मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र एकोणिसावी

श्यामची आई - रात्र एकोणिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-तीन वेळा पळून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वत:च्या व दुसर्‍याच्याही गळ्याला एखादे वेळेस फास लावावयाचा, असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठ्वून दिले.
त्या वेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगात सुटून आले होते. त्याची प्रकृती फार अशक्त होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली; परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाईमाणूस त्या वेळेस नव्हते. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता. कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे.
एके दिवशी अक्काला वात झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते. परंतु मनात साठविलेले  ते सारे दु:ख ती वातात बोलत होती. तिला शुध्द नव्हती. त्या बेशुध्द स्थितीत सारे ह्यद्य़ातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले, तरी सासरी जाच का असावा, असे तिला वाटे.
ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसर्‍या घरातील आलेली मुलगी. तिचे आईबाप व्हावयाचे, हे खरे म्हटले तर सासूसासर्‍यांचे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते, की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील, तो सुदिन. सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यांत पाहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे.
सासरचे बोल जसे कारल्याने वेल । गोड कसे लागतील काही केल्या ।
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी । रात्रंदिन रडविती धायी धायी ।
वगैरे ओव्यांत हे करुण चित्र काढलेले आहे. या ओव्या बालकांनीच रचलेल्या आहेत.  त्यांनी स्वत:च्या स्थितीचे हे हीनदीन वर्णन केलेले आहे. कार्ल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी - या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली, म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे, अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे. आम्हांलाही मारीत असत. म्हणून आम्ही मारतो,हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले-मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासूसुनेचा खेळ करीत असतील, तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात! ‘करशील गडबड, का मारु आणखी!’ वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे.लहान आहे पाच-सहा वर्षांचा. तो मला म्हणतो,‘अण्णा, मला मास्तर व्हायचे आहे, नाही तर शिपाई व्हायचे आहे.’मी त्याला जर विचारले,‘हे दोन धंदेच तू का पसंत केलेस?’ तर तो म्हणतो, "म्हणजे सर्वांना  मारता येईल. सगळ्यांना झोडपून काढीन!’मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो, असे म्हणाल; परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी साधी माणुसकी आमच्यांत नसावी! पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांवरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती - त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत, हे पाहून ह्रदय जळते, पिळवटून येते, परंतु जाऊ दे.
दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसला होतो. ताम्हनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या? कोठले कोलन वॉटर? आई ताम्हन धरुन बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले, कोणास माहीत. परंतु ताम्हन मला धरावयास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवांस म्हणाली, "देवा, शंकरा, देवळात जाऊन तुझी पिडी तीन दिवस दहीभाताने लिंपीन, पोरीला गुण येऊ दे. उतार पडू दे. अंगाची तलखी कमी होऊ. ताप उतरु दे. "प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली होती. आईचा देवावर भरवसा होता; परंतु रात्रंदिवस सेवाहि करीतच होती. आपल्या प्रयत्नांत आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे.
"रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा. येथे रडवू नकोस. "असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. तिन्हीसांजाची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिणीना कांडप घातलेले होते, ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी‘गुरे आली, हो’ एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थबथबलेला हात अंगाला लागावा, म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे, म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर! लहान, दुबळा जीव! तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसांत होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता? आक्रोश करीत होता? ‘माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही, तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल.’ असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालह्रदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फ़ोड्र लागली. कळवळली.
माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे, का दिवा लावावा आणि देवातुळशीस दाखवावा, का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजीभात करावा, का रंगूला खेळवावे, का अक्काजवळ बसावे? तिला काय हजार हात होते? आई! धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात, ती मला राउळे, देवाची मंदिरेच वाटतात त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणे नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाहीत.
माझी आई संतापली. रागावलीही तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती. मर्यादा होती. "कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला! इकडची काडी तिकडे करायला नको! तिकडे लावलेन दिवे, आता येथे आला आइशिला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं, तर फ़ुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिं डोजी नुसता. श्याम्या, अरे कार्ट्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस."आई रागावून दु:खसंतापाने वेडी होऊन बोलत होती.
आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणार्‍या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फ़ेर्‍या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.
आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे, हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला, गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही, आपले जीवन म्हणजे सर्वांनी भार! सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणार्‍या तार्‍यांकडे बघत प्रार्थना केली, "देवा! आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर!"
त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढे खरे. माझी अक्का पुढे चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले मला नवीन ह्यदय मिळाले!

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP