श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय ३३

श्रीनवनाथभक्तिसार ही पोथी अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव मिळतो.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी जगदुद्धारा ॥ कनकवर्णा नरहरि चतुरा ॥ ऐक्यत्वकारणें हरिहरां ॥ शक्य एक तुझेंचि ॥१॥

तरी आतां कृपा करुनी ॥ ग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नीं ॥ शुभ योगी श्राव्य भाषणीं ॥ स्वीकार करीं महाराजा ॥२॥

मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदन ॥ त्रिविकमदेहीं संचरुन ॥ गोरक्ष तीर्थस्नानाकारणें ॥ धाडिलसे मच्छिंद्रें ॥३॥

यापरी गोरक्षनाथ ॥ महीं भ्रमतां नानी तीर्थ ॥ तो गोदातटीं अकस्मात ॥ येऊनियां पोहोंचला ॥४॥

तों गोदातटीं भामानगर ॥ तया अरण्यांत गौरकुमर ॥ परम झाला क्षुधातुर ॥ जठरानलें करुनियां ॥५॥

ग्राम पाहतां तो अरण्यांत ॥ उदक एक योजन न मिळे तेथ ॥ तया स्थानी क्षुधाक्रांत ॥ अनल जैसा पेटला ॥६॥

मार्गी चालतां दिशा लक्षीत ॥ तों शेत देखिलें अकस्मात ॥ कृषिकर्म प्रांजळवंत ॥ पाहूनि सुमार धरियेला ॥७॥

तंव तो कृषीवल माणीकनामी ॥ वय दश वर्षे देहधर्मी ॥ मध्यान्हसमय साधूनी ॥ भोजनातें बैसला ॥८॥

पात्र घेतलें पुढें वाढून ॥ कवळ करावा जों मुखीं अर्पण ॥ तों अकस्मात गौरीनंदन ॥ आदेश शब्द गाजवी ॥९॥

तंव तो माणीक कृषि शेतीं ॥ ऐकूनि आदेश शब्दाप्रती ॥ योजिला कवळ ठेवूनि हातीं ॥ प्रेमें नमीत तयातें ॥१०॥

म्हणे महाराजा तुम्ही कोण ॥ किमर्थ घेतलें आडरान ॥ येरु म्हणे मी तपोधन ॥ क्षुधानळीं पेटलों ॥११॥

परम झालों तृषाकांत ॥ म्हणोनि होऊनि आलों अतिथ ॥ तरी सन्निध अन्न असेल तूतें ॥ भिक्षा आम्हां ओपावी ॥१२॥

ऐशी ऐकतां तयाची वाणी ॥ म्हणे महाराजा योगेंद्रमुनी ॥ निधान आहे मनोधर्मी ॥ पात्र वाढिलें भक्षावें ॥१३॥

मग तो उठोनि त्याचि वेळीं ॥ शीघ्र ओपी पत्रावळी ॥ आणि मृत्कुंभ भरोनि जवळी ॥ शीघ्र करी पुढारां ॥१४॥

मग तो गोरक्ष तपोधन ॥ हस्तपाद प्रक्षाळून ॥ अन्नपात्र पुढें घेऊन ॥ जठराहुती घेतसे ॥१५॥

पूर्ण झाल्या जठराहुती ॥ मग सहजचि तुष्ट झाला चित्तीं ॥ कीं रुखा होतां जलप्राप्ती ॥ लवणाकार पावतसे ॥१६॥

कीं दरिद्याप्रती देतां धन ॥ मग कां न पावे तुष्ट मन ॥ कीं यथेच्छ मेळविता झाल्याकारण ॥ तोष शरीरीं मिरवेना ॥१७॥

तन्नाय कृषिनरेंद्रात्तमा ॥ घडूनि आलें तुष्टमहिमा ॥ मग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमा ॥ वरदफळा दावी तो ॥१८॥

म्हणे कृषिका कवण काम ॥ मिरवला हो देहधर्मी ॥ येरु ऐकोनि म्हणे स्वामी ॥ आतां कासया पुसतां हो ॥१९॥

तरी महाराजा आटाआटी ॥ करावी प्रथम कार्यासाठी ॥ कार्य झालिया व्यर्थ चावटी ॥ अन्यासी कासया शिणवावें ॥२०॥

तरी आतां कार्य झालें ॥ पुढें योजीं शीघ्र पाउलें ॥ गोरक्ष म्हणे बोलशी बोल ॥ सत्य असती तुझे बा ॥२१॥

परी तुवां मातें दिधलें अन्न ॥ तेणें मम चित्त झालें प्रसन्न ॥ तरी तव देहीं किंचित पण ॥ सत्य असेल वद मातें ॥२२॥

जे जे कामना असेल तूतें ॥ ती पूर्ण पावशी फळसहितें ॥ येरी ऐकूनि कृषी त्यातें ॥ ऐसें उत्तर देतसे ॥२३॥

म्हणे महाराजा महीपाठीं ॥ तुम्हीच हिंडतां भिकेसाठी ॥ ते तुम्ही मोह धरुनि पोटीं ॥ मातें काय द्याल जी ॥२४॥

भणंगापाशीं भणंग गेला ॥ तो काय देऊनि तृप्त झाला ॥ खडका उदकपान्हा बोला ॥ कदाकाळी दिसेना ॥२५॥

तुम्ही तेवी हिंडतां अन्नासाठी ॥ आम्हां काय देणार जेठी ॥ नाथ म्हणे इच्छातुष्टा ॥ आतां तुझी करीन बा ॥२६॥

येरी म्हणे पुरें बोलणें ॥ काय आहे तुम्हांस्वाधीन ॥ तरी आणिक तुजकारण ॥ लागत असेल तें माग ॥२७॥

नाथ म्हणे रे एक दान ॥ तुवां दिधल्या झालों प्रसन्न ॥ तरी कांहीतरी मजपासून ॥ मागूनि घेई कृषिराया ॥२८॥

येरु म्हणे उगला ऐस ॥ तुवां काय द्यावें आम्हांस ॥ तरी कांहीं न मागूं सुरस ॥ पंथ आपुला क्रमीं कां ॥२९॥

ऐसे बोलतां माणीकनामी ॥ गोरक्ष विचारी आपुलें मनीं ॥ आडबंग असती कृषिधर्मी ॥ सदा विपिनीं बैसूनियां ॥३०॥

तरी हा मातें म्हणतो माग ॥ परी त्याच्याचि हितार्थ करावा लाग ॥ ऐसें विचारोनि मनोवेगें ॥ तयालागीं बोलतसे ॥३१॥

म्हणे कृषिराया ऐक वचन ॥ तूं आम्हांसी म्हणशील देऊं देणें ॥ तरी मागें सरस वचन ॥ निश्चयें करुनियां बोलावें ॥३२॥

येरु म्हणे तापसा ऐक ॥ मातें दिससी महामूर्ख ॥ जो देणार आपुले आत्मसुख ॥ तो मागें सरणार नाहीं कीं ॥३३॥

अरे चंद्र असे शीतळपणीं ॥ तरी तो वर्षेल दाहकपणीं ॥ परी तो ढळणार नाहीं प्राणी ॥ मागें पाऊल कासया ॥३४॥

सविताराज तेजोदीप्ती ॥ तोही अंधकारीं करील वस्ती ॥ परी उदार तो औदार्याप्रती ॥ मागें पाऊल सारीना ॥३५॥

मही गेलिया रसातळीं ॥ परी औदार्यप्राप्ती महाबळी ॥ त्या कृपणत्व कदाकाळी ॥ अंगालागीं स्पर्शेना ॥३६॥

तरी कोणतें मागणें तूतें ॥ मागूनि घेईजे त्वरितें ॥ मी बोललों निश्चयातें ॥ निश्चय माझा पाहीं कां ॥३७॥

ऐशी बोलतां विपुल वार्ता ॥ गोरक्ष म्हणे आपुल्या चित्ता ॥ तरी मनाचे करणें मागूं आतां ॥ कैसा सांभाळील पाहू तो ॥३८॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ म्हणे मज दावीं कां विपिनपती ॥ जें जें आवडेल तुजे चित्तीं ॥ तें तूं न करीं महाराजा ॥३९॥

कांही एक इच्छील तुझें मन ॥ तें तूं न करणें हेंचि मागणें ॥ इतुकें देऊनि तुष्टपण ॥ बोळवीं कां कृषिराजा ॥४०॥

ऐशीं वदतां तयाची वाणी ॥ अवश्य म्हणे कांषकर्मी ॥ हा धर्म आतां आपुले धर्मी ॥ अर्कअवधीं रक्षीन गा ॥४१॥

ऐशी तैशी देऊनि भाक ॥ तुष्ट केलें शरीरास ॥ असो गोरक्ष त्या विपिनास ॥ सांडूनियां चालिला ॥४२॥

माणिकनामी कृषी शेतांत ॥ मुक्त करिता झाला औत ॥ येठणें बांधूनि समस्त ॥ भार सकळ वाहातसे ॥४३॥

वृषभा मागें दिधलें लावून ॥ मौळीं घेत येठण उचलून ॥ मनांत म्हणे ग्रामासी जाऊन ॥ क्षुधाबल घालवावें ॥४४॥

इतुकी मनीं योजना होतां ॥ स्मरण झालें गोरक्षनाथा ॥ पुत्र कल्याण आणितां चित्ता ॥ मनाचें करणें उल्लंधावें ॥४५॥

मन इच्छीत असे घरीं जावया ॥ तरी आपण न जावें तया ठाया ॥ मग तेथेंचि उभा राहूनियां ॥ गाढ निद्रा करीतसे ॥४६॥

मौळीं येठणाचा भार ॥ घेऊनि उभा महीवर ॥ नेत्र झांकूनि चिंतापर ॥ हरिनामीं योजितसे ॥४७॥

मन इच्छी हालवूं अंग परी न हाले धडभाग ॥ स्थिर होऊनि संचरले ओघ ॥ वचनार्थ संपादी ॥४८॥

तरुपर्ण जे येती उडोन ॥ तेचि करीतसे भक्षण ॥ मनीं येतां सांठवण ॥ तेही त्याग पर्णीचे करीतसे ॥४९॥

मग सहजस्थितीं वायुलहर ॥ अकस्मात येतसे मुखावर ॥ तितकेचि प्राशन आहारपर ॥ अमल मन होतसे ॥५०॥

तेणें कृश झालें शरीर ॥ सकळ आटूनि गेलें रुधिर ॥ मांस म्हणाया तिळभर ॥ स्वप्नामाजी दिसेना ॥५१॥

त्वचा अस्थि झाल्या एक ॥ उभा राहिला कष्टदायक ॥ येरीकडे तपोबाळक ॥ बद्रिकाश्रमीं पातला ॥५२॥

बद्रिकेदारा नमूनि त्वरित ॥ पाहूं चालिला चौरंगानाथ ॥ तंव गुहागृहीं शरीरावरतीं ॥ वाळवीवारुळ विराजले ॥५३॥

मुखीं तितुकी नामावळी ॥ आणि नेत्रचंद्रीं असे शिळाभारीं ॥ असे स्थिर तया स्थळीं ॥ गोरक्षनाथ प्रगटला ॥५४॥

त्वरित द्वाराची शिळा काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारणें ॥ तों वारुळ गेलें वेष्टून ॥ सर्व अंगीं तयाच्या ॥५५॥

शिळाचंद्री न हाले पाती ॥ रामशब्दें वलगे उक्ती ॥ तें पाहूनियां गोरक्ष जती ॥ परम चित्तीं हळहळला ॥५६॥

मग शरीराचे वारुळ काढून ॥ पाहे तयाचे शरीराकारण ॥ तों हस्तपाद लवेंकरुन ॥ तपोबळें आले ते ॥५७॥

मग सावध करुनि तयातें ॥ म्हणे पाहें मी आलों गोरक्षनाथ ॥ शीघ्र कवळूनि तयाचा हस्त ॥ बाह्यात्कारीं आणिले ॥५८॥

मग कृपें करितां अवलोकन ॥ शरीरशक्ति आली दारुण ॥ मग उठूनि वंदी गोरक्षचरण ॥ म्हणे सनाथ झालों असें मी ॥५९॥

यापरी तयासी आलिंगुनी नाथ ॥ म्हणे बा कैसा झाला चरितार्थ ॥ येरी म्हणे मज माहीत ॥ नाही चामुंडे विचारी ॥६०॥

मग विचारुनि चामुंडेसी ॥ वृत्तांत पुसे चरितार्थासी ॥ येरु म्हणे आम्ही फळांसी ॥ देत होतों महाराजा ॥६१॥

परी चौरंगी न करुनि भक्षण ॥ बैसला होता शिळा लक्षून ॥ मग फळेंचि पर्वताप्रमाणें ॥ गोरक्षातें दाविलीं ॥६२॥

फळनगा पाहोनि तपोजठी ॥ विस्मय करी आपुल्या पोटीं ॥ म्हणें धन्य याची तपोराहाटी ॥ ब्रह्मादिकां अतर्क्य ॥६३॥

परम चित्तीं कृपा वेष्टुनी ॥ मौळीं ठेविला वरदपाणी ॥ अनुग्रहचोज पुन्हां दाउनी ॥ ब्रह्मसनातन केला असे ॥६४॥

पुढें चौरंगीसी घेऊन ॥ बद्रिकेदारालया आणून ॥ जागृत करुनि उमारमण चौरंगीतें भेटविला ॥६५॥

मग तेथें राहूनि षण्मास ॥ सकळ करविला विद्याभ्यास ॥ अस्त्र शस्त्र बहुवस ॥ प्रवीण झाला महाराजा ॥६६॥

मग सकळ देवांतें पाचारुन ॥ तपोवळें केलें सधन ॥ मग सकळ दैवतें तुष्ट करुन ॥ वरदप्रज्ञा आराधिलें ॥६७॥

सकळ देव वर देऊन ॥ पहाते झाले आपुले स्थान ॥ येरीकडें बद्रिकेदार नमून ॥ चौरंगीसह निघाला ॥६८॥

त्वरें येऊनि वैदर्भ देशांत ॥ चौरगींतें कौंडिण्यपुर दावीत ॥ म्हणे बा रे तव माता तात ॥ भेट घेई तयांची ॥६९॥

भेटशी तरी कैसा त्यातें ॥ जगीं जाऊनि अति ख्यात ॥ हस्तपदांचे मुंडणखंडणनिमित्त ॥ उत्तरा सड घेईजे ॥७०॥

राये छेदिलें तव हस्तपदासी ॥ परी धुसधुसी आहे मम मानसीं ॥ तरी आपुला प्रतापसंगम रायासी ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥७१॥

अवश्य म्हणे चौरंगीनाथ ॥ भस्मचिमुटी कवळुनि हस्त ॥ रायाचें लक्षूनि बागाईत ॥ वातास्त्रासी सोडीतसे ॥७२॥

तंव तेथींचे वनकर ॥ सहा शत एक सहस्त्र ॥ वातचक्रें उडवूनि अंबर ॥ दाविता झाला तयांसी ॥७३॥

पुन्हां वातअस्त्र घेत काढून ॥ तंव ते उतरती महीकारण ॥ किती पडले मूर्च्छना वेष्टून ॥ कितीएक ग्रामीं पळाले ॥७४॥

तें येऊनि राजांगणी ॥ सांगते झाले विपरीत करणी ॥ कोणी केली न दिसे नयनीं ॥ आश्चर्य बहु होतसे ॥७५॥

मग भृत्यांतें पाचारुन ॥ पुसूनि त्यातें वर्तमान ॥ कोणी केलें आला कोण ॥ शोधालागी धाडीतसे ॥७६॥

तों येरीकडे चौरंगीसहित ॥ पाणवठी बैसला गोरक्षनाथ ॥ हेर पाहूनि त्वरित ॥ रायापाशीं पातले ॥७७॥

म्हणती महाराजा पाणवध्यासी ॥ बैसले आहेत दोन तापसी ॥ तीव्रतेजी कानफाटवेषी ॥ विद्यार्णव दिसताती ॥७८॥

ऐसें ऐकूनि राजेश्वर ॥ स्वननीं आपुला करी विचार ॥ आले असती गोरक्ष मच्छिंद्र ॥ पुत्रदुःखें द्वेषानें ॥७९॥

तरी आतां त्वरेकरुन ॥ तयांसी जावें शरण ॥ नातरी ग्रामासी पालथें करुन ॥ प्राणांप्रती हरतील ॥८०॥

ऐसा विचार करुनि मानसीं ॥ राव सामोरा ये समारंभेंसी ॥ गज वाजी शिबिका रथांसी ॥ कटकासह येतसे ॥८१॥

ग्रामाबाहेर कटक येतां ॥ गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा ॥ आपुला प्रताप आतां ॥ निजदृष्टीं दावीं कां ॥८२॥

ऐशीं ऐकतां गोरक्षगोष्टी ॥ पुन्हां कवळी भस्मचिमुटी ॥ वातास्त्र जल्पूनि पोटी ॥ चमूवरी प्रेरीतसे ॥८३॥

मग तें वातास्त्र अति तीक्ष्ण ॥ चमूसह राया दाविलें गगन ॥ रथ गज वाजा शिबिकासन ॥ वातास्त्रें पाडिली ॥८४॥

तेणेंकरुनि चभू समस्त ॥ गगनपंथें आरंबळत ॥ म्हणती हे महाराजा नाथ ॥ शरणागता तारावें ॥८५॥

सकळ स्तविती दीनवाणीं ॥ ते शब्द ऐकोनि तपोज्ञानी ॥ चौरंगीसी म्हणे घे उतरोनी ॥ चमूसहित रायातें ॥८६॥

मग तो कुशल प्रज्ञावंत ॥ पर्वतास्त्र असे आड करीत ॥ मग सकळ आटूनि गेला वात ॥ चमू मिरवली नगमौळी ॥८७॥

मग उभा करोनि आपुला कर ॥ म्हणे उतरुनि यावें चमू समग्र ॥ मग रायासह कटकभार ॥ उतरले तळवटी ॥८८॥

मग समीप येतां शशांगर ॥ चौरंगीसी बोलिला गौरकुमर ॥ पितयासी करुनि नमस्कार ॥ तुष्ट चित्तीं मिरवीं कां ॥८९॥

ऐसें ऐकतां गुरुनंदन ॥ धावूनि धरिले तातचरण ॥ म्हणे महाराजा मी तव नंदन ॥ निजदृष्टीं देखें मज ॥९०॥

ऐसे बोलतां चौरंगनाथ ॥ रावें धांवूनि धरिले हदयांत ॥ मग परम प्रीतीं गोरक्षातें ॥ चरणीं भाळ अर्पीतसे ॥९१॥

मग गोरक्षही धरुनि हदयीं ॥ म्हणे राया याचा प्रताप पाहीं ॥ येरी म्हणे तुजसमान आई ॥ भेटल्या न्यून कायसें ॥९२॥

याउपरी तैसें चौरंगीनाथ ॥ वज्रास्त्र निर्माण करीत ॥ चूर्ण करुनि महापर्वत ॥ अदृश्यपंथीं मिरवतसे ॥९३॥

याउपरी शशांगर ॥ गोरक्षासी म्हणे चतुर ॥ आरोहण करुनि शिबिकेवर ॥ राजसदनीं चला जी ॥९४॥

याउपरी बोले चौरंगीनाथ ॥ आम्ही न येऊं तव गृहांत ॥ सापत्न मातुःश्रीचे कुडें मनांत ॥ हस्तपाद छेदिले ॥९५॥

मग मूळापासोनि सकळ वृत्तांत ॥ रायालागीं केला श्रुत ॥ राव कोपोदधींत ॥ उचंबळला आगळा ॥९६॥

सेवकालागीं आज्ञा करीत ॥ ताडीत आणा राणी येथ ॥ तें ऐकूनि चौरंगीनाथ ॥ काय परी वदतसे ॥९७॥

म्हणे ताता आपुलें वचन ॥ हेचि शिक्षा आली घडून ॥ यापरी ताता आपुले कीर्तीनें ॥ ब्रह्मांड भरेल महाराजा ॥९८॥

तरी ऐसें न करीं ताता ॥ सदनींच शिक्षा करावी प्रीता ॥ मग शिबिकासनी बैसवूनि तत्त्वतां ॥ राजसदना पातले ॥९९॥

राव जातां मंदिरांत ॥ पादत्राण घेऊनि हातांत ॥ ताडन करुनि पत्नीतें ॥ म्हणे जाई येथूनी ॥१००॥

द्वादश संवत्सरपर्यंत ॥ त्वां तप केलें शुचिष्मंत ॥ तयाचें फळ कुडें मत ॥ भ्रष्ट केलें राज्यासी ॥१॥

तें पाहूनि गोरक्षनाथें ॥ राया संबोधूनि केला शांत ॥ एक मास राहिला तेथ ॥ शशांगरभक्तीनें ॥२॥

यापरी गोरक्ष जातेसमयीं ॥ वंश वेष्टी मोहप्रवाहीं ॥ प्रसाद देऊनि राजदेही ॥ वीर्यवान पैं केला ॥३॥

म्हणे कामिनी करुनि दुसरी ॥ भोगीं वंशलतेची लहरी ॥ ऐसें सांगूनि शशांगरीं ॥ चौरंगीसह चालिला ॥४॥

मार्गी चालतां मुक्काम ॥ पाहते झाले प्रयागस्थान ॥ स्नान करुनि उत्तोमात्तम ॥ शिवालयीं पातलें ॥५॥

येतांचि करुनि शिवदर्शन ॥ मग शिवदारे बोलूनि वचन ॥ गुरुकलेवराचें वर्तमान ॥ तियेलागी पुसतसे ॥६॥

तंव ती होऊनि भयभीत ॥ बोलती झाली चाचरे घेत ॥ शरीरेंकरुनि थरथरां कोपित ॥ पायावरी लोटली ॥७॥

म्हणे महाराजा गुरुनाथा ॥ राजाभाजा रेवतीकांता ॥ तिनें मातें भ्रष्टवूनि चित्ता ॥ पुसूनि घेतलें होतें कीं ॥८॥

याउपरी दुसर्‍यालागुनी ॥ वदलें नाहीं कलेवर कहाणी ॥ परी नेणों भय वाटे मनीं ॥ कलेवर पहा निजदृष्टी ॥९॥

स्त्रीजाती बोलती एक ॥ परी करणी करिती आणिक ॥ मज वाटतसे ती चाळक ॥ समक्ष दृष्टीं पहावें ॥११०॥

ऐसी ऐकूनि तियेची वाणी ॥ परम घाबरला गोरक्षमुनी ॥ मग एकांत गुहासदनीं ॥ विदारुनि पाहतसे ॥११॥

तंव तें मोकळे गुहागार ॥ आंत नाहीं कलेवर ॥ मग नेत्रीं दाटूनि मोहाचा पूर ॥ शोकसिंधु उचंबळे ॥१२॥

तंव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता ॥ सोडूनि दिधली माजी ममता ॥ आतां येथें गुरुनाथा ॥ कवणे ठायीं पाहूं मी ॥१३॥

ऐसें म्हणूनि आरंबळत ॥ धरणीप्रती शरीर टाकीत ॥ तंव ती शैवदारा मोहस्थित ॥ होऊनि त्यातें बोलतसे ॥१४॥

म्हणे महाराजा धैर्य धरीं ॥ मीं राजांगने जाऊनि सत्वरीं ॥ पुसूनि येतें मच्छिंद्रशरीरीं ॥ वृत्तांत कैसा झाला तो ॥१५॥

ऐसें बोलूनि गोरक्षातें ॥ शैवदारा अंतःपुरांत ॥ शीघ्र जाऊनि रेवतीतें ॥ राजनेमानें नमियलें ॥१६॥

तंव ती पाहूनि शैवकामिनी ॥ म्हणे कां आलीस वो माय बहिणी ॥ येरी म्हणे अंतःकरणीं ॥ आठव मातें झालासे ॥१७॥

म्हणाला तरी आठव कोण ॥ तरी द्वादश वर्षे आलीं भरुन ॥ तुम्हांलागीं सांगितली खूण ॥ राजभागीं विचारा ॥१८॥

ऐसी ऐकतां तियेची वाणी ॥ एकांता ने ते राजपत्नीं ॥ म्हणे माय वो अंतःकरणीं ॥ चिंता सोडीं सकळ ती ॥१९॥

अगे तुजविरहित त्याचि दिवशीं ॥ कलेवर काढूनि शस्त्रउद्देशी ॥ वांटले गे रतिरती मांसीं ॥ सकळ विपिनामाझारी ॥१२०॥

त्यासही लोटले बहुत दिवस ॥ अस्थिमांसाचा झाला नाश ॥ जीवजंतू खाऊनि त्यास ॥ विष्ठा मृत्तिका झाली असे ॥२१॥

तरी या कार्याचा सकळ तरु ॥ समूळीं उपटिला बीजांकुरु ॥ आतां चिंतेचें फळ अपारु ॥ कोठूनि दृष्टी पडेल ॥२२॥

ऐसें बोलता राजांगना ॥ परम चितें व्यापिली मना ॥ म्हणें नेणों पुढिल्या कर्मा ॥ कैसें घडोनि येईल ॥२३॥

परी आतां असो कैसें श्रुत करावें गोरक्षास ॥ जें जें असेल प्रारब्धास ॥ भोग भोगणें लागेल ॥२४॥

ऐसा विचार करुनि चित्तीं ॥ पुनश्व आली शिवालयाप्रती ॥ जे वदली रेवती युक्ती ॥ प्रांजळ तैसें सांगितले ॥२५॥

सांगतां ऐकिलें नाथें ॥ परम पेटला क्रोधानळातें ॥ म्हणे शिक्षा करावी राजभाजेतें ॥ दुःखार्णवीं बुडवूनियां नाथें लागतसे ॥२७॥

जरी अवज्ञा करुन ॥ जंतूंचे झालें भक्षण ॥ तरी आतां शोधार्थ मन ॥ मच्छिंद्रशरीरीं ठेवावें ॥२८॥

न द्यावें तिसी शिक्षेकारणें ॥ तें नाश न पावे निश्चय पूर्ण ॥ कोणे तरी ठाया लागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥२९॥

मग बोलावूनि चौरंगीतें ॥ म्हणे बा रक्षीं शरीरातें ॥ मी देहासी सांडूनि त्रिभुवनातें ॥ कलेवर शोधार्थ जातों कीं ॥१३०॥

परी रेवती येथील राजकांता ॥ प्रवर्तली आहे मच्छिंद्रघाता ॥ तैशीच वहिवटेल माझिया अर्था ॥ म्हणूनि सावध असावें ॥३१॥

ऐसें सांगूनि चौरंगीतें ॥ प्रवेश करी गुहागृहातें ॥ प्राण सान शरीरातें ॥ भ्रमण करी दक्ष दिशा ॥३२॥

सकल शोधला जंबुद्वीप ॥ सरितार्णवीं सकल आप ॥ ग्राम कानन सप्तद्वीप ॥ रतीरती शोधिलें ॥३३॥

परी जीवजंतूची देहस्थिती होऊन ॥ शोधितां गुरुचें कलेवर पूर्ण ॥ कोणेतरी ठायालागून ॥ मच्छिंद्रदेह असेल ॥३४॥

अतळ वितळ सुतळ पाताळ ॥ सप्तही पाताळस्थळ ॥ पिंडब्रह्मांड शोधूनि सकळ ॥ स्वर्गावरी चालिले ॥३५॥

सुवर्लोक भुवर्लोक तपोलोक ॥ अर्यमा यक्षादि सत्यलोक ॥ कुबेर तारागणादि अनेक ॥ शोधूनियां पाहिले ॥३६॥

एक मेरु स्वर्गपाठार ॥ गणगंधर्वादि अन्य सुरवर ॥ सकल शरीरा करुनि संचार ॥ गुरुशरीरे शोधिलें ॥३७॥

उपरी पाहूनि वैकुंठ समस्त ॥ त्वरें पातला कैलासाप्रत ॥ तों होतांचि प्रवेश शिवगणांत ॥ धुंडाळूनि पाहतसे ॥३८॥

तों शिवगणीं चामुंडासमुदायांत ॥ अस्थि त्वचा मांस देखे समस्त ॥ यापरी वीरभद्र सर्व गणांत ॥ गर्जोनियां सांगतसे ॥३९॥

म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेम ॥ मच्छिंद्रशवातें करा रक्षण ॥ तयाचा शिष्य गौरनंदन ॥ कोणे रुपें येईल कीं ॥१४०॥

ऐसी ऐकूनि तयाची वार्ता ॥ गोरक्ष तेथूनि झाला निघता ॥ तों येरीकडे चौरंगीनाथा ॥ काय सुचलें होतें कीं ॥४१॥

गोरक्षशवाजवळ बैसून ॥ आणीक सकळ अस्त्र व्यापून ॥ जेथें लाग न लागे देवांकारण ॥ ब्रह्मादिकांकरुनियां ॥४२॥

ऐसें अस्त्र व्याप्त ॥ तैशांतूनि निघूनि गौरसुत ॥ गुप्तवेषें शरीरांत ॥ येऊनियां प्रवेशला ॥४३॥

प्रवेशतांचि अकस्मात ॥ उठूनि बैसला गौरसुत ॥ मार्ग सोडूनि गुहागृहांत ॥ बाहेर आले उभयतां ॥४४॥

मग सिद्ध करुनि भस्मझोळी ॥ उभे राहिले दोन्ही बळी ॥ पर्वतास्त्र तेणें काळीं ॥ अर्कावरी सोडिलें ॥४५॥

गोरक्षमुखींचें पर्वतास्त्र ॥ प्रविष्ट होतां अति स्वतंत्र ॥ माथां उचलितां अंबरपात्र ॥ भरोनियां निघाले ॥४६॥

सवालक्ष योजनमिती ॥ स्वर्गी उंच झाले गभस्ती ॥ त्याहूनि माथा द्विगुण पर्वती ॥ अंबरातें मिरवला ॥४७॥

मित्रमार्गीचा धरुनि रोक ॥ आकाशस्तंभ झाला एक ॥ तेणेंकरुनि स्यंदनीं अर्क ॥ मार्गावरी अडखळला ॥४८॥

चक्रपदा चालावया वाट ॥ न मिळे पाहूनि सुभट ॥ मग सज्ज करुनि गांडीवचिमुटी ॥ योजिता झाला महाराजा ॥४९॥

तीव्रशरीरीं वज्रास्त्र ॥ योजूनि सोडी प्रविष्ट मित्र ॥ तेणेंकरुनि पर्वतास्त्र ॥ भंगिता झाला ते क्षणीं ॥१५०॥

परी पर्वतास्त्र भंगित होतां ॥ आदित्य विचारी आपुले चित्ता ॥ हें अस्त्र कोणाची प्रतापदुहिता ॥ आडमार्गी झालें असे ॥५१॥

ऐसें पाहतां अर्क अंतरी ॥ तो समजला नर गोरक्षकेसरी ॥ मग स्यंदनासह महीवरी ॥ येऊनियां प्रगटला ॥५२॥

येतां देखती अर्कराज ॥ काय करिती हो विजयध्वज ॥ चंद्रास्त्राचें पेरुनि बीज ॥ कोटी चंद्र निर्मिले ॥५३॥

तेणेंकरुनि शीतळ प्रवाहीं ॥ मिरवती झाली मही ॥ मग तो सकळ दाह स्वभावीं ॥ बाधूं न शके अर्काचा ॥५४॥

ऐसी समाधानस्थिती होतां ॥ परी समीप पावला प्रविष्ट सविता ॥ मग चौरंगी आणि गोरक्षनाथ ॥ अर्कचरणी लागती ॥५५॥

यापरी भाविकस्थिति सांगून ॥ बोलता झाला जगलोचन ॥ बा रे तुज सुखसंबंध कोण ॥ दर्शवीं कां वाचेशीं ॥५६॥

येरु म्हणती महाराजा ॥ आम्ही उदेलों एक काजा ॥ मच्छिंद्रदेह तेजःपुंजा ॥ शिवगणें हरियेला ॥५७॥

तरी आपण जाऊनि तेथें ॥ सुनीति सांगावी वीरभद्रातें ॥ की मच्छिंद्रदेह महीते ॥ पाठवूनि द्यावा कीं ॥५८॥

परी या कार्या बहुधा नीती ॥ सांगूनि जरी ना ऐकती ॥ मग मागूनि बोलावूनि घेऊं या क्षितीं ॥ युद्धालागीं मिसळाया ॥५९॥

ऐसें पर्वी महापर्वी ॥ आमुची जाऊनि करावी शिष्टाई ॥ इतुका उपकार मच्छिंद्रदेहीं ॥ आम्हांसी साह्य मिरवावें ॥१६०॥

ऐसें बोलतां गोरक्षनाथ ॥ आदित्य अवश्य त्यांतें म्हणत ॥ मग त्या क्षणीं कैलासा जात ॥ त्वरित जाऊनि पोंचला ॥६१॥

गणें पाहूनि अर्क येतां सहज ॥ पापांलागीं विजयध्वज ॥ म्हणती येणें महाराज ॥ कवण्या अर्था झाले असें ॥६२॥

आदित्य म्हणे ऐका वचन ॥ गोरक्षशिष्टाईसाधन ॥ करुं पातलों तुम्हांकारण ॥ मच्छिंद्रदेहाकारणें ॥६३॥

तरी मम बोलणें आतां ॥ चित्त द्यावें परम हिता ॥ महीसी पाठवा मच्छिंद्रदेह आतां ॥ तुष्ट करीं गोरक्षा ॥६४॥

तुम्हीं तुष्ट केलिया त्यास ॥ नाथपंथें वाढेल प्रीत ॥ ऐसें उत्तर बोलतां आदित्य ॥ वीरभद्र बोलतसे ॥६५॥

हे महाराजा ऐक वचन ॥ आम्हांसीं दुःख दिधलें मच्छिंद्रानें ॥ तरी आतां गेलिया प्राण ॥ मही न दाऊं शबातें ॥६६॥

जरी गोरक्ष झुंजेल आम्हांतें ॥ तरी सिद्ध होऊं युद्धातें ॥ गोरक्ष जिंकूनि समरंगणातें ॥ मच्छिंद्रासम करुनि ठेवूं ॥६७॥

उपरी बोले नारायण ॥ मच्छिंद्रें दुःख दिलें तुम्हांकारण ॥ तेव्हां तुमचा प्रताप पळून ॥ कवण ठाय गेलासे ॥६८॥

आतां अवचट घडलें ऐसें ॥ म्हणूनि प्रौढ झाला मानसें ॥ परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष ॥ प्रतापबळी असे कीं ॥६९॥

तेव्हां मच्छिंद्र होता एक ॥ आतां दोघे असती प्रतापअर्क ॥ ते कोपल्या सकळ धाक ॥ कृतांतासम योजिती ॥१७०॥

येरु म्हणती असो कैसे ॥ परी कदा न देऊं मच्छिंद्रास ॥ यापरी बोलतां राजस ॥ आवडेल तैसें करावें ॥७१॥

परी एक आणिक वचन ॥ तुम्ही उतरा महींकारण ॥ स्वर्गी करितां कंदन ॥ शिवलोकांत पावेल तें ॥७२॥

म्हणती कीं यासी काय कारण ॥ तरी ते प्रतापी असती तीक्ष्ण ॥ कैलासगिरि पिष्ट होऊन ॥ खंड करितील क्षणाधें ॥७३॥

परी ते पाहूनी येथील वस्ती ॥ विनाश होईल स्वर्गाप्रती ॥ मग त्या कोपे पशुपती ॥ शासन करील तुम्हांतें ॥७४॥

भवभवानी अति प्रीती ॥ करिती गोरक्षमच्छिंद्रांप्रती ॥ पहा शरीरज सवें चामुंडांहातीं ॥ कैलासातें पाठविले ॥७५॥

तरी आतां शिवा न कळतां ॥ मानेल तैसे करावें चित्ता ॥ ऐशी गोष्ट आदित्य बोलतां ॥ सर्वां परी मानलें ॥७६॥

मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसी ॥ तुम्ही युद्धा जावें सर्व महीसी ॥ दुःख लागतां कांहीं रणासी ॥ मीही येतों मागून ॥७७॥

मग अष्टभैरवगण ॥ अवश्य म्हणूनि करिती गमन ॥ विमानें प्रत्यक्ष घेऊन ॥ शस्त्रअस्त्रादिकीं उतरले ॥७८॥

बहात्तर कोटी चौर्‍यायशीं लक्ष ॥ येतांचि देखे नाथ गोरक्ष ॥ मग चौरंगीतें बोले प्रत्यक्ष ॥ सावध होई मम वत्सा ॥७९॥

असो शिवगण येतांचि महीं ॥ लोटते झाले शस्त्रप्रवाहीं ॥ तें गोरक्ष पाहूनि त्या समयीं ॥ वर्जास्त्र निर्मियेलें ॥१८०॥

वज्रास्त्र पातलें लव न लागतां ॥ सहस्त्र वेळां भवतें फिरतां ॥ तेणें शिवगणांचे शर समस्त ॥ अंगी लिप्त न होती ॥८१॥

तें पाहूनियां सकळ शिवगण ॥ योजिती अपार अस्त्रांकारण ॥ तितुक्याहीं अस्त्रां उभय जन ॥ लक्ष्य धरुनि उडविती ॥८२॥

अग्निअस्त्र धूमास्त्र ॥ तयावरी प्रेरिती वातास्त्र ॥ वातास्त्रावरी उरगास्त्र ॥ प्रेरिते झाले शिवगण ॥८३॥

काळास्त्र आणि वज्रास्त्र ॥ महाकठिण स्पर्शास्त्र ॥ तयामाजी दानवास्त्र ॥ प्रळय करीत आगळा ॥८४॥

तें पाहूनि गोरक्षनाथ ॥ प्रेरिता झाला जलदास्त्र ॥ तयामागें पर्वतास्त्र ॥ लागोपाठ करीतसे ॥८५॥

तयामागे खगेंद्रास्त्र ॥ तयामागें संजीवनी अस्त्र ॥ मग प्रेरी इंद्रास्त्र ॥ ते जाऊनिया झगटे ॥८६॥

विभक्तास्त्र देवास्त्र कठिण ॥ तींही झगटती त्वरेंकरुन ॥ ऐसें अस्त्र परिपूर्ण ॥ गण अस्त्र तें भंगिती ॥८७॥

त्यात काय करी चौरंगीनाथ ॥ हळूचि मोहनास्त्र प्रेरीत ॥ तें संचरुनि गणहदयांत ॥ मग पिसाटपणें मिरवत ॥८८॥

सर्वासी नाहीं देहभान ॥ तेणें न कळे आलों कोणकार्यालागून ॥ पिशाचवृत्तीं भ्रमत रानोरान ॥ व्यर्थ फिरते जाहले ॥८९॥

त्यांत आणिक चौरंगीनाथ ॥ प्रेरी प्रळयकाळींचा वात ॥ तेणें गण समस्त ॥ वायुचक्रीं पडियेले ॥९०॥

तों वीरभद्र मागूनि चामुंडेसहित ॥ युद्धालागीं आला त्वरित ॥ परी शिवगण पाहूनि अव्यवस्थित ॥ परम चित्ती क्षोभला ॥९१॥

मग गांडीवातें टणत्कारोनी ॥ बाण योजिले अपार गुणी ॥ कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तीन्ही ॥ विविध बाणीं पाडीतसे ॥९२॥

जैसा प्रळयकाळींचा वडवानळ ॥ तो यत्नें न पावे कदा शीतळ ॥ तन्न्यायें शिवबाळ ॥ कोपानळी वेष्टिला ॥९३॥

तें पाहूनि चौरंगीनाथ ॥ रतिअस्त्र प्रेरीत त्वरीत ॥ तेणें कामास्त्र त्वरें निश्चित ॥ मूर्च्छित होऊनि पडियेले ॥९४॥

यावरी दुसरें चौरंगीनाथ ॥ दशासुरी अस्त्र प्रेरीत ॥ तें पाहुनियां नाभीसुत ॥ झडझडोनि पळतसे ॥९५॥

चित्तीं म्हणे नोहे बरवें ॥ वेद हरतील आतां सर्व ॥ शंखासुर प्रतापार्णव ॥ पुनः उदय झाला असे ॥९६॥

ऐसा विचार करुनि मनीं ॥ ब्रह्मास्त्र दडविलें अदृश्यपणीं ॥ पुढें कामिनीअस्त्र चौरंगीमुनी ॥ ग्रेरिता झाला लवलाहे ॥९७॥

तें पाहूनि कार्तिकास्त्र ॥ पळूनि लपवी मुखपात्र ॥ परी चौरंगीचे पांचजन्यास्त्र ॥ प्रळयालागीं मिरवले ॥९८॥

तें पाहूनियां भद्रजाती ॥ मत्स्यास्त्र योजिलें परन निगुती ॥ तेणे करुनि तदस्त्र शांती ॥ अदृश्य तें मिरवलें ॥९९॥

परी परम कोपोनि तपोबळ ॥ तीव्रास्त्र योजिलें तत्काळ ॥ संजीवनी योजूनि सबळ ॥ सकळ दानवां उठलें ॥२००॥

ते दानव म्हणाल कोण कोण ॥ त्रिपुरसुंदराक्ष मलमृदु मान्य ॥ म्हैसासुर जालंधर प्राज्ञ ॥ काळयवन अघ बक ॥१॥

हिरण्याक्ष हिरण्यकश्यपसहित ॥ मुचकुंद बळी वक्रदंत ॥ रावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांत ॥ सिंहनाद भरिताती ॥२॥

ऐसे सबळ राक्षस उठतां ॥ विमानयानीं सुरवर असतां ॥ अति भय मानूनि चित्ता ॥ विमानांतें पळविती ॥३॥

कैंचे युद्ध कैचें पाहणें ॥ पळती सुर भयभीत होऊन ॥ तेहतीस कोटी देवतांकारण ॥ चिंता अपार व्यापिली ॥४॥

म्हणे रावणें बंदीं घातलें ॥ दैवें दाशरथी रामें सोडिलें ॥ आतां दैन्य भोगूनि आलें ॥ दुःख अपार येधवां ॥५॥

ऐसे होऊनि भयभीत ॥ कंपे व्यापिले ते समस्त ॥ असो सुरवर जाऊनि वैकुंठात ॥ निवेदिती श्रीरंगा ॥६॥

मग तो दयाळ चक्रपाणी ॥ ऐसी ऐकूनि सुरवरवाणी ॥ म्हणे भोग आला परतुनी ॥ अवतारदीक्षेकारणें ॥७॥

मग तो परम दचकूनि चित्तीं ॥ शिव पाचारिला सुरवरांहाती ॥ बैसवूनि स्वसंगतीं ॥ विचित्र करनी निरोपिली ॥८॥

म्हणे गोरक्षें केलें अनुचित ॥ पुनः उठविले दानव समस्त ॥ आतां दानव तरी रसातळाप्रत ॥ मही सकळ नेतील कीं ॥९॥

एक एक दानवासाठीं ॥ आपण माराया झालों कष्टी ॥ कल्पावरी अवतार जेठी ॥ धरुनियां भीडलो ॥२१०॥

तरी आतां कैसें करावें ॥ निवटतील कैलासा सकळ दानव ॥ अहा मूर्ख तो वीरभद्रराव ॥ व्यर्थ द्वेषीं मिरवला ॥११॥

मग सोडूनि वैकुंठासी ॥ येते झाले गोरक्षापासी ॥ म्हणती बा विपरीत महीसी ॥ पुत्रा हें काय मांडिले ॥१२॥

अरे एकएका राक्षसालागीं ॥ आम्ही श्रमलों बहु प्रसंगीं ॥ अवतार घेऊनि नाना रंगीं ॥ हनन केलें तयांचे ॥१३॥

तरी आतां कृपा करुन ॥ अदृश्य करीं दानवांकारण ॥ येरी म्हणे गुरुशवा आणून ॥ द्यावें आधीं मजलागीं ॥१४॥

मग शिवें बोलावूनि चामुंडेसी ॥ मच्छिंद्रशवातें आणविलें महीसी ॥ म्हने बा घेई आणि राक्षसांसी ॥ शांतदृष्टी दावीं कां ॥१५॥

यापरी गोरक्ष म्हणे त्यांतें ॥ दानव नोहेत अस्त्रव्यक्त ॥ संजीवनी प्रयोग देहस्थित ॥ दानव उदया पावले ॥१६॥

तरी अवतार घेऊन ॥ पुनः योजा रणकंदन नातरी वीरभद्राची आस्था सोडून ॥ द्यावी लागेल तुम्हांते ॥१७॥

यावरी बोले भालदृष्टी ॥ येर पोर नाहीं म्हणे पोटीं ॥ परी नाथा राक्षस जेठी ॥ दुःख देतील आम्हांतें ॥१८॥

एक मधुदैत्य माजला ॥ तेणे पळविले रानोरानीं आम्हांला ॥ शेवटीं एकदशीनें त्याला ॥ मृत्युमुखी पाठविलें ॥१९॥

ऐसें दुःख सांगावें किती ॥ तरी आतां कृपामूर्ती ॥ वेगी निवटी राक्षसांप्रती ॥ पुत्रमोह साडिला ॥२२०॥

ऐसें शिव विष्णु बोलत ॥ येरीकडे राक्षस समस्त ॥ वीरभद्र पाहूनि झुंजत ॥ धनुष्यबाण कवळूनियां ॥२१॥

परी तो प्रतापी भद्रजाती ॥ एकटा झुंजतो सर्वाप्रती ॥ नानाशस्त्रअस्त्राकृती ॥ निवारींत बलिष्ठ ॥२२॥

तुष्ट होतां गोरक्ष जती ॥ वाताकर्षण अल्पयुक्तीं ॥ भस्मचिमुटी रणकंदनाप्रती ॥ फेंकूनियां देतसे ॥२३॥

ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण ॥ एकमेळीं माजले कंदन ॥ येरीकडे शिवविष्णूंनी ॥ स्तुतीं तुष्टविला गोरक्ष ॥२४॥

तेणें दानव वीरभद्रासहित ॥ महीं पाडिले निचेष्टित ॥ श्वासोच्छवास कोंडूनि समस्त ॥ प्राणरहित झाले ते ॥२५॥

सबळ अस्त्रेम वाताकर्षण ॥ ठाऊक नव्हतीं देवदानवांकारण ॥ परी नाथपंथीं तीं येऊन ॥ प्रसन्न झाला कृपेनें ॥२६॥

असो वीरभद्र आणि दानव समस्त ॥ रणीं निमाले प्रतापवंत ॥ त्यावरी गोरक्षें जल्पूनि अग्निअस्त्र ॥ सकल केले भस्म तेणें ॥२७॥

यावरी पुढें पंचानन ॥ वेष्टिले अति मोहानें ॥ तें पुढीले अध्यायीं सकळ कथन ॥ श्रोतियानी ऐकावें ॥२८॥

परम साधन योजूनि चित्तीं ॥ पाठ थापटूनि वक्त्याप्रती ॥ भला भला म्हणवूनि उक्ती ॥ श्रोते करिती तत्कृपें ॥२९॥

परम अवधाना योजूनि चित्त ॥ वक्ता जाहला धुंडीसुत ॥ नरहरि मालु नाम ज्यांत ॥ संतसेवे अनुसरला ॥२३०॥

स्वास्त श्रीग्रंथ भक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयस्त्रिंशति अध्याय गोड हा ॥२३१॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥३३॥ ओंव्या ॥२३१॥

॥ नवनाथभक्तिसार त्रयस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP