अध्याय अकरावा - श्लोक २०१ ते २७०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.

 


पिता बंधु दोघेजण ॥ गेले ज्या पंथेकरून ॥ त्या मार्गें मीही जाईन ॥ ऊठ येथूनि पापरूपे ॥१॥

असो कैकयी गेली उठोन ॥ तों उदय पावला चंडकिरण ॥ भरतें वल्कलें वेष्टून ॥ भस्म लाविलें सर्वांगीं ॥२॥

सर्व अलंकार त्यागून ॥ वटदुग्धीं जटा वळून ॥ वनाप्रती कैकयीनंदन ॥ चरणचालीं चालिला ॥३॥

षोडशपद्में दळभार ॥ नगरलोक निघाले सत्वर ॥ ओस पडले अयोध्यापुर ॥ जीवमात्र चालिले ॥४॥

कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ शिबिकेंत बैसल्या ते क्षणीं ॥ वरी वस्त्रावरण घालूनी ॥ वाहनासहित झांकल्या ॥५॥

वसिष्ठादि सकळ ब्राह्मण ॥ सवें निघालें चारी वर्ण ॥ अयोध्येंत कैकयीवांचून ॥ नाहीं कोणी राहिलें ॥६॥

जन म्हणती ओस नगर ॥ कैकयीचें वपन करूं सत्वर ॥ तिजवरी धरावें छत्र ॥ परम अपवित्र पापिणी ॥७॥

तिचें पोटीं भरत जन्मला ॥ जैसा कागविष्ठेंत अश्र्वत्थ प्रगटला ॥ कीं कागिणी पोटीं कोकिळा ॥ निपजे अवचिता जैसी कां ॥८॥

असो भरत म्हणे सुमंतातें ॥ रघुवीर गेला कोण्या पंथें ॥ तोच मार्ग दावीं आम्हांतें ॥ तुझें अनुमतें चालूं आम्ही ॥९॥

मग भरतसमवेत दळभार ॥ गुहकाश्रमा पावले सत्वर ॥ वाजत वाद्यांचे गजर ॥ नादें अंबर कोंदलें ॥१०॥

गुहक विलोकी दुरून ॥ म्हणे मातेनें धाडिले दोघेजण ॥ दळभार सिद्ध करून ॥ रामलक्ष्मण वधावया ॥११॥

मग सहस्रांचे सहस्र किरात ॥ गुहकें मेळविले समस्त ॥ धनुष्य ओढोनियां त्वरित ॥ जान्हवीतीर बळकाविलें ॥१२॥

भरतासि सांगती सेवक ॥ संग्रामासी सिद्ध जाहला गुहक ॥ जन्हुकुमारीचें उदक ॥ स्पर्शों न देती कोणातें ॥१३॥

मग शत्रुघ्न आणि दळपती ॥ भरतासंगें विचार करिती ॥ म्हणती आज्ञा द्यावी निश्र्चितीं ॥ शिक्षा लावूं तयातें ॥१४॥

भरत म्हणे गुहक रामभक्त ॥ म्यां ऐकिला होता वृत्तांत ॥ तरी समाचार न घेतां यथार्थ ॥ युद्ध त्यासी न करावें ॥१५॥

मग भरत पुढें होऊन ॥ गुहकाप्रति बोले वचन ॥ त्वां युद्ध आरंभिलें निर्वाण ॥ काय कारण सांग तें ॥१६॥

गुहक म्हणे घेऊनि दळभार ॥ वधावया जातोसि रघुवीर ॥ तरी मी श्रीरामउपासक निर्धार ॥ वेंचीन प्राण स्वामीकाजीं ॥१७॥

माझा स्वामी रघुनंदन ॥ निराहार वनीं निर्वाण ॥ तुम्ही मारावया दोघेजण ॥ दळभारेंसी चालिलां ॥१८॥

परम निंदक दुर्जन खळ ॥ जे रघुनाथद्वेषी चांडाळ ॥ त्यांचीं शिरें छेदोनि तत्काळ ॥ पाठवीन यमलोका ॥१९॥

मातेच्या बोलेंकरूनि ॥ श्रीराम वधूं पाहसी वनीं ॥ तरी तुम्हांस जान्हवीचें पाणी ॥ स्पर्शों नेदीं अणुमात्र ॥२२०॥

ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरतासी आलें दीर्घ रुदन ॥ गुहकास म्हणे सोडूनि बाण ॥ माझें शिर छेदोनी टाकीं ॥२१॥

मज पापियाचा देह त्वरित ॥ गुहका छेदीं यथार्थ ॥ कैकयीनें केला अनर्थ ॥ सीताकांत धाडिला वना ॥२२॥

जन्मलों कैकयीचे उदरीं ॥ जन म्हणती हा रामचंद्राचा वैरी ॥ तरी गुहका आतां वेग करीं ॥ छेदीं झडकरीं देह माझा ॥२३॥

श्रीरामावियोगाचें दुःख ॥ मज सोसवेचि अणुमात्र देख ॥ निर्वाण बाण सोडोनि एक ॥ मज रघुनायकपद दावीं ॥२४॥

भरताचें अंतर ओळखून ॥ गुहक धांवोनि धरी चरण ॥ दोघांसी पडिलें आलिंगन ॥ गेले विसरून देहभाव ॥२५॥

कंठ दाटला दोघांचा ॥ उभारणी जाहली रोमांचा ॥ दोघांचे नेत्रीं अश्रुधारांचा ॥ पूर पडत ते काळीं ॥२६॥

दोघेही श्रीरामचे भक्त ॥ दोघेही योगी विरक्त ॥ दोघेही श्रीरामास आवडत ॥ वल्कलेंवेष्टित दोघेही ॥२७॥

दोघांही केलें भस्मोध्दूलन ॥ दोघांही केलें जटावळण ॥ दोघेंही न घेती अन्न ॥ रामदर्शनावांचोनि ॥२८॥

गुहक म्हणे भरता वसिष्ठा ॥ श्रीराम गेला चित्रकूटा ॥ आतां चला जी उठा उठा ॥ वेगीं भेटा राघवातें ॥२९॥

ऐकतां गुहकाचें वचन ॥ भरत धरूं धावे चरण ॥ गुहक घाली लोटांगण ॥ प्रेमेंकरून सद्रद ॥२३०॥

भरतें स्नानसंध्या सारून ॥ गुहकासी म्हणे प्रीतीकरून ॥ श्रीराम राहिला एक दिन ॥ तें मज स्थळ दाविजे ॥३१॥

गुहक म्हणे न्यग्रोधवृक्ष ॥ त्याखालीं राहिला कमलपत्राक्ष ॥ जयासी हृदयीं ध्याय विरूपाक्ष ॥ सहस्राक्ष शरण ज्यातें ॥३२॥

या तृणशेजे वरी जाण पद्मनयनें केलें शयन ॥ याच पंथें येऊन ॥ केलें स्नान जान्हवीचें ॥३३॥

सीतेच्या तगटवस्त्रांचे रज ॥ ते न झगटती तृणशेज ॥ देखतां भरत भक्तराज ॥ साष्टांग नमन करीतसे ॥३४॥

रघुनाथपदमुद्रा तेथ ॥ उमटल्या देखोनि भरत ॥ ते धुळी कपाळा लावित ॥ सद्रदित होवोनि ॥३५॥

असो नौका आणोनि सहस्र ॥ उतरला सकळ दळभार ॥ प्रयागासी येऊन सत्वर ॥ भरद्वाजदर्शन घेतलें ॥३६॥

लक्षोनि चित्रकुटाचा पंथ ॥ चालती गुहक आणि भरत ॥ तों फळें वेंचावया सुमित्रासुत ॥ पर्वतातळीं उतरला ॥३७॥

तों पर्णकुटीमाजी रघुनंदन ॥ करावया बैसला हवन ॥ तेथें उपसामग्री आणोन ॥ जनकात्मजा देतसे ॥३८॥

चकोरमुखीं एकसरां ॥ अत्रिसुत सोडी अमृतधारा ॥ तैशा आहुती घाली वैश्र्वानरा ॥ तृप्त होय रामहस्तें ॥३९॥

तेव्हां आश्रमाबाहेर जनकबाळी ॥ जो सुकुमार चंपककळी ॥ तों सुदर्शनगंधर्वें जातां निराळीं ॥ ते वेल्हाळी देखिली ॥२४०॥

जानकी देखोनि सुंदर ॥ चित्तीं जाहला कामातुर ॥ भय लज्जा समग्र सोडोनियां दीधली ॥४१॥

मंगळरूप ते मंगळभगिनी ॥ गंधर्व धांवला ते क्षणीं ॥ अमंगळ कागरूप धरूनी ॥ सीतेलागीं झडपीतसे ॥४२॥

जैसा पतंग दीप देखोन ॥ उडी घाली विसरून मरण ॥ कीं खदिरांगारासी वृश्र्चिक येऊन ॥ पुच्छेंकरून ताडी जेंवि ॥४३॥

कीं अंतगृहींचें दिव्यान्न ॥ स्पर्शों धांवे जैसे श्र्वान ॥ यज्ञशाळेमाजी मळिण ॥ अंत्यज जैसा पातला ॥४४॥

असो जानकींचें स्तनयुग ॥ धरूं पाहे पतित काग ॥ जगन्माता धांवली सवेग ॥ आंग घाली घरणीतें ॥४५॥

मग म्हणे धांव धांव रघुराया ॥ कागें विटंबिली माझी काया ॥ आक्रंदे परम जनकतनया ॥ रघुवर्या जाणवलें ॥४६॥

आहुती टाकी रघुनाथ ॥ जवळी नाही सुमित्रासुत ॥ मग दर्भ मंत्रोनि त्वरित ॥ रामचंद्रें प्रेरिला ॥४७॥

कल्पांतविजूसमान ॥ कागें दर्भ देखिला दुरून ॥ पळों लागला घेतलें रान ॥ पाठीसी बाण लागला असे ॥४८॥

गंधर्व भ्रमे सकळ सृष्टी ॥ परी कोणी न घाली तया पाठीं ॥ हिंडता जाहला हिंपुटी ॥ होय कष्टी दुरात्मा ॥४९॥

इंद्रादिक देवगण ॥ समस्तांसी गेला शरण ॥ ते म्हणती न दाखवीं वदन ॥ दुष्टा होईं माघारा ॥२५०॥

मग भेटला नारद मुनि ॥ काग लागला तयाचे चरणीं ॥ म्हणे पहा हो या त्रिभुवनीं ॥ ठाव नेदी कोणी मज ॥५१॥

माझी पाठ न सोडी बाण ॥ मग नारद बोले वचन ॥ मूढा रामासी जाय शरण ॥ तोचि मरण चुकवील ॥५२॥

मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा ॥ मी तुज शरण कृपासागरा ॥ दीनरक्षका अतिउदारा ॥ मज पामरा न मारावें ॥५३॥

मजवरी टाकिला बाण ॥ हें लोकांत न दिसे थोरपण ॥ कमळावरी वज्र घेऊन ॥ घातल्या काय पुरुषार्थ ॥५४॥

सूक्ष्म आळिका धरी सुपर्ण ॥ वडवानळ जाळी तृण ॥ भोगींद्र उचली सुमन ॥ हें काय अपूर्व बोलावें ॥५५॥

पर्जन्यें उठलें तृण ॥ अगस्ति प्याला किंचित जीवन ॥ मेघें निजप्रतापेंकरून ॥ घटीं जीवन भरियेलें ॥५६॥

सूर्यें दीपतेज झांकिलें ॥ गोवत्स विदारिला शार्दूलें ॥ रघुपति त्वां मज तैसें मारिलें ॥ तरी थोरपण प्रकटेना ॥५७॥

मातेचिया स्तनावरी ॥ बाळक हस्त ठेवूनि क्रीडा करी ॥ तरी काय माता जीवें मारी ॥ बाळकातें सांगपां ॥५८॥

महाराज रविकुळभूषणा ॥ ताटिकांतका अहल्योद्धारणा ॥ द्विपंचमुखदर्पहरणा ॥ शरणागता न मारावें ॥५९॥

मग बोले रघुपति ॥ माझा बाण असत्य कल्पांतीं ॥ नव्हेच जाण निश्र्चितीं ॥ महामलिना अपवित्रा ॥२६०॥

मग बाणासी अज्ञापी रघुनंदन ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ वेगें छेदावा सव्य नयन ॥ शिक्षा यास जाण पैं ॥६१॥

न लागतां पातया पातें ॥ दर्भें छेदिलें नयनातें ॥ काग म्हणे रघुत्तमातें ॥ देई वरातें मज कांहीं ॥६२॥

मग दोहींकडे एक बुबुळ ॥ खेळे ऐसें केलें चंचळ ॥ काकदृष्टी अवघ्यांत चपळ ॥ जन सकळ देखती ॥६३॥

सीतेसी द्यावया चुंबन ॥ तूं धावलासी दुरात्मा पूर्ण ॥ तरी तूं करिसी विष्ठाभक्षण ॥ कनिष्ठ जाण पक्ष्यांत तूं ॥६४॥

तुज वर एक देतो जाण ॥ प्रेतपिंड तूं भक्षल्याविण ॥ सर्वथा नोहे उद्धारण ॥ हें वरदान तुज दिधलें ॥६५॥

मग सुदर्शन गंधर्व तेव्हां ॥ साष्टांग नमोनि श्रीराघवा ॥ आपले स्वस्थळाप्रति तेधवां ॥ जाता जाहला आनंदें ॥६६॥

भरत प्राणसखा आतां ॥ येऊनि भेटेल रघुनाथा ॥ श्रोतीं परिसावी तेचि कथा ॥ भव्यव्यथा नासे जेणें ॥६७॥

रामविजय ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित अयोध्याकांड ॥ तें श्रवण करितां वितंड ॥ विघ्नें उदंड वितळती ॥६८॥

अयोध्याधीशा रामचंद्रा ॥ ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा ॥ श्रीधरवरदा प्रतापरुद्रा ॥ मज नाममुद्रा अखंड देईं ॥६९॥

स्वस्ती श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥

एकदशोऽध्याय गोड हा ॥२७०॥ ओंव्या ॥२७०॥ ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP