स्त्रीवर्गासंबंधाने मनुस्मृतिकाराची समजूत

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वरील कलमात सांगितलेल्या स्त्रीस्वातंत्र्यनाशाच्या ऐतिहासिक कारणांचा विचार पुढे करण्यात येईल.  प्रस्तुत स्थळी हा नाश करण्याच्या वेळी सामान्यत: स्त्रीवर्गासंबंधाने मनुस्मृतिकाराची समजूत कशा प्रकारची झाली होती हे समजण्यापुरती पुढील वचने लिहिली असता पुरे होईल :
स्वभाव एष नारीणां नराणामिह दूषणम् ।
अतोर्थान्न प्रमाद्यंति प्रमदातु विपश्चित: ॥२१३॥
अविद्वांसमलं लोके विद्वांसमपि वा पुन: ।
प्रमदा ह्युत्पथं नेतुं कामक्रोध वशानुगम् ॥२१४॥
मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा न विविक्तासनो भवेत् ।   
बलवानिन्द्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति ॥२१५॥
म. स्मृ. अ. २

पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षंति स्थविरे पुत्रा न स्त्रीस्वातंत्यमर्हति ॥३॥
सूक्ष्मेभ्योपि प्रंसंगेभ्य: स्त्रियो रक्ष्या विशेषत: ।
द्वयोर्हि कुलयो: शोकमावहेयुररक्षिता: ॥५॥
पानं दुर्जनसंसर्ग: पत्या च विरहोटनं ।
स्वप्नोन्यगेहवासश्च नारीसंदूषणानि षट् ॥१३॥
नैता रूपं परीक्षंते नासां वयसि संस्थिति: ।
सुरूपं वा कुरूपं वा पुमानित्येव भुज्जते ॥१४॥
पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्रेह्याच्च स्वभावत: ।
रक्षिता यत्नतोपीह भर्तृष्वेता विकुर्वते ॥१५॥
म. स्मृ. अ. ९.
या वचनांपैकी प्रथमच्या वचनांचा तात्पर्यार्थ पुढीलप्रमाणे : ‘ स्त्रिया स्वभावाने घातक व मोहक; त्या अजाण मनुष्यावर भलतेच प्रसंग आणतील, व त्याला भलत्याच मार्गाला लावितील. त्यांच्या वार्‍यासही शहाण्या माणसाने उभे राहू नये. आपली प्रत्यक्ष माता, भगिनी किंवा कन्या यांच्याशीदेखील एकान्तात कदापि असू नये; कारण इंद्रिये बलवत्तर होऊण ती चांगल्या शहाण्यासुरत्या माणसचेही हृदय खेचून घेतील. ’
पुढील वचनांचा अर्थ असा : ‘ स्त्रियांच्या लहान वयात त्यांचे रक्षण पिता करितो, तरुणपणी पती रक्षण करितो, व वृद्धपणी ते पुत्राचे हातून होते. एकंदरीत स्त्रीजाती केव्हाही स्वतंत्र असण्यास पात्र नाही. - प्रसंग कितीही क्षुल्लक असो, स्त्रियांवर देखरेख कडक असली पाहिजे. ती जर का न राहील तर त्या सासर व माहेर या दोहोसही दु:खाचा प्रसंग आणतील. - मद्यपान, वाईट संगत, पती जवळ नसणे, भटकण्याची खोड, अर्धवट झोप, व परक्या घरी राहणे, या सहा कारणांनी स्त्रिया बिघडतात. स्त्रिया रूपाची परीक्षा करीत नाहीत. त्यांना वयाची चाड कशी ती नाही. मनुष्य सुरूप अथवा कुरूप कसाही असो, तो पुरुष आहे एवढ्यावरच त्या त्याशी रममाण होतात. - त या स्वभावत:च परपुरुषाकडे जाणार्‍या व चंचल चित्ताच्या असून त्यांच्या अंगी स्नेह अगर प्रीती यांचा मुळीच वास नसतो. पती त्यांच्याविषयई कितीही जपत असले, तरी त्या विपरीत आचरण करावयाचे ते करण्यास काही कमी करीत नाहीत !! ’
आता लिहिल्या प्रकारेचे अनुदार विचार स्मृतिकाराच्या मनात येण्याचा तो काळ लक्षात आणिला, म्हणजे स्वकीयपक्षाच्या दोषांची बाजू छपवून मणगटाच्या जोरावर स्त्रियांस पादक्रान्त करू इच्छिणार्‍या त्या पुरुषवीरांकडून स्त्रियांच्या विद्येसंबंधने असे कडक नियम व्हवे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. शूद्रांची योग्यता म्हटली म्हणजे त्यांनी त्रैवर्णिकांचे दास्यच करावे; त्यांना संपत्ती मिळविण्याचा अधिकार नाही; त्यांनी विद्येकडे लक्ष देताच कामा नये; त्यांनी नुसते वेदांचे अक्षर उच्चारिले किंवा ऐकिले तर त्यांची जीभ कापावी, व कानात शिशाचा रस ओतावा; - कडक नियम जसे शूद्रांच्यासंबंधाने झाले, तसेच त्यांचीच धाकटी भावंडे म्हणून स्त्रियांच्या संबंधानेही कडक नियम झाले. या व त्या नियमांत विशेष मिळून इतकाच की, शूद्र म्हणून मानिलेल्या लोकांस जे नियम सरसकट लागू केले, तेच त्रैवर्णिकांनी आपल्या स्वत:च्या स्त्रियांसही पर्यायाने लागू करण्यास कमी केले नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP