मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र एकतिसावी

श्यामची आई - रात्र एकतिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईत वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात. मोह वाईट गोष्टींचेच असतात, असे नाही; तर चांगल्या गोष्टींचेही असतात.
"श्याम! आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळ वाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम! तू ज्या आठवणी सांगतोस, त्या असतात साध्या; परंतु सुंदर धर्म तू दाखवून देतोस. कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले; तसे तुझ्या या लहान गोष्टींत धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते. श्याम! काल मी रामजवळ म्हटले, की ही गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्ट आहेत. गोष्टीरुपाने तू धर्म सांगत आहेस; धर्मरुपाने गोष्टी सांगत आहेत. रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व ह्रदयता आपणांस  ओतता येईल. हे तू दाखवीत आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही. बहीणभावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे जीवन समृध्द, सुंदर व श्रीमंत करता येते. श्याम! तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले! त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास. त्या वेळेस मला गहिवरुन आले होते. श्याम! आता केव्हा असे ऐकावयास सापडले? तू जणू श्यामसुंदर कृष्णाची मूर्तीचे आहेस, नाही?"
"राजा! अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे. तुझे माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुला माझे सारे चांगलेच दिसते. माझ्यात एकच गुण आहे; तो म्हणजे कळकळ. या कळकळीने सारे सजून दिसते. मी कीर्तन करतो, तेव्हा संगीतगायनाची उणीव मी माझ्या उत्कंठतेने व कळकळीने भरुन काढतो. राजा! मजजवळ दुसरे काय आहे? काही नाही. खरेच काही नाही. मी आपला बोलका ढलपा. कामे तुम्ही करता. मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्दवेल्हाळ मी; परंतु तुम्ही कार्यवेल्हाळ आहात. राजा! मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो. भिका, नामदेव, राम हे किती काम करतात! तुम्ही मला मोठेपणा दिलात, तरी मजजवळ काही ठेवतो. हे मी जाणून आहे. तुम्ही दगडाला शेंदूर फासून नमस्कार करीत आहात." श्याम बोलत होता.
इतक्यात राम आला.
"काय,रे, राम? गाडी आली की काय?" श्यामने विचारले.
"नाही. बेत बदलला आहे. आता न जाता रात्री जायचे ठरले. रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ, असे दाजी म्हणाले. राजा! रात्री जा, काही उशीर होणार नाही!" राम म्हणाला.
"देवाची इच्छा!" राजा म्हणाला.
सायंकाळ झाली होती. आकाशात अनंत रंगांचे प्रदर्शन उघडले होते. लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते. भव्य देखावा दिसत होता. नदीतीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते. गोष्टी बोलता दोघे मुके झाले. एकमेकांचे हात त्यांनी हातांत घेतले होते. हात सोडून दिले. गुराखी गाई चारुन परत जात होते. कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते.
"श्याम! चला परत जाऊ." राजा म्हणाला.
"राजा! असे भव्य सृष्टिदर्शन झाले, म्हणजे वाटते कोठे जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे. सृष्टीच्या मूक अशा महान संगीत सिंधूत आपल्या जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा." श्याम बोलत होता. त्याचे ओठ थरथरत होते. श्याम म्हणजे मूर्त भावना, श्याम म्हणजे मूर्त उत्कटता होती.
शेवटी दोघे मित्र आले. आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली. आकाशाच्या गच्चीत एकेक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले. गच्चीत एकेक माणूस जमता जमता सारी गच्ची भरुन गेली. प्रार्थनेला सुरुवात झाली. प्रार्थना संपली. क्षणभर सारी मंडळी डोळे मिटून बसली होती. श्यामने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
आमच्या लहानपणी जेव्हा आईचे सांधे दुखत होते, त्या वेळेस लाडघरच्या देवीला एक नवस केलेला होता. दापोली तालुक्यातच लाडघर म्हणून मोठे सुंदर गाव समुद्रकाठी आहे. लाडघर येथे तामस्तीर्थ आहे. लाडघरजवळ एके ठिकाणी समुद्राचे पाणी लालसर दिसते, तांबूस दिसते, म्हणून त्यास तामस्तीर्थ म्हणतात. तो देवीचा नवस किती तरी दिवस फेडावयाचा राहिला होता. आईचे सांधे बरे झाले होते. जरी ती पहिल्याइतकी सशक्त राहिली नव्हती, तरी हिंडू-फिरु शकत होती, दोन धंदे करु शकत होती. लाडघरच्या देवीला लाकडाची बाहुली, लाकडाचा कुंकवाचा करंडा, खण, नारळ, वगैरे वाहावे लागत असे. हा नवस फेडण्यासाठी आई पालगडहून दापोलीस येणार होती व दापोलीहून आईला घेऊन मी लाडघरास जावयाचे, असे ठरले होते.
आई केव्हा येते, याची मी वाट पाहात होतो. किती तरी वर्षांनी आई पालगडच्या बाहेर जाणार होती! बारा वर्षांत पालगदच्या बाहेर ती गेली नव्हती. ना कधी हवापालट,ना कधी थारेपालट. आई आली. दापोलीहून लाडघरास जाण्यासाठी मी गाडी ठरविली. दापोलीहून पहाटे निघावयाचे ठरले. दापोलीपासून लाडघर तीन कोस होते. तीन तासांचा रस्ता होता.
पहाटेचा कोंबडा आरवला. आई उठली. मीही उठलो. गाडीवान वेळेवर आला व हाका मारु लागला. मी सारे सामान घेतले. आई व मी गाडीत जाऊन बसलो. लाडघरास आमची एक दूरची आतेबहीण होती. तिच्याकडे उतरावयाचे आम्ही ठरविले होते. सकाळी सात आठ वाजता पोचू, असे वाटत होते.
गाडीवानाने गाडी हाकली व बैल चालू लागले. बैल मोठ्या आनंदाने चालत होते. पहाटेची शांत वेळ होती. कृत्तिकांचा सुंदर पुंजाकार आकाशात दिसत होता. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज त्या शांत वेळी आल्हादकारक वाटत होता. जणू सृष्टिमंदिरातीलच त्या गोड घंटा पहाटे वाजत होत्या! फुले फुलली होती. वारे  मंद वाहत होते. पाखरे गात होती. सृष्टिमंदिरात काकडाआरती सुरु झाली होती.
गाडीमध्ये मी व माझी आई दोघे जणच होतो. मी व माझी आई; माझी आई आणि मी. दोघे, अगदी दोघेच होतो. आमचे एकमेकांवर फार प्रेम होते. माझे वय चौदा-पंधरा वर्षांचे होते; तरी आईला मी लहानच होतो. आईला मुले कधी मोठी झाली, असे वाटतच नसते. मी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडलो होतो. गाडी मोठी होती, पुष्कळ जागा होती. आईच्या मांडीवर डोके खुपसून मी निजलो होतो. आई माझ्या डोक्यावरुन, माझ्या केसांवरुन आपला प्रेमळ हात फिरवीत होती.
"किती रे भरभरीत शेंडी? श्याम? तेलबील नाही वाटते लावीत कधी?" आईने विचारले. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. मी फार सुखावलो होतो.
सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन
अशी माझी स्थिती झाली होती. आई व मी, आम्ही एकत्र कधीही प्रवास केला नव्हता. इतक्या स्वतंत्रपणे, मोकळेपण, आम्ही कधी हिंडलो नव्हतो. आई व मी होय. आम्हां दोघांचे त्या दिवशी जग होते. माझ्या मनात अनेक सुखरुन्पे खेळत होती. मी मोठा होईन, शिकेन, माझ्या आईला मी काही कमी पडू देणार नाही; तिला सुखाच्या स्वर्गात ठेवीन, वगैरे मनोरथ मी मनात मांडीत होतो. मनोरथाचे मनोरे रचावयाचे व पाडावयाचे, हा मनाचा चंचल स्वभावच आहे.
आई मला म्हणाली, "श्याम, बोलत रे का नाहीस? अजून झोप पुरी नाही वाटते झाली?"
"आई, तुझ्या मांडीवर मुकेपणाने मी निजावे व तू प्रेमळपणाने माझ्याकडे बघावेस, माझ्या अंगावरुन हात फिरवावास, याहून दुसरे काही मला नको. मला थोपट. आई तुझ्याजवळ नेहमी लहान मूल व्हावे, असेच मला वाटते. थोपट मला, ओव्या म्हण. " माझे शब्द ऐकून आई खरोखरीच मला थोपटू लागली. व ओव्या म्हणू लागली. रानातील पाखरे किलबिल करु लागली होती. दापोली ते लाडघर दुतर्फा घनदाट जंगल आहे. रस्त्यात सूर्याचा प्रकाशही येऊ शकत नाही. एके ठिकाणी डोंगरातून धो धो पाणी रस्त्यावर पडत आहे. तो देखावा भव्य व मूक करणारा आहे. काजू, आंबे, फणस, वड, पायरी, कंरज यांची झाडे दुतर्फा रस्त्याने आहेत. या झाडांवरुन नाना प्रकारचे पक्षी हिंडू फिरु लागले. गाऊ लागले. सृष्टी जागृत होऊ पाहत होती; परंतु मी माझ्या आईच्या मांडीवर निजू पाहत होतो. झोप येत नव्हती. तरी डोळे मिटून पडलो होतो. जगाची उठायची वेळ; परंतु माझी माता मला निजवीत होती. आईने ओव्या म्हणता म्हणता पुढील ओवी म्हटली. कधी कधी माझी आई स्वत:ही ओव्या करुन म्हणत असे.याचा मला त्यापूर्वी अनुभव आला होता. या वेळेसही तोच अनुभव आला.
घनदाट या रानात । धो धो स्वच्छ वाहे पाणी
माझ्या श्यामच्या जीवनी । देव राहो ॥
आई अशी ओवी म्हणताच मी खाडकन उठून बसलो. धो धो वाहणार्‍या पाण्याला पाहावयास मी उठून बसलो.
आईने विचारले, " काय, रे, उठलाससा? कंटाळलास, वाटते? नीज, हो. माझी मांडी दुखायची नाही. "
मी म्हटले, " आई, श्यामच्या जीवनात तू देवाला बोलावीत आहेस, मग मी कसा निजू? देव येणे म्हणजे जागृती येणे. देव सर्वांन जागृती देतो, सूर्यनारायण सर्व चालना देतो, नाही का?"
दुरुन समुद्राची गर्जना ऐकू येत होती. जंगल संपताच दूरचा उचंबळणारा सागर दिसू लागला. संसाराच्या जंगलाजवळच परमेश्वरी आनंदाचा समुद्र अपरंपार उचंबळत असतो. संसाराच्या जरा बाहेर जा, की तिथे आनंद तुम्हांला भेटेल.
दुरुन टुमदार व सुंदर लाडघर गाव दिसू लागला. आम्ही गावात शिरलो. ज्याच्या त्याच्या बागेत बैलरहाट सुरु होते. बागेचे शिंपणे चालले होते. रहाटाचा कुऊ कुऊ आवाज ऐकावयास येत होता. बैलांच्या पाठीमागून लहानशी शिमटी हातात घेऊन हाकलणारे मुलगे, त्यांचा आवाज ऐकू येत होता. पाण्याचे पाट बागेतून वाहत होते. पोफळी, नारळी, केळी, अननस यांना पाणी जात होते. प्रत्येकाचे घर व घराशेजारी प्रत्येकाचे केळीपोफळीचे-नारळींचे आगर. मोठा सुखी व सुंदर असा तो गाव होता. स्वच्छ व समृध्द मुबलक पाणी, सुंदर हवा, फळाफुलांची रेलचेल, दाट झाडी.
आमची गाडी गावातून चालली. नेमके घर आम्हांस माहीत नहते. विचारीत विचारीत चाललो. वाटते मुलांची शाळा होती. आमच्या गाडीकडे शाळेतील लहान मुले पाहू लागली. एखादी नवीन गाडी, नवीन पक्षी, नवीन मनुष्य काहीही अपरिचित दृष्टीस पडताच मुलांची जिज्ञास जागी होत असते.
सुभाताईचे घर सापडले एकदाचे. गाडीवानाने गाडी सोडली. बैलांना बांधून चारा घातला. आम्ही घरात गेलो. सुभाताईला मी कधीही पूर्वी पाहिले नव्हते. आईने सुध्दा किती तरी दिवसांनी तिला पाहिले. माझी आई सुभाताईपेक्षा वयाने वडील होती. आईच्या मोठ्या मुलीसारखी सुभाताई शोभत होती.
आईला एकदम पाहताच चकितच झाली. "वयनी! ये. किती ग वर्षांनी आपण भेटत आहोत!"
अशा गोड शब्दांनी सुभाताईने आईचे स्वागत केले. "आणि हा कोण?" तिने माझ्याकडे पाहून विचारले.
आई म्हणाली, ‘सुभ्ये! हा श्याम हो. लहानपणी हट्ट करणारा. सर्वांशी भांडणारा तो हो हा. तुला नाही का आठवत?"
"बराच की रे मोठा झालास. इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते?" सुभाताईने विचारले.
"हो, मी चौथ्या इयत्तेत आहे."असे मी उत्तर दिले.
त्या प्रेमळ, भरल्या घरात आम्ही एकदम घरच्यासारखी होऊन गेलो. सुभाताई म्हणाली, "वयनी, समुद्रावर आताच स्त्रात करावयास जा; म्हणजे दहा-अकरा वाजायला परत याल. दुपारी जेवणे-खाणे झाल्यावर देवीला जाऊ; म्हणजे सायंकाळी तुम्हांला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी आठ दिवस राहतीस, तर किती चांगले झाले असते! मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का?"
"सुभ्ये! ही गाडी परत भाड्याची ठरविली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आल्ये आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघी भेटलो, हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो." आई म्हणाली.
आम्ही कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याबरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामस्तीर्थावर जावयाचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो! अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार, खाली निळा पाण्याचा समुद्र व वर निळा आकाशाचा समुद्र.
आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्त्रान करावयाचे, ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा तेथे उसळत होत्या. येथील वाळूही जरा लालसर आहे असे वाटत होते."येथेच लाल पाणी का बरे?" असा सुभाताईच्या यजमानास मी प्रश्न विचारला.
ते म्हणाले, " देवाचा चमत्कार; दुसरे काय?"
आई म्हणाली, " येथे देवाने राक्षसास मारले असेल, म्हणून हे पाणी लाल झाले!" सुभाताईचे यजमान म्हणाले, "हो!तसा तर्क करावयास हरकत नाही."
लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे मी गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुऊ लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुल्या करावयास हसत हसत खेळत-खिदळत येत होता. पायांखालची वाळू लाट माघारी जाताच निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराच्या कृपासमुद्रात डुंबत होतो. पाणी खारट होते, तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्यायली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिली, हळदकुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली; चार आणे समुद्रात फेकोन दिले! मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्या रत्नाकराला आईने चार आणे दिले! ती कृतज्ञता होती. चंद्रसूर्य निर्माण करणार्‍या देवाला भक्त काडवार्ताने, निरांजनाने ओवाळतो. स्वत:च्या अंत:करणातील कृतज्ञता व भक्ती काही तरी बाह्य चिन्हात प्रकट करावयास मनुष्य पाहात असतो. त्या अनंत सागराला पाहून थोडी त्यागबुध्दी नको का शिकावयाला?
कोरडे नेसून पुन्हा आम्ही गाडीत बसलो. गाडी घरी आली, तो बारा वाजावयास आले होते. भूक भरपूर लागली होती. सुभाताईने पाने वगैरे घेऊन तयारी केलीच होती. तिच्या यजमानांचे स्त्रानसंध्या, देवतार्चन, पहाटेच होत असे. पहाटे सारे करुन मग ते बागेच्या, आगराच्या कामास लागत असत.
आम्ही जेवावयास बसलो. जेवण अत्यंत साधे परंतु रुचकर होते. सुभाताईने तेवढ्यातल्या तेवढ्यात आमच्यासाठी खांडवी हे साधे पक्वान्न केले होते. नारळाचा आंगरस काढला होता; नारळाची चटणी होती. प्रत्येक पदार्थाला नारळाने रुची आली होती. वांगी व त्यात मुळ्याच्या शेंगा अशी भाजी होती. ती मोठी झकास झाली होती. घरचे लोणकढे तूप होते.
"श्याम, श्लोक म्हण चांगलासा." आई म्हणाली.
मी"केयूरा न विभूषयन्ति पुरुष" हा संस्कृत श्लोक म्हटला. सुभाताईच्या यजमानास माझा श्लोक फार आवडला.
"इंग्रजी शाळेत जातोस, तरी श्लोक म्हणायला लाजत नाहीस वाटते? अलीकडच्या मुलांना चार श्लोकही चांगले पाठ येत नाहीत. तुझा नंबर कितवा आहे, श्याम!" त्यांनी मला विचारले.
"दुसरा." मी सांगितले.
"वा! चांगला हुशार दिसतोस! ते म्हणाले.
सुभाताईचा मुलगा पाच वर्षांचा होता व मुलगी दोन-अडीच वर्षांची होती. मुलगा मधू वडिलांजवळ बसला होता. त्यानेही एक चांगला श्लोक म्हणून दाखविला.
"श्याम! खांडवी घे हो आणखी. लाजू-बिजू नकोस." सुभाताई म्हणाली
"श्याम मुळी सार्‍या जगाचा भिडस्त. येथे नको हो लाजायला! श्याम!" आई हसत म्हणाली.
माझी आईही जेवावयास बसली होती. सुभाताई तिला प्रेमाने म्हणाली, "वयनी! तू आपली सावकाश जेव. त्यांना जाऊ दे उठून."
सार्‍यांची जेवणे झाली. ओल्या पोफळातील सुपारी सुभाताईने आईला दिली. मी सुपारी खात नसे; परंतु ओल्या सुपारीतले खोबरे कुरतडून खाल्ले. सुभाताई व आई दोघींनी आवराआवर केली. दोघी जणींनी जरा अंग टाकले व दोघीजणी बोलत होत्या. सुभाताईच्या मुलग्याबरोबर मी आगरात गेलो. आगरातील मजा पाहात होतो. कितीतरी केळी प्रसवल्या होत्या. केळीच्या दात्यांची पखरण पडली होती. केळीच्या दात्यांची चटणी करतात. परंतु फार असले, म्हणजे त्यांना कोण विचारतो! केळ्फुलाची एकेक पारी उघडत होती व केळ्याची फणी बाहेर पडत होती. पेरुचे झाड होते. त्यावर मी चढलो. पोपट बसले होते त्याच्यावर. एक सुंदर पेरु पोपटाने टोचला होता. आम्ही तो पाडला व खाल्ला इतक्यात सुभाताईने हाक मारली. म्हणून मी घरात गेलो व मधूही पाठोपाठ धावत आला.
"श्याम! त्या पपनशीवरची दोन-तीन पपनसे तोडून आण. दोन फोडू व एक बरोबर घेऊन जा, गाडीत खायला होईल."सुभाताईने सांगितले.
"कोठे आहे झाड?" असे मी विचारताच" चल, मी दाखवितो, मामा!" असे मधू म्हणाला व माझा हात धरुन मला ओढू लागला. पपनशीच्या झाडावर पिवळी पिवळी नारळाच्या सुखडीएवढी पपनसे लटकलेली होती. आमच्या घरी लहानपणी पपनसे होती; परंतु तिला तितकी मोठी फळे येत नसत. मी झाडावर चढून दोन-तीन पपनसे पाड्ली, पपनसे घेऊन आम्ही घरात गेलो. मी अशी सूचना केली, की रानात देवाला जावयाचे तेथेच पपनसे फोडावी. रानात मजा येईल. परंतु सुभाताई म्हणाली, "रानात आपण ओला नारळ व पोहे खाऊ, पपनसे येथेच फोडा." पपनसे फोडण्यात आली. गाडीवानालाही नेऊन दिल्या फोडी. फारच गोड होती पपनसे.
देवीला जायची वेळ झाली. मी गाडीवानास उठविले. सुभाताई, तिची मुले, मी व माझी आई सारी गाडीत मावलो. गाडी मोठीच होती. गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी ती देवी होती. आईने देवीची पूजा केली. लाकडी बाहुली, करंड्या, बांगड्या तिच्या पायांवर वाहिल्या. खणनारळांनी देवीची ओटी भरण्यात आली. सार्‍यांनी कपाळाला अंगारा लावला व घरच्या माणसांसाठी कागदाच्या चिटोर्‍यात आईने पुडी करुन घेतली. मग आम्ही वनभोजन केले. नारळ, पोहे, गूळ. रानात गंमत वाटली. रानात नेहमी मजा वाटते, मनाला प्रसन्न व मोकळे वाटते. वनभोजने, तेथे घरच्या भिंती नसतात. विशाल सृष्टीच्या विशाल घरात आपण असतो. तेथे संकुचितपणा नाहीसा झालेला असतो.
देवीच्या पाया पडून आम्ही घरी गेलो. आम्हांला आता परत दापोलीस जावायाचे होते. दापोलीहून रात्री बैलगाडीने आई परत पालगडला जाणार होती. आम्ही तयारी केली. मी सुभाताईला व तिच्या यजमानांना नमस्कार केला.
"तू दापोलीस जवळच आहेस; एखाद्या रविवारी यावे. घरी पालगडास इतके लांब जावयाचे, तर येथे येत जा. ऐकलेस ना, श्याम!" सुभाताई म्हणाली.
तिचे यजमान म्हणाले,"श्याम! येत जा, रे. आम्ही काही परकी नाही. अरे गेल्या-आल्याशिवाय ओळख तरी कशी होणार. ये हो!" मी‘हूं’ म्हटले; आम्ही देवाच्या पाया पडलो. देवांना सुपारी ठेवली. सुभाताईने पोफळे, दोन शहाळी, एक मोहाचा नारळ घरी नेण्यासाठी बरोबर बांधून दिली. पपनसेही दोन घेतली.
"सुभ्ये, येते हो!" आई म्हणाली. आई निरोप मागू लागली.
"वयनी! आता पुन्हा, ग, केव्हा भेटशील?" सुभाताई भरल्या मनाने म्हणाली.
आई म्हणाली, "सुभ्ये! देवाला माहीत, केव्हा भेटू, ते. बारा वर्षांनी मी आज पालगड सोडून क्षणभर बाहेर पडल्ये. जायचे तरी कोठे? येऊन जाऊन माझे दोन भाऊ पुण्या-मुंबईकडे आहेत. त्याच्याकडे गेल्ये तर! परंतु त्यांचे संसार आहेत. त्यांना बहिणीची आठवण कोठे येत असेल एवढी? सुभ्ये, गेली पाच वर्ष सारखा हिवताप लागला आहे पाठीस. ताप आला, की पडावे अंथरुणावर; घाम येऊन ताप निघाला, की उठावे कामाला. घरात तरे दुसरे कोण आहे? गरिबाला दुखणी येऊ नयेत हो. पापच ते जिभेला चव मुळी कशी ती नसते. आल्याचा तुकडा व लिंबाची फोड घेऊन कसे तरी दोन घास घशाखाली ढकलायचे. असो देवाची इच्छा! आपण माणसे  तरी काय करणार दुसरे आला भोग भोगावा, आलेला दिवस दवडावा. हे सांगायचे तरी कोणाला? कोणाजवळ दु:ख उगाळायचे? इतक्या वर्षांनी तू भेटलीस; तुझा प्रेमळ स्वभाव, म्हणून बोलावसे वाटले. माझ्या मुलीसारखीच तू चंद्री नि तू खेळत असा. तुला न्हायला घातले आहे, तुला लहानपणी परकर शिवले आहेत. माझीच तू, म्हणून बोलत्ये. जरा दु:ख हलके होते. बरे वाटते. जगात आपल्या दु:खाने दुसरा दु:खी होतो, हे पाहून जरा बरे वाटते. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे बोलावे," असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला.
"वयनी! आमच्या मधूच्या मुंजीत ये हो आता. वयनी! श्याम वगैरे मोठे होतील, मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत, हीच देवाची देणगी!" सुभाताई म्हणाली.
आई म्हणाली, "हो. तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला, की माझे सारे काम करु लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरे, येत्ये!" असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलांच्या हातात एकेक रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला.
"वयनी! रुपया कशाला?" सुभाताई म्हणाली.
"राहू दे, ग! मी आता पुन्हा त्यांना कधी भेटने? सुभ्ये, तुझी वयनी आता श्रीमंत नाही, हो असू दे हो तो रुपया." असे म्हणून मुलांच्या पाठीवरुन हात फिरवून आई निघाली.
आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. गाडी निघाली. बैलांना परत घरी जावयाचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता. बैलांना हळूहळू जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली.
सायंकाळ होत आली होती. सारा समुद्रच तामस्तीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्याच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्या दमल्या-भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता. बुडाला, सूर्य बुडाला. तो लाल गोळा समुद्रात पडला. त्या वेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसर्‍या दिवशी परत येणार होता.
दोन्हीकडे किर्र झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्री वेळी जंगलातून जाण्यास फारच गंभीरता वाटते. रातकिडे ओरडत होते. दुरुन समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकर गाडीत बोलू लागली.
"आई! पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई! तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे, असे वाट्ते."मी आईचा हात हातात घेऊन म्हटले.
आई म्हणाली," तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईल. मग मला पंढरपूर, नाशिक, काशी, व्दारका, सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. हे सुध्दा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर! आपल्यात म्हण आहे ना? "काशीस जावे नित्य वदावे । यात्रेच्या त्या गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या  घरी आहेत. गरिबासाठी ही सोय आहे. बाळा! आपण कोठे जावयाचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखे घरी धरणे धरुन बसतात. वाटते नको जिणे! पुरे हा संसार! कोठल्या यात्रा नि बित्रा! अरे, ही संसारयात्रा हीच मोठी यात्रा, हो! या यात्रेतूनच भरल्या हातांनी अब्रुनिशी मला डोळे मिटू दे, म्हणजे झाले."
डोंगरावर धो धो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यांतूनही शांत प्रवाह होता. गालांवर घळघळत होता. त्या पवित्र गंगा-यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदरात घुसविले.
"आई, तू मला हवीस, आम्हांला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकतो. तू नाहीस, तर तर कोणासाठी शिकावयाचे, कोणासाठी जगावयाचे? आई! तुला देव नाही हो नेणार!" असे म्हणून मी आईला घट्ट धरुन ठेविले. जणू त्या वेळीस मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवीत होतो.
"देव करतो ते सारे बर्‍यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले."आई म्हणाली.
आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने सर्व कोमल भावनांनी उचंबळून मी माझे डोके ठेविले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले," आई! तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. एका भिकार्‍याचा मुलगा आपल्या झोळीतील चार दाणे रस्त्यावर टाकी. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई! आपलेही तसेच सारे चांगले होईल. नाही का? आपले दारिद्य्र जाईल चांगले दिवस येतील."
"श्याम! देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो. विषाचे अमृत करतो, सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसारीची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे?" आई म्हणाली.
"आई! देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरिबी आली, अपमान झाले, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या तरी तीही कृपाच, असे म्हणतात, ते खरे का ग?" मी प्रश्न विचारला.
"बाळ! तुझ्या अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे जे करतो ते बर्‍यासाठी, एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले, ते तुझ्या बर्‍यासाठी ना? मग माझ्याहून, किती तरी पटींनी देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवो, अमृताचा देवो, त्याच्यावर श्रध्दा असावी." आई जणू श्रध्दोपनिषदच गाऊन राहिली होती.
एकदम माझे लक्ष समोर गेले. "वाघ! आई! वाघ!" मी घाबर्‍या घाबर्‍या म्हटले. काय तेजस्वी डोळे व भव्य भेसूर मुद्रा! काय ती ऐट! उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो. तसेच त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत. गाईगुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे बंदन करावयास तो आला होता.
हळूहळू दापोली गाव आले. दूरचे दिवे लुकलुक दिसू लावले. रात्री नऊ वाजता आम्ही घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही. दुसर्‍या दिवशी गेली.
मित्रांनो! तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहेत. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कोठे गेलो नाही. तो एकच दिवस! त्या एकाच दिवशी मी व माझी आई सूष्टीमाऊलीच्या-समुद्र व वनराजी यांच्या सहवास होतो. दोघे रंगलो. प्रेमात डुंबलो. ह्रदय ह्रदयांत ओतली. त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने, अस्सल शंभर नंबरी सोने करु पाहात होता. आणखी प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापभ्रष्ट देवताच होती.
असे सांगून श्याम एकदम उठून गेला. सारे स्तब्ध बसले होते. थोड्या वेळाने मंडळी भानावर आली व आपापल्या घरी भरल्या अंत:करणाने गेली.

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP