगें
पाहुन रतिपति धांवत मागें
प्रखर घेउनी निजकरि शक्ती
उद्धवजी परि त्या आडविती ॥४६॥
“ देशकालबल आण विचारी
घातक याचे नियत मुरारी
प्रथम पुरीची करी व्यवस्था
मदन धरी या वचनी आस्था ॥४७॥
परत फिरे तो जयजय घोषे
स्वागत करिती यादव हर्षे
सुवासिनी त्या प्रति ओवाळी
कुंकुम रेखुन, भव्य - कपाळी ॥४८॥
तीर्थाहुन परतले मुरारी
चकित पाहुनी xरानगरी
तारकपीडित इंद्रपुरीसम
दिसे दुर्दशा नागरिका श्रम ॥४९॥
ढासळला तट खचलें गोपुर ढीग पथीं दगडांचे
विशीर्ण झालें उपवन बुजलें सर फुलल्या कमलांचे ॥५०॥
दारीं येता श्रीमधुसूदन
प्रद्युम्नानें केले वंदन
खाली घालित मान परंतु
शद्ब फुटेना बहुभयहेतूं ॥५१॥
परी सात्यकी कथीत सगळें
शौर्य कसे मदनें गाजविले
पिता धरी मग तयास हृदयीं
धन्यवाद इतरासहि देई ॥५२॥
खंत न मानावी थोडीही
अपयश हे नच दूषण कांहीं
कर्तव्या परि व्हावे तत्पर
सोडुन पाणी सर्वस्वावर ॥५३॥
प्रयत्न हाची धर्म नराचा
यश अपयश हा खेळ विधीचा
समाधान वा धैर्य चळो ना
काळहि मग हो केविलवाणा ॥५४॥
वास्तुविशारद कु ल का क र वी
कोट गोपुरे निर्मीत नवी
नगर दिसे ते पुनः मनोहर
देह जसा काया कल्पोत्तर ॥५५॥
शाल्व - वधाची करी प्रतिज्ञा
सह घेउन वीरा समयज्ञा
निघे मार्तिकावत नगरीसी
शासित होता शाल्व जियेसी ॥५६॥
शाल्वनृपासी प्रजा तेथली त्रासुन गेली होती
अपुला म्हणुनी किति सोसावी यथेच्छ - वर्तनरीती ॥५७॥
आदर नुरला लव धर्माचा
उदो होतसे नव रीतींचा
भ्रांत - कल्पना - प्रेरित सेवक
लोभ - मस्तरे - पूरित शासक ॥५८॥
गळचेपी हो व्यक्तिमताची
वाण जाहली वस्त्रान्नाची
सीमा केली महर्गतेनें
काय करावे वदा प्रजेनें ॥५९॥
मूर्त धर्म त्या श्रीकृष्णासी
इच्छित होते म्हणुन मनासी
तोच येतसे कळता चालुन
सर्व लोक गेले आनंदुन ॥६०॥
शाल्व परी तो मानुनिया भय
सागरतीरा घेई आश्रय
लावुनि नियमा त्या राज्यासी
सिंधुतटी खल धरी त्वरेसी ॥६१॥
समर होत घनघोर तेथ मग लंकेवरती जेवी
दांत खाउनी हरिवर करकर युद्ध करी मायावी ॥६२॥
दुष्ट म्हणे तो श्रीकृष्णासी
“ तदा कुठें लपला होतासी
बरा अता आलास येथवर
झेप किडा घे जसा दिव्यावर ॥६३॥
मगधेशा वधिले कपटेसी
प्रिय शिशुपाला राजसभेसी
घेइन आता त्याचे उसने ”
मुकुंद हासे उपहासानें ॥६४॥
“ तव शक्ती या धावपळीनी ”
म्हणे मुरारी “ येत कळोनी
तुझी उपेक्षा करण्यामाजी
चूक होय ती वारिन आजी ” ॥६५॥
शस्त्रांस्त्रांचा करि खल यारा
व्यर्थ गिरीवर जणु जलधारा
माया त्याची कठुन हरीते
भूल पाडण्या समर्थ होते ॥६६॥
पळुन जात तो पाहुन अंती फेकुनिया निजचक्रा
कृष्णे वधिला शाल्व पडे शव जलांत सुख हो नक्रा ॥६७॥
हर्ष जाहला या द व वी रा
व्योम न पुरले जयजयकारा
वाजविती सुर मुदे नगारे
मही तोषली खल - संहारे ॥६८॥
दुष्टवधाचे सरे प्रयोजन
करी प्रतिज्ञा मग मधुसूदन
“ शत्र करीं नच धरिन अता मी
साक्ष अब्धि, गिरि, सविता व्योमीं ॥६९॥
उरले जे ते अर्जुन हाती
सांगिन मी तो केवळ युक्ती ”
कृतार्थ करूनी स्नाने सागर
परत निघाला श्रीकरुणाकर ॥७०॥
दीन हांक तों कानीं आली
धाव धाव रे हे वनमाली
निघे कुठुन मग धीर हरीला
इतर जनासी विस्मय झाला ॥७१॥
द्रुपदसुतेची हांक असे ती विटंबनेते भिउनी
कौरपतिचा नीचपणा तो प्रेरक ज्यासी शकुनी ॥७२॥
तिथे असे कीं घडले होते
शकुनि म्हणाला सुयोधनांतें
“ पाहिलेस ना पांडववैभव
सावध हो वा सरले कौरव ॥७३॥
भाग दिलाती त्यासी अर्धा
गणिता नच माझिया विरोधा
सर्प सोडीले कसे मोकळे
जतु सदनीं ज्या तुम्ही दुखविले ॥७४॥
तुज दिसलेना क्षेत्रावरती
लोक सर्वही धर्मा भजती
कपट असे हे त्या काळ्याचे
तोच वाढवी महत्त्व याचे ॥७५॥
तो चढला सम्राट -- पदावर
तूं हाती बांगड्या तरी भर
राज्य हरी ते करून तातडी
अथवा मोल तुझे बघ कवडी ॥७६॥
युद्धाचा उपयोग आज ना जन नच अपुल्या मागे
धाड निमंत्रण धर्मासेसे तूं द्यतमिषें अनुरागें ॥७७॥
सर्व हिरावुन घेऊं द्यूतें
हात कोण मम धरील तेथे ”
मान्य करी ते खल दुर्योंधन
मार्ग वाकडे धरिती दुर्जन ॥७८॥
द्यूता वा वाहिले रणा जर
‘ ना ’ न म्हणावे क्षत्रें त्यावर
त्यातुन धर्मा आवड होती
तीच जाहली घातक अंती ॥७९॥
धन गज बाजी गेले वैभव
आनंदाने फुलले कौरव
धृतराष्ट्रासी कौतुक भारी
काय मिळाले अंध विचारी ॥८०॥
राज्यहि सारे हरला शेखीं
कपटासी तो धर्म अनोखी
बंधूसह मग पणास लावी
घडती घटना कशी टळावी ॥८१॥
दुर्योधन दुःशासन शकुनी नीचपणाने हसले
“ धीर न सोडी धर्मा अजुनी रत्न अमोलिक उरले ॥८२॥
पांचांची जी तुमची भार्या
जोड जियेच्या नच सौंदर्या
ती मृदुलांगी लाव पणासी
हरता होइल अमुची दासी ” ॥८३॥
“ होय ” म्हणाला खिन्न युधिष्ठिर
भीमा ये संताप अनावर
“ भलते करितो हा अविचारे
सहदेवा झणि आण निखारे ॥८४॥
हात जाळितो धर्माचे या
खेळे लावुन पणास जाया ”
परी अर्जुनें बहुप्रयासी
आवरिलें त्या वायुसुतासी ॥८५॥
द्युतीं हरला पुनः युधिष्ठिर
सभेत सज्जन वदती हरहर
मद चढलासे अंधसुताना
जा पांचाली सभेत आणा ॥८६॥
दुःशासन धावला त्वरेनें ‘ अधमाधम ’ म्हणुकाय
केस धरुन तिज फरफट ओढी खाटिक जैसा गाय ॥८७॥
करी विनवण्या बहु पांचाली
नराधमा त्या दया न आली
सूर्य न पाहूं शकला जीते
ओढित तिजसी भर रस्त्याते ॥८८॥
सभेत केली उभी मानिनी
सभ्या बोलत ती त्वेषानी
थोर वृद्ध जन बसले येथे
काय सर्व हे संमत त्यते ॥८९॥
भीष्मा द्रोणा धृतराष्ट्रा हे
कशी साहता विडंबना हे
क्रद्ध पाहते निजभर्त्याते
ते खाली वळविती मुखाते ॥९०॥
बुद्धिमती ती वदे भामिनी
प्रश्ना उत्तर द्या मम कोणी
दास असे जो स्वयेच झाला
कसा पणा लावीत पराला ॥९१॥
आज्ञा पतिची असली तरिही टाकुनिया सुगुणासी
सदोष वर्तन करीन नच मी होइन केवी दासी ॥९२॥
विचार पडला भीष्म द्रोणा
पेच कठिण तो सुटला कोणा
नियम एकदा जो स्थापियला
जरी प्रसंगी तो दोषाला ॥९३॥
तरी मोडणे उचित नसे तो
रीतीला तो घातक होतो
समाज - धारण नियमे होते
व्यक्तिस्तव कधि मोडु नये ते ॥९४॥
कुणी न शकले उत्तर देऊं
भीमा झाले गिळुं की खाऊं
आवरीत परि त्यासी अर्जुन
बोलत खोचुन मग दुर्योधन ॥९५॥
मी वागतसे धरूनी नियमा
विरोध मातें कोण करी मा
मय भवनी मज हासत होता
अवसर लाभे मजसी आता ॥९६॥
थांबलास का तरि दुःशासन
हिचे त्वरे घे लुगडे फेडून
लाच कशाची दासीला या
ही तो वस्तू उपभोगाया ॥९७॥
विकर्ण ठाके उभा म्हणाला गर्जुन तो गुणराशी
“ धर्म विवाहे परिणतपत्नी कधि नच होईल दासी ” ॥९८॥
“ सुयोधना ये शुद्धेवर तूं
अनर्थास हे होईल हेतू ”
विदुर वदे परि कुणा न माने
नीच न वळती उपदेशानें ॥९९॥
कर्ण करी धिःकार तयांचा
काम उसळला अंधसुताचा
सभेत करूनी मांडी उघडी
म्हणे बैस चल येथें धगडी ॥१००॥
भीम भडकला कालाग्नीसम
‘ बसेल तेथें भव्य गदा मम ’
म्हणे गर्जुनी ‘ थांब खला लव
चुरा करिन या मांड्य़ांचा तव ’ ॥१०१॥
पुनः शांतवी त्यासी अर्जुन
पुढे पापमति ये दुःशासन
घालि सतीच्या निरीस हाता
कुणी न उरला तिजसी त्राता ॥१०२॥
घट्ट धरोनी वसना हातें ओरडली ती साध्वी
अंत किती बघसी गोविंदा भडके वणवा भोंती ॥१०३॥
हे व्रजनाथा हे यदुनाथा
कोण तुझ्याविण अता अनाथा
धांव धांव हे करुणामूर्ते
गांजितात रे दुर्जन माते ॥१०४॥
गोपीप्रिय हे नाथ रमाधव
भवनाशन करुणाघन केशव
हाक न माझी का ऐकूं ये
होशी कां हरि निष्ठुर हृदये ॥१०५॥
धाव धाव शरणागत वत्सल
टाहो फोडी ती भयविह्वल
कृष्ण हाच की ध्यास तियेसी
मोकली न हरि निजभक्तासी ॥१०६॥
लाज राखण्या पतिव्रतेची
वसने पुरवी बहुमोलाची
एक ओढिले त्या दुष्टानें
दुजे आंत चमके तेजाने ॥१०७॥
दुःशासन ओढी ईर्षेने लुगड्या मागुन लुगडी
व्यर्थ परि श्रम साली काढुन केळ न होते उघडी ॥१०८॥
सभाभवन भरले वस्त्रांनीं
चिंब जाहला खल घामांनी
अंती थकुनी बसला खाली
सतेज वसनावृत पांचाली ॥१०९॥
प्रभाव दिसला पतिव्रतेचा
अंधा धसका बसे भयाचा
भावि अनर्थातुन तनयासी
वाचविण्या तो म्हणे सतीसी ॥११०॥
‘ वत्सल - हृदये सती द्रौपदी
मला क्षमाकर मी अपराधी
हूड असे मत्पुत्र सुयोधन
कृती तयाची मनांत आण न ॥१११॥
स्वतंत्र अससी तूं पांचाली
माग हवे ते मज या काली
करीन आदर तव आज्ञेचा
अन्यथा न ही होइल वाचा ’ ॥११२॥
काय अता ही मागत हीची उत्सुकता सकलासी
म्हणे द्रौपदी दासपणातुन मुक्त करा भर्त्यांसी ॥११३॥
सिंह वनी मोकळे असावे
साह्य कुणाचे कशास व्हावें
मृगेंद्रता स्वयमेव तयासी
वरिते मोहुन शौर्य बलासी ॥११४॥
मानधनेचे ते तेजस्वी
भाषण ऐकुन माथा डुलवी
द्रोण भीष्म कृप विदुर सुलक्षण
चरफडले परि मनांत दुर्जन ॥११५॥
म्वयें अर्पिले वैभव सारे
धृतराष्ट्रे दर्शनी उदारे
ओटी भरुनी पांचालीची
करी बोळवण अंध तियेची ॥११६॥
संपले न परि हे इतुक्यानी
पुनः भारिला पिता खलानी
विचारुनी त्या द्युतासाठी
परत बाहिले धर्मापाठी ॥११७॥
बारा वर्षे वनवासी मग एक वर्ष अज्ञाती
हरेल त्यानें जावे हा पण ठरलासे त्या द्यूतीं ॥११८॥
पराभूत हो धर्म पुनःहि
प्रथम येतसे जय कपटाही
धर्माचरणा म्हणती थोर
परिणामाचा करुन विचार ॥११९॥
पांडव होती तइं वनवासी
द्रुपदसुता अनुसरे तयासी
धर्म जातसे नत - मुख होउन
क्रुद्ध भीम निजबाहु उभारून ॥१२०॥
वाळू फेकी अर्जुन जाता
मुक्तकेश ती पांडवकांता
मंत्य्र म्हणतसे धौम्य पुरोहित
प्रजा जाहली सर्वहि दुःखित ॥१२१॥
अमुचा सर्वाधार निघाला
या भावें जन विह्वल झाला
बसले धरुनी पद राजाचे
धर्म म्हणे त्या मंजुल वाचें ॥१२२॥
दुःख न राही कुणा सर्वदा सुख ना नित्य कुणासी
धर्म गणावा सखा जिवीचा भय ना मग विपदासी ॥१२३॥
सुशील पांडव वनांस आले
मुनिजन सारे हर्षित झाले
केले त्यानी प्रेमें स्वागत
सज्जन गौरव होते सदोदित ॥१२४॥
रविप्रसादे हत वैभवही
धर्मा पडले उणे न कांहीं
शत शत विप्रासह निष्कामी
वनीं वसे नृप काम्यकनामीं ॥१२५॥
घोर निबिड ते विशाल कान्न
रम्य मनोहर तरिही भीषण
विसंगतीतहि थोरी साची
मूर्त जशी भगवान हराची ॥१२६॥
असूर्यपश्या वनभू तेथिल
नृपजाया जणु अवरोधातिल
रवि - कर - दंडित अंधारासी
आश्रय दे जी विसावण्यासी ॥१२७॥
भरदिवसासी उन्हाळ्यांतही तेथ चांदणें नांदें
दाखवीत वाकुल्या शीतता चंडकरा आनंदें ॥१२८॥
कलरवनादित कुठें तटाकें
कुठें घातला गोंधळ भेकें
प्रफुल्ल होती कमळीं कांहीं
दुजी घाणश्या शेवाळांहीं ॥१२९॥
गगनश्रीमुख - चुंबन - लोलुप
भव्य भव्यतर कोठें पादप
नि ज ज न नी च्या अंकावरतीं
झुडुपें कोठें लोळण घेती ॥१३०॥
करवंदीच्या झिंबड जाळ्या
माजघरासम वाघां झाल्या
तरूमूलाच्या बिळांत कांहीं
ससा गोजिरा चाहुल घेई ॥१३१॥
उपमा ललनांच्या मृदुतेची
अशी फुलें फुललीं शिरिषाचीं
पर्णहीन भुक्कड काटेरी
वृक्ष कुठें रसिकास निवारी ॥१३२॥
परी वसंती त्या वृक्षीही शाखांच्या शेंड्यातें
लाल तुरे अतिसुंदर येती मोहविती नयनाते ॥१३३॥
अपात्र दाता मधु अविवेकी
वा समदृष्टी संत म्हणूं की
संत न हा छे कठोर कांटे
यत्संसर्गे गळले कोठें ॥१३४॥
जुनाट वृ क्षां च्या खो डा व र
वेढुन असती वेली ठोसर
जणु वृद्धाच्या पायावरती
फुगलेल्या या शिराच दिसती ॥१३५॥
विशाल मंडप भव्य असावा
तसा वृक्ष - विस्तार दिसावा
खोडे ज्यांची पाचांच्या ही
कवेंत येतिल वाटत नाहीं ॥१३६॥
फांद्या त्यांच्या धरुनी हातीं
उड्या माकडें यथेच्छ घेती
सर्प थोर लोंबतात पाहुन
पळती दंता विचकुन चिरकुन ॥१३७॥
गजबजलेले प क्षि ग णां नी
वृक्ष कितीतरि असती रानीं
तेथ समृद्धी असे फळांची
कां न उठावी नगरे यांची ॥१३८॥
सिंह - गर्जना ऐकुन चित्तीं
व्याकुळ चीत्कारा करि हत्ती
बिलगुन जाती लता भयानें
पादपास पसरुनी प्रतानें ॥१३९॥
मधुन मधुन त्या वनांत जेथें आश्रम पावन होते
शीतताच केवळ त्या ठायीं सौंदर्यासह येते ॥१४०॥
घाण तेथ ना पाचोळ्याची भय ना हिंस्र पशूंचे
सर्प कशाला येतिल ऐकून केकारव मोरांचे ॥१४१॥
तळ्यांत निर्मळ कमळें फुलती
शांत रवंथ हरिणे करिताती
फलसंभारें विनम्र पादप
कोमल राही सदाच आतप ॥१४२॥
विविध तरूंचा परिमल हुंगित
फुलांफुलांतुन वारा वाहत
नववधुसमनित हरित चिरासी
नेसुन तेथें रमे वनश्री ॥१४३॥
निज भक्ताना त्या विपदेसी
धीर द्यावया ये हृषिकेशी
प्रिय भामेसी सवे घेउनी
कमल विभूषित रम्य काननीं ॥१४४॥
पाहुन पुढती श्रीवनमाली
शोकाकुल झाली पांचाली
रडे स्फुंदुनी करुण, सती ती
प्रिया जवळ दुःखा कढ येती ॥१४५॥
देवल कश्यप नारद गाती स्तोत्रें तव जगदीशा
कर्तुमकर्तुंकर्तुमन्यथा शक्ति तुझी परमेशा ॥१४६॥
रूप तुझें हें ब्रह्म सनातन
उरले सकल त्रिभुवन व्यापुन
प्रभु तूं विभु तूं सर्वात्मा तूं
झाला छळ मम कवण्या हेतूं ॥१४७॥
श्रीकृष्णा मी तुझी प्रिय सखी
वीर पती हे असुन मस्तकीं
कुत्री सम मज ओढी दुर्जन
कशास असले दुःसह जीवन ॥१४८॥
जिवंत असुनी यादव पांडव
समर्थ असतां तूंहि रमाधव
कसे वाटले अंध सुतासी
उपभोगूं हिज गणुनी दासी ॥१४९॥
पती असो की दुबळा निर्धन
निज पत्नीचें करितो रक्षण
बलशाली हे असुनी पुढती
विटंबना मम मुकाट बघती ॥१५०॥
असो तुम्हा धिःकार कशाला गांडिव चक्र गदा ही
अबलेचे ही रक्षण ज्याते करावया नच येई ॥१५१॥
पुत्र पती ना असती भ्राते
पिता न तूंही कृष्णा माते
कुणीहि ना मज कुणीहि नाही
कां न छळावें क्षुद्रानीहि ” ॥१५२॥
त्वेषसहित अति उद्वेगाचे
भाषण बोचक हे प्रमदेचे
धनंजयाच्या वसे जिव्हाळी
जशी पहाटे ठेच हिवाळीं ॥१५३॥
टपटपटपटप पडती धारा
उरोभाग तो भिजला सारा
मुखास झाकुन दो हातानी
मुक्त रडे क्षतहृदया मानी ॥१५४॥
स्कंधा स्पर्शुन वत्सल हाते
म्हणे “ व्यथा तव समजे माते
घडते नच हे असतो मी जरि
सुदूर होतो शाल्व - वधा परि ॥१५५॥
शोक न करि गे, विजयी पांडव
होतिल, रडतिल रिपु भार्या तव
संकटातची सच्छीलांचे
तेज चढे अनलीं हेमाचे ॥१५६॥
शोक भार तो हलका झाला श्रीहरिच्या सहवासी
संताची प्रिय भेट अशीची वाढविते हर्षाची ॥१५७॥
पुरुषोत्तम सर्वज्ञ रमाधव
म्हणे घेउनी जवळी पांडव
वर्षे बारा तुम्हां मिळाली
करा त्यांत सिद्धता आपुली ॥१५८॥
धोरण पुढचे समजेल जया
तोच आणितो खेचुन विजया
स्वस्थ कधी न बसेल सुयोधन
तुम्हीहि करणें बल संपादन ॥१५९॥
विजया जा तूं इंद्रपुरासी
मिळीव तेथिल अस्त्र बळासी
भीष्म - द्रोणासवें रणांते
प्रसंग आहे पुढें तुम्हांते ॥१६०॥
तपें शंकरा तुष्ट करावे
पाशुपता त्यापुन मिळवावे
शैव - शक्ति ती येतां हातीं
सुरासुरांची नुरली भीती ॥१६१॥
नको धरु युधिष्ठिरा लवही मानसीं संशय
हवी प्रबल शक्तिता खलजनां बसाया भय
अधर्म असतो खरा वरुन धर्म भासे जरी
कधी उलट ही असे समजण्यांत ते चातुरी ॥१६२॥

‘ संकट निवारण ’ नांवाचा चौदावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
भाद्रपद शके १८७१

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP