मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र नववी

श्यामची आई - रात्र नववी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" बारकू आला की नाही ? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो . एका गाईला तो मारीत होता . गाय दुसर्‍याची असली तरी ती देवता आहे . जा रे बारकूला त्याच्या घरून आणा ." श्याम म्हणाला . " तो बाहेर बसला आहे ऐकत , आत यावयास लाजतो आहे , " शिवा म्हणाला .

श्याम उठला व बाहेर आला . त्याने बारकूचा हात धरला . बारकू ओशाळला होता . तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता . श्याम त्याला म्हणाला , " बारकू ! तू मला आवडतोस , म्हणून तुला रागे भरली . माझा इतका का तुला राग आला ? मी तुझ्या भावासारखाच आहे . चल आज मी आमच्या मोर्‍या गाईची गोष्ट सांगणार आहे ."

श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला . श्यामच्या गोष्टीची सारीजण वाट पाहात होती . श्यामने सुरूवात केली :

" आमच्या घरी एक मोरी गाय होती . ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे . अशी गाय आपल्या सार्‍या गावात नाही , असे लोक म्हणत असत . खरोखरच दृष्ट पडण्यासारखी ती होती . कशी उंच थोराड होती . गंभीर व शांत दिसे . आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता . तो भरून ती दूध देई . तिची कास भरदार असे . तिची नीट काळजी घेण्यात येत असे .

माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची . मोर्‍या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची . मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी . गाय म्हणजे देवता . गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे ; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही . तोंडदेखली गोपूजा आहे , देखल्या देवा दंडवत , असा प्रकार आहे . पूर्वी दुसर्‍याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत . तिला भाकरी वगैरे देत . मूठभर चारा देत . आज दुसर्‍याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की , त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या . दुसर्‍याची गाय दूर राहीली . स्वत : च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण , वेळेवर पाणी मिळत नाही . रानात , गावात जे मिळेल ते तिने खावे . कोठे घाणेरडे पाणी प्यावे . आज या गाईला आपण भीक मागावयाला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे . जशी सेवा तसे फळ . गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल .

माझी आई मधून मधून गोठ्यात जावयाची . तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची . त्याला धुवण म्हणतात . हे थंड व पौष्टिक असते . दुपारी जेवावयाचे वेळेस एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी , असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत . देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देत असे . त्याला गोग्रास म्हणतात . आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे . या मोर्‍या गाईचे आईवर फार प्रेम होते . प्रेम करावे व करवून घ्यावे . प्रेम दिल्याने दुणावते . आईला ती चाटावयाची . तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी , तसतशी मोरी गाय आपली मान वर करी . आईची शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे . मोर्‍या गाईचे दूध आईच काढीत असे . मोरी गाय दुसर्‍या कोणाला काढू देत नसे . ज्याने द्यावे त्याने घ्यावे , असा जणू तिचा निश्र्चय होता . दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही . " गंधेना गाव : पश्यन्ति " गाई वासाने ओळखतात . तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा , हे तिला कळत असे . आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी . ती गाय स्वत्ववती होती . सत्यवती होती , अभिमानी होती . प्रेम न करणार्‍याला ती लाथ मारी . " पाप्या ! माझ्या कासेला तू हात लावू नकोस : माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये , " असे जणू ती सांगत असे .

ती मोरी गाय भाग्यवान होती , असे आम्ही समजत असू . जणू आमच्या घराची ती शोभाच होती . आमच्या घराची देवता होती . आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य , स्त्रेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती . परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला . या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात . पटापट पाय आपटून गुरे मरतात . पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात . एक दोन दिवसांत ढोर मरते .

मोर्‍या गाईला पायलाग झाला . पुष्कळ उपचार केले ; परंतु गाय बरी झाली नाही . एका काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती . आम्ही घरात जपही केले ; परंतु आमची पुण्याई संपली होती . मोरी गाय आम्हास सोडून गेली ! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही . आम्ही सारे जेवलो . आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू ! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु : ख कळते ! इतरांस काय समज ? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुंढ काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात असे .

कधी कधी बोलताना आई म्हणे , " मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले . त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले . भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे ; परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली . माझ्या आईचे म्हणणे खरे आहे , फार व्यापक अर्थाने खरे आहे . ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली , ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले , तिची हेळसांड केली , त्या दिवसापासून दु : ख रोग , दारिद्य्र दैन्य , दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली . चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता , आधारदेवता , या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही , तोपर्यंत तरणोपाय नाही , गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो - पूजा नव्हे . आपण दांभिक झालो आहो . देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो . गाईलाही माता म्हणतो : परंतु तिला खायला प्यायला देत नाही ; तिचे दूध्ही मिळत नाही ; मिळाले तर रूचंत नाही . खोटा वरपांगी नमस्कार करणार्‍याला नरक सांगितला आहे , दास्य सांगितले आहे ."

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP