पौष वद्य ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


न्या. रानडे यांचे निधन

शके १८२२ च्या पौष व. ११ रोजीं हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक, विख्यात राजकारणी, दूरदृष्टीचे विवेचक व स्वतंत्र भारताचे द्र्ष्टे न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे यांचें निधन झालें. राजकीय, सामाजिक, धार्मिक, औद्योगिक, आर्थिक इत्यादि अनेक क्षेत्रांत माधवरावांनीं मार्गदर्शन केलें. हिंदी अर्थशास्त्राचे ते तर जनकच होते. आयुष्यांतील शेवटच्या दिवसांतहि यांचें लक्ष सार्वजनिक कार्यांत गुतूंन राहिलें होतें. लाहोरच्या सामाजिक परिषदेस जातां आलें नाहीं म्हणून यांना मनस्वी वाईट वाटलें. रोज रात्रीं साडे दहा वाजतां काळजात वेदना सुरु होत असल्या वेळीं मृत्यूशींच झुंज सुरु होई. पौष व. ९ रोजीं पायावर सूज दिसत होती आणि पौष व. ११ ला सकाळीं माधवरावांना थोडी हुशारी वाटली. रमाबाईसह थोडें फिरुन आल्यावर त्यांचे मित्र कीतिचंद मुकर्जी मरण पावल्याची बातमी तारेनें यांना समजली. ‘काम करतां करतां मरण्यांत सुख असतें. अशा अर्थाचे सुभाषित माधवरावांच्या तोंडातून बाहेर आलें. रात्रीं जेवण झाल्यावर वाचीत असतांना नेहमीची कळ आली. शेजारचे डॉक्टर धांवत आले. रमाबाई माधवरावांना सावरुं लागल्या, पण उपयोग झाला नाहीं. एक रक्ताची वांति झाली आणि माधवरावांचा आत्मा त्यांचे शरीर सोडून गेला ! दुसर्‍या दिवशीं सर्व देश दु:खसागरांत बुडून गेला. लो. टिळकांनीं माधवरावांची योग्यता सांगितली. "महाराष्ट्र देश म्हणजे त्या वेळीं थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्यास कोणत्या तर्‍हेनें ऊब दिली असतां तो पुन्हां सजीव होईल व हातपाय हालवूं लागेल, याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करुन अनेक दिशांनीं, अनेक उपयांनीं, अनेक रीतींनीं त्यास पुन्हा जिवंत करण्याचें दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरितां जिवापाड जर कोणीं मेहनत केली असेल तर ती प्रथमत: माधवरावांनींच केली असे म्हटलें पाहिजे." ना. गोखले यांनीं उद्‍गार काढले, " Mr. Ranade was one of those men who appear, from time to time, to serve as a light to guide the footsteps of our weak and erring humanity.

- १६ जानेवारी १९०१

N/A

References : N/A
Last Updated : October 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP