अध्याय बारावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


मग उचलोनियां दोहीं करीं ॥ बंधूसीं आदरें हृदयीं धरी ॥ जैसा जयंतपुत्र सहस्रनेत्रीं ॥ प्रीतीकरोनी आलिंगिला ॥५१॥

की क्षीरसागरीं लहरिया उठती ॥ त्या एकांत एक मिसळती ॥ कीं वेदशास्त्री श्रुती ॥ ऐक्या येती परस्परें ॥५२॥

तैसा अलिंगिला भरत ॥ तों शत्रुघ्न लोटांगण घालित ॥ परम प्रीतीं रघुनाथ ॥ आलिंगन देती तयातें ॥५३॥

सकळ अयोध्येचे ब्राह्मण ॥ रामासी भेटती प्रीतीकरून ॥ सर्व दळभार प्रजानन ॥ करिती नमन रामासी ॥५४॥

लक्ष्मण भरत शत्रुघ्न ॥ परस्परें देती क्षेमालिंगन ॥ मग सुमंत प्रधानें येऊन ॥ श्रीरामचरण वंदिले ॥५५॥

मग सुमंत म्हणे रघुराया ॥ पैल वसिष्ठ आणि दोघी माया ॥ तंव त्या दशरथकुळवर्या ॥ धीर न धरवे ते काळीं ॥५६॥

सामोरा चालिला रघुनंदन ॥ भोंवते अपार अयोध्याजन ॥ जैसा कां वेदोनारायण ॥ अनेक श्रुतीं वेष्टिला ॥५७॥

येऊनियां वसिष्ठाजवळी ॥ रामें गुरुचरण वंदिले भाळीं ॥ जैसा मदनदहनाचे चरणकमळीं ॥ स्कंद ठेवी मस्तक ॥५८॥

तों कौसल्या सुमित्रा माता ॥ त्यांचीं वाहनें जवळी देखतां ॥ धांवोनी येतां रामसुमित्रासुतां ॥ उतरती खालत्या दोघीजणी ॥५९॥

कौसल्येचे चरणीं मस्तक ॥ ठेवूनि बोले रघुनायक ॥ म्हणे सुखीं कीं मम जनक ॥ श्रीदशरथ दयाब्धि ॥६०॥

तों जाहला एकचि कल्लोळ ॥ रुदन करिती लोक समग्र ॥ सुमित्राकौसल्येसी बहुसाल ॥ नाहीं पार तयातें ॥६१॥

वसिष्ठ म्हणे रघुनाथा ॥ तुझा वियोग न साहे दशरथा ॥ रामराम म्हणतां मोक्षपंथा ॥ गेला तात्काळ जाण पां ॥६२॥

वचन ऐसें ऐकतां कानीं ॥ करुणासागर मोक्षदानी ॥ विमलांबुधारा नयनीं ॥ तेच क्षणीं चालिल्या ॥६३॥

स्फुंदस्फुंदोनि विलाप थोर ॥ पित्यालागीं करी रघुवीर ॥ म्हणे पूर्ण सत्याचा सागर ॥ श्रीदशरथ वीर जो ॥६४॥

ज्याचे युद्धाची ठेव ॥ पाहती मानव इंद्रादि देव ॥ वृषपर्वा शुक्रादि सर्व ॥ दैत्य युद्धीं जिंकिले ॥६५॥

श्रोते म्हणती नवल येथ ॥ जो पुराणपुरुष रघुनाथ ॥ तो शोकार्णवीं पडिला ही मात ॥ असंगत दिसतसे ॥६६॥

जो जगद्वंद्य आत्माराम ॥ जो विश्र्वबीजफलांकित द्रुम ॥ तो शोकाकुलित परब्रह्म ॥ पितयालागीं कां जाहला ॥६७॥

विषकंठ आला कीं क्षीरसागरा ॥ उष्णता व्यापिली रोहिणीवरा ॥ पक्षिवर्या त्या खगेंद्रा ॥ सर्पबाधा केवीं जहाली ॥६८॥

चिंतामणी दरिद्रें व्यापिला ॥ कल्पवृक्ष केवीं निष्फळ जाहला ॥ प्रळयाग्नीचे डोळां ॥ अंधत्व केवीं पातलें ॥६९॥

तंव वक्ता दे प्रत्त्युत्तर ॥ श्रोतीं ऐकिजे सादर ॥ पूर्ण ब्रह्मानंद रघुवीर ॥ मानवलोकीं अवतरला ॥७०॥

जगद्रुरु देवाधिदेव ॥ दावी मायेचें लाघव ॥ अवतारकारणाची ठेव ॥ लौकिकभाव दाविला ॥७१॥

नट जो जो धरी वेष ॥ त्याची संपादणी करी विशेष ॥ यालागीं जगदात्मा आदिपुरुष ॥ दाखवी आवेश मायेचा ॥७२॥

ऐसी उघडतां शब्दरत्न मांदुस ॥ गुणग्राहक श्रोते पावले संतोष ॥ संदेहरहित निःशेष ॥ जेंवी तम नासे सूर्योदयीं ॥७३॥

कीं वैराग्यें निरसे काम ॥ ज्ञानें वितळे जेवीं भ्रम ॥ जैसा निधानांतूनि परम ॥ दारुण सर्प निघाला ॥७४॥

करितां संशयाचें निरसन ॥ मागें राहिलें अनुसंधान ॥ तरी हे गोष्टीस दूषण ॥ सर्वथाही न ठेवावें ॥७५॥

ग्रासामाजी लागला हरळ ॥ तो काढावया लागेल वेळ ॥ कीं अनध्यायामाजीं रसाळ ॥ वेदाध्ययन राहिलें ॥७६॥

चोरवाटा चुकवावया पूर्ण ॥ अधिक लागला एक दिन ॥ तरी ते गोष्टीतें दूषण ॥ कदा सज्ञान न ठेविती ॥७७॥

रात्रीमाजीं सत्कर्में राहतीं ॥ परी सूर्योदयीं सवेंचि चालतीं ॥ छायेंस पांथिक बैसती ॥ सवेंचि जाती निजमार्गे ॥७८॥

समुद्राचें भरते ओहटें ॥ सवेंच मागुती विशेष दाटे ॥ कीं चपळ तुरंग चपेटे ॥ विसावा घेऊनि मागुती ॥७९॥

तेंवि परिसा पुढील कथार्थं ॥ आठवोनि पिता दशरथ ॥ शोकाकुलित जनकजामात ॥ क्षणएक जाहला ॥८०॥

मग वसिष्ठ म्हणे श्रीरामा ॥ प्रयागाप्रति जाऊनि गुणग्रामा ॥ उत्तरक्रिया करूनि निजधामा ॥ दशरथासी बोळविजे ॥८१॥

कित्येक प्राकृत कवि बोलत ॥ कीं जे पतनीं पडिला दशरथ ॥ परी हे गोष्ट असंमत ॥ बोलतां अनर्थ वाचेसी ॥८२॥

जयाचें नाम घेतां आवडीं ॥ जीव उद्धरले लक्षकोडी ॥ तो आपुला पिता पतनीं पाडी ॥ काळत्रयीं न घडे हें ॥८३॥

असो गयेप्रति येऊन ॥ उत्तरक्रिया सर्व सारून ॥ पिता निजपदी स्थापून ॥ आले परतोन चित्रकूटा ॥८४॥

सकळ ऋषी आणि अयोध्याजन ॥ बैसले श्रीरामासी वेष्टून ॥ मग भरतें घालोनि लोटांगण ॥ कर जोडूनि उभा ठाकला ॥८५॥

म्हणे जयजयाजी पुरुषोत्तमा ॥ मायाचक्रचालका पूर्णब्रह्मा ॥ विरिंचिजनका सुखविश्रामा ॥ मंगलधामा रघुराया ॥८६॥

हे राम करुणासमुद्रा ॥ हे रविकुलभूषणा राघवेंद्रा ॥ सर्वानंदसदना रामचंद्रा ॥ प्रतापरुद्रा जगद्रुरो ॥८७॥

हे राम रावणदर्पहरणा ॥ हे राम भवहृदयमोचना ॥ हे राम अहल्योद्धारणा ॥ मखरक्षणा सीताधवा ॥८८॥

हे राम कौसल्यागर्भरत्ना ॥ हे राम माया अपारश्रममोचना ॥ सनकसनंदमानसरंजना ॥ निरंजना निजरूपा ॥८९॥

दानवकाननवैश्र्वानरा ॥ ममहृदयारविंदभ्रमरा ॥ अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकरा ॥ समरधीरा सर्वेशा ॥९०॥

हे राम भक्तचातकजलधरा ॥ प्रेमचकोरवेधकचंद्रा ॥ संसारगजच्छेदकमृगेंद्रा ॥ अनंगमोहना अनंगा ॥९१॥

उपवासी मरतां चकोर ॥ त्याचे धांवण्या धांवे चंद्र ॥ कीं अवर्षण पडतां जलधर ॥ चातकालागीं धांवे कां ॥९२॥

कीं चिंताक्रांतासी चिंतामणि ॥ सांपडे पूर्वभाग्येंकरूनि ॥ कीं दरिद्रियाचे अंगणीं ॥ कल्पवृक्ष उगवला ॥९३॥

कीं पतिव्रतेसी प्राणनाथ भेटला ॥ कीं क्षुधितापुढें क्षीराब्धि आला ॥ कीं साधकासी निधि जोडला ॥ आनंद जाहला तैसा आम्हां ॥९४॥

हंसें देखिलें मानससरोवर ॥ कीं प्रेमळा भेटला उमावर ॥ कीं संकल्पीं द्रव्य अपार ॥ दुर्बळ ब्राह्मणासी दीधलें ॥९५॥

तैसा आनंद जाहला जनांसी ॥ आतां सत्वर चलावें अयोध्येसी ॥ सांभाळावें बंधुवा आम्हांसीं ॥ श्रीदशरथाचेनि न्यायें ॥९६॥

आपुलें राज्य सांभाळावें ॥ गोब्राह्मणां प्रतिपाळावें ॥ आमुचे मनोरथ पूर्ण करावे ॥ आतां परतावें सत्वर ॥९७॥

जननी आमुची परम चतुर ॥ मज देत होती राज्यभार ॥ जैसे छेदोनियां शिर ॥ गुडघ्यास पूजा बांधिली ॥९८॥

पूज्यमूर्ति वोसंडून ॥ जैसे गुरवाचे धरी चरण ॥ राजकुमर सांडोन ॥ कन्या दिधली अजारक्षका ॥९९॥

पाडोनि देवळाचें शिखर ॥ घातलें भोंवतें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्नसत्र घातलें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP