वनपर्व - अध्याय पंधरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


सरला वनवास, मग द्वैतवनीं पांडुनंदन वसति, तें
दिवसांत वांकुल्या शत दावी हो ! त्या हि नंदनवसतितें. ॥१॥
विप्रासि आधि तेथें बहु दे जो हरिण हरुनि अरणींतें,
तन्मारणीं करिति ते, कौशल केलें कधीं हि न रणीं तें. ॥२॥
शृंगाग्रविलग्नारणि तो मृग गेला चि, लागले होते
त्यामागें, जे फार चि पांच हि नरसिंह भागले, हो ! ते. ॥३॥
भेटे वनीं अकस्मात्तापापह साधुसा चि एक वट,
तच्छीतच्छायेतें सेविति ते त्रुषित वीर एकवट. ॥४॥
धर्म चि धैर्यें साहे, सोसील व्यसन काय दुसरा तें ?
नकुळ तदाज्ञा घेउनि आणाया तोय जाय सुसरातें. ॥५॥
उष्णें झाला होता तप्त तृषित जेंवि धेनुसुत डागें,
धावे, तरंगहस्तें जाणों पाचारिला चि सुतडागें. ॥६॥
तों यक्ष म्हणे, ‘ बापा ! आधीं सेवूं नको चि तोयातें,
मत्प्रश्नोत्तरदाता प्याया न्याया हि योग्य तो यातें. ’ ॥७॥
करुनि अनादर पीतां पडला तो धैर्यमेरु ही नकुळ.
किमपि न वदे, न पाहे, पतित श्रीमत्त जेंवि हीनकुळ. ॥८॥
मग सहदेव धनंजय भीम हि पडले तसे चि जळपानें;
गमले वधिले ते त्या स्वह्रदतटीं कालियाख्यखळपानें. ॥९॥
धर्म म्हणे, ‘ हा ! देवा ! न कळे झाला अनर्थ काय कसा ?
मज बंधु एक तरि जळ द्याया यावा चि शीघ्र सायकसा. ॥१०॥
हा ! रे ! कितवा ! धर्मा ! स्वकृतें निजजीवितासि आंचव्प; घे
‘ धिग्धिग् ! ’ म्हणोनि; विटते द्यूत न करितां सुबंधु कां चवघे ? ’ ॥११॥
ऐसें म्हणोनि जावुनि धर्में ते बंधु पाहिले शवसे;
साधूंत अहंतासी ज्यांमध्यें चेतना न लेश वसे. ॥१२॥
“ हा ! भीम ! हा ! धनंजय ! न स्वर्गीं सुख पहाल, हा ! नकुळा !
हा ! सहदेवा ! दोष त्यजितां मज काय हा लहान कुळा ? ॥१३॥
गेलासि केंवि भीमा ! त्यागुनियां मज गुरुप्रति, ज्ञात्या ! ?
त्यजिल्या सुयोधनोरुध्वंसादि कशा गुरु प्रतिज्ञा त्या ? ॥१४॥
वत्सा ! न भंगलासि प्रभुसीं हि करुनि तशा हि व्षम रणा;
कालविलें काय जळीं त्या दुष्टांहीं वशाहिविष मरणा ? ॥१५॥
विष कालविलें असतें, तरि सलिली करपतीं न कां नलिनें ?
अलिनें त्यजिलीं असतीं, होतीं तुमचीं हि आननें मलिनें. ॥१६॥
गेला स्वर्गासि ? बरें, जा; परि कवणासि हा निरविला हो ! ?
अंत्यद्भुत हें; म्हणतिल न कधीं ही पद्म ‘ हानि रविला हो. ’ ॥१७॥
‘ विजयिचतुर्बंधुचतुर्भुजलीलेकरुनि आक्रमीन रसा, ’
ऐसें चि म्हणत होतों, परि झालों आजि दीन मीं नरसा, ॥१८॥
यामागें न, व्यसनीं आजि बुडालों, जळीं महोपळसा,
रे मुग्ध जीवशुक ! जा सोडुनियां, लुब्ध या न हो पळसा. ॥१९॥
मेले कसे अकस्मात् ? तेज असे म्हणुनि होय न व्याधी,
तर्क न चाले बहुधा, माझी तृष्णाकुळा चि भव्या धी. ॥२०॥
प्रियबंधुमरणकारण शोधूं, जळपान करुनि, तर्कशतें,
जें क्षुत्तृट्प्रतिबंधा न गणी, मुनिचें चि हृदय कर्कश तें. ” ॥२१॥
चिंतुनि ऐसें प्याया गेला जों साधु दक्ष तोयातं,
विनिवारी तों चि सरस्तटगत बकरूप यक्ष तो यातें. ॥२२॥
‘ रे कौंतेया ! केले अनुज तुझे प्रेतरूप म्यां चवघे,
तूं तरि वांच, हठें जळ सेवुनि मरतां उगे चि कां अवघे ? ॥२३॥
मत्प्रश्नाचें उत्तर दे, जळ सेवूं नको चि, थांब कसा. ’
धर्म म्हणे, ‘ ऐसा तूं कोण प्रभु ? जाहलासि कां बकसा ? ’ ॥२४॥
‘ मीं यक्ष ’ असें सांगे दावी प्रकटुनि शरीर पर्वतसें,
पूर्वीं कधीं हि जालें प्रपत न आश्चर्यभीतिपर्व तसें. ॥२५॥
धर्म म्हणे, ‘ अग्निपुढें पांडित्य करील काय कापूस ?
कळल्या उत्तर देइन, पुसणें तें यक्षनायका ! पूस. ’ ॥२६॥
यक्षातें चि न निववी नृपदत्त प्रश्नशतसमुत्तर तें
सुश्रोतृवृंद ज्याच्या श्रवणें होवूनि बहु समुत् तरतें. ॥२७॥
यक्ष म्हणे, ‘ कौंतेया ! या पांडित्यें गुरू हि तुज लाजो,
जालों प्रसन्न, जवघांमजि उठो एक इष्ट तुजला जो. ’ ॥२८॥
धर्म म्हणे, ‘ नकुळ उठो; ’ यक्ष म्हणे, ‘ मान्य जे शतक्रतुला,
भीम नको, विजय नको, आवडलें त्यजुनि अमृत तक्र तुला ? ’ ॥२९॥
धर्म म्हणे, ‘ बा यक्षा ! मज तों माद्रीपृथा समा, नावें
दोघींचीं हि असावीं, म्या अधिक उणें कधीं न मानावें. ॥३०॥
उरलों मीं कुंतीचा, माद्रीचा ज्येष्ठ पुत्र उरव,अ हो !
स्वर्गीं न अश्रुहारा त्या मातेचें कदापि उर वाहो. ’ ॥३१॥
यक्ष म्हणे, ‘ बा साधो ! तूं चि परम धन्य भरतसंतानीं,
तुझिया यशीं निवाया नित्य असावें चि भरत संतानीं. ॥३२॥
पाहसि समभावें अनुज्यांसि, सुतांस हि असें न बा पाहे,
सुत्पोत्थितसे भ्राते चवघे हि तुझे उठोत, बापा ! हे. ’ ॥३३॥
त्या यक्षवरें उठले सुखसुप्त तसे पळांत चवघे ते,
फार निवाले पांच हि, अमृताची जेंवि देव चव घेते. ॥३४॥
भूप म्हणे, ‘ यक्ष न तूं, कोण प्रभु ? अद्भुतप्रभावांचे
लीळेनें असु हरिले; न तुजपुढें आमुची प्रभा वांचे. ’ ॥३५॥
पुसतां ऐसें प्रेमें साम्गे तो त्या नृपास, ‘ मज तात !
धर्म, असें जाण सुता ! कवि ज्याची सम कृपा समजतात. ॥३६॥
झालों प्रसन्न, वत्सा ! धर्मात्मा तूं चि धन्य मत्तनया !
वर माग, मत्प्रसादा पात्र भला होय, अन्य मत्त न या. ’ ॥३७॥
भूप म्हणे, ‘ हें द्या, ज्या हरिणहृता सांपडोत त्या अरणी. ’
धर्म म्हणे, ‘ या घे बा ! कैंचा मृग ? आमुची च ती करणी. ॥३८॥
माग दुजा वर, बा ! गा ! घ्यावें सर्वस्वसें असे नातें;
वत्सा ! तुला न द्यावें म्या तातें वस्तु जें असेना तें. ’ ॥३९॥
राय म्हणे, ‘ संवत्सर दुर्घट अज्ञातवास हा तातें
हो निर्विघ्न असा वर द्यावा, ठेवुनि शिरीं स्वहातातें. ’ ॥४०॥
पितृपति म्हणे, ‘ विराटक्षितिपतिनगरीं तुम्हीं विशंक रहा;
गुप्त असाल, उगाचि न वर गुरुवर अतुललील शंकर हा. ॥४१॥
तिसरा वर माग, तुझ्या भुललों मीं साधुनायका ! महिम्या. ’
वंदुनि म्हणे युधिष्ठिर, ‘ जिंकावा लोभ कोप काम हि म्यां. ’ ॥४२॥
ऐसे सद्वर देवुनि आशीरम्रुतें यथेष्ट वर्षोनि,
स्पर्शोनि शिरीं झाला अंतर्हित धर्मराज हर्षोनि. ॥४३॥
पांडव त्या विप्राच्या ठेविति आधीं शिरोंबुजें चरणीं,
मग अर्पिति धर्मप्रभुदर्शनवरलाभहेतु त्या अरणी. ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP