मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|
अध्याय अठ्ठाविसावा

ग्रामगीता - अध्याय अठ्ठाविसावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

सर्व धर्माचा समन्वय । विश्वशान्तीचा उपाय । लोकसुधारणेचें विद्यालय । सामुदायिक प्रार्थना ॥१॥
ऐसें झालें प्रतिपादन । परि आमुचां ऐका प्रश्न । सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील एक कैसे ? ॥२॥
कैसा रुचेल एक पाठ ? प्रत्येकाची वेगळीच वाट । कैसे बसतील एकवट । भक्त भिन्न देवांचे ? ॥३॥
दुसर्‍या धर्मीयांमाजीं बसतां । झाली वाटे धर्मभ्रष्टता । यासाठी उपाय सांगा कोणता । सामुदायिकतेसि ? ॥४॥
श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । संक्षेपें करितों उपाय कथन । लोकां पटवावें तत्त्वज्ञान । सदधर्माचें नानापरी ॥५॥
जगीं दिसती विभिन्न धर्म । परि सर्वांचें एकचि वर्म । विश्वधारणेचा मार्ग उत्तम । सदधर्म तोचि ॥६॥
व्हावी विश्वाची उत्तम धारणा । शांति लाभावी सर्वजना । या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना । केले धर्मप्रवर्तकांनी ॥७॥
’ सर्व विश्व आर्य करीन ’ । ’ तिन्ही लोक आनंदें भरीन ’ । हें संतऋषींचें विशाल बंधुपण । नव्हतें स्वार्थासाठी ॥८॥
लोक प्रतिमापूजक नसावे । त्यांनी एका ईश्वरासि प्रार्थावें । हा महंमदाचा उपदेश नव्हे । एकाच देशासाठी ॥९॥
येशू ख्रिस्ताने प्रेमपाठ दिला । प्राणहि पणास लावला । तेथे अन्य मानव नाही वगळला । कळपांतूनि देवाच्या ॥१०॥
बुध्द आणि महावीर । श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र । यांनाहि सर्वांचीच फिकीर । विश्व सुखी होवो म्हणोनि ॥११॥
त्या त्या देशधर्माच्या संतीं । हीच व्यापक धरोनि वृत्ति । विशाल मानवसमाजाप्रति । सेवा दिली आपुली ॥१२॥
अन्य देशांचे आणि भाषांचे । झालेले आणि होणारे साचे । थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचें । आपुल्या ग्रंथीं ॥१३॥
धर्मभ्रष्टतेची कल्पना । ही मान्यचि नव्हती धर्माचार्यांना । सर्व विश्वाचीच त्यांना । काळजी होती समान ॥१४॥
सर्व विश्वाचा एकचि देव । त्याचीं मुलें सर्वचि जीव । जरी वेगवेगळें दिलें नांव । तरी भाव हाचि त्यांचा ॥१५॥
हिंदूंचा देव हिंदुत्व धरी । मुसलमानांचा मुस्लिम करी । ख्रिश्चनाचा ख्रिस्त्यांनाचि तारी । ऐसें म्हणणें आकुंचित ॥१६॥
सर्वांत उच्च ऐसी भावना । जगच्चालकाची कल्पना । तेथे कैचा उरे भिन्नपणा ? आप-पर कोण ? ॥१७॥
भिन्न मार्ग-मार्गी असती । परि देव नाही भिन्नस्थिती । मूळ धर्माचीहि नाही गति । भिन्नत्वाची ॥१८॥
सर्वचि म्हणती जगत सारें । केलें आमच्या ईश्वरें । धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारें । दिला आम्हां ॥१९॥
ऐसे सर्वाधिपति ईश्वर । काय जगीं असती शंभर ? एकचि जगच्चालक परमेश्वर । तोचि सर्वांचा ॥२०॥
अल्ला, गॉड, अर्हत, देव । अहूरमज्द, निर्वाण, शिव । परमेश्वरासि ठेवा नांव । एक गुरुदेव तोचि माझा ॥२१॥
जगासि सुखी उन्नत करावें । हेंचि त्या जगन्नियंत्या रुचावें । मग धर्माचें रूप याहूनि असावें । भिन्न कैसें ? ॥२२॥
आपणाऐसें सर्वांचें सुखदु:ख । जाणोनि वागावें उपकारक । सर्व धर्मी हाचि आदेश एक । दुमदुमताहे ॥२३॥
यांचा करूं जातां विचार । सर्व पंथधर्म भक्तिप्रकार । एकतत्त्वी कळती साचार । भेद भक्तांनी कां घ्यावा ? ॥२४॥
ज्याची बुध्दि अल्पबल । ते घरांत करिती घरकुल । परि हें विश्व एकचि दल । मानवांचें ॥२५॥
एकचि भूमि सर्वांकरितां । एकचि हवापाणी, सुख-व्यथा । पंचभूतांचीच सर्वथा । शरीरें सर्वांची ॥२६॥
एकचि जीवनाचें मूळ । एकचि शेवटचें स्थळ । एकचि सेवाधर्म निर्मळ । नाना रूपीं ॥२७॥
सर्वांच्या नेत्रीं एकचि ज्योति । सर्वांच्या अंगीं एकचि शक्ति । सर्वांठायीं एकाचीच व्याप्ति । तेथे भिन्न कोण आले ? ॥२८॥
मुस्लिम ख्रिस्ती जमात कांही । आकाशांतून आली नाही । त्यांचे पूर्वीहि होती मही । मानवांनी नटलेली ॥२९॥
एकाचें जग देवाने केलें । आणि एकासि भुतांनी जीवन दिलें । ऐसें मानतां जग वेगळालें । दिसेना पंथधर्मांचें ॥३०॥
धर्मात नाही हिंदु मुसलमान । धर्मांत नाही पारशी-खिश्चन । धर्मांत नाही शिख-जैन । पाहतां मुळीं ॥३१॥
लोक धर्मांची व्याख्याच विसरले । धर्में हिंदु मुसलमान झाले । मूळचें मानवपणहि आपुले । हरविलें त्यांनी ॥३२॥
देशभाषेचे बुरखे घातले । हवापाण्याने रिवाज बदलले । त्या बहिरंगासीच धर्म म्हणों लागले । अल्पज्ञानी ॥३३॥
देशाचारी राहणी झाली । हवापाण्यापरी विशेषता आली । उत्पादनापरी आरंभिली । भोजन-व्यवस्था ॥३४॥
म्हणोनि काय मानवत्वहि बदललें ? सत्यसिध्दान्ती अंतर पडलें ? पाप-दु:खहि उचित वाटलें । उलटें कोणा ? ॥३५॥
हें म्हणणें मला आवडेना । मी एकचि मानतों सर्वांना । आधी मानवता सर्वांचा बाणा । पंथभेदांना स्थान मग ॥३६॥
भिन्न राहणी भिन्न उपासना । म्हणोनि का पारखा मानवपणा ? जरी भिन्न पध्दतींनी केली प्रार्थना । तरी काय झालें ? ॥३७॥
एकाचि सागराची वाफ । होऊनि आली पाणीरूप । थेंब कामें करोनि खूप । जातील शेवटीं एका स्थळीं ॥३८॥
तैसेचि आहे मानवांचें । मानव कोणत्याहि धर्माचें । परंतु समाजरचनेसाठी त्यांचे । महत्त्व सारिखें ॥३९॥
आदि-अंतीं सर्वचि एक । मध्ये समाजसेवेचें कौतुक । त्याचेंहि मूल्य समान देख । मानवधर्म-दृष्टीने ॥४०॥
धर्म सांगे पुजारी व्हावें । धर्मचि सांगे भंगी व्हावें । धर्म म्हणतो गावें-नाचावें । सर्वांसाठी ॥४१॥
ऐसें वेगवेगळें कर्म केलें । तरी परकेपण नाही ठेविलें । सर्व मिळोनि एक झाले । तोचि धर्म ॥४२॥
धर्मामाजीं सर्व येतें । परंतु तारतम्य पाहिजे तेथे । मानवाशीं होय विद्रोह ते । न करावें धर्म म्हणे ॥४३॥
धर्माची आखणी मानवता । मानवतेसाठी करावी व्यवस्था । कोठेहि होतां अव्यवस्था । धावोनि जावें ॥४४॥
ही व्यवस्था जेव्हा अपुरी पडली । तेव्हाचि गट वृत्ति निर्माण झाली । व्यक्तिमत्वाचीं प्रलोभनें वाढलीं । भिन्न मार्गांनी ॥४५॥
विश्वाचे ऐसे झाले तुकडे । कोणीहि गेला कोणीकडे । नांवरूप धरोनि वेडेंवाकडें । फुटला धर्म ॥४६॥
देशकालादिकासि बघून । केलीं साधनें निर्माण । त्या फांद्यांनाचि धर्मवृक्ष मानून । आखणी झाली गटांची ॥४७॥
म्हणोनि पडलें विभिन्न नाम । हिंदु-मुसलमान-ख्रिश्चन धर्म । जैन-शिख-महानुभाव-ब्राह्म । नामें धर्मामाजीं ॥४८॥
अजोनि खुंटली नाही संख्या । जेवढी पंथसंप्रदाय-व्याख्या । सर्वांसीच धर्मनामाअख्या । पुढे लागे ॥४९॥
घराघराचा अलग धर्म । धर्म एकेक व्यवहारकर्म । ’ आपलें जगणें ’ हेंचि सत्याचें वर्म । ऐसा भ्रम जाहला ॥५०॥
ऐसी जंव वाढली प्रथा । तंव झाली सर्वांसीच व्यथा । मग म्हणती विरोधी धर्मपंथां । केलें पाहिजे शासन ॥५१॥
हें आवराया निर्मिली सत्ता । सामदामदंडभेद-प्रथा । हा राजधर्महि लावण्यासि व्यवस्था । मानवांची ॥५२॥
जे धर्ममार्गी संघटित झाले । त्यांनी न्यायसत्र आरंभिलें । आपापल्या परींनी केलें । स्थापन राज्य ॥५३॥
राज्य केलें धर्मासाठी । परि उपभोगचि लागला पाठीं । लागली अहंतेची आटाआटी । आसक्तीमुळे ॥५४॥
मग धर्मचि वगळून गेला । राजकारण धर्म झाला । त्यासाठी गलबला वाढला । सर्व देशीं ॥५५॥
विसरोनि सेवाधर्माचें अधिष्ठान । राज्य करावें हेंचि मोठेपण । राबवावें मानवां पूर्ण । ऐसें झालें ॥५६॥
मग मानवाच्या सुखासाठी । मानव द्यावेत बळी संकटी । पडली ऐसीच राहटी । लोकांमाजीं ॥५७॥
गेलें प्रेमाचें समजावणें । लागलें तलवारीस धार देणें । जो करील हिंसा अधिकतेने । तो विजयी ठरला धर्मवान ॥५८॥
सत्ताबळ संख्याबळ । त्यावरि धर्म ठरला प्रबळ । तेथे सत्याचें फुटलें कपाळ । शक्तियोगें ठरतां धर्म ॥५९॥
मग धर्मचि झालें हतियार । धर्माकरितां युध्द संहार । धर्मयुध्दाचें बंड थोर । वाढलें लोकीं ॥६०॥
सत्य त्याग सेवेसि कोणी पुसेना । आपुलींच मतें मिरविती नाना । ऐसा हा झाला धिंगाणा । पृथ्वीवरि ॥६१॥
बिघडोनि गेली धर्माची रीति । ती सुधारावया अपुरी शक्ति । म्हणोनि देवादिकांनाहि हातीं । शस्त्रें धरावीं लागली ॥६२॥
तें धर्मयुध्द न्यायाचें होतें । उन्मत्तता मुळीच नसे जेथे । ’ बळी तो कान पिळी ’ हें तेथे । लावणें हा अधर्म ॥६३॥
न्यायदानांत द्वेषपाप नसतें । परि जेव्हा आसक्ति देशाची घेरते । तेव्हा माणसाची बुध्दि जाते । विनाशाप्रति ॥६४॥
मग युध्द राष्ट्राची अरेरावी । घमेंड कुटिलतेच्या उठाठेवी । अधर्म तो जरि असेल युध्दचवी । कोणाचीहि अन्यायी ॥६५॥
माणूस माणसासि मारी । अपराध नसतां दमन करी । तें युध्दहि परि दुराचारी । बोलिलें शास्त्रीं धर्मांचेंहि ॥६६॥
हा न्याय जेव्हा सकळांना कळे । तेव्हा थांबे युध्दाचें वारें सगळें । मानवसमाज माणुसकीशीं मिळे । न्यायदेवतेपुढे ॥६७॥
जें युध्दांचें तेंचि लहान झगडयांचें । तैसेंचि कुटुंबांमधील कलहांचें । हें सारें प्रदर्शन अज्ञानाचें । वेगळाल्यापरीं ॥६८॥
धर्म, पंथ आणि पक्ष, देश । यांच्या नशेचा अभिनिवेश । धर्मवेडें करोनि मानवास । न्यायमार्गें जाऊं नेदी ॥६९॥
जेव्हा मुसलमान राज्य करी । तेव्हा देवळें पाडोनि मशिदी उभारी । आपण शहाणे म्हणोनि वाजवी भेरी । लौकिकामाजीं ॥७०॥
त्याची सत्ता विलया गेली । तेव्हा हिंदूने मसजिद पाडली । आपलीशी करोनि सोडली । दुसर्‍या पंथीं ॥७१॥
जेव्हा ख्रिश्चनाचें बंड आलें । तेव्हा त्याने चर्च वाढवले । आपुलें जाळें पसरोनि दिलें । मनमाने त्यांनी ॥७२॥
रागद्वेषांचें समाधान । अभिलाषापूर्तीचें साधन । म्हणोनि केलें युध्द वा दमन । सूडबुध्दीने ॥७३॥
हा तो नव्हे धर्मविचार । हा आहे शक्तीचा व्यवहार । धर्मात मान्य नाहीच संहार । निरपराध मानवांचा ॥७४॥
धर्मांत आहे सुव्यवस्था । शांति, बुध्दि, न्यायप्रियता । अहिंसेने समजावितां । होतो धर्म श्रेष्ठ ऐसा ॥७५॥
मानव मानवासाठी कष्टतो । दुसर्‍याच्या सुखीं सुखावे, श्रेष्ठ तो । परि मानवास मानव संहारतो । अधर्म याहूनि कोणता ? ॥७६॥
हेंचि जयांना अंतरीं कळलें । तेचि महामानव समजले गेले । मग कोणतेहि पंथ धर्म जरी असले । सर्व चांगले आम्हांलागी ॥७७॥
सर्वचि धर्मपंथांचे देव । धर्मप्रवर्तक महामानव । यांचा ऐसाचि असे भाव । व्हावे मानव सर्व सुखी ॥७८॥
जगीं नांदावी सुखशांति । सर्वांनी आचरावी बंधुप्रीति । यासाठीच झटले असती । महापुरुष अभेदत्वें ॥७९॥
धरोनि हाचि विशाल हेत । कालानुसार काढिले पंथ । केला उपदेश लिहिले ग्रंथ । परोपरीं त्यांनी ॥८०॥
याचसाठी आजवरि झालीं । कुराणें पुराणें धर्ममतेंहि भलीं । परि अहूनिहि नाही आकळली । खोली याची सर्वांना ॥८१॥
पूर्वीपासूनि प्रयत्न झाले । न कळणारांनी विरोधिलें । अजूनहि प्रयत्न चालले । याचि मार्गाचे ॥८२॥
आम्ही आहोंत प्रयत्नवादी । देवादिकांचे विशाल संवादी । जगासि तैसी लाभो सदबुध्दि । म्हणोनि प्रार्थना आरंभिली ॥८३॥
यांत नवीन नाही गोविलें । पूर्वीच्या धर्माचें हृदगत भलें । तेंचि एकत्र करोनि ठेविलें । वेगळया स्वरूपें ॥८४॥
सर्वचि थोरांचे थोर विचार । सर्वाच्या पध्दतींचा सार । करोनि ठेविला गुच्छाकार । समाजापुढे ॥८५॥
ज्यांत परस्परांचें समाधान । जेणें सकलांचें सुंदर जीवन । तेंचि साधावया अनुसंधान । प्रार्थना केली ॥८६॥
समन्वयकारी प्रार्थनापाठ । ही नव्हे पोलादी चौकट । येथे प्रत्येकासि वाव असे स्पष्ट । आपुलें गोवाया ॥८७॥
तात्त्विकता कुठूनहि घ्यावी । आपुलीच ’ एक टांग ’ नसावी । सर्वांच्या समाधानाची ठेवावी । सहनशील बुध्दि ॥८८॥
ऐसी प्रार्थनाच शान्ति-प्रभावी । शान्तीसाठी विशालता हवी । विशालतेसाठी सोय व्हावी । परस्परांची ॥८९॥
परस्परांच्या हृदयांसि स्पर्शता । जवळ येईल आत्मीयता । तेणेंचि विश्वासि प्रेमें जिंकतां । होईल प्राप्ति सुखशांतीची ॥९०॥
धर्म-पंथ-देशांचें भांडण । न मिटे ऐक्य-प्रेमाविण । तें प्रेम साधाया प्रार्थनेसमान । पातळी नाही उत्तम ॥९१॥
सर्वचि धर्मीं प्रार्थनातत्व । सात्विकतेंतचि टिकाऊ एकत्व । याचें जाणोनिया महत्त्व । आणावें सर्वां एके ठायीं ॥९२॥
परस्परांचा संबंध नव्हता । म्हणोनि पध्दतींत बदल होता । त्यांस आतां जवळ आणतां । पाप कैसें ? ॥९३॥
सर्व विश्वाची एकचि प्रार्थना । सर्व विश्वाचा एकचि बाणा । सर्व विश्वांतचि एकपणा । कां न यावा ? ॥९४॥
न येण्याचें एकचि कारण । आकुंचित आमुचें ज्ञान । म्हणोनि आपापल्या परीने मंडण । केलें असे धर्मांचेंहि ॥९५॥
देवापासूनि एक होती । तेचि विशाल मन करिती । अल्प ज्ञानियापाशी फजीती । मानवधर्माची ॥९६॥
ते समजती भ्रष्टाकार । इतर तुच्छ आपण थोर । त्यांना स्वत:चाहि धर्म-विचार । कळला नाही ॥९७॥
प्रार्थनीं सर्वांनी फड मांडावे । प्रार्थना संपतांचि वितंडावें । ते प्रार्थी नव्हेत पेंढारी म्हणावे । स्वार्थी ऐसे ॥९८॥
लोक स्वार्थांनी दुरावले । आपसांत लढूं लागले । ते उपासनेने जवळ आले । होईल ऐसें ॥९९॥
त्यासाठी त्यांना ज्ञान द्यावें । धर्मसमानत्व शिकवावें । न पटे तोंवरि प्रार्थनेसि लावावें । स्वधर्माच्याचि ॥१००॥
भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली । परि प्रार्थनातत्त्वें प्रतिपादिलीं । तरी आदरभावना सर्वत्र वाढली । होईल ऐसें ॥१०१॥
याने तयार होईल भूमिका । प्रत्येक धर्म आपणासारिखा । तेणें विश्व शान्तिसुखा । पावेल एक होऊनि ॥१०२॥
म्हणोनि धरिली ही साधना । साधा सामुदायिक प्रार्थना । सामुदायिक होण्याचीच धारणा । आरंभिली सात्विक ॥१०३॥
ईश्वराची जी मनोकामना । एकापसोनि अनेकपणा । अनेकान्तरीं एकत्व भावना । उपभोगावी या द्वारें ॥१०४॥
सर्वांनी चहूकडोनि यत्न करावे । आपल्यापरीने जवळ यावें । सिध्दान्तांचें गोडवे गावे । म्हणजे वेळ न लागे ॥१०५॥
सिध्दान्तरूप तत्त्वज्ञान । लोकांमाजीं रुजविल्याविण । न होय पंथद्वेषादिकांचें उच्चाटन । नेहमीकरितां ॥१०६॥
सामुदायिक प्रार्थनारूपें । हें तत्त्व रुजविणें असे सोपें । म्हणोनि लागा खटाटोपें । कार्यासि या गांवोगांव ॥१०७॥
गांवोगांवीं धर्मसमभाव । मग आपैसेंचि सुखावे विश्व । पृथ्वीसि लाभेल स्वर्ग-गौरव । तुकडया म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । धर्मसमन्वय कथिला येथ । अठ्ठाविसावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥
॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥
*
" संत हे भेदाभेद पाळीत नाहीत. आपल्यामध्य ही भदाची भिंत आहे, तिनेच आपल्याला वेगळें केलें आहे. तुम्हीहि ती पाडून टाका. फातिहा काय नि रामनाम काय; मशीद काय, द्वारकामाई ( वृंदावन ) काय नि पारशांची धनी काय, सर्वांच्या अंतर्यामीं एकच आहे.
---श्रीसंत साईबाबा

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP