मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय विसावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय विसावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी महिलोन्नति Translation - भाषांतर ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥ विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥ ’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच जगातें उध्दरी ।’ ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरुहूनिही ॥३॥मातेच्या स्वभावें पुत्राची घडण । त्यास उज्ज्वल ठेवी तिचें वर्तन । स्त्रीच्या तेजावरीच पुरूषाचें मोठेपण । ऐसें आहे ॥४॥म्हणती जरी ’ बाप तैसा लेक ’ । परि माऊलीचें महत्त्व अधिक । मातृशक्तीनेचि वाढती सकळीक । मुलें चारित्र्याने ॥५॥ पुरूष सर्वकाहीं करी । परि बांधला राहे घराबाहेरी । सर्व विचार घेवोनि आचरी । तरीच शांति त्यासहि लाभे ॥६॥उत्तम महिला हेंचि करी । आपुलें घर ब्रीदासह सावरी । मूलबाळ आदर्श करी । वरि प्रेमळपण सर्वांशीं ॥७॥याच गुणें ’ मातृदेवो भव ’ । वेदाने आरंभीच केला गौरव । नररत्नांची खाण अपूर्व । मातृजाति म्हणोनिया ॥८॥प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जिजाबाई । कौसल्या देवकी आदि सर्वहि । वंदिल्या ग्रंथीं ॥९॥ कांही पुराणीं सांगितली दीक्षा । करावी स्त्रीजातीची उपेक्षा । ती होती साधनाची शिक्षा । सर्वतोपरीं ॥१०॥वियोगाने वैराग्य दृढ करावें । मन इंद्रियसुखांतूनि परतवावें । म्हणोनि विषयप्रवृत्तीचे गोडवे । निषेधिले त्यांत ॥११॥वैराग्यांत न कथिलें दोषविरोधा । नसली साधनांत आपदा । कीर्तीत नसली कांही निंदा । तरि पूर्ण नोहे साधन ॥१२॥म्हणोनि इंद्रिय-विषय-दोषदर्शन । देहाचें नश्वरत्व ओंगळपण । हें वैराग्यार्थ केलें कथन । व्यक्तिनिंदा नव्हे ती ॥१३॥ जेथे जेथे मन मोहूनि धावे । तेथूनि त्यास परतवोनि लावावें । लहान मुलापरी सांगावे । छीः छीः ऐसें म्हणोनि ॥१४॥हें पुरुषास कथिलें स्त्रियेसाठी । तोच भाव पुरुषाविषयीं तिचें पोटीं । तेथे कवणाची तुच्छता मोठी ? छीः छीः विषयांसि शास्त्र म्हणे ॥१५॥परि छीः छीः नेहमीच म्हटलें । तरि पालनपोषणचि बिघडलें । संसारचक्रचि थांबोनि गेलें । त्यांतूनिहि फुटती हीन मार्ग ॥१६॥म्हणोनि विधीने सेवन उचित बोलिंलें । महिलेविण विश्व न चाले । काय होतें पुरुषाने केलें ? अभद्र झालें घर सारें ॥१७॥घरचा उत्तम कामधंदा । हें महिलेचेंचि लक्षण सदा । आलिया-गेलियासि आपदा । महिला असतां न वाटे ॥१८॥ खस्ता सोसूनि परिचर्या । प्रेमळपणें बारीक कार्या । करूं जाणती उत्तम भार्या । न कंटाळतां काळजीने ॥१९॥पुरुष-हृदया नाकळे जेवढें । स्त्रियेचें समजणें तितुकें गाढें । तियेच्या भावनागंगेचे पवाडे । वर्णिले न जाती माझ्याने ॥२०॥ सर्वांगीण एकतानता । तिजसीच घडे एकात्मता । जें जें ठरवील तें सर्वथा । करोनि सोडिल माऊली ती ॥२१॥जगांत असती नाना जीव । सकळांस जाहीर त्यांचा भाव । परि मायाळुपणाचा गौरव । माऊलीसरिसा नाही ॥२२॥देवाने निर्मिली ही क्षिति । तिचे उदरी खाणी किती । परि माऊलीजैसी प्रेमळ दीप्ति । कोठेच नाही ॥२३॥ माऊलीचें स्वभावकर्म । तोचि जगी म्हणविला मानवधर्म । माऊलीचें उत्कट प्रेम । म्हणोनीच देव प्रिय लोकां ॥२४॥ संती माऊलीचें रूप धरिलें । तरीच ते देवपणासि पावले । नाना साधनें करोनि फिरले । त्यांना न गवसलें देवरूप ॥२५॥तें हें स्वतःसिध्द माऊलीपण । स्त्रियेअंगी सहजचि घडण । त्याचा विकास करावया पूर्ण । उत्तम शिक्षण पाहिजे ॥२६॥ स्त्री-दक्षता विचित्रचि आहे । तेथे माणसाचें लक्षचि न जाय । तेवढें शिक्षण मुलाबाळांस ये । तरीच सोय संसाराची ॥२७॥पुरुष आहे पिंडवर्णी । स्त्री आहे दक्ष कारुणी । दोघांचे स्वभाव मिळतांक्षणीं । होय मेदिनी वैकुंठचि ॥२८॥ उत्तम पुरुषासवें उत्तम नारी । तरि त्यांचा संसार स्वर्गापरि । पुरुषाहूनि काकणभरि । महिला वरीच राहतसे ॥२९॥जेव्हा पुरुष होय चिंतातुर । तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार । हें मी पाहिलें घरीं अपार । प्रसंग येतां जाण्याचे ॥३०॥निरीक्षोनि जीं जीं घरें पाहिलीं । तेथे सरसता अनुभवा आली । चातुर्य-लक्षणें अधिक दिसलीं । महिलांमाजीं ॥३१॥मानवी स्वभावांचें अनुमान । प्रसंग पाहोनि अवधान । पुढील काळाचें अनुसंधान । स्त्रियांचे ठायीं ॥३२॥स्त्रीलाच भक्ति स्त्रीलाच ज्ञान । तिलाच संयम शहाणपण । तिच्यानेच हालतीं वाटे संपूर्ण । संसारचक्रें ॥३३॥ म्हणजे पुरुषाचें कांहीच नाही । ऐसें म्हणणें नोहे कांही । सहज स्वभावाची रचनाचि ही । विशद करोनि सांगितली ॥३४॥ हें सर्व जरी सांगितलें । तरी त्यांत भावनेनेचि रंग भरले । कारण, मी नाही अनुभवलें । सुखदुःख संसाराचें ॥३५॥ माझा संसार विश्व आहे । सर्व स्त्री-पुरुष मायबाप । व्यवहारदृष्टीने समजून काय । पाहिजें तें तें बोललों ॥३६॥ परि यांतूनि एकचि घ्यावें । स्त्रियेसि कोठे अव्हेरावें । कोठे माऊली म्हणोनि पाय धरावे । ओळखावें हें तारतम्यें ॥३७॥ कोठे वागवावें मित्रभावें । कोठे देवी म्हणोनि पुजावें । कोठे वैरिणीसारखे बघावें । स्थलकालपात्रभेदाने ॥३८॥ हें ज्या पुरुषांना नाही कळलें । ते जरी रानीवनी पळालें । तरी काय होतें केलें । सोंग ऐसें वरपंगी ? ॥३९॥ ते जिकडे जातील तिकडे । स्त्रीचि आहे मागेपुढे । अंतरी-बाहेरी प्रकृतीचे वेढे । जीवापाडें पडले हे ॥४०॥ केवळ आपुल्या वृत्तीकरितां । केली स्त्रीनिंदा तत्त्वता । तेथे माऊलीपणाचिया माथां । दोष देतां पाप लागे ॥४१॥ म्हणोनि वैराग्यें स्त्री अव्हेरली । त्यांनी विवेकें साधना केली । त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली । माऊली तीस म्हणोनि ॥४२॥ परि हें एकांगीपणें नोळखती । स्त्रियांची अनास्था करिती । यानेच झाली घोर दुर्गति । समाज-जीवनाची ॥४३॥ हीन-दुबळें केलें स्त्री-समाजा । तैसीच पुढे वाढली प्रजा । म्हणती स्त्रीजात तेवढी पशूच समजा । पाशवी झालें जग सारें ॥४४॥कोणी भोगवस्तु समजोनि भली । सजवोनि ठेवती नुसती बाहुली । त्याने घरोघरीं शिरला कली । अबला बनली मायभूमि ॥४५॥म्हणती स्त्री ही गुलामचि असते । तिला हक्क नाहीत उध्दरायापुरते । हें म्हणणें शोभेना शहाण्यातें । स्वार्थांधतेचे ॥४६॥म्हणती स्त्री ही कार्यांत धोंड । म्हणोनि तिच्या प्रगतींत पाडावा खंड । ऐशापरी जाणोनि वाढविती दगड । मार्गी आपुल्या ॥४७॥वास्तविक दोन्ही संस्कारें जन्मती । अपुल्या प्रयत्नेंच उन्नत होती । शेवटी उध्दारही तिच्याच हातीं । असे तियेचा ॥४८॥काय देवें देवता भिन्न केल्या ? ऋषि-पत्न्या नव्हत्या सांभाळिल्या ? काय महिलात साध्वी नाही झाल्या ? पहा पुराणी मागच्या ॥४९॥काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद ? नाही केला ब्रह्मवाद ? नाना विद्याकला भेद । यांत प्रवीण कितीतरी ॥५०॥ काय स्त्रियांनी युध्द नाही केलें ? पतिपुत्रां नाही प्रोत्साहन दिलें ? काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले । ब्रीदासाठी ? ॥५१॥ हजारो स्त्रिया फुलांहूनि नाजूक । ब्रीदासाठी जाहल्या राख । त्यांचें करावें तेवढें कौतुक । थोडेंचि आहे ॥५२॥स्त्रियेसारिखी मोहिनी नाही । स्त्रियेसारिखी वैरागिणी नाही । स्त्रियेसारिखी मुलायम नाही । आणि कठोर रणचंडिका ॥५३॥ परि तिचें लक्ष कोणीकडे न्यावें । काय संस्कार तिच्यांत भरावे । काय शिकवोनि तयार करावें । हें आहे संगतीहातीं ॥५४॥ संगती विषयासक्तीची असली । तरि वेडीबावरी स्त्री बनली । तिच्यांत वैराग्यऊर्मी भरली । तरि न गवसे गुंडांसहि ॥५५॥प्राण देईल आपुल्या हातें । परि भ्रष्ट न होईल लोभें-भयें ते । ऐसे विचारचि पाहिजे तेथे । बिंबविले धीरपुरुषें ॥५६॥ त्यासाठी तिला तैसेंचि ठेवावें । सुसंगति द्यावी आणि शिकवावें । नातेंगोतें सर्व तैसेंचि राखावें । स्त्रीचेप्रति ॥५७॥ अगदी मूलवयापासोनि । उत्तम चालीरीतींची राहणी । कार्यी चपल, सावध जीवनीं । शिक्षण देवोनि करावी ॥५८॥ कांही मुली शक्ति-शिक्षण घेती । मुलांपेक्षाहि धीट असती । नाही गुंडाचीहि छाती । हात घालील त्यांचेवरि ॥५९॥ तेथे कासयासि पडदा । परावलंबनाची आपदा । आत्मसामर्थ्यानेच सदा । स्त्रिया मर्दिती असुरांना ॥६०॥ परि इकडे करोनि दुर्लक्ष । आपुला राखोनि वरपक्ष । लोक स्त्रियांचें जीवन रुक्ष । करोनि ठेविती स्वार्थाने ॥६१॥ कांही लग्न होतां गुंतविती घरीं । नसे बोलण्याचीहि उजागरी । ’ चूल आणि मूल ’ हीच चाकरी । सांगती तिज ॥६२॥ कांही घरांतचि कोंडून ठेविती । बिचारीला जगचि नसे जन्मजातीं । जरा दिसली सूर्याप्रति । मारूनि करिती सरळ तिला ॥६३॥ मुलीने सदा लपोनि राहावें । मुलाने गांवीं रागरंग पाहावे । ऐसे हे दुष्ट रिवाज ठेवावे । न वाटती आम्हां ॥६४॥अरे ! तुझ्याहूनि ती उत्तम वागते । समाजीं उत्तम भाषण देते । तुलाहि शहाणपण शिकवूं जाणते । मग ती मागे कशाने ? ॥६५॥ऐसें असतां दाबून ठेवावें । आजच्या युगीं शोभा न पावे । जेथे समान हक्क असती बरवे । वर-वधूंना ॥६६॥ ईश्वरानेचि निर्मिलें हें सूत्र । दोन्ही ठेवावेत समान पवित्र । मुलांनीच काय केलें सर्वत्र । राहाया पुढे जगामाजीं ? ॥६७॥ वेगळे नियम प्रतिष्ठेसंबंधीं । विधवा होतां विवाह-बंदी । निर्वाहाचीहि नाही संधि । ही भेदबुध्दि कशासाठी ? ॥६८॥ कांही स्त्रिया विधवा होती । केश काढूनि विद्रुप करिती । त्याने कैसी साधे संन्यासवृत्ति । मला नसे ठावें हें ॥६९॥ आपुला झांकोनि दुबळेपणा । करावी दुसर्याची विटंबना । हा तों आहे दुष्टपणा । अमानुष जैसा ॥७०॥संन्यास घेणें असेल विधवेला । तरि वनीं आश्रमीं ठेवावें तिला । सेवाशिबिरीं अभ्यास केला । पाहिजे तिने स्वइच्छें ॥७१॥आपण खावें ल्यावें साजिरें । तिला जन्मवरि दु:खांचे भारे । त्याहूनि तिचें मरणें बरें । होतें पति-चितेमाजी ॥७२॥ तिने वृत्तीने राहावें उदास । करावा परमार्थाचा अभ्यास । विद्रूप करूनि आपणास । काय फायदा समजेना ॥७३॥ विधवेसि मानावें अभद्र । मुलगी जन्मतां ती दळभद्र । वय वाढतां समजावी क्षुद्र । हा तो दुष्टपणा समाजाचा ॥७४॥जैसा पुरुष राहे ब्रम्हचारी । तैसी स्त्रीहि असूं शकते कुमारी । अधिकाराची उणीव सारी । घालविली पाहिजे ॥७५॥स्त्रीजातीस संततिनियमन-बेडी । परि पुरुषास नाही कांही बेरडी । हें म्हणणें नव्हे अविचारी खोडी । वाटते मज ॥७६॥ नियमन असावें तें सर्वासि । अभ्यास द्यावा तो दोघांसि । विशाल करावें विचारशक्तीसि । देशक्लेश समजावोनि ॥७७॥ समाजीं जो पुरुषासि आदर । तैसाचि महिलांशि असावा व्यवहार । किंबहुना अधिक त्यांचा विचार । झाला पाहिजे समाजीं ॥७८॥येथेच समाजाचें चुकलें । एकास उचलोनि दुसर्यास दाबलें । याचें कटुफळ भोगणें आलें । कितीतरी स्थानीं ॥७९॥परि लक्ष नाही आज तिकडे । नाहीत मुलीबाळींना उत्तम धडे । कुरण वाढूं द्यावें ढोरांसाठी पुढे । तैसें झालें समाजाचें ॥८०॥ यास पाहिजे आता वळविलें । ठिकठिकाणीं शिक्षण दिलें । मुलीमहिलांचें जीवन जागविलें । तरीच जगलें गांवराज्य ॥८१॥शहाण्यांनी हें विसरूं नये । गांवीं सर्वांची करावी सोय । जेणें पुरुषांचें तैसेंचि स्त्रियांचें होय । उत्थान आता ॥८२॥तरीच ग्राम शोभूं लागे । पुरुष-नारी दोन्ही विभागें । जेणें स्वर्गचि उतरेल कार्यायोगें । विकासाच्या ॥८३॥ महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास । करील ऐसें शिक्षण खास । जरि दिलें जाईल त्यांस । तरीच भावी जग पालटे ॥८४॥ महिलांचें उच्चतम शिक्षण । शिक्षणांत असावें जीवनाचें स्थान । जीवनांत असावें स्वारस्य पूर्ण । शांतिदयादि भावनांचें ॥८५॥ समाजविकास ज्यास आवडे । त्याने शिकवावे मुलींना धडे । लिहितां-वाचतां येईल एवढें । तरी शिक्षण आवश्यक ॥८६॥तैसीच शिकवावी टापटीप । गाणें बोलणें वागणें अनुरूप । घर पाहतांचि कळावें आपोआप । कैसी येथील महिला तें ॥८७॥मुलीबाळीस उत्तम ठेवणें । हें तों मातापित्यांचें कर्तव्य प्रमुखपणें । त्यानेच राष्ट्राचें फेडील पारणें । घर संतानें आपुलिया ॥८८॥ मीं पाहिलें मुलें फार शिकती । यंत्रविद कारागीर होती । परि मुलींसाठी योजना अति । मंद आहे शिक्षणांची ॥८९॥ऐसें समाजीं न व्हावें । मुलांपरीच मुलींना शिकवावें । त्यांचें स्थानमान नेहमी असावें । सहकारितेचें ॥९०॥ मुलांस विविध उच्च ज्ञान द्यावें । तैसेंचि मुलींनाहि शिकवावें । हेळसांड करूं नये हें जाणावें । समाजाने ॥९१॥ परि स्वतंत्र असावें मुलीचें शिक्षण । स्त्रीपुरुषांचे उद्योगहि भिन्न । जेथे होतें दोघांचें मिलन । प्रसंग कठिण ओढवती ॥९२॥ विचारें जें जें कांही होतें । त्यांत योजनाबध्दता राहते । अविचाराने जातां मोहपंथें । धोका मागुतां पावती ॥९३॥म्हणोनि समजोनि शिक्षण द्यावें । दोन्ही रथचक्रां सारखें करावें । शक्तियुक्तींनी भरावें । गांव सारें आपुलें ॥९४॥ परंतु नेहमी भयभीत करावें । प्रत्येकाचें स्थान भिन्न ठेवावें । मग स्वभावास वळण कोणीं द्यावें । संसर्ग येतां ? ॥९५॥ स्त्रीपुरुषांच्या विकृत कल्पना । भ्रमविती परस्परांच्या मना । यासाठी वाढवावा बंधुभिगिनीपणा । योग्य संबंधें ॥९६॥शिक्षणांत अशीच करावी व्यवस्था । न होईल परस्परांची अनास्था । या दृष्टीने शिकवोनि समस्तां । वळण द्यावें नैतिकतेचें ॥९७॥ दोघांनाहि आपुलें ब्रीद कळे । तरीच सगळा अनर्थ टळे । एरव्ही पिंजर्यांत जरी वेगळे । तरी गोधळे वृत्ति त्यांची ॥९८॥ म्हणोनि सहशिक्षणहि नाही वाउगें । जरि नैतिकभाव राहती जागे । शिक्षणीं जागृति ठेवणें सर्वांगें । काम नेत्या वडिलांचें ॥९९॥ शिक्षणीं सांभाळोनि तनुमन । करावें मुळीबाळीस विद्वान । अंगीं असावें शौर्य पूर्ण । ब्रीद आपुलें रक्षाया ॥१००॥ जेव्हा पुरुष पावतो पतना । त्यास स्त्रीप्रकृति सहन होईना । तेव्हां महिलांत असावी संघटना । त्याची सुधारणा करावया ॥१०१॥ जैसी मुलांची संघटित सेना । तैसी स्त्रियांची असावी संघटना । आपुल्या सुखदु:खांच्या भावना । प्रकटवाव्या सभासंमेलनीं ॥१०२॥पुरुषांचें जैसें स्फूर्तिस्थान । तैसेंचि महिलांचें असावें उन्नतिभुवन । त्यांत सभा प्रार्थना कथाकीर्तन । उपक्रम पूर्ण महिलांचे ॥१०३॥दूर सारोनि जातीय आदि भाव । जमवोनि महिलासमुदाय सर्व । तिळगूळ हळदीकुंकू शारदोत्सव । सहभोजनादि करावे ॥१०४॥ उत्सव साध्वीपतिव्रतांचे । जयंति-पुण्यतिथी पर्व तयांचे । वाचनालयादिक महिलाविभागाचें । जेथे तेथे आवश्यक ॥१०५॥स्त्रियांचे स्वतंत्र मेळे-समुदाव । त्यांच्या उन्नतीचा कला-गौरव । प्रतिकाराचीहि त्यांना जाणीव । अवश्य असावी ॥१०६॥ माझें म्हणणें श्रोतयांतें । जें जें सुख असेल पुरुषातें । महिलांसीहि असावें अभिन्नपणें तें । स्वातंत्र्य सुखसाधन ॥१०७॥ सर्व सोयी पुरुषांकरितां । स्त्रियांसाठी सर्व व्यथा । हें कोण बोलतें शास्त्र आता ? द्यावें हातां झुगारोनि ॥१०८॥ पुरुष उन्नतीस चढला । परि कांहीच न कळे महिलेला । तरि तो गांवहि एक कल्ली झाला । नशीबीं आला र्हास त्रास ॥१०९॥ म्हणोनि रथाचीं दोन्ही चाकें । मजबूत करावी कांतोनि सारखें । तरीच संसारगाडी सुखें । सुखावेल ग्रामजीवनाची ॥११०॥आदर्श ऐसे मातापिता । जन्म देतील आदर्श सुतां । ते वैकुंठ बनवितील भारता । तुकडया म्हणे ॥१११॥ इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । ग्रामोद्वार कथिला महिलोन्नतींत । विसावा अध्याय संपूर्ण ॥११२॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*अभंगदळूं कांडू खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥ सर्व जीवांमध्ये पाहूं । एक आम्ही होऊनि राहू ॥ जनी म्हणे ब्रह्य होऊं । ऐसें सर्वांघटीं पाहूं ॥ ---श्रीसंत जनाबाई N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP