अध्याय चवदावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

श्रीरामकथा ऐकतां सादर ॥ सुख उपजे अपार ॥ शशांक देखोनि सागर ॥ पूर्ण जैसा उचंबळे ॥१॥

सद्रुरु वर्षतां कृपाघन ॥ शिष्यसरितेसी ये स्वानंदजीवन ॥ कीं उगवतां सूर्यनारायण ॥ अरविंदें विकासती ॥२॥

कीं दुर्बळासी सांपडे धन ॥ कीं वणव्यांत जळतां वर्षे घन ॥ वसंतकाळ देखोन ॥ द्रुप जैसे फूलती पैं ॥३॥

ऐसी कथा ऐकतां उपजे सुख ॥ जे कथेसी भुलला कैलासनायक ॥ पार्वतीसह प्रेमं देख ॥ रामकथा हृदयीं धरिली ॥४॥

जे मोक्षतरूचें बीज देखा ॥ जे भवनदीमाजीं तारक नौका ॥ जे अज्ञानतिमिरदिपिका ॥ वाल्मीकें हे पाजळली ॥५॥

कीं अविद्याकाननवैश्र्वानर ॥ कीं एश्र्वर्यपीठांची देवी सुंदर ॥ कीं मनोरथमोक्षांची जननी ॥ कं पापतापभंजनी ॥ मंदाकिनी प्रत्यक्ष हे ॥७॥

ऐसी कथा अत्यंत पावन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ तेरावे अध्यायीं कथन ॥ आला रघुनंदन पंचवटीये ॥८॥

जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो कमळिणीमित्रकुलभूषण ॥ मेदिनीगर्भरत्नजीवन ॥ पंचवटीये राहिला ॥९॥

जो भूधरावतार लक्ष्मण ॥ जो नरवीरांमाजी पंचानन ॥ सुरस फळें नित्य नूतन ॥ काननींहून आणित ॥१०॥

ऐसें असतां कोणे एके काळीं ॥ लक्ष्मण विलोकितां वनस्थळीं ॥ तो देखिली वंशजाळी ॥ सरळ गगनचुंबित ॥११॥

ते वंशजाळीभीतरीं ॥ दशकंठाचा भाचा शंबरी ॥ विषकंठाचें आराधन करी ॥ काळखड्रप्राप्तीतें ॥१२॥

साठीसहस्रवर्षेपर्यंत ॥ तप दारुण करितां तेथ ॥ वंशजाळीत असे गुप्त ॥ बाहेर न दिसे कोणातें ॥१३॥

माध्यान्हीं आला आदित्य ॥ तो काळखड्र अकस्मात ॥ गगनपंथें उतरत ॥ सुमित्रासुतें देखिलें ॥१४॥

तंव ते मनीं भावी शस्त्रदेवता ॥ मी नवजाय शंबरीच्या हाता ॥ शरण जाईन सुमित्रासुता ॥ हरीन जीवीता शंबरीच्या ॥१५॥

सभाग्यापुढें चिंतामणी ॥ पडे अकस्मात येऊनी ॥ तैसें काळशस्त्र ते क्षणीं ॥ सौमित्राजवळी पातलें ॥१६॥

सौमित्रें हाती घेतलें शस्त्र ॥ म्हणे कृपाळु तो त्रिनेत्र ॥ ऐसें बोलोनि अजराजपौत्र ॥ परमानंदें तोषला ॥१७॥

मग तो उर्मिलाप्राणाधार ॥ वस्त्रें पुसिलें काळशास्त्र ॥ म्हणे याचा प्रताप दिसे अपार ॥ पाहूं धार कैसी ते ॥१८॥

जेणें पुष्पप्राय धरिली धरणी ॥ तेणें निजबळें शस्त्र उचलोनी ॥ शंबरीसहित जाळी ते क्षणीं ॥ दुखंड केली तत्काळ ॥१९॥

शोणिताचा चालिला पूर ॥ साशंकित पाहे उर्मिलावर ॥ म्हणे कवण होता येथें विप्र ॥ नेणोनि साचार वधिला म्यां ॥२०॥

चिंतातुर राघवानुज ॥ तपस्वी वधिला नेणोनि सहज ॥ आतां कोपेल रघुराज ॥ मुखांबुज कोमाइलें ॥२१॥

असो याउपरी परतला ॥ जानकी मार्ग लक्षी वेळोवेळां ॥ म्हणे माध्यान्हकाळ टळला ॥ सौमित्रें लाविला उशीर कां ॥२२॥

ऐसें विलोकीं क्षणक्षणां ॥ तों येतां देखिलें लक्ष्मणा ॥ शस्त्र देखोनि मृगनयना ॥ अहल्योद्धरणाप्रति बोले ॥२३॥

म्हणे स्वामी आजि लक्ष्मण ॥ येत मंद मंद म्लानवदन ॥ तंव तो सर्वसाक्षी पूर्ण चैतन्यघन ॥ अंतरखूण जाणतसे ॥२४॥

तंव तो पावला महावीर ॥ रघुपतीपुढें ठेविलें शस्त्र ॥ जोडोनियां दोन्ही कर ॥ समाचार सांगितला ॥२५॥

म्हणे अयोध्याधीशा समर्था ॥ अकस्मात खड्ग आलें हाता ॥ वंशजाळी हाणोनि पाहतां ॥ तपस्वी घात पावला ॥२६॥

मग सुहास्यवदन जनकजामात ॥ म्हणे द्विज नव्हे तो राक्षस यथार्थ ॥ शूर्पणखेचा तो सुत ॥ भाचा जाण रावणाचा ॥२७॥

तो बहुत दिवस तप करित होता ॥ काळखड्र यावें हाता ॥ मग इंद्रादिदेवां समस्तां ॥ अजिंक्य व्हावें समरांत ॥२८॥

दुजयाचा चिंतिती घात ॥ त्यांसीं निर्दाळी उमाकांत ॥ ज्याची क्रिया त्यास बाधित ॥ अति अनर्थसूचक जे ॥२९॥

जैसे खणूं जातां वारुळ ॥ महासर्पें डंखिलें तत्काळ ॥ कीं हातीं धरितां तप्त लोहगोळ ॥ भस्म होय तेधवां ॥३०॥

जैसा शुष्ककाष्ठछिद्रीं चरण ॥ बळेंचि घालिजे नेऊन ॥ वरी खीळ बैसविली ठोकून ॥ मग करितां रुदन न निघेची ॥३१॥

जे जे आपण क्रिया करावी ॥ ते ते सवेंचि लागे भोगावी ॥ परी सौमित्रा आतां सीता रक्षावी ॥ न विसंबावी क्षण एक ॥३२॥

आतां येथून महाद्वंद्व ॥ मांडेल असावें सावध ॥ राक्षसी मावा नानाविध ॥ ब्रह्मादिकां न कळती ॥३३॥

हें एक बरवें जाहलें ॥ जें काळखड्र हातासी आलें ॥ ऐसें ऐकतां ते वेळे ॥ मन तोषलें सौमित्राचें ॥३४॥

तंव ते रावणाची भगिनी ॥ शूर्पणखा शंबरीची जननी ॥ रात्री दुष्ट स्वप्न देखोनि ॥ सावध जाहली तात्काळ ॥३५॥

मग विचार करून मानसीं ॥ सवें घेतल्या चौघी राक्षसी ॥ सवेग चालिसी वनासी ॥ निजपुत्रासी पहावया ॥३६॥

लंकेबाहेर जों आली ॥ तों दिनकरें प्रभा केली ॥ मार्ग चालतां वेळोवेळीं ॥ वंशजाळी विलोकित ॥३७॥

तंव ते न दिसेचि पाहतां ॥ देखे गृध्र मंडळ घालितां ॥ धापा दाटली धांवतां ॥ स्थळबीभत्सता देखोनी ॥३८॥

जवळी येऊनियां पाहे ॥ तों पुत्रासहित जाळी घायें ॥ द्विखंड होवोनि पडिली आहे ॥ रुधिर वाहे भडांभडां ॥३९॥

मग धाय मोकलोनि कैशी ॥ गडबडां लोळे भूमीसी ॥ जळावेगळी मासोळी जैशी ॥ चडफडी तैशी अतिशोकें ॥४०॥

मग उठवोनी सखियांनीं ॥ बैसविली सावध करूनी ॥ म्हणती पुढील कार्य मनासी आणीं ॥ कोणें वनीं सुत वधियेला ॥४१॥

मग ते राक्षसी उठोन । भोंवते पाहे विलोकून ॥ तों मानवी पदमुद्रा देखोन ॥ विस्मय करी मानसीं ॥४२॥

शंबरीसहित जाळभ् ॥ एके घायें खंड केली ॥ तरी काय राक्षसांची सीमा जाहली ॥ आयुष्याची येथोनियां ॥४३॥

असो दहन करून शंबरीसी ॥ वन शोधिती तेव्हां राक्षसी ॥ तों दुरोनि देखिलें सौमित्रासी ॥ जैसा तेजस्वी चंडाशु ॥४४॥

शूर्पणखा म्हणे हाचि काळ ॥ येणेंचि ग्रासिला माझा बाळ ॥ मग कापट्यवेष तात्काळ ॥ धरित्या जाहल्या राक्षसी ॥४५॥

रंभेहूनि सुंदर देखा ॥ स्वरूपें नटली शूर्पणखा ॥ सवें चौघीजणी सख्या ॥ भुले देखतां अनंग ॥४६॥

चौघीजणी दोहींकडे ॥ मध्यें शूर्पणखा दिव्य रूपडें ॥ जिच्या स्वरूपाचा प्रकाश पडे ॥ काननामाजीं हिंडतां ॥४७॥

चौघींच्या स्कंधावरी हात ॥ पादुका पायीं रत्नखचित ॥ हावभाव कटाक्ष दावित ॥ गायन करी मधुरस्वरें ॥४८॥

आल्हादकारक चंद्रवदन ॥ वदनीं बोलतां झळकती दशन ॥ चाले गजगती मोडोनि नयन ॥ उर्मिलाजीवन देखोनियां ॥४९॥

हळूच सख्यांसी बोलत ॥ येणेंचि वधिला गे माझा सुत ॥ तरी यासी सगळेंचि मुखांत ॥ घालोनि गिळीन निर्धारें ॥५०॥

तो सौमित्र करीत रामस्मरण ॥ काननामाजी करी भ्रमण ॥ जैसे कमळावरी भ्रमर जाण ॥ ठायीं ठायीं रुणझुणती ॥५१॥

तों शूर्पणखा ते वेळीं ॥ सवेग पातली सौमित्राजवळी ॥ कामचेष्टा करी वेळोवेळीं ॥ वचन माधुर्य बोलोनियां ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP