जून १९ - परमार्थ

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला , की जगातल्या सर्व दु : खांचे मूळ , देहदु : ख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यत : साठविलेले आहे . या दोन गोष्टींत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले , आणि ह्या दृष्टीने विचार सुरु झाला . पैशाचा विचार करता असे दिसले की , आपण लंगोटी घातलेली , जवळ पैसा नाही , आणि त्याचा लोभही नाही . आता दुसर्‍याला पैसा द्यायचा म्हटले , म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे , तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल ; नंतर पैसे मिळविणे , आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे . पण हे करणे वाटते तितके सोपे नाही . कारण दुसर्‍याला देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला , तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल , आणि दुसर्‍याला पैसा देण्याची बुद्धी मारील . म्हणजे परिणाम असा होणार की , दुसर्‍याला पैसा तर देता आला नाहीच , पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला . ह्यात दुसर्‍याचे काम तर नाहीच . आणि स्वत : चे मात्र नुकसान झाले . दुसरी बाब देहदु : खाची . ज्याची देहबुद्धी मेलेली आहे , त्याला दुसर्‍याच्या देहदु : खाची जाणीव होऊ शकत नाही . म्हणजे , दुसर्‍याचे देहदु : ख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वत : च्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल . समजा , इतके केले , आणि दुसर्‍याचे देहदु : ख निवारले , तरी त्याला पुन : देहदु : ख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल ? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल ? म्हणजे देहदु : ख कायमचे टाळता येत नाही , आणि पैसाही देता येत नाही . अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच , पण आपल्या स्वत : च्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वत : ची अवनती केल्यासारखे होऊन , नुकसान मात्र पदरात पडते . म्हणून रामाची प्रार्थना केली की , असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस .

बालपणाची सरल वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत . एक पैसा , आणि दुसरे विद्या . दोन्हींपासून ‘ मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ’ ही वृत्ती उत्पन्न होते , आणि ती घातक असते . ‘ मी कुणीतरी आहे ’ असे वाटण्यापेक्षा ‘ मी कुणाचा तरी आहे ’ असे वाटणे हिताचे आहे . जगातले अत्याचार , अनीती , अधर्म , असमाधान , या सर्वांचे कारण हेच की , मनुष्य जास्त लोभी झाला आहे . देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो , पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो .

N/A

References : N/A
Last Updated : July 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP