मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग पहिला|
अभंग ११९ ते १३८

विरहावस्था - अभंग ११९ ते १३८

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


११९

आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा ।

काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥

कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं ।

कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥

हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय ।

एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥

१२०

वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग । सर्व सांडियेला मोह ममता संग ।

जीवीं जिवला जाला अनंग । भेटता भेटवा मज श्रीरंग ॥१॥

ऐशी विरहिण बोले बोली । कां रे हरी तु सांडी केली ॥धृ ॥

समभाव तुज पहावया । मन आमुचे गुंतलें देवराया ।

तुं तंव मध्यें घालिसी माया । नको आतां विरह पायां ॥२॥

आमुचा विरह कोण निवारी । विरहिनी बोले ऐशिया परी ।

एका जनार्दनी श्रीहरी । जन्ममरणाचा विरह निवासी ॥३॥

१२१

कोण्या वियोगे गुंतला कवर्णे हातीं । परा पश्यंती मध्यमा जया धाती ।

श्रुति शास्त्र जया भांडती । तो कां हो रुसला श्रीपती ॥१॥

येई येई कान्हा देई आलिंगन । भेटी देऊनि पुरवीं मनोरथ पुर्ण ।

विरहाविरहा करी समाधान । दावी तु आपुले चरण ॥२॥

येथें अपराध आमुचा नाहीं । खेळ सर्व तुझा पाहीम ।

एका जनार्दनी नवल काई । एकदां येउनी भेटी देई ॥३॥

१२२

कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ॥

रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥

रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥

एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥

१२३

विरहिणी विरहा विरहित बोले । कां वो पुर्वकर्म आड ठेलें ।

वाचें न येती नाम सावळें । तया विरहा मन माझें वेधलें ॥१॥

ऐशा परी बोलती गोपबाळा । कोठें गेला नेणो सांवआळा ।

पहातां पहातां ठकविलें गोपाळा । ऐसा याच विरह लागला ॥२॥

नेणो कांही कर्म आड ठेलें । वियोग वियोगाचें वर्म ऐसें जाले ।

एका जनार्दनीं कौतुक बोले । ऐशा दुःखा विराहिणा बोले ॥३॥

१२४

नको नको रे दुर देशीं । आम्हां ठेवी चरणापाशीं ।

मग या विरहा कोन पुसी । ऐसी इच्छा देई आम्हांसी ॥१॥

पुरे पुरे संसार विरह छंद । तेणें तुं अंतरासी गोविंद ।

द्वैताचा नसो देऊं बाधा । हृदयीं प्रगटोनी दावी बोध ॥२॥

विरह हरी सत्वर देवराया । परेपरता प्रगटोनि दावीं पायां ।

दुजें मागणें आणीक नाहीं काह्मा । एका जनार्दनीं शरण तुझिया पायां ॥३॥

१२५

समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें ।

हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥

सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी ।

पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥

तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान ।

शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥

१२६

आशा मनीषाचा विरह लागला । तेणें सांवळा दुरी ठेला ।

जवळी असोनी बोलती अबला । कवणें गुणें कान्हु रुसला ॥१॥

धांवे धावे कान्हई नंदनंदना । पुरवीं तूं आमुची वासना ।

आणिक नको दुजी कल्पना । विरह निवारी देई दर्शना ॥२॥

छंदे छंदें विरहिणी बोलें । कां वो बोलण्या अबोलणें जालें ।

एका जनर्दनी ऐसें केलें । नंदनंदना चित्त गुंतलें ॥३॥

१२७

जन्म जन्मांतरी विराहिणी । होती दुश्चित्त अंतःकरणी ।

दुःखी सेशिलें होतें मागें जन्मीं । ये खेपे निरसलें स्थुळ कारणीं ॥१॥

येउने भेंटी देहीं देहातीत । तयाचा विरह मजलागीं होत ।

मना समुळ मन पहात । तो भेटला गोपीनाथ ॥२॥

दुःख फिटलें मान जालें थोर । हर्षें आनंदें आनंद तुषार ।

एका जनार्दनीं भेटला परात्पर । तेणें संसार विरह गेला निर्धार ॥३॥

१२८

काम क्रोध वैरी हे खळ । लोभ अहंकार आशा बरळ ।

कर्म बळीवंत लागलें सबळ । तेणें वेधिलें आमुतें निखळ ॥१॥

नको नको वियोग हरी । येई येई तूं झडकरी ।

आम्हा भेटें नको धरुं दुरी । वियोग झाला तो आवरीं ॥२॥

तुझिया भेटिंचे आर्त मनीं । याकारणें विरह बोलणें वाणी ।

एका शरण जनार्दनीं । वियोग गेला पाहतां समचरणीं ॥३॥

१२९

मागें विरह बहुतंशी झाला । संसारश्रम वायां केला । क्षणभरीं विश्रांती नाहीं मला । तो सदगुरु जिवलगा भेटला ॥१॥

आतां विरहाची सरली गोठीं । डोळेंभरी पाहिल्या जगजेठी । जाउनी चरणीं घालावी मिठी । विरह गेला समुळ दृष्टी ॥२॥

एका जनार्दनीं पाहतां आनंदलें । जन्म जन्मातरींचें दुःख । फिटलें विरहाविरहें हर खुंटलें । काया वाचा मनें वेधलें वो ॥३॥

१३०

बहुत जन्में विरहें पीडली । नेणो कैसी स्थिर राहिली । मन अशा गोविंदी वेधिली । तो मध्यमा वैखारीये गुंतलो वो ॥१॥

चारी वाचा परता सावळां । विरहिनीसी छंद लागला । चौपरता कोठें गुंतला । तेंणों आम्हीं अबला वो ॥२॥

विरह जाईल कैशा परी । पुर्वपुण्या सुकृत पदरीं । एका जनार्दनीं भेटलें हरी । तैं विरह नोहे निर्धारी ॥३॥

१३१

येई वो श्रीरंगा कान्हाबाई । विरहाचें दुःख दाटलें हृदयीं । कोण सोडवील यांतुन पाहीं । दैवयोगें सांपडला सगुण देहीं ॥१॥

सगुण निर्गुण याचा वेध । वेधें वेधलें मन झालें सद्गद । वाचा कुंठित हारपला बोध । नेणें आणिक परमानंद ॥२॥

स्थित स्थित मति झाली । वृत्ति विरक्ति हारपली समाधि उन्मनी स्थिरावला । ऐशी विरहाची मति ठेली वो ॥३॥

संगविवर्जित मन झालें । काया वाचा मन चित्त ठेलें । एका जनार्दनीं ऐसें केलें । विरह दुःख निरसिलें ॥४॥

१३२

भिन्न माध्यान्हीं रात्रीं नारी । विरह करी बैसोनि अंतरीं । केधवा भेटले श्रीहरी । तो नवल जालें अंतरीं वो ॥१॥

अवचित घडला संतसंग । विरहाचा झाला भंग । तुटोनि गेला द्वैतसंग । फिटला जन्ममरणाचा पांग वो ॥२॥

एका जनादनीं संतसंग । फिटला संसारपांग । विरह गेला देहत्याग । सुखें सुख झालें अनुराग वो ॥३॥

१३३

विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥

मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥

क्षणिक विषय संसार । भरला दिसे भवसागर । यांतुनी उतरीं पैलपार । संतसंग मिळविया ॥२॥

यासी शरण गेलिया वांचुनी ।संतसंग न जोडे त्रिभुवनी । शरण एकाभावें जनार्दनी । विरह गेला समूळ निरसोनी ॥३॥

१३४

ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥

धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥

नामविरहित विरह तो कोण । विषय विरह थुंकीन मी जाण । नामांवांचुनी नेणें साधन । तो विरह न व्हावा पुर्ण ॥२॥

एका जनार्दनी सत्य वचन । विरहविरह गेला मुळीहून । नाम जपतां स्थिर झालें मन । विरह गेला त्यागुना ॥३॥

१३५

रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥

विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥

संतसंग घडला धन्य आजीं । मोह ममता तुटली माझी । भ्रांती फिटोनि गेली सहजीं । विरह गेला सुख झालें आजीं ॥२॥

धन्य धन्य संतसंगती । अवधी झाली विश्राती । एका जनार्दनी चिंत्तीं । विरहभ्रांति निरसली ॥३॥

१३६

आनुपातें विरहिण बैसे । कां वो कर्म बळिवंत दिसे । संगवर्जित मज झालें ऐसें । कोणी योगे भेटी नसे ॥१॥

मज भेटवा संतसंगती । तेणे निवारेण सर्व भ्रांती ॥धृ॥

विरहें बहुत पीडिली बाळा । कोन शांतवी तया अबलां । वेधे श्रीरंग जीवी लागला । तया भेटलीया सुख होईल तयाला ॥२॥

नेणें आपपरावे दुजें कांहीं । विरहें विरह जडला हृदयीं । कोण सोडवी गुरु मज देहीं । या विराहा अंतपार नाहीं ॥३॥

ऐसा विरह करिता दुःख । दैव योगें घडलें संतसुख । तापत्रय विरह गेला देख । सुखें सुख अपार झालें देख ॥४॥

संतसंग निरसे विरह । पावन देह झाला विदेह । एका जनार्दनी आनंद पाहे । विरह निरसला सुख झालें गे माय ॥५॥

१३७

युगायुगीं पीडिली विरहिणी । नाठवीं ध्यानीं मनीं चक्रपाणी । म्हणोनी वियोगाची जाचणी । तो भेंटला संतसंग साजणी ॥१॥

विरह गेला सुख झालें अपार । जन्मोजन्मी चीं तुटे वेरझार वो ॥धृ॥

घडतां संतसंग विश्रांती । तुटली माया पडळभ्रांति । भव संसार याची झाली शांती संतमहिमा वर्णावा किती ॥२॥

महिमा वर्णितां विरहा फिटलें । एका जनार्दनी तया भेटलें । सुख अनुभवे अंतरीं दाटलें । विरहाचें बीज भाजिलें वो ॥३॥

१३८

बोला बोल विरहिणी बोले । गगनी चांदणे शुद्ध शोभलें । त्यामाजीं घनसांवळे खेळे । कर्मदशें वियोग जाला बळें ॥१॥

दावा गे दावा गे कृष्णवदन । विरहाचें दुःख् दारुण कोण्या कर्में झालें खंडन । कां हो यदुनंदन न बोले ॥२॥

विरहतांपे तापलं भारीं । कोण आता दुजा निवारी । श्रीगुरु भेटला झडकरी । एका जनार्दनी दाविला श्रीहरी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP