करुणाष्टकें - अष्टक ८

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


तुझीया वियोगें जीवत्व आलें । शरीरयोगें बहु दु:ख झालें । अज्ञान दारिघ्र माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥१॥
परत्रीं जिणें दीन कंठूं किती रे । उदास माझ्या मनि वाटतें रे । लल्लाटरेखा  तरि पालटेना । तुजवी० ॥२॥
जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी । तुझिया वियोगें पळही गमेना । तुजवी० ॥३॥
विश्रांति नाहीं अभिमान देहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । स्वहीत होतां मजला दिसेना । तुजवी० ॥४॥
विषयी जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें । समयीं बहू क्रोध शांती भरेना  । तुजवी० ॥५॥
संसारसंगें बहू पीडलों रे । कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षें सांभाळि दीना । तुजवी० ॥६॥
सदृढ झाली देहबुद्धि पाही । वैराग्य कांहीं हे नांव नाहीं । अपूर्ण कामीं मन हें विटेना । तुजवी० ॥७॥
निरूपणीं हे सद्‍बुद्धि होती । फलत्याग होतां सवेंचि जाती । काय करूं रे क्रिया घडेना । तुजवी० ॥८॥
जयजय दयाळा त्रैलोक्यपाळा । भवसिंधुहारी मज तारि हेळा । स्वामीवियोगें दासा मनीं आठव वीसरेना । तुजवी० ॥१०॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
॥ करुणाष्टकें श्लोकसंख्या ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP