समाधान - ऑगस्ट १२

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती , तद्वतच अनेक संतलक्षणांत शांती हे पहिले लक्षण आहे . वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण . तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे . पृथ्वी ही क्षमा -शांतिरुप आहे . त्याप्रमाणेच संत असतात . शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे . जिथे स्वार्थ तिथे अशांती . भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत -भावना , तिथे खरी शांती नाही . अनन्यतेने शांती प्राप्त होते , आणि तीच परमार्थाचा पाया आहे . पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत . त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार . शांती बिघडायला दोन कारणे आहेत : एक : गत गोष्टींचा शोक , आणि दुसरे : पुढची चिंता . आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही . आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण . सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही ; पश्चाताप करण्याची पाळी येईल . म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे . भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही . सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे .

आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी . एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले . तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे . तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले . लोकांची ये -जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला , म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले . साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती , तशीच दुसर्‍या ठिकाणीही कायम होती . शेतमालकाला आश्चर्य वाटले . ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा , तो शांतच राहणार . म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे . त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा . कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये . अकर्तृत्वभाव ठेवावा . अशाने शांती येईल . जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल . एकनाथांची शांती अगाध होती . नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे . राजेरजवाडे आले आणि गेले , पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले , कारण ते शांतीची मूर्ती होते . ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवतस्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही . जे जे घडते ते ते भगवदिच्छेने घडते ही दृढ भावना असणे , हेच शांतीचे लक्षण आहे . कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो . विद्या , वैभव , कला , संपत्ती , संतती , याने शांती येतेच असे नाही . निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे . मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल . मनातली शांती कायम ठेवून रागावता येते . तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही .

N/A

References : N/A
Last Updated : September 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP