अध्याय तेरावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


त्यामागें मंगळभगिनी ॥ मंगळकारक विश्र्वजननी ॥ स्थिर स्थिर हंसगमनी ॥ मंगळजननीवरी चाले ॥५१॥

दुरावतां भूमिकन्या ॥ सौमित्र म्हणे राजीवनयना ॥ जानकी मागें राहिली मनमोहना ॥ उभा राहें क्षणभरी ॥५२॥

वचन ऐकतां जगन्नायक ॥ उभा राहिला क्षण एक ॥ परम उदार सुहास्यमुख ॥ परतोनि पाहे सीतेकडे ॥५३॥

तंव ते सुकुमार जनकबाळी ॥ हळूहळू आली जवळी ॥ जेंवी सारासार विचार नेहाळी ॥ आत्मसुखाची पाविजे ॥५४॥

असो ते पतिव्रतामंडन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ जयावरून कोटी मदन ॥ ओंवाळून टाकावे ॥५५॥

परम सलज्ज होऊन ॥ केलें किंचित हास्यवदन ॥ जेणें निवती राघवकर्ण ॥ ऐसें वचन बोलली ॥५६॥

म्हणे जगद्वंद्या रविकुळभूषणा ॥ विषकंठहृदयाचिन्मयलोचना ॥ चरणीं चालतां रघुनंदना ॥ बहुत श्रम पावलेती ॥५७॥

परम सुकुमार लक्ष्मण ॥ चरणीं पावला शीण ॥ वृक्षच्छायेसि जाऊन ॥ गुणसागरा बैसावें ॥५८॥

रातोत्पल सुकुमार ॥ त्याहूनि पदें तुमची अरुवार ॥ अरुणसंध्यारागमित्र ॥ चरणतळवे सुरवाडले ॥५९॥

जें जान्हवीचें जन्मस्थान ॥ तें मी निजकेशीं झाडीन ॥ शीतोदकें धुवोन ॥ मग चुरीन क्षणभरी ॥६०॥

आजिचें पेणें किती दूर ॥ आहे तें नकळे साचार ॥ ऐकतां पद्माक्षीचें उत्तर ॥ द्रवला रघुवीर अंतरीं ॥६१॥

म्हणे सुकुमार चंपककळी ॥ चरणीं चालतां बहु श्रमली ॥ ऐसें बोलतां नेत्रकमळीं ॥ अश्रु आले राघवाचे ॥६२॥

मग आपुलें हस्तें करून ॥ कुरवाळिलें सीतेचें वदन ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ श्रम संपूर्ण हरियेला ॥६३॥

परम सुखावली जनकनंदिनी ॥ श्रीरामाचीं पदें झाडूनि ॥ मग आपुल्या मुक्तकेशेंकरूनि ॥ प्रक्षाळूनि चरण चुरीतसे ॥६४॥

मग उठोनि चालिला रघुवीर ॥ पाठीसी उभा भूधरावतार ॥ त्याचेमागें जनकजा सुंदर ॥ हंसगती चमकतसे ॥६५॥

वनचरें वैरभाव सांडोनि ॥ होतीं ते पळतीं भयेंकरूनि ॥ विराध राक्षस ते क्षणीं ॥ आला धांवूनि अकस्मात ॥६६॥

महाभयानक विशाळ शरीर ॥ खदिरांगार तैसे नेत्र ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी मोकळिया ॥६७॥

जैसा अग्नीचा ओघ थोर ॥ तैसी जिव्हा लवलवित बाहेर ॥ काजळाचा पर्वत थोर ॥ तैसें शरीर दिसतसे ॥६८॥

गळा नरमुंडांच्या माळा ॥ हातीं शूल ऊर्ध्व धरिला ॥ सिंहगजवनचरांचा मेळा ॥ टोंचिल्या माळा शूलावरी ॥६९॥

शतांचे शत ब्राह्मण ॥ रगडी दाढेखालीं घालून ॥ वाटेंसी लत्ताप्रहारेंकरूनी ॥ वृक्ष पाडी समूळीं ॥७०॥

पुढें जातसे रघुनाथ ॥ मागोनि विराध आला धांवत ॥ जानकी धरूनि अकस्मात ॥ जात झाला ते वेळीं ॥७१॥

जैसा गृहीं तस्कर रिघोनी ॥ धनकुंभ जाय घेऊनि ॥ कीं अकस्मात व्याघ्र येऊनि ॥ नेत उचलानि हरिणीतें ॥७२॥

कीं होमशाळेंत रिघे श्र्वान ॥ जाय चरुपात्र घेऊन ॥ तैसा विराध दुर्जन ॥ जात वेगेंकरूनियां ॥७३॥

करुणास्वरें करूनि देखा ॥ जानकी म्हणे मित्रकुळटिळका ॥ धांव धांव अयोध्यानायका ॥ जगव्यापका दीनबंधु ॥७४॥

परतोनि पाहे राजीवाक्ष ॥ तों सघन लागले वनीं वृक्ष ॥ नयनीं न दिसे प्रत्यक्ष ॥ कोणीकडे गेला तो ॥७५॥

क्षण न लागतां लक्ष्मण ॥ धनुष्यासी योजिला अर्धचंद्र बाण ॥ तत्काळ वृक्ष छेदून ॥ केलें वन निर्मूळ ॥७६॥

धनुष्य चढवोनि जनकजामातें ॥ पाचारिलें तेव्हां विरोधातें ॥ जैसा मृगेंद्र महागजातें ॥ तैसी लक्ष्मणें हांक फोडली ॥७७॥

अरे राक्षसा धरीं धीर ॥ माझा बाण घटोद्भव थोर ॥ तुझे आयुष्यसागराचें नीर ॥ प्राशील आतां निर्धारें ॥७८॥

महाव्याघ्राचा विभाग देख ॥ कैसा नेऊन वांचेल जंबुक ॥ आदित्याच्या कळा मशक ॥ तोडील कैसा निजांगें ॥७९॥

काळाचें हातींचा दंड अभंग ॥ केविं नेऊं शके झोटिंग ॥ वासुकीचा विषदंत सवेग ॥ दुर्दुर केवीं पाडीं पां ॥८०॥

विराध म्हणे तूं मानव धीट ॥ गोष्टी सांगतोसी अचाट ॥ तरी तुझें करीन पिष्ट ॥ मुष्टिघातें आतांचि ॥८१॥

ऐसें राक्षस बोलून ॥ जानकीस खालीं ठेवून ॥ धाविन्नला पसरूनि वदन ॥ रामसौमित्रांवरी तेधवां ॥८२॥

करीं धांवत्या वायूंचें खंडण ॥ ऐसें रामें सोडिले दोन बाण ॥ त्यांहीं दोनी भुजा उडवून ॥ गेले घेवोन निराळपंथें ॥८३॥

सवेंचि सूर्यमुखशरें ॥ शीर छेदिलें कौसल्याकुमरें ॥ विमानीं देव जयजयकारें ॥ पुष्पसंभार वर्षती ॥८४॥

विराध पावला दिव्य शरीर ॥ रामासी विनवी जोडूनि कर ॥ म्हणे मी गंधर्व तुंबर ॥ नाम माझें रघुवीरा ॥८५॥

गायन करावया वहिलें ॥ यक्षपतीनें बोलाविलें ॥ तंव म्यां मद्यपान केलें ॥ भ्रांत झालें शरीर माझें ॥८६॥

कंठीं न उमटतां स्वर ॥ मग कुबेरें सोडिलें शापशस्त्र ॥ म्हणे तूं होय निशाचर ॥ महाघोर वनांतरीं ॥८७॥

मग म्यां करुणा भाकितां थोर ॥ उच्छाप बोलिला कुबेर ॥ तुज वनीं वधील रघुवीर ॥ तैं उद्धार होय तुझा ॥८८॥

राघवा वर्षें दहा सहस्र ॥ मी विचरें येथें रजनीवर ॥ माझ्या भेणें दशशिर ॥ चळचळां थोर कांपतसे ॥८९॥

असो माझा उद्धार झाला येथ ॥ म्हणोनि वंदिलें रघुनाथातें ॥ विमानीं बैसोनि त्वरितें ॥ स्वस्थानासी पावला ॥९०॥

विराध रामें मारितां वनीं ॥ चहूंकडे पसरली कीर्तिध्वनी ॥ जैसे तैल पडतां जीवनीं ॥ जाय पसरोनि क्षणार्धें ॥९१॥

कीं सुपुत्रीं दान देतां निर्मळ ॥ कीर्तीनें भरे भूमंडळ ॥ कीं दुर्जनासी गुह्य केवळ ॥ सांगतां पसरे चहूंकडे ॥९२॥

कीं कुलवंतासी उपकार ॥ करितां कीर्ति वाढे सविस्तर ॥ कीं संतसमागमें अपार ॥ दिव्य ज्ञान प्रगटे पैं ॥९३॥

असो जानकी सप्रेम येऊन ॥ वंदी श्रीरामाचे चरण ॥ म्हणे तुमचा पराक्रम आणि संधान ॥ आजि म्यां दृष्टीं पाहिलें ॥९४॥

विराध उद्धरूनि जातां ॥ तेणें प्रार्थिलें रघुनाथा ॥ स्वामी तव दर्शनीं आस्था ॥ शरभंगऋृषीनें धरिली असे ॥९५॥

हंसविमान घेऊनि इंद्र ॥ त्यासी मूळ आला साचार ॥ परी तुज पाहिल्याविण मुनीश्र्वर ॥ नवजायचि ब्रह्मपदा ॥९६॥

केव्हां उगवेल रोहिणीवर ॥ म्हणोनि इच्छिती चकोर ॥ तैसा दृष्टीं पहावया रामचंद्र ॥ शरभंग ऋृषि इच्छितसे ॥९७॥

ऐसें विराधें सांगून ॥ मग तो गेला उद्धरून ॥ त्याचे आश्रमासी रघुनंदन ॥ जाता झाला ते काळीं ॥९८॥

मग पुढें जात रघुनंदन ॥ मागें येत जानकी चिद्रत्न ॥ तिचे पाठिसीं लक्ष्मण ॥ चहूंकडे पहातसे ॥९९॥

आणीक येतील रजनीचर ॥ म्हणोनि चापासी लाविला शर ॥ बळिया सुमित्राकुमर ॥ पाठिराखा येतसे ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP