मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र पहिली

श्यामची आई - रात्र पहिली

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


आश्रमातील प्रार्थना झाली . सारे सोबती सभोवती सभोवती मंडलाकार बसले होते . श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते . तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते . वाळवंटातींल झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो . अंधारात एक किरणही आशा देतो . सध्याच्या निष्प्रेम काळात ’ मला काय त्याचे ’ अशा काळात , असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय . त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते . तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला -- साचीव जीवनाला -- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय .

गावात सर्वत्र शांतता होती . आकाशात शांतता होती . काही बैलांच्या गळ्यांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता . वारा मात्र स्वस्थ नव्हता . तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता . आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता .

श्यामने सुरूवात केली :

" माझ्या आईने माहेर फार श्रीमंत नव्हते , तरी सुखी होते , माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती . माझ्या आईचे माहेर गावातच होते . माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते . माझी आई सर्व भावंडांत मोठी होती . माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते . माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत , कोणी बयो म्हणत . आवडी ! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे . बयो ! खरेच ती जगाची बयो होती ; आई होती . माहेरची गडीमाणसे कांडपिणी , पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला ’ बयो ’ म्हणून हाक मारीत , तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा ह्यद्यालाच कळे !

" माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती . माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती . तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत . माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते . सासर श्रीमंत होते . सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई . निदान ते तरी स्वत : ला तसे समजत . आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते . पोत , पेट्या , सरीवाकी , गोट्तोडे , सारे काही होते . भरल्या घरात , भरल्या गोकुळात ती पडली होती . सासरचे तिचे नावे यशोदा ठेवण्यात आले होते . सासरी ती लहानाची मोठी होत होती . कशाली तोटा नव्हता . चांगले ल्यायला , चांगले खायला होते . एकत्र घरात कामही भरपूर असे . उत्साही परिस्थितीत , सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास् मनुष्य कंटाळत नाही . उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो .

" मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा - अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती . कारण आजोबा थकले होते . वडीलच सारा कारभार पाहू लागले . देवघेव तेच पाहात . आम्ही आमच्यां वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत . आजूबाजूच्या खेड्यांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत ."

" खोत म्हणजे काय ?" भिकाने प्रश्न विचारला . श्याम म्हणाला , " खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल ."

" त्याला काही मिळत नाही का ? " रामने विचारले .

" हो , मिळते तर ! सरकारी शेतसा ~ याच्या जवळजवळ चौथा हिंस्सा खोताला फायदा असतो . खोत गावातील पिकांची आभावणी करतो . पिकांचा अंदाज करतो . ’ याला पीक धरणे ’ असे म्हणतात . एखाद्या शेतात पीक चांगले नसले . तरी चांगले लावतात ! लोकांनी वसूल दिला नाही , तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात . ठरल्या वेळी खोताने शेतसार्‍याचे हप्ते - वसूल आला नसला , तरी - पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत !"

’ आमच्या वर्‍हाड - नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो ." भिका म्हणाला . गोविंदा उत्कंठेने म्हणाला , " पुरे रे आता तुमचे ! तुम्ही पुढे सांगा "

श्यामने पुन्हा गोष्टीला सुरूवात केली .

" आम्ही वडवली गावचे खोत होतो . त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती . धो धो पाणी वाहत असे . दांड बांधून दुरून पाणी आणले होते . ते उंचावरून पडत असे . बागेत केळी , पोफळी , अननस लावलेले होते . निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती . कापे , बरके , अर्धकापे ; तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हांस मी दाखवीन . ती बाग म्हणजे आमचे वैभव , आमचे भाग्य , असे म्हणत ; परतु गड्यांनो ! ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते ! पाप क्षणाभर हसते व कायमचे रडत बसते . पाप थोडा वेळ डोके वर करते ; परंतु कायमचे धुळीत मिळते . पापाला तात्पुरता मान , तात्पुरते स्थान . जगात सदगुणच शुक्राच्या तार्‍याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात .

" खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे . बोलवले तर गेले पाहिजे ; नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा . गावातील कष्टाळू बायकामाणसांनी वांगी लावावी , मिरच्या कराव्या ; कणगरे , करि दे , रताळी लावावी ; भोपळे , कलिंगडे यांचे वेल लावावे . परंतु या सर्वांवर खोताची नजार असावयाची . खरोखर या जगात दुसर्‍याच्य श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही , दुस ~ याला राबवून , रात्रंदिवस श्रमवून , त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे , यासारखा अक्षम्य अपराध नाही . माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले ? पाणीदार मोत्यांची नथ ! खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यांतील मोत्यांसारखा मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती . त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोडांवरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोट्तोड करण्यात आले होते . परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते . तो माझ्या आईला जागे करणार होता .

" माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही ; परंतु पूर्वजांची प्रथा चालू ठेवली . खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटॆ . कोणी ऐकले नाही की , तर त्यांना वाटे हे कुणबट माजले ! कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला म्हारडा म्हणावयाचे , अशी ही पध्दत ठरलेली ! असे म्हणताना आपणच माजलो आहोत , सत्तान्ध झालो आहोत , हे ह्यांच्या लक्षातही येत नसते .

" वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला ; तथापि , त्यांना फारसा अनुभव आला नव्हता . खोतपणाच्या तोर्‍यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात . पूर्वजांचीही पापे होतीच . पाप किंवा पुण्य काही मरत नाही . जगात काही फुकट जात नाही . जे पेराल ते पिकेल ; जे लावाल ते फोफावेल , फळेल .

" एकदा काय झाले , तो अवसेची रात्र होती . भाऊ वडवलीस गेले होते . सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते . आज गावाला जाऊ नका , आज अवरस आहे . वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले ; परंतु भाऊ म्हणाले , " कसली अवस नि कसला शनिवार ! के व्हावयाचे ते होणार . प्रत्येक दिवस पवित्रच आहे . प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो . " ते वडवलीस गेले . दिवसभर राहिले . तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले .

घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले , " भाऊद ! तिन्हिसांजा म्हणजे दैत्याची वेळ . या वेळेस जाऊ नका . त्यातून अवसेची कालरात . बाहेर अंधार पडेल . तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला रहा . कोंबड्याला उठून थंड वेळेस जा . " भाऊंनी ते ऐकले नाही . ते म्हणाले , " म्हातार्‍ये ! अग , पायाखालची वाट , झाली रात्र म्हणून काय झाले ? मी झपाझप जाईन . दूध काढतात , तो घरी पोचेन ."

भाऊ निघाले . बरोबर गडी होता . त्या म्हातारीचा शब्द ’ जाऊ नका ’ सांगत होता . फळणारी पापे ’ चल , राहू नको .’ म्हणत होती . गावातील लोकांनी निरोप दिला . एक जण भेसूर हसला . काहींनी एकमेकांकडे पाहिले . भाऊ व गडी निघाले . अंधार पडू लागला . परमेश्वराचे , संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले .

वडवली गावापासून दीद कोसावर एक पह्या होता . पावसाळ्यात त्याला उतार होत नसे . तो पह्या खोल दरीतून वहात होता . त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती . त्या झाडीत वाघसुध्दा असे . तेथून दिवसाढवळ्याही जावयास नवशिक्यास भय वाटे ! परंतु भाऊ निर्भयपणे जात होते . त्यांना भीती माहीत नव्हती . भुतेखेते , जीवजीवाणू , कसलेच भय त्यांना वाटत नसे .

भाऊ दरीजवळ आले . एकदम शीळ वाजली . भाऊ जरा चपापले . पाप हे भित्रे असते . झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले . भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले . झटकन गडी पळत गेला . भाऊंना खाली पाडण्यात आले . मांगांच्या हातातील सुरे चमकत होते . भाऊंच्या छातीवर मांग बसला . चरचर मान चिरायची ती वेळ . करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते . शेजारच्या भवनातून एक भुजंग फूत्कार करीत सणकन निघून गेला . मांगाचे तिकडे लक्ष नव्हते इतक्यात एका म्हातारीने ओरड केली , " अरे , बामणाला मारले , खोताला मारले , रे , धावा !" ते मांगही जरा भ्यायले .

भाऊ त्या मांगांना म्हणाले , " नका रे मला मारू ! मी तुमचे काय केले ? सोडा मला . ही आंगठी , ही सल्लेजोडी , हे शंभर रूपये घ्या . सोडा मला !" दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते .

म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे , असे दिसले . कोणाची तरी चाहूल लागली . मांगांनी त्या आंगठ्या , ती सल्लेजोडी , ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला . ते मांग काही खरे खुनी नव्हते . या कामात मुरलेले नव्हते . पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते . त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती , प्रेम होते . स्वत : च्या मुलाबाळांच्या प्रेमाने , त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून , ते मांग खून करू पहात होते . कोणी म्हणतात की , जगात कलह , स्पर्धा हेच सत्य आहे . परंतु त्या कलहाच्या मुळाशी , या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे . ते प्रेम संकुचित आहे एवढेच . सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे . युध्द नाही . सहकार्य आहे , व्देष वा मत्सर नाही . असो . भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला . त्याने घाबर्‍या घाबर्‍या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली . आमच्या घरातील व गावातील पुरूष लगेच चालून गेली . पालगडला पोलिस ठाणे होते . तेथे वर्दी देण्यात आली .

घरात बातमी येताच आकान्त झाला . सार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले ! घरात दिवे लागले होते ; परंतु सार्‍यांची तोंडे काळवंडली होती . कसचे खाणे नि कसचे पिणे ! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता . त्या वेळेस आम्ही कोणी झालेली नव्हतो . आईला समजू लागले होते . बायकांना लवकर समजू लागते . माझी आई ती सारी कथा आम्हास सांगे . आई देवाजवळ गेली . निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला . ती म्हणाली , " देवा नारायणा ! तुला माझी चिंता तुला सारी काळजी . आई जगदंबे ! तुझी मी मुलगी . मला पदरात घे . माझे कुंकू राख . माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको , आई आई ! त्यावर कुहाड नको पडू देऊ ! मी काय करू ? कोणते व्रत घेऊ ? देवा ! माझी करूणा येऊ दे , तुला तू करूणेचा सागर . येऊ दे हो घरी सुखरूप . पाहीन त्यांना डोळे भरून ; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर . मला दुसरे काही नको . नकोत हे दागिने ! नकोत ती मोठी वस्त्रे ! कशाला मेली ती खोती ! नको मला , काही नको . पती हाच माझा दागिना . तेवढा दे ठेवा ." असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली .

आईने देवाला आळविले . प्रार्थिले ; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची ? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे , व्रत पाहिजे . माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले . मित्रांनो , जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री - पुरूष रत्ने आहेत ! राम आहे , हरिश्र्वंद्र आहे , सीता आहे , सावित्री आहे . तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका . सावित्री अमर आहे . स्त्रियांना सदैव ती धीर देईल . मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल . मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो .

माझ्या आईचे सौभाग्य आले . भाऊ घरी आले . त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी . दर वर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी . घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही . या व्रतात वटपूजा करावयाची असते . आकाशाला कवटाळू पाहाणार्‍या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे . वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो , ते जगाला छाया देवो . आधार देवो , वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो . त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची , उन्नत होण्याची सदैव इच्छा असो . वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात , त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो . या व अशाच भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील .

सावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे . मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे . आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती . त्या वेळेस मी आठ - नऊ वर्षांचा असेन सावित्रीव्रताला आरंभ होणार होता . माझी आई हिवतापाने आजारी होती . हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता . या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात . आईला जरा चालले तर घेरी येत होती .

आईने ‘ श्याम ’ अशी हाक मारली . मी आईजवळ गेलो व विचारले , " काय आई ? काय होते ? पाय का चेपू ?"

आई म्हणाली . " पाय नको रे चेपायला . मेले रोज चेपायचे तरी किती ? तू सुध्दा कंटाळला असशील हो . पण मी तरी काय करू ?

आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले . मी रडू लागलो . आई पुन्हा म्हणाली , " श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो . पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे . करशील ना तू बाळ . "

" कोणते काम ? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का ? " मी म्हटले .

आई गहिवरून म्हणाली , " नाही . तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस , हे बघ , उद्यापासून वट - सावित्रीचे व्रत सुरू होईल . मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत . मला भोवळ येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन . पूजा करीन . तीन प्रदक्षिणा घालीन . बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ ."

असे म्हणोन आईने माझा हात आपल्या हातात घेतला . प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले .

’ आई ! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील ? " मी विचारले . " चालतील हो बाळ . देवाला डोळे आहेत . देव काही मेला नाही . त्याला सारे समजते , कळते . तू म्हणजे मीच नाही का ? अरे तू माझ्या पोटचा गोळा माझाच जणू भाग ! माझेच तू रूप ! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील . मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे ." आई म्हणाली .

" पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर . शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ‘ अहाऽरे बायको !’ असे म्हणून माझी फजिती करतील . मला लाज वाटते , मी नाही जाणार ! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील . " अशा अनेक सबबी मी सांगू लागलो .

आईची म्लान मुद्रा खिन्न झाली . ती म्हणाली , ’ श्याम आईने काम करावयास कसली रे लाज ? हे देवाचे काम . ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील . देवाचे काम करावयास लाजू नये , पाप करावयास माणसाने लाजावे . श्याम ! त्या दिवशी चुलीमागचा खोबर्‍याचा तुकडा तू घेऊन खाल्लास . मी बघितले . पण बोलल्ये नाही . जाऊ दे . मुलाची जात आहे . परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे ? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस ? तो पांडवप्रताप कशाला वाचतोच ? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी . काम करावयास , प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का ? नसलास जाणार तर मी जाईन हो . येऊन - जाऊन काय होईल , मी भोवळा येऊन पडेन . मरेन तर सुटेन एकदाची . देवाजवळ तरी जाईन . परंतु श्याम ! तुमच्यासाठीच जगत्ये रे " असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला . आईचे शब्द माझ्या मनात खोलखोल . माझे ह्यदय विरघळले पाझरले , पावन झाले . " देवाचे काम करावयास लाजू नको ; पाप करण्याची लाज धर - " थोर शब्द ! आजही ते शब्द मला आठवण आहेत . आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे ? देवाच्या कामाची देशाच्या कामाची , भारतमातेच्या कामाची , आम्हास लाज वाटते . परंतु वाईट पुस्तक वाचण्याची , वाईट सिनेमा पाहण्याची , तपकीर ओढण्याची , विडी - सिगरेट ओढण्याची , सुपारी खाण्याची , चैन करण्याची लाज वाटत नाही . पुण्यकर्म , सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे . फार वाईट आहे ही स्थिती .

मी आईच्या पाया पडलो व म्हटले , " आई ! जाईन हो मी . कोणी मला हसो , कोणी काही म्हणो . मी जाईन . पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला . देवाला बांधून आणता झाला . तुझी काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे . शाळेत मास्तर रागावले , त्यांनी मारले तरी चालेल . आई ! तुला माझा राग आला होय . तुला वाईट वाटले ? असे केविलवाणे मी विचारले .

" नाही हो बाळ . मी तुझ्यावर कशी रागवेन ? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम ! " आई म्हणाली .

गड्यांनो ! मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे . माझ्या आईने त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही . " पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको !"

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP