अध्याय अकरावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

अध्यायापरीस अध्याय परिकर ॥ जैसा पळोपळें चढे दिनकर ॥ कीं शुक्लपक्षींहून चंद्र-॥ कळा विशेष वाढती ॥१॥

कीं अभ्यास करितां वाढे ज्ञान ॥ कीं योगसाधनें समाधान ॥ कीं वटबीज विस्तारे पूर्ण ॥ दिवसेंदिवस अधिक पैं ॥२॥

कीं बाळपणापासूनि पंडित ॥ अधिकाधिक व्युत्पत्ति वाढत ॥ कीं कृष्णावेणी संकीर्ण दिसत ॥ पुढें विशाळ होती जैशा ॥३॥

कीं अग्रापासूनि मुळाकडे ॥ इक्षुदंडाची गोडी वाढे ॥ कीं गुरुभजन करितां आतुडे ॥ ज्ञानकळा विशेष ॥४॥

जों जों नेम शुचिष्मंत ॥ तों तों तपश्र्चर्या वाढत ॥ कीं साधुसमागम करितां त्वरित ॥ क्षमा दया वाढती ॥५॥

कीं करितां निष्काम दान ॥ कीर्तीनें भरे त्रिभुवन ॥ कीं वीरश्रीची धरितां आंगवण ॥ प्रताप विशेष वाढे पैं ॥६॥

किंवा धरितां स्नेहादर ॥ मैत्री वाढे अपार ॥ किंवा करितां परोपकार ॥ यश विशेष वाढत ॥७॥

तैसी रामकथा गोड बहुत ॥ विशेष पुढें रस चढत ॥ जेवीं वर्षाकाळीं पूर येत ॥ गंगेस जैसा उल्हासें ॥८॥

गंगेचा पूर मागुता ओहटे ॥ हा दिवसेंदिवस अधिक वाटे ॥ चतुर प्रेमळ जरी श्रोता भेटे ॥ तरी वक्त्यासी आनंद ॥९॥

श्रोता भेटलिया मतिमंद ॥ तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद ॥ जैसें सूर्य मावळतां अरविंद ॥ संकोचोनि जाय पैं ॥१०॥

असो दशमाध्यायीं कथन ॥ जान्हवीतीरीं रघुनंदन ॥ न्यग्रोध वृक्षातळीं जाण ॥ तृणशेजे पहुडला ॥११॥

त्यजोनियां मायाजाळ ॥ निरंजनीं योगी जैसा निश्र्चळ ॥ तैसा राम तमालनीळ ॥ जान्हवीतीरीं शोभला ॥१२॥

तों तेथें गुहक भक्त थोर ॥ तयासी म्हणे राघवेंद्र ॥ परतीरासि सत्वर ॥ आम्हां आतां नेईं तूं ॥१३॥

भवाब्धि तरावया दुस्तर ॥ नामनौका जयाची पवित्र ॥ तो रघुवीर राजीवनेत्र ॥ प्रार्थना करी गुहकाची ॥१४॥

भणगापुढें क्षीरसागर ॥ म्हणे मज भूक लागली थोर ॥ कीं वाचस्पति मूढास विचार ॥ पुसतसे साक्षेपें ॥१५॥

कीं थिल्लरासी जन्हुकुमरी ॥ म्हणे माझी तृषा हरी ॥ किंवा दरिद्रियाचे द्वारीं ॥ कल्पवृक्ष याचक ॥१६॥

तैसा राम गुहाकातें ॥ म्हणे परपारा नेईं मातें ॥ तंव तो जाणोनियां राघवातें ॥ पुसे कौतुकें करूनियां ॥१७॥

म्हणे तुमचें नांव करूं श्रवण ॥ कोठें जातां काय कारण ॥ मग मेदिनीगर्भरत्नभूषणें ॥ काय बोलतां जाहला ॥१८॥

रविकुळमंडळ दशरथ ॥ तो पिता आमुचा यथार्थ ॥ या देहास नाम रघुनाथ ॥ जन समस्त बोलती ॥१९॥

ऐसें बोलतां रघुनंदन ॥ गुहकमाता करी रुदन ॥ म्हणे याचा नौकेसी लागतां चरण ॥ नारी संपूर्ण होईल ॥२०॥

याचे चरणरज झगडतां ॥ शिळज्ञ उद्धरली मिथिलेसी जातां ॥ आम्हीं पूर्वींच ऐकिली कथा ॥ भक्तसंतांचेनि मुखें ॥२१॥

कठिण पाषाण लागतां चरणीं ॥ इंदिरेतुल्य जाहली कामिनी ॥ नौका काष्ठाची तत्क्षणीं ॥ चरण लागतां होईल ॥२२॥

वृद्धा म्हणे पुत्रा अवधारीं ॥ यासी न घालावें नावेवरी ॥ नौकेची जाहलिया नारी ॥ कैसी जीविका तुझी होय ॥२३॥

एक वनिता पोसितां ॥ तुज संकट होय तत्वतां ॥ नावेवरी रघुनाथा ॥ पुत्रा सर्वथा बैसवूं नको ॥२४॥

मग गुहक म्हणे सर्वोत्तमा ॥ अगाध तुझे चरणांचा महिमा ॥ तरी ते चरण श्रीरामा ॥ मी प्रक्षाळीन स्वहस्तें ॥२५॥

पाषाणाची जाहली नारी ॥ हे तों चरणरजांची थोर ॥ तरी ते पद प्रक्षाळीन निर्धारीं ॥ मग नावेवरी बैसवीन ॥२६॥

मग गुहकें आश्रमास नेऊन ॥ बैसविला जगन्मोहन ॥ जो मायातीत शुद्ध चैतन्य ॥ पद्माक्षीरमण जगद्रुरु ॥२७॥

विधि हर सहस्रनयन ॥ ज्याचे वांछिती रजःकण ॥ सनकादिकां दुर्लभ पूर्ण ॥ करितां साधन नातळे जो ॥२८॥

जेथूनि जन्मली जन्हुकुमरी ॥ ते चरण प्रक्षाळून स्वकरीं ॥ फळें मूळ आणूनि झडकरी ॥ जनकजामात पूजिला ॥२९॥

ते वेळीं गुहकाचा हर्ष पाहें ॥ ब्रह्मांडामाजीं न समाये ॥ दृढ समाये ॥ दृढ धरूनि श्रीरामाचे पाय ॥ प्रेमेंकरून स्फुंदत ॥३०॥

म्हणे स्वामी रविकुलतिलका ॥ दयाब्धे मायाचक्रचाळका ॥ अयोध्यापते ताटिकांतका ॥ झडकरीं येईं मागुती ॥३१॥

स्वामी तूं परतोन आलियावीण ॥ मी कदापि न भक्षी अन्न ॥ नाना भोग मंगलस्नान ॥ न करीं येथूनि श्रीरामा ॥३२॥

जाणोनियां प्रेमळ भक्त ॥ श्रीराम त्यासी हृदयीं धरित ॥ मग नौका आणूनि त्वरित ॥ जनकजामात बैसविला ॥३३॥

सौमित्र आणि सीता सती ॥ तिघें नौकेवरी आरूढती ॥ मग सुमंताप्रति रघुपति ॥ आज्ञा देता जाहला ॥३४॥

सुमंता तूं जाय वेगें ॥ सकळ वृत्तांत रायासि सांगें ॥ माझा नमस्कार साष्टांगें ॥ वसिष्ठदशरथांसी सांगें कां ॥३५॥

चतुर्दश वर्षें होतां पूर्ण ॥ मी सत्वर येतों परतोन ॥ सकळ लोकांचें समाधान ॥ करी सुमंता जाऊनियां ॥३६॥

तुवां जाऊनियां त्वरित ॥ ग्रामासि आलिया बंधु भरत ॥ क्रोधेंकरून दशरथ ॥ वधील एकादा तयासी ॥३७॥

याकारणें तुवां सुमंता ॥ वेगें परतोनि जावें आतां ॥ सुमंत उतरून रथाखालता ॥ चरणीं माथा ठेवितसे ॥३८॥

नयनोदकेंकरून ॥ प्रक्षाळिले श्रीरामचरण ॥ सुमंत म्हणे माझेन ॥ अयोध्येस न जाववे ॥३९॥

मी समागमें येईन ॥ अथवा येथें प्राण देईन ॥ परी मी न जाय परतोन ॥ दुःख द्यावया समस्तां ॥४०॥

देखती जेव्हां रथ रिता ॥ दशरथ आणि कौसल्या माता ॥ त्यांची करावया हत्या ॥ माझेन तेथें न जाववे ॥४१॥

वनीं सांडून तुज रघुनायका ॥ प्रवेशतां अयोध्येंत देखा ॥ मज म्हणती काळमुखा ॥ कां तूं येथें आलासी ॥४२॥

मग रघुनाथें धरिलें हृदयीं ॥ म्हणे बारे चिंता न करी कांहीं ॥ तूं अयोध्येसी शीघ्र जाईं ॥ आज्ञा माझी पाळी कां ॥४३॥

माथां ठेविला वरदहस्त ॥ तेणें शोक समस्त जाहला शांत ॥ जैसा मेघ वर्षतां अद्भुत ॥ वणवा त्वरित विझोनि जाय ॥४४॥

मग आज्ञा घेऊनि सुमंत ॥ पैलतीरीं उभा अवलोकित ॥ नावेंत बैसला रघुनाथ ॥ गुहक पैलतीरा नेत पैं ॥४५॥

जैसा निवृत्तितटाकीं योगी पावत ॥ तैसा पैलतीरा उभा रघुनाथ ॥ सुमंतासी हातें पालवित ॥ जाय त्वरित माघारा ॥४६॥

यावरी पुढें पुष्करिणी ॥ तेथें क्रमिली एक रजनी ॥ मग प्रयागाप्रति चापपाणी ॥ येता जाहला ते वेळे ॥४७॥

दृष्टी देखोनि रघुनंदन ॥ प्रयागही जाहला पावन ॥ पुढें भरद्वाजआश्रमा रघुनंदन ॥ येता जाहला साक्षेपें ॥४८॥

आला ऐकोनि रघुराज ॥ सामोरा धांवला भरद्वाज ॥ रामें नमस्कारिला द्विज ॥ क्षेमालिंगन दीधलें ॥४९॥

भरद्वाज बोले सप्रेम ॥ आजि माझा सुफळ जन्म ॥ त्रिभुवनपति श्रीराम ॥ गृहा आला म्हणोनियां ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP