अध्याय चवदावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


तो सौमित्र करीत रामस्मरण ॥ काननामाजी करी भ्रमण ॥ जैसे कमळावरी भ्रमर जाण ॥ ठायीं ठायीं रुणझुणती ॥५१॥

तों शूर्पणखा ते वेळीं ॥ सवेग पातली सौमित्राजवळी ॥ कामचेष्टा करी वेळोवेळीं ॥ वचन माधुर्य बोलोनियां ॥५२॥

म्हणे वो अवधारा सुंदरा ॥ बहुत हिंडल्यें वसुंधरा ॥ परी मजयोग्य न मिळे नोवरा ॥ कुशळ चतुर प्रतापी ॥५३॥

तरी आजि माझें धन्य भाग्य ॥ पावल्यें स्वामीचें अर्धांग ॥ आजि तप फळले सांग ॥ आली सवेग पुढेंचि ॥५४॥

घेऊनियां नवरत्नमाळा ॥ घालावया आली गळां ॥ तंव तो महाराज सत्त्वगळा ॥ जो अवतरला भोगींद्र ॥५५॥

गुणसिंधु जानकीजीवन ॥ त्याची कृपा जयावरी पूर्ण ॥ विषयसंगें त्याचें मन ॥ काळत्रयीं मळेना ॥५६॥

जेणें प्राशिला सुधारस ॥ त्यासीं काय बाधेल महाविष ॥ जो सूर्यासन्निध करील वास ॥ तम केवीं त्यासी बाधेल ॥५७॥

कामधेनू ज्याचे मंदिरीं ॥ तो कधींच नव्हे दरिद्री ॥ जो पहुडला आनंदसमुद्रीं ॥ कर्मबंधीं न पडे तो ॥५८॥

कल्पवृक्ष आंगणीं देख ॥ तो कासया मागेल भीक ॥ ज्यासी भेटला वैकुंठनायक ॥ तो न पूजी भूतें प्रेतें ॥५९॥

उर्वशीसमान ज्याची ललना ॥ तो कदाही प्रेत कवळीना ॥ नंदनवनींचा भ्रमर जाणा ॥ अर्कीवरी न बैसे ॥६०॥

जो भ्रमरमंचकावरी ॥ पहुडणार अहोरात्रीं ॥ तो निजेल खदिरांगारीं ॥ हें काळत्रयीं घडेना ॥६१॥

ज्याचे अंगीं मृगमदाची उटी ॥ तो काकविष्ठा न पाहे दृष्टीं ॥ जो बैसला क्षीराब्धीच्या तटीं ॥ तो कां कांजी इच्छील ॥६२॥

असो ऐसा लक्ष्मण ॥ तो आहाररहित निर्वाण ॥ तो शूर्पणखेसी प्रतिवचन ॥ बोलता जाहला तेधवां ॥६३॥

मग म्हणे वो सुंदरी राहें ॥ आम्हां सीताराम वडील आहे ॥ पैल वसती पंचवटिये ॥ उमामहेश्र्वर ज्यापरी ॥६४॥

मायबाप गुरु बंधु ॥ रघुवीर माझा कृपासिंधु ॥ त्याचे आज्ञेविण हा संबंधु ॥ कालत्रयीं घडेना ॥६५॥

शेष सांडील भूभार ॥ पूर्वेस मावळेल दिनकर ॥ तरी राम आज्ञेविण साचार ॥ तुज न वरीं निर्धारें ॥६६॥

तों शूर्पणखा बोले वचन ॥ तरी मी आणित्यें रामाची खूण ॥ अवश्य म्हणे लक्ष्मण ॥ येरी तेथून चालिली ॥६७॥

सांगातें सखिया चौघीजणी ॥ विचार सांगे त्यालागुनी ॥ राम लक्ष्मण सीता तिन्हीं ॥ रात्रीं गिळोनि जाऊं लंके ॥६८॥

आमुची कार्यसिद्धी येथून ॥ सख्याहो जाहली परिपूर्ण ॥ मग ये वनींचे ब्राह्मण ॥ भक्षूं शाधोनि साक्षेपें ॥६९॥

ऐसें विचारोनि मानसीं ॥ वेगें आली पंचवटीसी ॥ देखोनियां सीतारामासी ॥ साष्टांग नमन पैं केलें ॥७०॥

आजि माझे भाग्य पूर्ण ॥ देखिले भावें स्वामिचरण ॥ बाई मी तुम्हांसी शरण ॥ जाऊ जाहल्यें तुमची मी ॥७१॥

मजवरी स्नेह करावा बहुत ॥ भावोजींस प्रार्थोनि त्वरित ॥ मजजवळी द्यावें लिखित ॥ प्राणनाथ वरावया ॥७२॥

चरण त्यांचे कोमळ चांगले ॥ वनीं हिंडताती एकले ॥ तळहातीन करकमळें ॥ सुमनसेजे घोलोनि ॥७३॥

भावोजींचे आज्ञेविण पाहें ॥ मज ते वरीत नाहींत करूं काये ॥ अहा त्यांचा वियोग न साहे ॥ विरहें जाय प्राण हा ॥७४॥

डोळां आसुवें आणिलीं लवलाहीं ॥ पतीस माझा विश्र्वास नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ भावोजींस बाई सांगा जी ॥७५॥

मी केवळ पतिव्रता साचार ॥ कर्णकुमारी परमपवित्र ॥ मज एकही पुरुषाचा पदर ॥ बाई लागला नाहींच ॥७६॥

त्यावीण मज पुरुष इतर ॥ बंधूसमान साचार ॥ मागुती उदकें भरोनि नेत्र ॥ म्हणे सत्वर पत्र द्या आतां ॥७७॥

सीतेसी सुख वाटलें फार ॥ म्हणे बरवा जाहला विचार ॥ मज जाऊ मिळाली सुंदर ॥ ईस सौमित्र वर साजे ॥७८॥

मग म्हणे जी रघुराया ॥ ईस खुण द्यावी लवलाह्या ॥ स्वामी सौमित्रा योग्य जाया ॥ मिळाली जी निर्धारें ॥७९॥

मग तो सर्वात्मा रघुनायक ॥ चराचरचित्तपरीक्षक ॥ जो मायाचकचाळक ॥ कर्ता हर्ता पाळिता जो ॥८०॥

तिच्या उफराट्या बाहुल्या नेत्रांत ॥ न्याहाळून पाहे जनकजामात ॥ म्हणे हे निशाचरी यथार्थ ॥ छळावया आली असे ॥८१॥

नेत्रवक्रांचे तिचे विकार ॥ त्यावरोनि समजलें अंतर ॥ सुमनावरून सत्वर ॥ वृक्ष चतुर जाणती ॥८२॥

बोलावरोनि कळे चित्त ॥ आचरणावरून पूर्वार्जित ॥ क्रियेवरोनी वर्णाश्रम सत्य ॥ परीक्षक जाणती ॥८३॥

राहणीवरून कळे परमार्थ ॥ शब्दावरूनी कळे पांडित्य ॥ प्रेमावरोनी भक्त ॥ परीक्षक जाणती ॥८४॥

दानावरूनी कळे उदार ॥ रणीं समजे प्रजा शूर ॥ लक्षणांवरूनी नृपवर ॥ जाणती चतुर परीक्षक ॥८५॥

वास येतां कळे काष्ठ ॥ स्वरावरोनी समज कंठ ॥ कोंभावरून स्पष्ट ॥ भूमीचें मार्दव जाणिजे ॥८६॥

अंगणावरून समजे सदन ॥ भूतदयेवरून ब्रह्मज्ञान ॥ प्रमेवरून रत्न ॥ परीक्षक जाणती ॥८७॥

असो सर्वात्मा रघुवीर ॥ शूर्पणखेचें ओळखिलें अंतर ॥ आंत शठत्व मृदु शब्द बाहेर ॥ जाणे चतुर श्रीराम ॥८८॥

मुख शोभे जैसें कमळ ॥ शब्द चंदनाहून शीतळ ॥ परी अंतरीं धूर्त कुटिळ ॥ तमाळनीळें आळखिलें ॥८९॥

श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ लग्नपत्रिका लिहों दे पाठीवरी ॥ ऐकतां भयभीत निशाचरी ॥ विश्र्वास अंतरीं उपजेना ॥९०॥

सीतेसी म्हणे बाई ऐकतां ॥ भावोजींसमोर बोलतां ॥ मज लाज वाटे तत्वतां ॥ तुम्हीच प्रार्था तयांसी ॥९१॥

भावोजी चतुर आणि तरुण ॥ मी लज्जावेष्ठित कामिन ॥ त्यांपुढें बैसतां जाण ॥ जाईल प्राण वाटतसे ॥९२॥

मग बोले रघुनंदन ॥ पृष्ठीवरी लिहिल्याविण ॥ आणिक आम्हांपाशीं खूण ॥ दुजी नाहीं सर्वथा ॥९३॥

मग शूर्पणखा बोले वचन ॥ तरी पृष्ठीवरी लिहावी खूण ॥ अवश्य म्हणे रघुनंदन ॥ केलें लेखन पृष्ठीवरी ॥९४॥

श्रीराम म्हणे जाय सत्वर ॥ उशीर न लावीच सौमित्र ॥ ऐसें बोलतां शतपत्रनेत्र ॥ पवनवेगें चालिली ॥९५॥

मग लक्ष्मणाजवळी येऊन ॥ सांगे परम हर्षेकरून ॥ भावोजींनीं मज देखोनि मान ॥ मुखवचनें सांगितलें ॥९६॥

अवश्य वरावें तुम्हांसी ॥ ऐसें सांगितलें मजपाशीं ॥ गांधर्वलग्न निश्र्चयेसी ॥ तात्काळचि लावावें ॥९७॥

मग बोले लक्ष्मण ॥ न देखतां श्रीरामाची खूण ॥ तुज न वरीं मीच पूर्ण ॥ सत्य वचन हें माझें ॥९८॥

येरी म्हणे ते समयीं ॥ माझा विश्र्वास तुम्हांसी नाहीं ॥ पुढें जन्म कंठणें एके ठायीं ॥ दुजें कांहीं नसेचि ॥९९॥

मी येथें लटिकें बोलोन ॥ भावजींस काय दावूं वदन ॥ मी तयांलागीं भेटोन ॥ आल्यें आतां तत्वतां ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP