आनंदलहरी - सद्‍गुरुचरण

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


सदगुरुचरणीं जयाचा भावो । तया बंधमुक्तता जाल्या वावो । त्यातें काळ विसरला पाहाहो । तया ठावो ब्रह्मपदीं ॥३७॥

भावार्थी जे निज गडे । तयां बद्धमुक्तता केवीं घडे । यमपुरी वोस पडे । ह्नणोनी रडे प्रेतनाथ ॥३८॥

जैं पतंग भक्षी वाडवानळासी । दर्दुरीं गिळिजे शेषासी । जैं खद्योतें गिळिजे रविबिंबासी । तैं गुरुभक्तांसी बद्धता ॥३९॥

जैं वायसें युद्ध कीजे खगपतींसी । पिपिलिका सप्तसागर शोषी । कीं मुर्कुटें गिळिजे ब्रह्मांडासी । तैं गुरुभक्तांसी बद्धता ॥४०॥

जैं चित्रीचिया हुताशनें । दग्ध होती महावनें । कीं रज्जूसर्पाचिया पानें । मृत्य पावे कृतांतू ॥४१॥

किं मक्षिकाचेनि थडकें । महागिरी पडों शके । किंवा प्रेताचेनि धाकें । झडपों शके महाकाळ ॥४२॥

किंवा वांझेचेनि सुतें । रणी जिंकीजे इंद्रातें । किंवा कांसवीचेनि घृतें । कुंभकर्णासीं तरळ होय ॥४३॥

हेंहि ईश्वर इच्छा घडे । परी गुरुभक्तांसी बद्धता न घडे जन्ममरणाचें फिटलें कोडें । तुटलें बिरडें मायेचें ॥४४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP