अध्याय अकरावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


भरतें ऐसें ऐकिलें ॥ लल्लाट भूमीवरी आपटिलें ॥ तें दुःख नवजाय वर्णिलें ॥ कल्पांत मांडला ते वेळीं ॥५१॥

अहा रघुवीरा राजीवनेत्रा ॥ नवमेघरंगा स्मरारिमित्रा ॥ जगद्वंद्या कोमलगात्रा ॥ कां ऊपेक्षिलें आम्हांतें ॥५२॥

ऐसे बोलोनियां भरत ॥ मेदिनीवरी अंग घालित ॥ माझी माउली रघुनाथ ॥ गेली निश्र्चित टाकोनि ॥५३॥

मेदिनीगर्भरत्नभूषण ॥ वनासी निघतां रघुनंदन ॥ दशरथें जेवीं सोडिला प्राण ॥ तैसें मरण मज कां न ये ॥५४॥

अद्यापि न ये मजला मृत्य ॥ कां मृत्यूच निमाला यथार्थ ॥ रामवियोगाचें दुःख अत्यंत ॥ मृत्यूसही न सोसवे ॥५५॥

धन्य धन्य राजा दशरथ ॥ कोमल हृदय प्रेमळ यथार्थ ॥ देह ठेवूनि विदेहजामात ॥ जवळ केला त्वरेनें ॥५६॥

तंव तो कमलोद्भवसुत ॥ आचार्य पातला त्वरित ॥ भरत जाऊनि चरण धरित ॥ मज रघुनाथ दाखवीं ॥५७॥

पहावया भरताचें मन ॥ वसिष्ठ काय बोले वचन ॥ तुज राज्य दिधल्याविण ॥ रायास अग्न देऊं नये ॥५८॥

आणि तुझिया मातेच्या मनांत ॥ तुज राज्य व्हावें प्राप्त ॥ वनास गेला जनकजामात ॥ तेंचि निमित्त जाण पां ॥५९॥

ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ परम दुःख पावला अंतरीं ॥ भरत आक्रंदत दीर्घस्वरीं ॥ राज्य करी म्हणतांचि ॥१६०॥

सुकुमार चंपककळिकेवरी ॥ चपळा पडतां न उरे उरी ॥ कीं कर्पूर जननीचे शिरीं ॥ शुंडाप्रहारीं ताडी गज ॥६१॥

कीं शस्त्रघायें तोडिली बाळें ॥ कीं वज्रघायीं चूर्ण कपाळें कीं अग्नींत पडलीं मुक्ताफळें ॥ तैसें वाटलें भरतातें ॥६२॥

श्रीराम गेला वनांतरी ॥ जरी मी येथें राज्य करीं ॥ तरी जितुकें ब्राह्मण पृथ्वीवरी ॥ म्यां वधिले स्वहस्तें ॥६३॥

जगद्वंद्यास वनीं सांडोन ॥ जरी मी अंगिकारीं राज्यासन ॥ विगतधवा जे जारीण ॥ तिचें गर्भस्थळ मी पावें ॥६४॥

रजस्वलेच्या शोणितासमान ॥ राज्यभिषेकाचें उदक पूर्ण ॥ मी आपुल्या उदरीं शस्त्र घालीन ॥ राज्यासन घ्या म्हणतां ॥६५॥

ज्यासी मृडानीवर ध्याय मनीं ॥ ज्याची अयोध्या हे राजधानी ॥ ते मी भोगितांचि ते क्षणीं ॥ महाचांडाळ मी जाहलों ॥६६॥

रघुवीर सांडोन काननीं ॥ जरी मी भोगीन राजधानी ॥ तरी जिव्हा जावो झडोनी ॥ कीटक पडोनि तत्काळ ॥६७॥

वनीं सांडोनि जगन्मोहन ॥ जरी मी घेईन राज्यासन ॥ तरी गुरुवध मद्यपान ॥ मात्रागमन घडे मज ॥६८॥

कलंक लागेल वासरमणी ॥ पाप प्रवेशेल गंगाजीवनीं ॥ मृगजळीं घटोद्भवमुनी ॥ जरी बुडोन जाईल ॥६९॥

चित्रकिरणाचियावरी ॥ चढती मुंगियांच्या हारी ॥ कीं वडवानळाचे शिरीं ॥ नृत्य करी पतंग ॥१७०॥

कीं ऊर्णनाभींच्या तंतुसूत्रीं ॥ जरी उचलेल धरित्री ॥ कीं तृणपाशें महाकेसरी ॥ जरी गुंतोन पडेल ॥७१॥

कीं मही उचलेल मशका ॥ जरी सुपर्णासी बाधेल आळिका ॥ दृष्टी देखतां दीपका ॥ मृगांक खालीं पडेल ॥७२॥

जरी हें घडेल ब्रह्मनंदना ॥ तरी मज होईल राज्यवासना ॥ ऐकोनि भरताच्या वचना ॥ वसिष्ठ जाहला सद्रद ॥७३॥

अहो तें भरताचें वचन ॥ वैराग्यवल्लीचें सुमन ॥ कीं विवेकनभींचें उडुगण ॥ प्रेमतेजें झळकत ॥७४॥

कीं तें भक्तिपंथींचें सरोवर ॥ कीं निश्र्चयभावें दिव्य नगर ॥ कीं तें विश्रांतीचें मंदिर ॥ वचनरूप प्रत्यक्ष ॥७५॥

असो तो कैकयीनंदन ॥ म्हणे स्वामी शिवतों तुझे चरण ॥ श्रीरघुवीराची मज आण ॥ राज्याभिषेक करूं नेदी ॥७६॥

कैकयीचें काळें वदन ॥ माता नव्हे ते लांव पूर्ण ॥ तीस आवडे रांडपण ॥ पतीचा प्राण घेतला ॥७७॥

मग वसिष्ठें जें जें चिंतिलें ॥ तें तें भरतासी निवेदिलें ॥ मंथरादासीचे बोलें ॥ कार्य नासलें सर्वही ॥७८॥

कलहकल्लोळसरिता ॥ ते ही मंथरा दासी तत्वतां ॥ कुबुद्धि शिकवूनि तुझी माता ॥ इणेंचि पाहें पां बोधिली ॥७९॥

ऐसी ऐकतांचि मात ॥ वेगें धांवे वीर भरत ॥ मंथरेची वेणी अकस्मात ॥ धरूनि शस्त्र काढिलें ॥१८०॥

मग धांवोनि ब्रह्मसुत ॥ भरताचा धरिला हात ॥ म्हणे स्त्री वधितां पाप अद्भुत ॥ कदा विपरीत करूं नको ॥८१॥

मग लत्ताप्रहारेंकरूनि ॥ भरतें ताडिलें तियेलागुनी ॥ त्रिवक्रकुब्जा तेथूनि ॥ नाम तियेसी जाहलें ॥८२॥

असो ब्रह्मपुत्रें तयेक्षणीं ॥ रामपादुका सिंहासनीं ॥ मणिमय रचित दिव्यरत्नीं ॥ सिंहासनीं स्थापिल्या ॥८३॥

त्यांवरी छत्र धरून ॥ मग राजदेह उचलून ॥ अग्निमुखीं समर्पून ॥ उत्तरकर्म भरत करी ॥८४॥

सप्तशत रायाच्या युवती ॥ अग्निप्रवेश तात्काळ करिती ॥ जैसी सूर्यकिरणें सामावती ॥ सूर्यासरसीं अस्तमानीं ॥८५॥

सुमित्रा आणि कौसल्या ॥ प्राण द्यावया सिद्ध जाहल्या ॥ मग वसिष्ठें वर्जिल्या ॥ शास्त्रप्रमाण रीतीनें ॥८६॥

पुत्रवंत्या स्त्रिया विशेष ॥ त्यांहीं न करावा अग्निप्रवेश ॥ तों कौसल्या म्हणे आम्हांस ॥ कशास व्यर्थ ठेवितां ॥८७॥

वनास गेला रघुनाथ ॥ परत्र पावला दशरथ ॥ आतां काय वांचूनि व्थर्थ ॥ काया अग्नींत निक्षेपूं ॥८८॥

मग वसिष्ठ सांगे वाहूनि आण ॥ तुम्हांस श्रीराम भेटवीन ॥ मग वनासी करील गमन ॥ पुढती आगमन करील पैं ॥८९॥

निवटोनि असुर समस्त ॥ अयोध्येसी येईल रघुनाथ ॥ हा वाल्मीकाचा मूळ काव्यार्थ ॥ माना यथार्थ सर्वही ॥१९०॥

गुरुवचन मानूनि प्रमाण ॥ चित्रकुटीं भेटेल रघुनंदन ॥ अग्निप्रवेश म्हणून ॥ वर्ज केला ते काळीं ॥९१॥

असो रात्र जाहली दोन प्रहर ॥ कैकयीनें येऊन सत्वर ॥ भरतासि एकांत विचार ॥ सांगे कैसा ऐका तें ॥९२॥

म्हणे पुत्रा ऐक वहिलें ॥ संकटीं म्यां राज्य साधिलें ॥ रामासी वनवासा पाठविलें ॥ नाना यत्नेंकरूनियां ॥९३॥

वना गेलें रामलक्ष्मण ॥ हें तूं परम मानीं कल्याण ॥ सत्वर घेईं छत्रीसिंहासन ॥ कांहीं अनमान करूं नको ॥९४॥

पितृवचन करावया प्रमाण ॥ वनास गेला रघुनंदन ॥ त्या शोकास्तव राव पावला मरण ॥ हेही जाण बरें जाहलें ॥९५॥

सापत्नबंधु राम निर्धारें ॥ त्यासीं वंचन करितां बरें ॥ देव दैत्य दायाद वैरें ॥ अद्यापिही वर्तती ॥९६॥

गरुड सर्व सापत्न ॥ वैरें वर्तती दोघेजण ॥ जरी तूं होसी माझा नंदन ॥ तरी वचन पाळीं हें ॥९७॥

भरतें ऐकतांचि तिची वाणी ॥ म्हणे उठें येथोनि चांडाळिणी ॥ तुझा वध केला असतां या क्षणीं ॥ परी माता म्हणोनि रक्षिली ॥९८॥

परम निर्दय तूं पापीण ॥ अमंगळ तूं लांव पूर्ण ॥ घेतला दशरथाचा प्राण ॥ जानकीजीवन धाडिला वना ॥९९॥

तूं सर्पीण होसी यथार्थ ॥ डंखोनि मारिला दशरथ ॥ माझा सखा रघुनाथ ॥ दूर वनासी धाडिला ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP