नृसिंहाख्यान - अध्याय २ रा.

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणे वराहरुप धारण करणार्‍या श्रीहरीने भ्रात्या हिरण्याक्षाचा वध केला असतां रोषानें व शोकानें हिरण्यकशिपु अगदी संतप्त झाला ॥१॥

क्रोधामुळें त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावूं लागला; व कोपानें त्याचे नेत्र अत्यंत प्रज्वलित झाले. त्याला आकाश धूम्रवर्ण झालेले दिसूं लागलें. भयंकर दाढांमुळे त्याची दृष्टि उग्र होऊन वांकडया भुंवयांमुळें त्याचे मुख अवलोकन करण्यासहि अशक्य झाले. अशा स्थितीत तो हिरण्यकशिपु, हातांतील शूळ वर उचलून सभेमध्ये दानवांना उद्देशून बोलूं लागला ॥२॥॥३॥

तो म्हणाला, हे शकुनिप्रभृति दैत्य दानव हो, हे द्विमूर्धन, हे त्र्यक्षा, हे शंबरा, हे शतबाहो, हे हयग्रीवा, हे नमुचे, हे पाका, हे इल्वला, हे विप्रचिते आणि हे पुलोभ्या, तुम्ही सर्वजण माझें वचन श्रवण करा; व विलंब न करितां माझ्या आज्ञेप्रमाणें आचरण करा ॥४॥॥५॥

अहो, समदृष्टि असूनहि भजननिमित्तानें सहाय्यक झालेल्या श्रीहरीच्या आधारानें हे आमचे क्षुद्र शत्रु जे देव, त्यांनी माझ्या अत्यंत भ्रात्याच्या वध केला ॥६॥

स्वतः शुद्ध तेजोमय असून जो कोणी आपली भक्ति करील त्याला अनुसरणारा, मायेनें वराहरुप धारण करणारा, बालकाप्रमाणें अस्थिरचित असणारा आणि आपल्या ‘ समत्वरुप ’ स्वभावाचा त्याग करणारा, असा जो श्रीहरी, त्याचा कंढ मी आपल्या शूळानें विदीर्ण करुन त्यांतील विपुल रक्तानें जेव्हां आपल्या रक्तप्रिय भ्रात्याचें तर्पण करीन, तेव्हांच माझ्या अंतः करणांतील व्यथा नाहींशी होईल ॥७॥॥८॥

ज्याप्रमाणें वृक्षाचे मूळ तोडिलें असतां शाखा आपोआप शुष्क होऊन जातात, त्याप्रमाणें तो कपटी प्रतिपक्षी विष्णु नाहींसा झाला असतां, देव स्वतः च नाश पावतील. कारण, विष्णु हाच त्यांचा प्राण आहे ॥९॥

यास्तव, ह्याक्षणींच आम्ही ब्राह्मण व क्षत्रिय ह्यांनी समृद्ध झालेल्या भूमीवर जा, आणि जे जे म्हणून तप, यज्ञ, वेदाध्ययन, व्रत आणि दान करीत असतील त्यांचा घात करा ॥१०॥

हे दैत्य हो, हा पुरुषोत्तम विष्णु यज्ञरुप असून धर्ममय असल्यामुळें द्विजांचे अनुष्ठान हेंच त्याचें मूळ आहे; आणि देव, ऋषि पितर, भूतें व धर्म यांचा मुख्य आश्रयहि तोच आहे ॥११॥

म्हणून जेथें इथें द्विज, गाई, वेद, वर्णाश्रम व वर्णाश्रमविहित कर्मे चालत असतील त्या त्या देशी जाऊन तुम्ही ती जाळून टाका ॥१२॥

अशा प्रकारे हिरण्यकशिपूने आज्ञा करतांच त्याचे सेवक ते हिंसाप्रिय दानव त्याच्या आज्ञेप्रमाणें लोकांचा संहार करुं लागले ॥१३॥

हे धर्मराजा, नगरें, गांव, गोठे, बागा, शेतें, आरामस्थानें, ऋषीचें आश्रम, खाणी, शेतकर्‍यांची घरें डोंगरांच्या दर्‍यांत असलेली खेडी, गौळवाडे आणि राजधान्या, इत्यादि सर्व त्या दानवांनीं जाळून टाकिलीं ॥१४॥

कांही जणांनी तर खोरीकुदळी घेऊन पूल, कोट आणि वेशी पाडिल्या; कांहीनी हातामध्यें कुर्‍हाडी घेऊन लोकांच्या निर्वाहाला साधनभूत असलेले वृक्ष तोडिले; आणि कांही जणांनी जळक्या लांकडानी लोकांची घरें जाळली ॥१५॥

ह्याप्रमाणें दैत्यराज हिरण्यकशिपूचे ते आज्ञाधारक दैत्य वारंवार लोकांना उपद्रव देऊं लागले. तेव्हां, यज्ञसंबंधी हविर्भाग मिळत नाहींसा झाल्यामुळें, देव स्वर्गाचा त्याग करुन गुप्तरीतीनें भूमीवर संचार करुं लागले ॥१६॥

हे धर्मराजा, इकडे भ्रातृमरणामुळें दुःखित झालेल्या हिरण्यप्रकशिपूनें आपल्या हिरण्याक्ष भ्रात्याचें उत्तर कार्य केलें आणि मग तो त्याच्या पुत्रांचें सांत्वन करुं लागला ॥१७॥

हे धर्मराजा, देश व काल जाणणारा हो हिरण्यकशिपु, मधुर वाणी शकुनि, शंबर, धृष्ट, भूतसंतापन, वृक, कालनाभ, महानाभ, हरिश्मश्रु आणि उत्कच ह्यांना व रुषाभानुनामक त्यांच्या मातेला आणि आपली माता जी दिति तिला उद्देशून पुढीलप्रमाणें समाधान करुं लागला ॥१८॥॥१९॥

हिरण्यकशिपु म्हणाला, - हे माते, हे वहिनी, आणि हे पुत्रहो, महावीर अशा हिरण्याक्षाकरितां शोक करणें तुम्हांला योग्य नाही कारण, शत्रूंच्या हे सुव्रते माते पाणपोईमध्यें ज्याप्रमाणें प्राण्यांचा सहवास क्षणिक असतो, त्याचप्रमाणें ह्या मृत्युलोकी माता व पुत्र इत्यादिकांचा सहवास क्षणिक आहे. कारण, दैवयोगानें प्राणी एकत्र संयुक्त होतात; व पुनरपि आपआपल्या कर्मामुळें वियुक्त होतात ॥२१॥

हे माते, आत्मा हा मृत्युरहित अक्षय, निर्मळ, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ असा आहे. कारण, तो देहादिकाहून भिन्न आहे. म्हणून मृत, कृश, मलिन, वियुक्त, अज्ञ असें समजून त्याबद्दल शोक करणे योग्य नाही. हे माते, हा आत्मा आपल्या अविद्येमुळें मोहित होऊन सुखदुःखादिकांचा विशेषेंकरुन स्वीकार करीत असल्यामुळें शरीर धारण करितो. सारांश, त्याला लिगशरीररुप जो उपाधी प्राप्त झाला आहे तोच संसार होय ॥२२॥

हे माते, जसे उपाधीचे धर्म उपाधियुक्त वस्तूवर भासमान होतात, म्हणजे ज्याप्रमाणें उदक हालत असल्यामुळें त्यामध्ये प्रतिबिंबित झालेले वृक्षहि हालत आहेत असें दिसतें; अथवा ज्याप्रमाणे नेत्रांना भ्रमण झाल्यामुळें पृथ्वी हालल्यासारखी दिसते, अथवा ज्याप्रमाणें मुणांच्या योगानें मनाचें भ्रमण झालें म्हणजे, आत्मा शरीरमय भासतो. परंतु खरें पहातां आत्मा परिपूर्ण असूनहि देहादिसंबंधरहित असा आहे. तथापि मनाच्या कल्पनेनें तो देहधारी असल्यासारखाच दिसतो ॥२३॥॥२४॥

वस्तुतः आत्म्याचा संबंध देहाशीं नाही. अर्थांत देहाविषयी अभिमान, प्रिय वस्तुशी वियोग, अप्रिय वस्तूंशी संयोग, कर्म, अनेक योर्नीमध्ये प्रवेश, उत्पत्ति, विनाश, नानाप्रकारचा शोक, अविवेक, चिंता, विवेकाची विस्मृति इत्यादि इत्यादि सर्व धर्म आत्मस्वरुपाहून अगदीं निराळे आहेत. त्यांचा आत्मस्वरुपाशी मुळींच संबंध नाहीं ॥२५॥॥२६॥

सारांश, शोकाचें कारण नसूनहि तुम्हीं हा व्यर्थ शोक करीत आहां. असो, ह्याविषयी एका मृत पुरुषाचे स्त्रीपुत्रादिक आप्त आणि यम ह्यांमध्यें झालेला संवादरुप पुरातन असा एक इतिहास आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो श्रवण करा ॥२७॥

उशीनर देशामध्यें सुयज्ञ म्हणून प्रसिद्ध असा एक राजा होता. त्याच्या शत्रूंनी युद्धामध्यें त्याचा वध केला असतां; त्याचे सर्व नातलग त्याच्या सभोंवती जमून शोक करीत बसले ॥२८॥

हे माते, त्याराजाच्या रत्नमय कवचाचे तुकडे तुकडे होऊन गेले होते; त्याच्या शरीरावरील भूषणें व माळा गळून गेल्या होत्या ; बाणांनी त्याचें हदय विदीर्ण झालें होतें व त्याचें सर्वांग रक्तानें भरुन तो भूमीवर पडला होता. त्याचे केंस अस्ताव्यस्त झाले होते; डोळे फुटले होवे; आवेशामुळें त्यानें आपला ओंठ चावलेला होता, त्याचें मुखकमळ धुळीने भरलें होते आणि त्याच्या भुजा आयुधासह युद्धामध्यें छिन्नभिन्न झाल्या होत्या ॥२९॥॥३०॥

याप्रमाणे प्रारब्धकर्मामुळे अशा विपन्न स्थितीमध्यें पडलेला आपला भर्ता तो उशीनरदेशाचा राजा, त्याला अवलोकन करुन त्याच्या राण्याने दुःखानें व्याकूळ झाल्या, आणि हे नाथा, ‘ आमचा सर्वस्वी घात झाला असे म्हणून हातानी वारंवार ऊर बडवून घेत त्या त्याच्या पायांजवळ शोक करीत पडल्या ॥३१॥

उच्चस्वरानें रोदन करीत असतां त्यांच्या स्तनांवरील केशरानें रक्तवर्ण झालेल्या अश्रूंनी, त्यांनी आपल्या प्रिय पतीचे पाय भिजविले. केंस मोकळे टाकून व अलंकारांचा त्याग करुन त्या आक्रोशपूर्वक विलाप करुं लागल्या. त्यांचा विलाप पाहून लोकांनाहि दुःख झालें ॥३२॥

त्या म्हणाल्या, - हे प्राणप्रिय प्रभो, ज्या विधात्यानें आमच्या दृष्टीच्या पलीकडील स्थितीत तुला नेलें, तो खरोखर निर्दय आहे. कारण, तूं पूर्वी त्या विधात्यानें तुला त्यांच्या शोकांची वृद्धि करणारा केलें आहे ॥३३॥

हे भूपते, सर्वोत्कृष्ट मित्र असा जो तं त्या तुजवांचून आम्हीं कसें बरें रहावें ? यास्तव हे विरा, ज्याठिकाणी तूं जावयाला निघाला आहेस, त्याठिकाणी तुझ्या चरणकमळाची सेवा करणार्‍या आम्हांलाहि आपल्या मागोमाग येण्याची आज्ञा दे ॥३४॥

ह्याप्रमाणे आपल्या मृत पतीला आलिंगन देऊन, - त्याचे शव दहन करण्यासहि नेण्याची इच्छा न करितां, त्या स्त्रिया सारख्या विलाप करीत बसल्या असतां, सूर्य अस्तास गेला ॥३५॥

तेव्हां आला, व त्याची समजूत करुं लागला ॥३६॥

यम म्हणाला, अहो, काय आश्चर्य हें ? अरे, आमच्यापेक्षां वयाने अधिक असून, लोकांचा जन्ममरणादि प्रकार नित्य अवलोकन करीत असतांहि ह्यांना केवढा हा मोह प्राप्त झाला आहे ! आपणहि मरणधर्मानें युक्त असून, ज्या अव्यक्त रुपापासून हा प्राणी जन्मास आला, तेथेंच तो गेला असतां त्याच्याविषयी हे व्यर्थ शोक करीत नाहीं काय ? ॥३७॥

अहो, ह्या लोकी मातापितर आम्हांला दुर्बळ स्थितीत सोडून गेले असतांहि, लांडगे आदिकरुन प्राण्यांनी आम्हांला भक्षण केले नाही, आणि ज्यानें गर्भामध्येहि आमचें रक्षण केलें, तोच इतर सर्वत्रहि आमचें रक्षण करील, असें समजून आपल्या रक्षणाचीहि आम्ही चिंता करीत नाही. तेव्हां सर्वापेक्षा आम्ही धन्य आहों ॥३८॥

हे अबलांनो, जो ईश्वर स्वतः नाशरहित असून स्वेच्छेने हें विश्व उत्पन्न करितो, त्याचें रक्षण करितो व त्याचा संहारहि करितो, त्या ईश्वराचे हें चराचर विश्व क्रीडासाधन आहे असें म्हणतात. म्हणून तोच त्याचें पालन व संहार करण्यास समर्थ आहे ॥३९॥

मार्गामध्येहि पडलेली वस्तु दैव राखीत असतां तशीच सुखरुप रहात्ये; पण दैवानें ज्या वस्तूची उपेक्षा केली, ती गृहामध्यें असली तरी नाहींशी होत्ये. त्याप्रमाणेच एकादा पुरुष अनाथ असूनहि दैवानें त्याच्यावर कृपादृष्टि ठेविली असतां तो वनामध्येंहि जिवंत रहातो, आणि दैवानें ज्यांची उपेक्षा केली आहे असा पुरुष गृहामध्ये असूनहि जगत नाहीं ॥४०॥

हे अबलांनों, सर्व देह लिंगशरीरापासून झालेल्या नानाप्रकारच्या कर्मांमुळें त्या त्या काळीं उत्पन्न होतात व नाशहि पावतात; परंतु आत्मा हा प्रत्येक वेळी देहामध्यें असूनहि त्याहून भिन्न व अमूर्त असल्यामुळें त्या शरीराच्या जन्मालि धर्मांनी तो बद्ध होत नाहीं ॥४१॥

हे स्त्रियांनो, ज्याप्रमाणें अत्यंत अविवेकी पुरुषानें आपले म्हणून मानिलेले घर त्याच्यांहून निराळें असतें, त्याचप्रमाणें अविवेकानें आपलें म्हणून भासत असलेलें हें पुरुषाचें शरीर पंचमहाभूतात्मक असून दृष्टिगोचर होत असल्यामुळें अभौतिक आणि साक्षीभूत अशा पुरुषापासून वस्तुतः पृथकच आहे. जसें उदकापासून झालेले बुडबुडे, पृथ्वीपासून झालेले घट व तेजापासून झालेले कुंडलादिक अलंकार नाश पावतात; त्याप्रमाणें त्या तिन्ही भूताच्या परमाणूंनी उत्पन्न झालेला देहच काळामुळे परिणत होऊन नाश पावतो, पण आत्मा नाश पावत नाही. ॥४२॥

जसा अग्नि काष्टांमध्यें असतांहि प्रकाशकरुपानें व दाहकरुपानें निराळाच अनुभवास येतो, आणि जसा देहांत असलेला वायु, मुख व नासिका इत्यादि स्थानांमध्यें निराळाच प्रतीतीला येतो, तसा आत्मा देहामध्यें असूनहि त्याहून भिन्न आहे. कारण, आत्मा देहामध्यें असतांनाहि त्याच्या ठिकाणी देहधर्म मुळींच नसतात. जसें आकाश सर्वत्रठिकाणी असूनहि तें कोठें लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा देहेंद्रियादि सर्व गुणांच्या आश्रयानें असतांहि त्याहून निराळाच आहे ॥४३॥

आणि त्यांतूनहि, हे मूढहो, ज्याकरितां तुम्ही शोक करीत आहां, तो हा तुमचा भर्ता सुयज्ञ तर येथें शयन करीत आहेच; तेव्हां तुम्ही कोणाकरितां शोक करीत आहां बरें ? पूर्वी ह्याठिकाणी जो श्रवण करीत होता, जो प्रत्त्युत्तर देत होता, तो सुयज्ञ वस्तुतः कधींहि दृष्टिगोचर होत नव्हता ॥४४॥

सर्व इंद्रियांच्या चेष्टांना कारण असल्यामुळें मोठा व मुख्य असा जरी प्राण आहे, तथापि ह्या देहांतील श्रोता व वक्ता हा नव्हे. हे स्त्रियांनो, इंद्रियांच्या योगानें त्याचें विषय जाणणारा जो आत्मा, तो नर, प्राण व देह ह्या दोन्ही अचेतन वस्तूंहून वेगळा असून सचेतन आहे ॥४५॥

तो सर्वव्यापी आत्मा, भूतें, इंद्रियें आणि मन, ह्यांच्या योगानें लक्षित होणार्‍या बर्‍यावाईट देहांचा स्वीकार करितो; परंतु तो त्याच्याहून भिन्न आहे. कारण आपल्या विवेकबलांच्या योगानें त्यांचा तो त्यागहि करितो ॥४६॥

जोंपर्यत आत्म्याला लिंगशरीराचा अभिमान असतो, तोंपर्यंत त्याचें तें कर्म बंधनाला कारण होतें व त्यापासून देहधर्माचें भोक्तृत्व त्याला प्राप्त होऊन क्लेश होतात; पण लिंगशरीराविषयीचा अभिमान निवृत्त झाल्यानंतर असा प्रकार घडत नाहीत. कारण, हा देहधर्मभोक्तृत्वरुप विपर्यय मायेनें होत असतो, तो वस्तुतः खरा नाहीं ॥४७॥

सुखदुःखादि गुणकार्ये खरीं आहेत असें मानणें व म्हणणें हा अगदी व्यर्थ अभिमान होय. कारण, जाग्रदावस्थेमध्ये मनोरथानें प्राप्त होणारे राज्यादि सुख अथवा स्वप्नावस्थेमध्यें प्राप्त होणारे स्त्रीसंभोगादि सुख जसें वस्तुतः खरें नाही, तसेंच सर्व इंद्रियजन्य सुखहि वस्तुतः खरे नाहीं ॥४८॥

वास्तविक आत्मा नित्य असून देह अनित्य आहे असें जाणणारे लोक आत्म्याविषयीं अथवा देहाविषयीं ह्या संसारामध्यें शोक करीत नाहीत. शोक करणार्‍यांचा स्वभाव निवृत्त करणें अशक्य आहे. ज्ञान दृढ झाल्यावांचून तो स्वभाव जात नाहीं ॥४९॥

हे स्त्रियांनो, पक्षांना मारणारा कोणी एक पारधी अरण्यामध्यें ईश्वरानें निर्माण केला होता. तों जेथें जेथें ते पक्षी असत तेथें तेथें घान्यकणादिकांनी त्यांना लोभ उत्पन्न करीत असे; आणि जाळें पसरुन त्यांना धरीत असे ॥५०॥

एकदां एक कुलिंगपक्षांचे जोडपें त्याठिकाणीं संचार करीत असतांना त्या व्याधाच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्या उभयतांपैकी कुलिंगीला त्यानें धान्य पसरलेलें दाखवून एकाएकी मोहित केलें ॥५१॥

नंतर काळानें प्रेरित झालेली ती कुलिंगी दोर्‍यांमध्ये अडकली. ती तशाप्रकारच्या संकटांत सांपडून अगदी दीन झाली आहे, असें कुलिंगपक्ष्यानें अवलोकन करतांच तो अत्यंत दुःखित झाला; पण तिला सोडविण्याविषयी तो असमर्थ असल्यामुळें अगदी दीन होऊन प्रेमामुळें एका वृक्षाच्या शाखेवर बसून विलाप करुं लागला ॥५२॥

तो म्हणाला - अहो ! हा निर्दय ब्रह्मदेव, सर्वप्रकारें दयेस पात्र अशा मज दीनाकरितां शोक करणार्‍या ह्या माझ्या दीन स्त्रीला नेऊन काय बरें करणार आहे ? ॥५३॥

अरेरे, विधुरावस्थेत दीन होऊन दुःखानें जिवंत रहाणार्‍या ह्या माझ्या अर्ध्या देहाचें आतां मला काय बरें प्रयोजन आहे ? ह्यास्तव आतां तो यमराज मलाहि खुशाल नेवो ॥५४॥

हे परमेश्वरा, जी माझी दुर्दैवी बाळें खाण्याकरितां घरटयामध्यें मातेची वाट पहात आहेत, ज्यांना अद्याप पंखसुद्धां फुटले नाहींत, त्या पोरक्या बालकाचें मी आतां पोषण कसें करुं ? ॥५५॥

ह्याप्रमाणें प्रियेच्या वियोगानें व्याकुळ झाल्यामुळें अश्रूंनी कंठ दाटून येऊन तो कुलिंगपक्षी विलाप करीत असतां मारिला ॥५६॥

असो. हे मूढ स्त्रियांनो, त्या पक्ष्याप्रमाणेंच आपला मृत्यु न जाणून शेकडो वर्षे जरी शोक करीत बसलां, तथापि हा पति तुम्हांला पुन्हा प्राप्त होणार नाही. ॥५७॥

हिरण्यकशिपु म्हणाला, - हे माते ह्याप्रमाणे तो बालक भाषण करीत असतां सुयज्ञ राजाचे सर्व न तलग मनामध्यें विस्मित झाले; आणि हें सर्व जगत् अनित्य असून मिथ्यारुपानेंच प्रकट झालें आहे असें मानूं लागतो ॥५८॥

असो. यमधर्म हें अख्यान सांगून त्याचठिकाणीं गुप्त झाला; व त्या नातेवाइकांनीही सुयज्ञाचें परलोकप्राप्तिविषयी करावयाचें सारें उत्तरकार्य केलें ॥५९॥

यास्तव स्वतः करितां तसेंच दुसर्‍याकरितां तुम्ही मुळीच शोक करुं नका. कारण, अमुक आपलें व अमुक दुसर्‍याचें अशा अभिमानरुप अज्ञानावांचून संसारांत प्राणिमात्रांना स्वतः कोण व इतर कोण ? स्वकीय कोण व परकीय तरी कोण आहे ? सर्व एकच आहे ॥६०॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें दैत्याधिपति हिरण्यकशिपूचे भाषण सुनेसह श्रवण केल्यावर दितीनें एका क्षणामध्यें पुत्रशोकाचा त्याग केला आणि आपलें मन आत्मस्वरुपीं लाविलें ॥६१॥

॥ दुसरा अध्याय समाप्त ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP