सद्‍गुरू - जुलै ४

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


एकदा असे झाले , की एका साधूकडे चोरांनी चोरी केली , ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले , तेव्हा चोरांना धरुन त्या शिष्यांनी खूप चोप दिला . हे त्यांचे करणे गुरुला समजले , तेव्हा त्या चोरांना आणून , गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले , आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजेन दिले . हे असे काय करता ? म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले , तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की , " तुम्ही तरी काय करता ? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत ; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी म्हणून दिला , परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही ! म्हणून , विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी . आपण सर्वांनी ‘ मी भगवंताकरिता आहे ’ असे मनाने समजावे . सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर , मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते , तीच खरी समाधी होय .

संत काय करतात ? आपण चुकीची वाट चालत असताना , ‘ अरे , तू वाट चुकलास ’ अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात . ते सदासर्वदा समाधिसुख भोगीत असतात , आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात . भगवंताच्या लीला पहाणार् ‍ यांनाच खरा आनंद मिळतो . आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे , ही भगवंताची लीला आहे . भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे . जसा मारुतीमध्ये देव - अंश होता , तसा तो आपल्यामध्येही आहे ; त्याने तो फुलविला , आपण तो झाकून विझवून टाकला . मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे . त्याचे ब्रह्मचर्य , भक्ती , दास्य , आणि परोपकार करण्याची तर् ‍ हा या गोष्टी आपण शिकाव्यात . मारुती हा चिरंजीव आहे . ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल . मारुतीला सर्व सृष्टी रामरुप दिसली . हेच खरे भक्तीचे फळ आहे . उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल . ‘ माझ्या देवाला हे आवडेल का ? ’ अशा भावनेने जगात वागावे . हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतु आहे . भगवंत दाता आहे , तो माझ्या मागे आहे , तो माझे कल्याण करणारा आहे , ही जाणीव झाली , की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन , आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल . समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय . आपली वृत्ती अशी असावी की , कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी . इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही , पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP