श्री गजानन विजय - अध्याय १

भक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.


श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती ।

जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥

कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन ।

मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥

तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं ।

कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥

म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां ।

सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥

मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति ।

परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥

आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती ।

जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥

त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन ।

मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥

तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी ।

मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥

त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला ।

साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥

आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा ।

सच्चिदानंदा रमेशा । "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥

तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर ।

कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥

जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण ।

सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥

ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा ।

तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥

रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली ।

गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥

तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन ।

चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥

ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा ।

म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥

हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया ।

माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥

हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा ।

ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥

तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर ।

लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥

तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास ।

साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥

तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं ।

लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥

माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता ।

तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥

हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी ।

ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥

आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया ।

गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥

आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर ।

ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥

आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा ।

दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥

गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर ।

हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥

हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता ।

दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥

तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें ।

दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥

जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते ।

तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥

लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर ।

ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥

दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत ।

ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥

आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण ।

करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥

संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर ।

वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥

संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची ।

संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥

त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश ।

आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥

ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे ।

हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥

संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत ।

आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥

भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी ।

ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥

जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन ।

कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥

याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण ।

अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥

नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर ।

महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥

शंकराचार्य जगद्‌गुरु । जे पदनताचे कल्पतरु ।

जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥

मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज ।

ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥

नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास ।

गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥

राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं ।

जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥

गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर ।

ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥

ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती ।

ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥

चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष ।

ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥

मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन ।

ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥

म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत ।

नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥

त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले ।

ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥

त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा ।

या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥

मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं ।

तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥

आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग ।

मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥

जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला ।

तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥

माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती ।

तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥

शेगांव नामें वर्‍हाडांत । ग्राम आहे प्रख्यात ।

खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥

ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर ।

ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥

त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें ।

जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥

हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा ।

प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥

तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा ।

येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥

गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर ।

चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥

शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी ।

म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्‍न ॥६४॥

जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण ।

संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥

रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी ।

पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥

माझा मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा ।

परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥

त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं ।

केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥

खर्‍या संताचें धोरण । न कळे कोणालागोन ।

महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥

या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा ।

वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥

जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून ।

ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥

जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण ।

तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥

तेथ त्या हिर्‍याची । खाण आहे कोणाचि ।

हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥

ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं ।

शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥

कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान ।

त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥

परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा ।

परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥

लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले ।

त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥

जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार ।

धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥

कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी ।

ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्‌गुरुंनीं केला असे ॥७९॥

गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत ।

चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥

तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी ।

गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥

हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून ।

योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥

शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं ।

हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥

त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां ।

एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥

हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण ।

शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥

त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची ।

त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥

उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार ।

घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥

तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं ।

एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥

कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें ।

पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥

कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत ।

कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥

नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत ।

प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥

मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर ।

आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥

ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी ।

शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥

शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत ।

हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥

कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती ।

"अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥

त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन ।

त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥

बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला ।

त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥

दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी ।

दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥

आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य ।

कीं याची करणी विपरीत । वेडयापरी दिसतसे ॥९९॥

हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता ।

देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥

द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख ।

कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥

बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्‍त्यासी ।

आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥

खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी ।

ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥

कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा ।

वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥

ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार ।

रत्‍न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥

पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले ।

या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥

हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं ।

पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिर्‍यातें ॥७॥

प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला ।

गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥

ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना ।

क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥

त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें ।

नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥

तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार ।

भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥

निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला ।

मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥

देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी ।

तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥

देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें ।

पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥

ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी ।

चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥

अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला ।

तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥

जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार ।

अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥

अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली ।

जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥

बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण ।

ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥

सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला ।

व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥

तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं ।

वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥

धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव ।

"निरिच्छा" हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥

सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला ।

पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥

ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत ।

हा ब्रह्मची होय साक्षात्‌ । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥

हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी ।

तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥

पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर ।

मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥

ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें ।

उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥

तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी ।

एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥

तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित ।

परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥

अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी ।

हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥

म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची ।

तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥

हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां ।

बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥

पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार ।

तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥

कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं ।

जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥

तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले ।

तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥

हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं ।

तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥

मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार ।

वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥

ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां ।

व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥

हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार ।

तेथें गढुळ,निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥

पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे ।

सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥

पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा ।

ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥

तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन ।

यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥

ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी ।

अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥

तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत ।

वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥

यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं ।

अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥

हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत ।

हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥श्रीहरिहरार्पणमस्तु॥शुभं भवतु ॥

॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP