एकनाथी भागवत - श्लोक २० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कोऽन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।

आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥२०॥

जितांही सुखाची वार्ता । कर्मठां नाहीं सर्वथा ।

तेही सांगेन मी कथा । ऐक आतां उद्धवा ॥८५॥

विखे रांधिलें मिष्टान्न । तें गोड न म्हणती सज्ञान ।

पुढें देखोनियां मरण । निःशेष तें अन्न सांडिती ॥८६॥

आगी लागिलिये घरीं । क्षण न राहिजे चतुरीं ।

मरण नादळतां उरी । सांडूनि दूरी पळताति ॥८७॥

धाडी आल्या निजद्वारीं । गोड न लगे साखरखिरी ।

तैसा मृत्यु जाणितलिया शरीरीं । विषयाकारीं सुख कैंचें ॥८८॥

दाढीसी लागलिया आगी । तो शृंगारु न मनी मुखालागीं ।

तैसा नीच नवा मृत्यु अंगीं । विषयसंगीं सुख कैंचें ॥८९॥

उठिल्या मरणान्त व्यथा । जन धन अन्न आणि कांता ।

सुख नेदितीच सर्वथा । झालीं वृथा समूळ ॥४९०॥

अंतकाळीं स्त्री धन । झालीं दुःखासीच कारण ।

त्यांसी सांडूनि न निघती प्राण । तळमळी जाण प्राणांतीं ॥९१॥

जैसा सुळीं द्यावया जो नेइजे । त्यासी नाना समारंभु कीजे ।

मुखीं घालिती पंचखाजें । तेणें तो नव्हिजे सुखिया कीं ॥९२॥

तैसें संमुख असतां मरण । विषयसुखें सुखावे कोण ।

विषय त्यागिती सज्ञान । मूर्खासी जाण आसक्ती ॥९३॥

देहदुःखाची अर्धघडी । नाशी विषयसुखाची कोडी ।

विषयालागीं शिणती वेडीं । अविनाश गोडी निर्विषयीं ॥९४॥

एवं या लोकांच्या ठायीं । सुख सर्वथैव नाहीं ।

लोकांतरीं म्हणती कांही । न घडे तेंही उद्धवा ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP