मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय एकोणतिसावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणतिसावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी दलित-सेवा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥श्रोतीं शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । परंतु ’ परधर्म भयावह ’ बोली । गर्जविली गीतेने ॥१॥ स्वधर्मी मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय । मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥ ऐका ग्रंथींचा दाखला । परधर्म भयावह जरी ठरला । तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥हिंदु बुध्द मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन । ऐसें नव्हतें नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥ भिन्न धर्मांचा जन्महि नव्हता । मग परधर्म कां सांगे गीता ? तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानीं तियेच्या ॥५॥ एकाची प्रकृति ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेंचि । त्यासि गुणकर्में दुसर्याचीं । साधती केंवि ? ॥६॥कोणात शक्ति कोणांत युक्ति । कोणांत ज्ञान, सेवावृत्ति । साधे त्याचि साधनें करावी भक्ति । जनताजनार्दनाची ॥७॥ त्याने आपल्या प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी । दुसर्याचें कर्तव्य घेतां शिरीं । विनाश त्याचा ॥८॥म्हणोनि परधर्म भयावह । ऐसें कथिलें नि:संदेह । तुपांत नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि उत्तम जरी ॥९॥स्वधर्म म्हणजे आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम । यासाठीच करणें जीवनाचा होम । श्रेयस्कर हें सर्वां ॥१०॥असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार । हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥ आत्मवश तें तें सुख । परवश परतंत्र तें दु:ख । ऐसेंहि धर्मग्रंथीं अनेक । कथिलें थोरांनी ॥१२॥परधर्म म्हणजे विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता । हें समजण्याचें तत्त्व हातां । दिलें तयांनी ॥१३॥ आपुला म्हणोनि हृदयीं धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा । ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥मुसलमान म्हणतां मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकूनि द्यावा । आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ स्वधर्माचा ॥१५॥ कोणी म्हणती आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु । ख्रिश्चनासि कधी न वंदूं । भाऊ म्हणोनि आपुला ॥१६॥ मी म्हणतों वंदन गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ? हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान कां द्यावा ? ॥१७॥ मुसलमानाचें उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन । हें कोणीं दिलें न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥ख्रिश्चन दूरदेशाहुनि आला । सेवा करतां करतां मेला । त्याने जरि धर्म नाही बिघडविला । तुमचा कांही ॥१९॥ तरी त्यासि तुम्हीं अव्हेरावा । हें म्हणणें नाही पसंत जीवा । तो आपुलाचि म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥ जो कोणी सत्य सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति । तो असो कोणत्याहि धर्मजमातीं । समजावा चित्तीं आपुलाचि ॥२१॥ धर्म माणुसकीसि म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती । न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा ॥२२॥ परि ही दृष्टि मंद झाली । आप-पर भावना बळावली । तेणें धर्मपंथांत फूट पडली । आत्मीयता दिसेना ॥२३॥ मूळतत्त्वें विलया गेलीं । महंती-बुवागिरी वाढली । सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगें ॥२४॥ ऐसा प्रकार होत आला । म्हणोनि खरा धर्म मातींत मिळाला । आतां उठणेंचि त्या धर्माला । कठीण झालें ॥२५॥गुणकर्मांचा लोप झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ? गोंधळोनि समाज गेला । गर्तेमाजीं भेदभ्रमें ॥२६॥ ’ विष्णुमय जग ’ हाच स्वधर्म । ऐसें संतीं कथिलें वर्म । तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥ ’ मानव ’ हेंचि आपुलें नाम । मग स्वधर्म म्हणजे ’ मानवधर्म ’ । हें तरी ध्यानीं घ्या सत्य वर्म । साध्या बोलीं ॥२८॥आपण आहोंत मानव । मानव्याचा वाढवावा गौरव । सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेंचि कार्य आपुलें ॥२९॥ मज मान्य धर्म न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति । करी जो समाजाची धारणास्थिति । समान भावें ॥३०॥ हें जोंवरि वर्म नेणें । तोवरि धर्म हो कोणी म्हणे । ती अपूर्णतेचीं धर्मलक्षणें । समजों आम्ही ॥३१॥ मग घ्या कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न । मानवता हीच आहे खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥ज्या ज्या धर्मी मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता । यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची ॥।३३॥कृष्ण म्हणे ’ समं हि ब्रम्ह ’ । समता हाचि ईश्वरी धर्म । समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म समत्वचि ॥३४॥सर्वठायीं वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव । दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजीं ॥३५॥ सर्व धर्म सोडोनिया । शरण जावें एका देवराया । सर्वव्यापक जाणोनि तया । हेंचि वर्म उध्दाराचें ॥३६॥ सर्वांविषयीं समभाव । सर्वांभूती वासुदेव । हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा ॥३७॥या दृष्टीने करी जें जें कांही । ती सर्वेश्वराची पूजाच होई । जेथे आप-पर भेद नाही । समन्वयीं चित्त आलें ॥३८॥मग तो असो कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा । तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानूं आम्ही ॥३९॥ यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सर्व धर्मी समत्व कथिलें । परि याचे फायदे घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥कोणीं युध्द करोनि लोकां जिंकिलें । बळेंचि आपुल्या धर्मी ओढिलें । कोणीं प्रलोभनांनी मोहविलें । वाटे का हें योग्य तुम्हां ? ॥४१॥कांही दूरदेशींचें लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती । भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥वाढवोनि आपुलें संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ । ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेंतूनि ॥४३॥ सर्व धर्मीं समभाव । म्हणतां धर्मान्तरासि मिळे वाव । येणें बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि कांही ॥४४॥ यावरि ऐकावें उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर । ह्या गोष्टींत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे ॥४५॥ धर्मान्तराचा करितां विचार । ज्ञात्याचेंचि योग्य धर्मान्तर । परि ज्यासि कळलें सारासार । त्यासि धर्मान्तर कशासाठी ? ॥४६॥ ज्यासि कळलें धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचें नुरे महत्त्व । मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे तें तें ॥४७॥न करील कोणावरि आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन । लोभें भयें परधर्मग्रहण । हें अध:पतन वाटे तया ॥४८॥ दुसर्या धर्मासि युध्दें छळिलें । त्यासि धर्मसेवा नाम दिलें । हें महापातक असे बोलिलें । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥तैसाचि जो समान अज्ञानी । त्यासि विधर्मी नेलें मोहवूनि । त्यायोगेंहि उन्नति कोठूनि ? तें तों सोंग बहुरूप्याचें ॥५०॥ मानवी स्वभाव प्रेमाचा भुकेला । कांही गरजांमुळे वश झाला । तरी त्याचा फायदा असला । घेऊं नये दुसर्यांनी ॥५१॥ कोणींहि सेवा करायासि यावें । परि धर्मान्तर मोहाने करवावें । आपले जनगण वाढवावे । हें तों दुष्ट राजकारण ॥५२॥ धर्मवर्में एकचि असती । परि हे राजकारण त्यांत गोविती । संख्याबल वाढवोनि करिती । परस्परांचा वैरभाव ॥५३॥ धर्मप्रचाराचे नांवाखाली । राज्यसाधना आंतूनि घाली । त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि ॥५४॥तो नव्हे कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेंचि धर्म त्याचा । अव्हेरूनि द्यावा जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥ तैसाचि न ओळखतां स्वत्व । दुसर्यांचें मानोनि महत्त्व । उगीच परधर्मीं घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे ॥५६॥ समजोनि तत्त्व सर्वांत मिळावें । परि पोटाकरितां धर्मा न सोडावें । आत्ममार्ग न समजतांचि करावें । कासयासि हें सारें ? ॥५७॥ऐसें जेथे जेथे झालें । त्यांना कलंकचि लागले । पाहतांना आजहि दिसलें । अनुभवियासि ॥५८॥येथे आपणहि आहों कारण । याचें असूं द्यावें स्मरण । खर्या धर्माचें सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन जनां ? ॥५९॥ लोक धर्म-धर्म ओरडती । प्रसंग पडल्या कामीं न येती । संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचें ॥६०॥धर्माचा बाळगती अभिमान । परि धर्मबांधवां नाही स्थान । कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तयां धर्मलंड ॥६१॥मानवाचा स्पर्शहि पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप । विधर्मी जातां मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥दीनदलितांची तहानभूक । दीनदलितांचें सुखदु:ख । कांहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक चालविती ॥६३॥ सर्वांठायीं म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखें करिती कर्म । ऐसें नाही धर्माचें वर्म । बोलिलें संतीं कोठेहि ॥६४॥परि हे शिकवाया उपदेशक कुठले ? कोण लोकांस समजावी भलें ? हे तों सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावें ॥६५॥पोटपुजार्यांनी केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार । मानवांमाजीं पाडलें अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥हें सर्व आडाणपण । जोंवरि जाणार नाही मानवांतून । तोंवरि जगाची उन्नति पूर्ण । होणें कठिण समजावें ॥६७॥ त्यासाठी एकचि करावें । आपापलें धर्मक्षेत्र सुधारावें । सकळांसीच सकळांचें द्यावें । तत्त्वज्ञान समजावोनि ॥६८॥ हें ज्या धर्मास जातीस फावे । तेणेंचि सुखसोहळे बघावे । यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी ॥६९॥कांहींनी करावा आदिवासी-सुधार । जावोनि रानीं खेडयांवर । पाहावें गरीब लोकांचें कुटीर । कैसें आहे ॥७०॥ गरीब जंगली आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती । झाडाखालीच असते वसती । कित्येकांची ॥७१॥ त्यांसि बोलणें चालणें समजेना । भिवोन पळती बघतांचि आपणा । प्रेम लावोनि त्या कुटुंबांना । करावें आपण आपलेंसें ॥७२॥त्यांना औषधपाणी पुरवावें । लिहिणें वाचणेंहि शिकवावें । उत्सवीं सहभोजनीं मिसळावें । कार्यकर्त्यांनी ॥७३॥जनीं भोजनीं मंदिरीं । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी । स्थान-मान सर्वतोपरीं । एक करावें सर्वांचें ॥७४॥स्वच्छ राहणी निर्व्यसनी । शिकवावी स्वयें त्यांत मिसळोनि । तुच्छ न मानावें दुरोनि । उणीव दावोनि परभारें ॥७५॥दूर कराव्या अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी । सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्नें ॥७६॥ आजवरि यांची केली उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा । घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि सदभावें ॥७७॥जे कोणी असती अडले-नडले । रंजले-गांजले रोगें पिडले । त्यांसाठी पाहिजे धाम निर्मिलें । सुखशांतीचें, आरोग्याचें ॥७८॥ क्षय अथवा कुष्टरोग । हे न मानितां दैवाचे भोग । त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे गांवोगांवीं ॥७९॥ भंगलेल्या मानवी मूर्ति । यांच्या सेवेंतचि ईश्वरभक्ति । आर्तासि दिल्यावांचूनि शांति । मागतां मुक्ति मिळे कैसी ? ॥८०॥जीवनांतूनि जे जे उठले । त्यांशी सहृदयपणें पाहिजे भेटलें । अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा ॥८१॥अंध पंगु मूक बधीर । अशक्त अपंग निराधार । या ईश्वरी चित्रां रंगविती सुंदर । ते ते थोर धर्मशील ॥८२॥ विधर्मी लोक हें कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति । किळस आळस आमुच्या चित्तीं । अधोगति आमुची ही ॥८३॥ सोडोनिया ऐसा स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव । दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म ॥८४॥ हाचि धर्म संतीं आचरिला । जनीं जनार्दन ओळखिला । निर्लोभ प्रेमें सजविला । विश्वबगीचा ॥८५॥ धर्मावतार रामकृष्ण । जटेने झाडी अस्पृश्यांचें अंगण । एकनाथ केलें भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचें ॥८६॥ चैतन्य महाप्रभूने हृदयीं । आलिंगिले दलित, रोगीहि । गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि ॥८७॥ विधवा अनाथ-अपंगसेवा । पैगंबरें मानिला पुण्यठेवा । जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥ श्रीरामें शबरीचीं खादलीं बोरें । गुहका आलिंगिलें प्रेमभरें । मित्र केलीं आदिवासी वानरें । अहिल्येसि उध्दरिलें ॥८९॥श्रीकृष्ण गोवळयांत नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला । जोबवतीशीं विवाह केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥भीष्माचिया वडिलाने । वरिलें कोळियाच्या कन्ये । ऐसीं शेकडो प्रमाणें । सापडती पूर्व ग्रंथीं ॥९१॥सीता शकुंतला कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र । समाजें सांभाळितां झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन ॥९२॥ ज्ञानदेव नामदेवादि संतीं । आलिंगिलें दलित समाजाप्रति । किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यांत त्याकाळीं ॥९३॥संत चोखोबाचें सारें घर । झालें भक्तीचें मंदिर । उपेक्षिल्या समाजीं देवत्व थोर । देतां संस्कार प्रगटे तें ॥९४॥ सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार । कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे ॥९५॥ तैसेचि आजहि उदया येती । घरोघरीं नामांकित पुरुष-युवती । त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या समाजांची ॥९६॥ महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हें ओळखलें । दलितोन्नतीचें कार्य केलें । कर्तव्य आपुलें तेंचि असे ॥९७॥मानवें मानवा समान समजणें । परस्परां उन्नत करणें । संसारासि या आनंदें भरणें । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥ कोणी कोणास त्रासवूं नये । कोणी कोणास फसवूं नये । कोणी कोणास दुरावूं नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥ पाहाव्या त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी । भेदभावना समूळ जाई । जीवन ऐसें निर्मावें ॥१००॥ मग त्यांचा विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे । वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचें ॥१०१॥हेचि आहे धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा । मागासल्या सर्वचि बांधवां । बंधु समजोनि शिकवावें ॥१०२॥पडित रान हें उठवावें । फुलाफळांनी बहरूं द्यावें । आहारीं जाऊंच न द्यावें । कोणाचिया कोणा ॥१०३॥ परि अन्य धर्मांशीं वितंडावें । कोणी कोणाचे दोष मांडावे । हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवूं नयेत सेवकांनी ॥१०४॥आपुला पिता जरी वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य । हेंचि धर्माचें सूत्र आद्य । सर्व धर्मी समभावनेचें ॥१०५॥ही दृष्टि सर्वांसीच द्यावी । समाजीं मानवता वाढवावी । म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गांवीं । उरणार नाही ॥१०६॥साधनांमाजीं उत्तम साधन । संस्कारें तयार करावें मन । सेवामार्गे मनीं घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥ कलापथक प्रवचन कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण । नाटकादि प्रत्येक साधन । याच कार्यीं योजावें ॥१०८॥ जें जें ज्यासि असेल ठावें । तें तें समाजा शिकवीत जावें । जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥ खरा धर्म जाणतील लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक । मग न गडेल परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥यासाठी भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचें साधन । प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावें संपूर्ण त्यांतूनि ॥१११॥ आपुल्या गांवचा कोणीं प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी । हीच खरी गांवाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो ! ॥११२॥हेलावतां सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार । मग कोठे धर्म धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वां ॥११३॥ भ्रामक रूढयांच्या कल्पनांतून । वर येऊं द्या धर्मनिधान । त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया म्हणे ॥११४॥ इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय संपूर्ण ॥११५॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*अभंगकांहो केशीराजा ! दुजें पै धरितां ? हे तों आश्चर्यता वाटे मज ॥ एकासि आसन एकासि वसन । एक तेचि नग्न फिरताति ॥ एकासि कदान्न एकासि मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांहि ॥ एकासि वैभव राजाची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥ हाचि न्याय तुमचे दिसतो कीं घरीं । चोखा हरि ! कर्म माझें ॥ ---श्रीसंत चोखामेळा N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP