नृसिंहाख्यान - अध्याय ४ था.

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें हिरण्यकशिपूनें ब्रह्मदेवापाशीं वर मागितले असतां, त्याच्या तपानें प्रसन्न झालेल्या त्या ब्रह्मदेवानें अत्यंत दुर्लभ असेहि वर त्याला दिले ॥१॥

ब्रह्मदेव म्हणाला, - ‘ बा देत्यराजा, तूं जे मजपाशी वर मागत आहेस ते पुरुषांना प्राप्त होण्यास दुर्लभ आहेत; तथापि, हे दैत्यश्रेष्ठा, ते दुर्लभ वर देखील मी तुला देतो ’ ॥२॥

वर मिळाल्यावर ज्याचा अनुग्रह कधींच निष्फळ होत नाहीं अशा त्या भगवान् ब्रह्मदेवाची असुरश्रेष्ठ हिरण्यकशिपूने पूजा केली, व मरीच्यादि प्रजापति त्याची स्तुति करीत असतां तो स्वस्थानी निघून गेला ॥३॥

ह्याप्रमाणे वर प्राप्त झालेला तो दैत्य सुवर्णासारखें तेजः पुंज शरीर धारण करुन आपल्या भ्नात्याच्या वधाचें स्मरण करीत भगवंताचा द्वेष करुं लागला ॥४॥

त्या जगद्विजयी महादैत्याने सर्व दिशा, तिन्ही लोक, देव, असुर व मानव यांचे राजे, गंधर्व, गरुड, नाग, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषि व पितृगण यांचे अधिपति, मनु, यक्ष, राक्षस व पिशाच ह्यांचे अधिपति, प्रेतें व भूतें ह्यांचे स्वामी आणि सर्व प्राण्याचे अधिपति ह्या सर्वांना जिंकून आपल्या आधीन करुन घेतलें व लोकपालांची स्थानें त्यांच्या तेजासह त्यानें हरण केली ॥५॥॥६॥॥७॥

नंतर तो हिरण्यकशिपु देवांचे शोभायमान असें क्रीडावन ज्यांत आहे अशा खर्गलोकीं गेला आणि तेथें विश्वकर्म्याने निर्माण केलेलें त्रैलोक्यलक्ष्मीचे केवळ वसतिरथान आणि सर्व समृद्धीनें युक्त जें इंद्राचे मंदिर यामध्ये वास करुं लागला ॥८॥

हे धर्मराजा, त्या इंद्राच्या मंदिरांत पोंवळ्याच्या आणि पाचेच्या फरसबंद्या असून स्फटिक मण्याच्या भिंती होत्या व ठैडूर्यमण्यांचे खांब होते ॥९॥

त्यांत सर्वत्र चित्रविचित्र चांदवे लाविले असून ठिकठिकाणी पद्मराग मण्यांची आसनें मांडून ठेविलेलीं होती; आणि सभोंवार मोत्यांचे सर लोंबत असलेल्या हस्तिदंती दुधाच्या फेंसासारख्या मृदु व शुभ्र अशा शय्याहि होत्या ॥१०॥

हे राजा, त्या इंद्रमंदिरांत रुणझुण वाजणार्‍या तोरडया पायांत घालून एकमेकींना हाक मारीत संचार करणार्‍या देवांगना रत्नांच्या फरशीमध्यें प्रतिबिंबित झालेलें आपले सुंदर मुख अवलोकन करीत होत्या ॥११॥

तेथें सर्व इच्छित मनोरथ परिपूर्ण होत असल्यामुळें प्रसन्नचित्त होणारा, महाबलाढय, सर्व लोकांस पराजित करुन त्रैलोक्याचें राज्य एकटाच करणारा; आणि अतिशय कडकारीतीनें अंमल करणारा असा तो दैत्यराज हिरण्यकशिपु रममाण झाला; व अत्यंत ताप पावलेले देवादिकहि त्याच्या पायांना अभिवंदन करुं लागले ॥१२॥

हे धर्मराजा, उग्रवासाच्या मद्यानें तो मत्त होऊन त्याचे नेत्र धुंद व आरक्त होत. तेज, मनः सामर्थ्य, शरीरसामर्थ्य आणि इंद्रियसामर्थ्य, ह्यांचे तो माहेरघरच असल्यामुळें ब्रह्मा, विष्णु व महेश्वर ह्या तीन देवांवांचून इतर सर्व लोकपाल हातांत नजराणे घेऊन त्याच्या सेवेला सादर होत असत ॥१३॥

हे पांडुपुत्रा, स्वसामर्थ्यानें महेंद्राच्या आसनावर बसलेल्या त्या हिरण्यकशिपूच्या गुणाचे विश्वावसु, तुंबरु आणि मी, इत्यादि सर्वजण गायन करीत असूं, व गंधर्व, सिद्ध, ऋषि, विद्याधर, अप्सरा, वारंवार त्याची स्तुति करीत असत ॥१४॥

वर्णाश्रमनिष्ठलोक बहुदक्षिणायुक्त अशा यज्ञांनी त्यांचीच आराधना करुं लागले व तोहि आपल्या तेजानें त्या सर्वांचे हविर्भाग ग्रहण करुं लागला ॥१५॥

त्याच्या राज्यांत सप्तद्वीपवती पृथ्वी नांगरल्यावांचून पिकूं लागली, सर्व लोक त्याचे इच्छित मनोरथ पूर्ण करुं लागले; आणि अंतरिक्ष लोकांत नानाप्रकारच्या आश्चर्यकारक वस्तु उत्पन्न करण्याचें तो एक स्थान झाला ॥१६॥

त्याचप्रमाणें खारें पाणी, मद्य, घृत, उसाचा रस, दहीं, दूध आणि गोडें पाणी ह्यांचे सात समुद्र व त्यांस मिळणार्‍या नद्या, ही सर्व आपल्या लाटांबरोबर रत्नांच्या राशी त्याला आणून देऊं लागली. पर्वत आपापल्या दर्‍यांत त्याच्याकरितां क्रीडास्थानें करुं लागले. वृक्ष सर्वच ऋतूंमध्यें फळे व फुले देऊं लागले, आणि तो एकटाच वृष्टि करणें, दहन करणें, शोषण करणें, इत्यादिक लोकपालाचे भिन्नभिन्न गुण धारण करुं लागला ॥१७॥॥१८॥

ह्याप्रमाणें तो दिग्विजयी व निष्कंटक राजा झालेला हिरण्यकशिपु, आपल्याला प्रिय असलेल्या विषयांचा यथेच्छ उपभोग घेऊं लागला; पण तो जितेन्द्रिय नसल्यामुळें त्याची तृप्ति मात्र कवीं झाली नाही ॥१९॥

असो. ह्याप्रमाणें सनकादिकांच्या शापास पात्र झालेल्या, ऐश्वर्यानें मत्त झालेल्या आणि शास्त्रविरुद्ध वर्तन करणार्‍या, अशा त्या हिरण्यकशिपूचा बराच मोठा काळ निघून गेला ॥२०॥

तेव्हां उग्र दंडानें अत्यंत उद्विग्र झालेले सर्व लोक दुसरा कोणेहि रक्षक नसल्यामुळें लोकपालांसह भगवान् अच्युताला शरण गेले ॥२१॥

तेथें गेल्यावर, शांत आणि निर्मळचित्त असे संन्यासी लोक ज्या स्थानी गेले असतां पुनः संसारांत माघारे येत नाहींत, व ज्या स्थानी सकलदुःखहर्ता असा परमात्मा भगवान् वास करतो, त्या स्थानाला आमचा नमस्कार असो, असें म्हणून त्यानीं बाह्येंद्रियें व मन यांचें संयमन केले. अंतः करणांतील रागादि मळ काढून बुद्धीची एकाग्रता केली आणि निद्रेचा त्याग करुन व वायुभक्षण करुन निर्वाह करीत ते देव त्या हषीकेशाची स्तुति करुं लागले ॥२२॥॥२३॥

तेव्हां साधूंजनांना अभय देणारी व मेघासारख्या गंभीर शब्दानें युक्त असल्यामुळें दशदिशांना नादित करणारी अशी वक्तृरहित आकाशवाणी उत्पन्न झाली ॥२४॥

‘ सुरश्रेष्ठ हो, तुम्ही भिऊं नका, तुम्हां सर्वाचें कल्याण असो. कारण, प्राण्यांना माझें दर्शन झालें असतां तें त्यांच्या कल्याणासच सर्वस्वी कारण होतें ॥२५॥

हे देव हो, ह्या दैत्याधर्माचा दुष्टपणा मी जाणिला आहे; व मी त्याचा वधहि, करणार आहे; परंतु तुम्ही कांही काळ वाट पहा ॥२६॥

अहो, देव, वेद, गाई, ब्राम्हण, साधु, धर्म आणि मी, यांच्या ठिकाणी जेव्हां पुरुषाचा द्वेष उत्पन्न होतो, तेव्हा तो लवकरच नाश पावतो ॥२७॥

हे सुरश्रेष्ठ हो, वैररहित आणि अत्यंत शांत अशा आपल्या महात्म्या प्रल्हादनामक पुत्राशी जेव्हां हा द्रोह वरुं लागेल, तेव्हां ब्रह्मदेवाच्या वराने जरी हा प्रबळ झाला आहे; तथापि मी ह्यांचा वध करीन " ॥२८॥

नारद म्हणाले, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणे जगद्गरु परमात्म्याने आकाशवाणीनें त्यांना सांगितलें असतां, त्याल नमस्कार करुन निर्भय झालेले देव परत गेले, व त्या असुराचा वध आतां झालाच असे त्यांनी मानिलें ॥२९॥

हे धर्मराजा, त्या दैत्याधिपति हिरण्यकशिपूला परमप्रतापी असे चार पुत्र होते त्यापैकी प्रल्हाद हा वयानें सर्वापेक्षां लहान असून गुणांनी मोठा होता सत्पुरुषांचा उपासक, ब्राह्मणभक्त, शीलसंपन्न, सत्यवादी व जितेन्द्रिय असून आत्म्याप्रमाणें सर्व भूतांचा एकच प्रिय व हितेच्छु होता. तो दासाप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांच्या चरणी नम्र, पित्याप्रमाणें दीनावर प्रेम करणारा, आपल्या बरोबरींच्यावर भ्रात्याप्रमाणें प्रीति करणारा, गुरुचे ठिकाणी ईश्वरबुद्धी वागणारा, आणि विद्या, वित्त, सौंदर्य व उत्तम जन्म, ह्यांनी युक्त असून मान व गर्व ह्यांनी रहित होता. संकटें प्राप्त झाली असतांहि तो मनामध्यें उद्विग्न होत नसे. परमात्म्यावांचून इतर सर्व मिथ्या आहे असें तो समजे. ह्या लोकीच्या व परलोकींच्या विषयांविषयीं तो निस्पृह असून इंद्रिये, प्राण, शरीर आणि बुद्धि ह्यांना त्यानें वश केलें होते. तो असुर असतांहि असुरांच्या गुणांनी रहित असल्यामुळे त्याच्या विषयवासना शांत झाल्या होत्या ॥३०॥

॥३१॥॥३२॥॥३३॥

हे धर्मराजा, भगवान् ईश्वराच्या ठिकाणीं असलेले गुण जसे कधीं लुप्त होत नाहींत, त्याप्रमाणें त्या प्रल्हादाच्या ठिकाणी असणारे ते श्रेष्ठ गुणहि अद्याप झाकून जात नाहीत. विवेकी पुरुष वारंवार ते ग्रहण करीत असतात ॥३४॥

हे धर्मराजा, तुझ्यासारखे विष्णुभक्त त्या प्रल्हादाची प्रशंसा करतील ह्यांत आश्चर्य नाही; परंतु असुरांचे शत्रु जे देव असेहि सुद्धां भरसबेमध्ये खरा साधु कोण, याविषयीं गोष्टी निघाल्या असतां शप्रल्हादाचीच उपमा देत असतात ॥३५॥

असंख्यात गुणांनी भूषित असें त्या प्रल्हादाचें माहात्म्य असून मी तुला थोडक्यांत त्याचें केवळ दिग्दर्शन करितों. भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी त्याची स्वाभाविक प्रीति जडली होती ॥३६॥

हे राजा, तो अगदी बालक असतांच कृष्णरुप पिशाचानें त्याचें मन घेरुन टाकिलें असल्यामुळें तें त्या कृष्णाच्याच ठिकाणी एकसारखे लागलें होतें; व म्हणून सर्व खेळणी टाकून तो सर्वदा कृष्णचिंतनच करीत असे. हें जग अशाप्रकारचें विषयासक्त आहे अशी त्याला जाणिवच नव्हती; व त्यामुळें त्याची स्थिति लोकांमध्ये जडासारखी भासत होती ॥३७॥

बसत असतां, हिंडत असतां, भोजन करीत असतां, शयन करीत असतां उदक प्राशन करीत असतां, भोजन करीत असतां, शयन करीत असतां, उदक प्राशन करीत असतां, किंवा भाषण करीत असतां, त्याला त्या आसनादि पदार्थांचे भानहि नसे. इतकें त्याचें गोविदानें आपल्याशी अगदी एकीकरण केलें होतें ॥३८॥

एकाद्या वेळी भगवच्चिंतनानें त्याचें अंतः करण क्षुब्ध झालें, म्हणजे तो रोदन करीत असे, केव्हां भगवच्चिंतनानें आनंद झाला म्हणजे तो हास्य करीत असे; व कधी कधी उच्चस्वराने भगवंताच्या गुणांचे गायन करीत असे ॥३९॥

कधीं कधीं तो मोठयानें हे हरे, हे प्रभो, इत्यादि गर्जना करी, तर केव्हां निर्मिड होऊन नृत्य करी; आणि एकादे वेळी ईश्वरचिंतनामध्ये गढून गेला म्हणजे तन्मय होऊन भगवंताच्या लीलांचें स्वतःच अनुकरण करी ॥४०॥

केव्हां केव्हां भगवत्स्वरुपी लीन होऊन गेल्यामुळें तो पूर्ण सुखामध्यें निमग्न होई. त्याच्या शरीरावर रोमांच उठत असत आणि स्थिर प्रेमापासून झालेल्या आनंदाश्रूंनी भरुन गेल्यामुळें त्याचे नेत्र किंचित् मिटत, व तो कांही एक न बोलतां स्वस्थ राही ॥४१॥

याप्रमाणें अशा साधूंच्या समागमाने श्रेष्ठकीर्ति वैराग्यशील परमेश्वराच्या चरणकमलांची निरंतर सेवा त्याला प्राप्त झाल्यामुळें तो स्वतः ला वारंवार परमानंदसुखाची प्राप्ति करुन घेई. इतकेंच नव्हें तर दुर्जनांच्या संगामुळें दीन झालेल्या दुसर्‍या पुरुषाच्याहि मनाला शांत करीत असे ॥४२॥

हें असो. हे धर्मराजा, ह्याप्रमाणें महाभगवद्भक्त महाभाग्यशाली आणि महात्मा असा जो आपला पुत्र प्रह्लाद, त्याचा हिरण्यकशिपु द्रोह करुं लागला ॥४३॥

धर्मराजा पुनः म्हणाला, - हे नारदा, शुद्ध आणि साधु असा जो आपला पुत्र प्रह्लाद त्याच्याशी पित्यानें द्रोह केला, हें मोठें आश्चर्य असून तुजपासून ते सविस्तर ऐकावें अशी आमची इच्छा आहे ॥४४॥

पुत्र जरी प्रतिकुल असला तथापि पिते पुत्रवत्सल असल्यामुळें केवळ शिक्षा लावण्यासाठी शब्दांनीच त्यांना ताडन करितात, परंतु शत्रूप्रमाणे त्यांच्यांशी द्रोह कधीहि करीत नाहीत ॥४५॥

तेव्हां पिता हेच ज्याचें दैवत आहे, जो कामक्रोधरहित असून आपणास अनुकूल आहे, अशा त्या प्रल्हादासारख्या पुत्राशीं पिते द्रोह कसे करितील ? यास्तव हे ब्रह्मनिष्ठा प्रभो, हिरण्यकशिपू पित्यानें स्वपुत्र प्रल्हादाचा द्वेष केला असतां तो त्या हिरण्यकशिपूच्या मरणास कारण झाला हें मोठें आश्चर्य आहे ? तरी आमच्या या शंकेचे निराकरण करा ॥४६॥

॥ चवथा अध्याय समाप्त ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP