मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
प्रारंभ

श्यामची आई - प्रारंभ

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो . त्याचे पुढचे बरे - वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते . त्याच्या बर्‍यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो . पाळण्यात असतानाच , आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच , पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते . मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे , असा मी करीत नाही . हिमालयाच्या दर्‍याखो ‍‍ र्‍यांत असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील , की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत ; रानावनांतील कानाकोपर्‍यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल , की , ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही . समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील , की ज्याची जगास वार्ता नाही . पृथ्वीच्या पोटात तार्‍यासारखे तेजस्वी हिरे असतील ; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही . वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील , की जे पल्लेदार दुर्बिणीतून अजून दिसले नाहीत . मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे , असा मी करीत नाही . मी निर्दोष होत आहे , ह्ळूहळू उन्नत होत आहे , ही ज्याला जाणीव आहे , तो मोठाच होत आहे . मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आइबापाच उत्पन्न करितात . आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय . मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात .

मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षणा सुरू झालेले असते . आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला , त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते . गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील , ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील , जी कर्मे केली असतीत , त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात . जगात फक्त आईबापच शिकवतात , असे नाही ; आजूबाजूचे सारे जग , सारी सजीव - निर्जीव सृष्टी शिकवीत असते ; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे , हे आइबापच शिकवितात . मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक . आईच्या पोटातच मुळी जीव राहीला ; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला ; जणू तिचाच होऊन बाहेर आला . बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो . तो आईजवळ हसतो ; आईजवळ रडतो ; आईजवळ खातोपितो ; आईजवळ खेळता - खिदळतो , झोपतो , झोपी जातो . आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते . म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईचे होय .

आई देह देते व मनही देते . जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच . लहानपणी मुलावर जे परीणाम होतात , ते दृढतम असतात . लहानपणी मुलाचे मन रिकामे असते . भिकार्‍याला , चार दिवासांच्या उपाश्याला , ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते , त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल , त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याच संग्रह करीत असते . अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगाणात ठेवले , तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर , त्याच्या शरीरावर इतका परीणाम होतो , की त्याच्या मनासही रंग येतो , असे बायका म्हणतात . -- याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते . मातीसारखे , मेणासारखे ते असते . द्यावा तो आकार त्याला मिळेल .

आईने तेलकट खाल्ले , तर मुलाला खोकला होईल , आईने उसाचा रस , आंब्याचा रस खाल्ला , तर मुलाला थंडी होइल , त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळाआपट केली , भांडणतंडण केले , तर मुलाच्या मनास खोकला होइल . परंतु ही गोष्ट आया विसरतात . आईचे बोलणे , चालणे , हसणेसवरणे , मुलाच्या आसमंतात होणार्‍या आईच्या सर्व क्रीया , म्हणजे मुलाच्या मनाचे , बुध्दीचे , ह्यदयात दूध होय . मुलाला दूध पाजताना आईने डोळे मत्सराने लाल झालेले असतील , तर मुलाचे मनही रागीट होईल .

अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर , पित्यावर , आप्तेष्टांवर , सभोवतालच्या सर्व सजीव - निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे . मुलांच्या समीप फार जपून वागावे . वातावरण स्वच्छ राखावे . सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो ; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात , ही गोष्ट खरी . आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो ; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात , हे खरे . सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार , आई - बापांची कृत्ये , स्वच्छ सतेज व तमोहीन अशी असतील , तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण , सुगंधी , रमणीय व पवित्र अशी फुलतील ; नाहीतर ती किडींनी खाल्लेली , रोगट , फिक्कट , रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील .

मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही . स्वच्छ झर्‍याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही . मुलांजवळ राहणार्‍यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी . वसिष्टऋषी वेदामध्ये वरूनदेवाला म्हणतात , " हे वरूणदेवा ! माझ्या हातून जर काही वाईट झाले , तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर ."

" अस्ति ज्याजान कनीयस उपारे "

कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो . या ज्येष्टाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे . आईबापांनी , शेजार्‍यांनी , गुरूजींनी -- सर्वांनी लहान मुलांच्या विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे .

श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती . दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे . कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे . आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत ; परंतु श्याम सांगत नसे . आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत . आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत . त्या वेळी स्वत : च्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत . " श्याम , तू सर्वांचे ऐकून घेतोस ; पण स्वत : चे मात्र का , रे , काहीच सांगत नाहीस ?" असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत .

एके दिवशी असाच आग्रह चालला होता . श्याम भरल्या आवाजाने म्हणाला ," माझ्या स्वत : च्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते . कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते , पुण्यबरोबर पापही आठवते . मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे . ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत , म्हणून माझी ही धडपड आहे . जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे , ही माझी तळमळ , हेच माझे ध्येय , हेच माझे स्वप्न ! कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता ?"

" केव्हा होईल जीवन माझे निर्मळ तार्‍यापरी । हुरहुर हीच एक अंतरी । "

" परंतु आम्हांला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा . चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता ," लहान गोविंदा म्हणाला .

" परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले , तर आपण निर्दोष आहोत , असा अहंकारही जडावयाचा " भिका म्हणाला .

श्याम गंभीर होऊन म्हणाला , " मनुष्याला स्वत : चे अध : पतन सांगावयास जशी लाज वाटते , त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत , हे सांगावयासही लाज वाट्ते . आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो , अशी देवाला माझी प्रार्थना असते ."

नारायण जरा हसत म्हणाला ," मी निरहंकारी आहे , याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाच , मी आत्मप्रौढी सांगत नाही , असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !"

श्याम म्हणाला , " या जगात जपावे तेवढे थोडेच , ठायी ठायी मोहक मोह आहेत कोसळावयास कडे आहेत . शक्यतोवर जपावे , यत्न करावे , प्रामाणिकपणे झटावे , आत्मवंचना करू नये . अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते . सदैव सावध राहिले पाहिजे ."

श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला , " आपण का एकमेकांस परके आहोत ? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो ? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही . आपण सारे एक . जे आहे , ते सर्वांच्या मालकीचे . तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस ? तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाच नाही . आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी ! कसला आहे गर्व ? तुझ्या जीवनात ही माधुरी , ही सरलता , ही कोमलता , हे प्रेम , हे गोड हसणे , ही सेवावृत्ती , ही निरहंकारिता , कोणतेही काम करण्यास लाज न वाट्ण्याची वृत्ती हे सारे कोठून आले , ते सांग ? आम्ही आजारर्‍याची शुश्रूषा करतो , तूही करतोस ; परंतु तू आजार्‍याची आई होतोस , आम्हांला क होता येत नाही ? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसर्‍याला आपलासा करतोस ; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून , बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही ? सांग , ही जादू कोठून पैदा केलीस ? सांग , तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ? ही कस्तूरी कोणी ओतली ? श्याम , वहाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का ? एकदा वहाडात एका श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते . त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला . श्रीमंत व्यापा ~ याने त्या कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला , " तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी ? पुण्याला जाऊन काही खपली , तर पाहावयाचे !" त्या श्रीमंत व्यापार्‍यास राग आला . तो म्हणाला ," तुझी सारी कस्तूरी मोज . त्या मातीच्या गार्‍यात मिसळून देतो . कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे , उत्तरेत जाऊन सांग . " त्या व्यापार्‍याने सारी कस्तूरी खरेदी केली व गार्‍यात मिसळून दिली . वर्‍हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो , असे सांगतात . श्याम , तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या , त्या वेळेस कोणी , रे तिथे कस्तूरी ओतली ? आमच्या जीवनाला ना वास , ना रूप , ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला ? हा रंग कोणी दिला , सांग .

श्यामच्याने आता राहवेना . तो गंभीरपने व गहिवराने म्हणाला , " माझ्या आईचे हे देणे . गड्यांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे , ते माझ्या आईचे आहे . आई आहे . आई माझा गुरू , आई माझी कल्पतरू , तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास , प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले . मनुष्यावर नव्हे , तर गाईगुरांवर , फुलांपाखरांवर , झाडामाडांवर , प्रेम करावयास तिनेच शिकवले . अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे , हे मला तिनेच शिकविले . कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्त्व न गमाविता कसे राहावे , हे तिनेच मला शिकविले . आईने शिकविले , त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही . अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे . त्यातून भरदार , जोमदार अंकुर केभा बाहेर येईल , तो येवो . माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले . मी मनात म्हणत असतो .--

" मदंतरंगी करूनी निवास सुवास देई मम जीवनास "

तीच वास देणारी रंग देणारी , मी खरोखर कोणी नाही . सारे तिचे , त्या थोर माउलीचे . सारी माझी आई ! आई !! आई !!!"

असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले . त्याच्या डोळ्यांतून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या . भावनांनी त्यांचे ओठ , त्यांचे हात , हातांची बोटे थरथरू लागली . थोडा वेळ सारेच शांत होते . तार्‍यांची थोर शांती तेथे पसरली होती , नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला , " गड्यांनो ! माझे असे काही सांगण्यासारखे नाही ; परंतु माझी आई कशी होती , ते मी तुम्हांला सांगेन . आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन . आईच्या आठवतील , त्या त्या गोष्टी सांगेन . तिच्या स्मृती आळवीन . रोज रात्री एकेका प्रसंग मी सांगत जाईन . चालेल का ?"

" हो , चालेल !" सारे म्हणाले .

राम म्हणाला ," देवाला मागितला एक डोळा , देवाने दिले दोन !"

गोविंदा म्हणाला , " रोजच सुधारस प्यावयास मिळणार . रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार !"

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP