अध्याय अकरावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


माझिया पुण्याचे गिरीवर ॥ भेदोनि गेलें चिंदंबर ॥ तरीच सीतावल्लभ रघुवीर ॥ मूळेंविण पातला ॥५१॥

सकळमंगलदायक रघुवीर ॥ जो मंगल भगिनीचा निजवर ॥ मंगलमातेचा उद्धार ॥ करावया जात प्रदक्षिणे ॥५२॥

तो पंचद्वयरथनंदन ॥ करावया सुरांचें बंधमोचन ॥ कमळिणीमित्रकुलभूषण ॥ येणें पंथें चालिला ॥५३॥

तो ऋषि धांवती अपार ॥ त्यांहीं कैसा वेष्टिला रघुवीर ॥ जैसा देवीं वेष्टिला सहस्रनेत्र ॥ कीं किरणांत मित्र विराजे ॥५४॥

कीं चंदनें वेष्टित मलयानिळ ॥ कीं विरक्तीं वेष्टिला जाश्र्वनीळ ॥ की वराभोंवते सकळ ॥ वऱ्हाडी जैसी मिरवती ॥५५॥

कीं साधक जैसे निधानाजवळी ॥ कीं रत्नाभोंवतीं परीक्षकमंडळी ॥ कीं कनकाद्रिभोंवतीं ॥ पाळी ॥ कुलाचलांची विराजे ॥५६॥

कीं नक्षत्रें वेष्टिला शशी ॥ कीं मानस वेष्टिलें राजहंसीं ॥ तैसा ऋषींनीं अयोध्यानिवासी ॥ भरद्वाज आश्रमीं वेष्टिला ॥५७॥

भरद्बाजें पूजिला रघुनंदन ॥ तेथें क्रमिला एक दिन ॥ ऋषि बोलती सुवचन ॥ अजनंदनपुत्राप्रति ॥५८॥

चतुर्दश वर्षेंपर्यंत ॥ श्रीरामा रहा येथें स्वस्थ ॥ दंडकारण्याप्रति व्यर्थ ॥ कासयासी जावें हो ॥५९॥

राघव म्हणे येथें राहतां ॥ अयोध्येच्या प्रजा येतील समस्ता ॥ ब्राह्मण आणि माता पिता ॥ येतील भेटीस निश्र्चयें ॥६०॥

आम्ही गुप्तरूपें येथूनी ॥ प्रवेशूं महाकाननीं ॥ पुढील भविष्यार्थ मनीं ॥ मुनि तुम्हीं जाणतसां ॥६१॥

असो ऋषि आश्रमीं क्रमोनि एक दिवस ॥ ऋषींस पुसे अयोध्याधीश ॥ पुढें चालिला जगन्निवास ॥ मार्ग आम्हांस दाविजे जी ॥६२॥

भरद्वाज म्हणे चित्रकूटपर्वतीं ॥ विद्वज्जन बहुत राहती ॥ तुम्ही तेथें करावी वस्ती ॥ कांही दिवस राघवा ॥६३॥

भरद्वाजें बोळविला रघुनाथ ॥ आज्ञा घेऊनि त्वरित ॥ प्रयागासी परतला ॥६४॥

सिद्धवट देखोनि नमन ॥ करी पद्माक्षी रमण ॥ त्या सिद्धवटीं सावित्री पूर्ण ॥ सीता देखोन नमस्कारी ॥६५॥

विजयी होऊनि रघुनंदन ॥ वनींहून आलिया परतोन ॥ दोन लक्ष गोदानें येथें देईन ॥ ब्राह्मणसंतर्पण यथाविधि ॥६६॥

पुढें चित्रकूटपर्वतावरी ॥ चढला शरयुतीरविहारी ॥ तेथें वाल्मीक ऋषि तप करी ॥ बहुत ऋषींसमवेत ॥६७॥

जेणें नारदकृपेचेनि बळें ॥ अवतारभविष्य कथियेलें ॥ जैसें कमळा अगोदर भरिलें ॥ सरोवरीं जळ जेवीं ॥६८॥

अवताराआधीं जन्मपत्र ॥ केलें शतकोटी विस्तार ॥ तेणें दृष्टीं देखतां रघुवीर ॥ आश्रमाबाहेर धांवला ॥६९॥

वाल्मीकाचे निजचरणीं ॥ माथा ठेवी मोक्षदानी ॥ वाल्मीकें वरचेवर उचलोनी ॥ अलिंगन दीधलें ॥७०॥

इतरां समस्त द्विजवरां ॥ भेटला परात्पर सोयरा ॥ सौमित्रें चित्रकूटीं ते अवसरा ॥ पर्णकुटिका बांधिली ॥७१॥

ऋषिमंडळींत रघुवीर ॥ चित्रकूटीं राहिला जगदुद्धार ॥ गुहक पाठवून बाहेर ॥ समाचार नेला हो ॥७२॥

चित्रकूटीं राहिला रघुनायक ॥ सुमंतासी सांगे गुहक ॥ राघववियोगें दोघांसी दुःख ॥ अत्यंत जाहलें तेधवां ॥७३॥

गुहकें घरासी नेला ॥ म्हणे मी आतां राम कैं देखेन डोळां ॥ असो रथासहित सुमंत परतला ॥ वेगीं अयोध्येसी येतसे ॥७४॥

अयोध्या दिसे प्रेतवत ॥ रिता घेऊन प्रवेशला रथ ॥ सुमंत मुखावरी पल्लव घेत ॥ झांकोनि मुख चालिला ॥७५॥

सुमंत म्हणे आपुले मनीं ॥ श्रीराम टाकोनि आलों वनीं ॥ ऐशिया मज अभाग्यासी जननी ॥ काय व्यर्थ प्रसवली ॥७६॥

कैकयीसदनासमोर ॥ सुमंतें सोडोनि रहंवर ॥ मंदिरांत प्रवेशे सत्वर ॥ अति मुखचंद्र उतरला ॥७७॥

रिता आणिला माघारा रथ ॥ अयोध्येंत समस्तांसी जाहलें श्रुत ॥ घरोघरीं एकचि आकांत ॥ सीताकांतवियोगें ॥७८॥

इकडे कंठीं प्राण धरून ॥ कैकयीसदनीं अजनंदन ॥ सुमंतें तयासी देखोन ॥ नमन करूं लाजतसे ॥७९॥

राजा म्हणे टाकिलें राजीवनयना ॥ मज वाटतें माझिया प्राणा ॥ मूळ आलासी सत्वर ॥८०॥

जगद्वंद्य माझी वस्तु जाण ॥ टाकिली कोण वनीं नेऊन ॥ श्रीराम माझें निधान ॥ कोणें चोरें चोरिलें ॥८१॥

राजहंस माझा रघुनंदन ॥ पंकगर्तेत ठेविला रोवून ॥ माझें सुढाळ मुक्त पूर्ण ॥ भिरकावून दिधलें कोठें ॥८२॥

अन्नपूर्णावरहृदयींचें रत्न ॥ म्यां तुझे हातीं दिधलें पूर्ण ॥ घोर वनीं तें टाकून ॥ कैसा आलासी माघारा ॥८३॥

मज अंधाची काठी बळें ॥ हिरूनि कोणी नेली न कळे ॥ अरण्यामाजी माझीं बाळें ॥ उपवासी निराहारें ॥८४॥

सुंदर सुकुमार सुमनकळी ॥ माझी माउली जनकबाळी ॥ सुमंता रथाखालीं कैसी उतरली ॥ कैसी चालिली पंथीं सांग ॥८५॥

तिहीं भोजनें कोठें केलीं वनीं ॥ शयन केलें कोणे मेदिनीं ॥ सुमंता सांग मजलागुनी ॥ देह टाकूनि जाईन मी ॥८६॥

मग तो सुमंत म्लानवदन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ तीन दिवस निराहार पूर्ण ॥ तिघेंजणें पैं होतीं ॥८७॥

तृणासनीं राजीवनेत्र ॥ पहुडला घनश्यामगात्र ॥ पांघरावया अंबर ॥ आपाद मस्तक देखिला म्यां ॥८८॥

श़ृंगवेरपर्यंत ॥ म्यां बोळविला रघुनाथ ॥ ज्याचेनि नामें जग तरत ॥ तो गुहकें नेला परपारा ॥८९॥

मायानदीं उल्लंघून ॥ संत स्वरूपीं होती लीन ॥ तैसा पैलतीरा रघुनंदन ॥ दैदीप्यमान पाहिला म्यां ॥९०॥

याउपरी करुणाकरें ॥ अयोध्येसी जातां त्वरें ॥ तेथोनियां जगदुद्धारें ॥ निजकरें मज पालविलें ॥९१॥

राघवें साष्टांग नमन ॥ घातलें मग तेथून ॥ पुढें चरणचालीं रघुनंदन ॥ करीत गमन वनवासा ॥९२॥

जैसा अस्ता गेला दिनकर ॥ तैसा वनीं प्रवेशला रघुवीर ॥ याज्ञिककुंडामाजी वैश्र्वानर ॥ आच्छादित जैसा कां ॥९३॥

ऐसीं सुमंताचीं वचनें भूपाळ ॥ कर्णीं ऐकतांचि तात्काळ ॥ धबधबा तेव्हां वक्षःस्थळ ॥ पिटोन घेत ते समयीं ॥९४॥

सुमंता वनीं रघुनंदन ॥ कैसा परतलासी सोडून ॥ अरे तुझें हृदय निर्दय पूर्ण ॥ कैसा प्राण गेला नाहीं ॥९५॥

सुमंता तुझा थोर धीर ॥ वज्रापरी तुझें शरीर ॥ वनीं सांडोनि रघुवीर ॥ कैसा एथवरी आलासी ॥९६॥

गळामाजी गुंतला मीन ॥ तैसा तळमळी अजनंदन ॥ श्रीराम वियोगाचा अग्न ॥ जाळीत पूर्ण सर्वांगीं ॥९७॥

म्हणे धांव धांव बारे रघुनंदना ॥ सरोजनेत्रा सुहास्यवदना ॥ कोमलांगा माझिया प्राणा ॥ गेलासी वना टाकूनि ॥९८॥

हांक फोडिली दशरथें ॥ धांव माउलीये रघुनाथे ॥ मज सांडोनि तान्हयातें ॥ गेलासी वना दूरदेशा ॥९९॥

रामा चालिला माझा प्राण ॥ अंतकाळीं दावीं तुझें वदन ॥ ऐसें बोलतां वटारिले नयन ॥ सोडिला प्राण रामस्मरणें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP