अध्याय नववा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


शशांक देखतां विटती तस्कर ॥ दिवाभीतां नावडे दिनकर ॥ कीं हिंसकांस तत्त्वविचार ॥ मनींहून नावडे ॥५१॥

तैसा सोहळा देखोन मानसीं ॥ परम संतापली ते दासी ॥ रामनिधानासी विवसी ॥ आड आली साक्षेपें ॥५२॥

ते कलहपीठींची देवता ॥ कीं ते दुःखकल्लोळप्रवाहसरिता ॥ गृहांत अग्नि लागे अवचिता ॥ तैशी आंत प्रवेशली ॥५३॥

आंगणीं शरीर टाकी तात्काळ ॥ धबधबां पिटी वक्षःस्थळ ॥ कैकयीस म्हणे तूं केवळ ॥ अभागीण सर्वस्वें ॥५४॥

अगे बुद्धिहीन सर्वांत ॥ तुझें तुज न कळे हित ॥ मातुळगृहीं पाठविले तुझे सुत ॥ राज्यीं रघुनाथ स्थापिती ॥५५॥

तुज अवदशा आली यथार्थ ॥ सौभाग्य गेलें वाहात ॥ देशधडी केला भरत ॥ तुज अनर्थ समजेना ॥५६॥

राज्यीं बैसतां रघुनंदन ॥ तुझे पुत्र टाकील वधोन ॥ कैकयी तुज शिकवील कोण ॥ मजवांचून बुद्धि आतां ॥५७॥

मग तिजप्रति कैकयी बोलत ॥ मज भारत तैसाच रघुनाथ ॥ तूं हा खेद न करी यथार्थ ॥ कदा अनर्थ करूं नये ॥५८॥

ऐसें बोलोनि सत्वर ॥ कंठींचें पदक आणि हार ॥ तिच्या गळ्यांत घाली परिकर ॥ दासी आपुली म्हणोनि ॥५९॥

पदक आणि मुक्तामाळा ॥ मंथरेनें तोडून टाकिल्या ॥ तोंड घेतलें ते वेळां ॥ राज्य बुडालें म्हणोनी ॥१६०॥

स्नेहें धांवोनि कैकयी ॥ तीस धरती झाली हृदयीं ॥ विकल्प प्रवेशला ते समयीं ॥ चित्तगृहीं कैकयीच्या ॥६१॥

कैकयी तीस म्हणे ते समयीं बरी युक्ति योजलीस लवलाहीं तूं माझी प्राणसखी होसी पाहीं ॥ करूं कायी सांग आतां ॥६२॥

भरत तो नाहीं जवळी ॥ रामासी राज्य देती प्रातःकाळीं ॥ अयोध्यावासी लोक सकळी ॥ श्रीरामाकडे मुरडले ॥६३॥

वसिष्ठ आणि दशरथ ॥ यांसी प्राणाहून आवडे रघुनाथ ॥ ते तों माझा वचनार्थ ॥ न मानिती कदाही ॥६४॥

मंथरा म्हणे ऐक साचार ॥ पूर्वींचे मागें दोन वर ॥ तुवां रथ सांवरिला घालोनि कर ॥ शक्राचे युद्धसमयीं पै ॥६५॥

ऐसें गांठीस असतां शस्त्र ॥ तुज भय नाहीं अणुमात्र ॥ राज्यीं स्थापून तुझा पुत्र ॥ रामचंद्र वना धाडीं ॥६६॥

मनुसंख्या संवत्सर ॥ वनासी धाडीं रघुवीर ॥ चतुर्दश वर्षात तुझा पुत्र ॥ चवदा भुवनें जिंकील पैं ॥६७॥

वना निघतां रामचंद्र ॥ समागमें जाईल सौमित्र ॥ काननीं राक्षस परम दुर्धर ॥ रामलक्ष्मणां भक्षितील ॥६८॥

राक्षसें भक्षिल्या रघुनंदन ॥ भरतासी सहजचि कल्याण ॥ यालागीं वर दोनी घे मागून ॥ रायापाशीं आतांचि ॥६९॥

वनासी निघतां रघुनाथ ॥ प्राण त्यागील दशरथ ॥ तेहि गोष्टीचें तुजला हित ॥ राज्यीं भरत स्थापावया ॥१७०॥

रामाचे आवडते भक्त ॥ तेहि बाहेर घालूं समस्त ॥ आतां येईल दशरथ ॥ करीं अनर्थ येथेंचि ॥७१॥

ऐसीं ते दासीचीं वचनें ॥ हृदयीं धरिलीं कैकयीनें ॥ जैसें वमन होतांचि श्र्वानें ॥ उचलोनियां घेइंजे ॥७२॥

कीं शिंदीवृक्षापासून ॥ किंचित निघतां मद्यजीवन ॥ मद्यपी जैसा वोढवी वदन ॥ तैसेंचि वचन मानलें ॥७३॥

मर्कटासी मदिरारस पाजिला ॥ त्यांत वृश्र्चिकें दंश केला ॥ त्यामाजीं भूतसंचार झाला कैकयीस जाहलें तैसेंचि ॥७४॥

अलंकार काढिले झडकरीं ॥ तोडून टाकिली गळसरी ॥ केशमुक्त उर्वीवरी ॥ निद्रा करी सक्रोधें ॥७५॥

तंव ते भोगसमयाची वेळ ॥ कैकयीगृहा आला भूपाळ ॥ राजा मंथरेसि पुसे उतावेळ ॥ राीण आमुची कोठें पैं ॥७६॥

तंव ते बोले पापखाणी ॥ पैल ते पडली तुमची राणी ॥ काय आहे तिचे मनीं ॥ तें तो न कळेचि आम्हांतें ॥७७॥

मग कैकयीजवळी येऊन ॥ करें कुरवाळी राजा वदन ॥ दिधलें दशरथासी लोटून ॥ झिडकारून एकीकडे ॥७८॥

म्हणे परता होईं नृपा नष्टा ॥ असत्यवादिया क्रियाभ्रष्टा ॥ तुझे अंतरींचा भाव खोटा ॥ सर्वही म्यां ओळखिला ॥७९॥

ऐसे शब्द ऐकतां तीव्र ॥ धगधगिलें रायाचें अंतर ॥ चरण तिचे धरी सत्वर ॥ येरी लोटी परतेंचि ॥१८०॥

राजा म्हणे संभ्रम होत ॥ राज्यीं स्थापितों रघुनाथ ॥ तूं विघ्न न करीं येथ ॥ शरणागत तुझा मी ॥८१॥

वस्त्रें भूषणें अलंकार ॥ अपेक्षित देईन समग्र ॥ तुझ्या वचनालागीं निर्धार ॥ प्राण वेंचीन जाणपां ॥८२॥

मी असतां गळसरी ॥ तोडून टाकिली महीवरी । मागुता जावोनि चरण धरी ॥ लोटी निजकरीं कैकयी ॥८३॥

स्त्रीलोभाचिये आवडी ॥ प्राणी नाडिले लक्षकोडी ॥ जन्म मरणांचिया ओढी ॥ माजी पडिले बहुतचि ॥८४॥

स्त्रीलोभ परम दारुण ॥ पूर्वीं नाडले बहुतजण ॥ मूर्तिमंत भव्यव्याधि कामिन ॥ भुलवि सज्ञान जाणते ॥८५॥

संसारअनर्थास मूळ ॥ तो स्त्रीसंबंध जाण केवळ ॥ स्त्रीलोभें पापें सकळ ॥ आंगीं येऊन झगटती ॥८६॥

असो तो राजा दशरथ ॥ स्त्रीलोभें जाहला भ्रांत ॥ कैकयीस म्हणे माग इच्छित ॥ तें मी यथार्थ पुरवीन ॥८७॥

कैकयीस संकेत दावी मंथरा ॥ सांडूं नको पूर्वील निर्धारा ॥ मागून घेईं दोहीं वरां ॥ वना रघुवीरा पाठवीं ॥८८॥

कैकयी म्हणे नृपनायका ॥ माझ्या स्वर्गीच्या दोन्ही भाका ॥ न द्याल तरी उणें देखा ॥ येईल वंशा तूमच्या ॥८९॥

राजा म्हणे माग सत्वर ॥ तुज दीधले अपेक्षित वर ॥ मग म्हणे वना धाडीं रघुवीर ॥ राज्य भरतासी समर्पीं ॥१९०॥

जवळीं असतां रघुनायक ॥ त्याकडे होतील सकळ लोक ॥ यालागीं दूर वनासी देख ॥ आतांचि शीघ्र पाठवावें ॥९१॥

मनुसंख्यासंवत्सर ॥ राज्य करील माझा पुत्र ॥ मग तुम्ही आणावा रघुवीर ॥ अथवा तिकडेच ठेविजे ॥९२॥

ऐसें ऐकतांचि वचन ॥ गजबजलें रायाचें मन ॥ वाटे विद्यल्लता येऊन ॥ अंगावरी पडियेली ॥९३॥

कीं शरीर अग्नींत पडलें ॥ कीं काळिजीं कर्वत घातले ॥ कीं पर्वताचे कडे कोसळले ॥ आंगावरी अकस्मात ॥९४॥

कैकयीवचन प्रळयाग्न ॥ जाळीत चालिला आयुष्यकानन ॥ मग तिचे धांवोन धरी चरण ॥ पदर पसरून मागतसे ॥९५॥

जो जो मागसील पदार्थ ॥ तो तो पुरवीन समस्त ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९६॥

मी पृथ्वीपति राजा दशरथ ॥ परी तुझा असें शरणागत ॥ सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९७॥

पट्टराणिया समस्त ॥ तुझ्या सेवेसी लावीन यथार्थ ॥ परी सुकुमार माझा रघुनाथ ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९८॥

जो लावण्यामृतसागर ॥ उदार धीर गुणगंभीर ॥ कोमळगात्र रघुवीर ॥ वनाप्रति धाडूं नको ॥९९॥

काय रघुत्तमें अन्याय केला ॥ एवढा त्यावरी कोप धरिला ॥ डोळस तमालनील सांवळा ॥ वनाप्रति धाडूं नको ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP