अध्याय तेरावा - श्लोक २०१ ते २४३

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ऐसें ऐकतां वचन ॥ सीतेनें केलें हास्यवदन ॥ हालवितां राहिली मान ॥ उन्मीलित नयन जाहले ॥१॥

ऋषिपत्न्यांतें कळली खूण ॥ प्रत्यया आला रघुनंदन ॥ विलोकितां राघवध्यान ॥ धाल्या पूर्ण ब्रह्मानंदें ॥२॥

मग सीतेचिया चरणीं मिठी ॥ घालिती सकळ त्या गोरटी ॥ म्हणती माते धन्य सृष्टी ॥ राम जगजेठी दाविला ॥३॥

जैसा मौन धरूनि वेद ॥ संतांसीं दावी ब्रह्मपद ॥ तैसा सीतेनें परमानंद ॥ ऋषिपत्न्यांसी दाविला ॥४॥

आतां असो हा पसार ॥ अगस्तीनें श्रीरामचंद्र ॥ आश्रमा नेऊनि साचार ॥ परमानंदें पूजिला ॥५॥

अक्षय चाप अक्षय भाते ॥ अक्षय कवच रघुत्तमातें ॥ शस्त्रें अस्त्रें मंत्रसामर्थ्यें ॥ दशरथीतें दीधलीं ॥६॥

जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥ तैसा दिधला एक बाण ॥ म्हणे याच शिरें रावण ॥ शेवटीं धाडीं निजधामा ॥७॥

एक मासपर्यंत ॥ तेथें काळ क्रमी रघुनाथ ॥ मग घटोद्भवासी पुसत ॥ आम्हीं आतां रहावें कोठें ॥८॥

अगस्ति म्हणे गोदातटीं ॥ वस्तीसी स्थान पंचवटी ॥ तेथें तूं राहे जगजेठी ॥ सीता गोरटी जतन करीं ॥९॥

आज्ञा घेऊनि ते वेळां ॥ पंचवटी श्रीराम चालिला ॥ वाटेसी जटायु देखिला ॥ राघवेंद्रें अकस्मात ॥२१०॥

पथीं बैसला जैसा पर्वत ॥ श्रीराम सौमित्रासी पुसत ॥ हा राक्षस होय यथार्थ ॥ आणीं त्वरित धनुष्य बाण ॥११॥

दोन्ही तूणीर घननीळें ॥ पाठीसी दोहींकडे आकर्षिले ॥ तंव तो जटायु ते वेळे ॥ काय बोले दुरूनियां ॥१२॥

म्हणे ये वनांतरीं तूं कोण ॥ मजवरी टाकिसी बाण ॥ सांग तुझें नामभिधान ॥ मग रघुनंदन बोलत ॥१३॥

रविकुळमंडण दशरथ ॥ त्याचा पुत्र मी रघुनाथ ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ जटायु जवळी पातला ॥१४॥

म्हणे कश्यपसुत अरुण ॥ तो माझा जनिता पूर्ण ॥ पितृव्य माझा सुपर्ण ॥ जटायु जाण नाम माझें ॥१५॥

माझा ज्येष्ठबंधु सांपाती ॥ तो दक्षिणसागरीं करी वस्ती ॥ तुझा पिता दशरथ नृपती ॥ मज बंधुत्वें मानीतसे ॥१६॥

शक्रासी युद्ध करितां ॥ मी साह्य झालों दशरथा ॥ मज बंधुत्व मानी तत्वतां ॥ अजराजपुत्र ते काळीं ॥१७॥

ऐसी ऐकतांचि मात ॥ सद्रदित झाला रघुनाथ ॥ जटायूचे कंठी मिठी घालित ॥ म्हणे तूं निश्र्चित पितृव्य माझा ॥१८॥

मग जटायूचे अनुमतें ॥ श्रीराम राहे पंचवटीतें ॥ पर्णशाळा सुमित्रासुतें ॥ विशाळ रचिल्या ते वेळे ॥१९॥

फळें मुळें आणून ॥ नित्य देत सुमित्रानंदन ॥ आपण निराहार निर्वाण ॥ चतुर्दशवर्षेंपर्यंत ॥२२०॥

जानकी भावी ऐसें मनीं ॥ लक्ष्मण फळें भक्षितो वनीं ॥ मग आणितो आम्हांलागुनी ॥ फळें घ्या म्हणोनि म्हणतसे ॥२१॥

सीतेचे आज्ञेविण ॥ सौमित्र न करी फळें भक्षण ॥ नित्य उपवासी निर्वाण ॥ तो लक्ष्मण महाराज ॥२२॥

पुढील जाणोनि भविष्यार्थ ॥ फळें नेदी रघुनाथ ॥ याच प्रकारें दिवस बहुत ॥ उपवास झाले तयासी ॥२३॥

पर्णकुटीचा द्वारपाळ ॥ सर्वकाळ सुमित्राबाळ ॥ तो विष्णुशयन फणिपाळ ॥ सेवा प्रबळ करीतसे ॥२४॥

रात्रीमाजी लक्ष्मण ॥ हातीं घेऊनि धनुष्यबाण ॥ राक्षस येतील म्हणोन ॥ सावधान सर्वदा ॥२५॥

निद्रा आणि आहार ॥ कधीं न स्पर्शे सौमित्र ॥ भक्तराज परम पवित्र ॥ जैसा निर्मळ मित्र सदा ॥२६॥

पंचवटीस राहिला रघुनाथ ॥ चहूंकडे प्रकटली मात ॥ तों वनभिल्लस्त्रिया मिळोनि बहुत ॥ म्हणती राघव पाहूं चला ॥२७॥

अयोध्याधीश रघुपति ॥ बहुत ऐकतों त्याची किर्ति ॥ एकवचन एकपत्नीव्रती ॥ चला निश्र्चितीं पाहूं तो ॥२८॥

निरंजनी राहिला रघुनाथ ॥ तो डोळेभरी पाहों यथार्थ ॥ अरिदर्पहरण सीताकांत ॥ पाहूं चला एकदां ॥२९॥

जो निर्विकार परब्रह्म ॥ तो सगुण सुवेष श्रीराम ॥ ज्याचे श्रुति नेणती वर्म ॥ तो पूर्णकाम पाहूं चला ॥२३०॥

म्हणती परब्रह्म सांवळे ॥ भेटीसी न्यावी अमृतफळें ॥ पूर्वपुण्य असेल आगळें ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३१॥

अपार मिळोनि भिल्लिणी ॥ उत्तम फळें वेंचिती वनीं ॥ नाचत नाचत कामिनी ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३२॥

ज्याचें नाम घेतां निर्मळ ॥ शीतळ जाहला जाश्र्वनीळ ॥ चरणरजें तात्काळ ॥ गौतमललना तारिली ॥३३॥

एक जानकी वेगळीकरून ॥ सकळ स्त्रिया कौसल्येसमान ॥ जो दशकंठदर्पहरण ॥ मखरक्षण मखभोक्ता ॥३४॥

अहो पूर्वकर्म निर्मळ ॥ पाहावया परब्रह्म उतावेळ ॥ हेंच उत्तम साचें फळ ॥ पंचवटीसी आलिया ॥३५॥

पंचभूतात्मक पंचवटी ॥ नरदेहास आल्या गोरटी ॥ श्रीराम देखतां दृष्टीं ॥ घालिती सृष्टी लोटांगण ॥३६॥

पूर्वफळें आणिलीं होतीं ॥ समस्त अर्पिलीं रघुपतीप्रती ॥ देखोनि तयांची भक्ति ॥ फळें भक्षीत सीताराम ॥३७॥

नित्यकाळ भिल्लिणी ॥ रामास फळें देती आणोनी ॥ येथें कितीएक जनीं ॥ विपरीत वाणी बोलिजे ॥३८॥

म्हणती उच्छिष्ट फळें भक्षिलीं ॥ हे सर्वथा असत्य बोली ॥ तीं उत्तम फळें पाहोनि रक्षिलीं ॥ श्रीरामभेटीकारणें ॥३९॥

मूळ न पाहतां यथार्थ ॥ भलतेंचि करी जो स्थापिति ॥ त्यासी बंधन यथार्थ ॥ चंद्रार्कवरी चुकेना ॥२४०॥

असो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हाचि अमृतवृक्ष यथार्थ ॥ येथींचीं फळें रघुनाथभक्त ॥ सदा भक्षिती प्रीतीनें ॥४१॥

ब्रह्मानंदा जगदोद्धारा ॥ पंचवटीवासिया श्रीधरवरा ॥ आदिपुरुषा निर्विकारा ॥ अचळ अभंगा अक्षया ॥४२॥

इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोदशाध्याय गोड हा ॥२४३॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु॥ ओव्या २४३ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP