अध्याय बारावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

संतमंडळी बैसली थोर ॥ बृहस्पतीऐसे चतुर ॥ आतां साहित्यसुमनाचे हार ॥ गुंफोन गळां घालूं त्यांचे ॥१॥

अनर्ध्य शब्दरत्नें प्रकाशवंत ॥ त्यांचे ग्राहक चतुर पंडित ॥ विशेषें रघुनाथभक्त विरक्त ॥ ते प्रेमभरें डुल्लती ॥२॥

मतिमंद बैसतां श्रोता श्रवणीं ॥ तरी ग्रंथरस जाय वितळोनी ॥ जैसें भस्मामाजी नेऊनी ॥ व्यर्थ अवदान घालिजे ॥३॥

रत्नपरिक्षा करिती चतुर ॥ तेथें गर्भांध विटे साचार ॥ गायन ऐकती सज्ञान नर ॥ परी बधिर तेथें विटती पैं ॥४॥

कमळसुवास सेविती भ्रमर ॥ परी तो स्वाद न जाणे दर्दुर ॥ हंस घेती मुक्तांचा चार ॥ परी तो बकासी प्राप्त नाहीं ॥५॥

दुग्ध दोहोनि नेती इतर ॥ गोचिड तेथें अहोरात्र ॥ वसे परी प्राप्त त्यास रुधिर ॥ नेणे क्षीर मतिमंद तो ॥६॥

कीं वसंतकाळीं कोकिळा ॥ पंचमस्वरें आळविती ॥ रसाळा ॥ काकजाती तैशा सकळा ॥ परी तयां तो स्वर नव्हेचि ॥७॥

बलाहक गर्जना करिती गगनीं ॥ मयुर नाचती पिच्छें पसरूनी ॥ परी ते कळा वृषभांनीं ॥ नेणिजे जैशी सर्वथा ॥८॥

चकोर चंद्रामृत सेविती ॥ परी ते कळा कुक्कुट नेणती ॥ म्हणोनि श्रोता मंदमती ॥ सहसाही न भेटावा ॥९॥

श्रोता भेटलिया चतुर ॥ ग्रंथरस वाढे अपार ॥ जेवीं वीर संघटतां थोर ॥ रणचक्रीं रंग भरे ॥१०॥

असो एकादशाध्यायाचे अंतीं ॥ चित्रकुटी राहिला रघुपति ॥ सुदर्शन गंधर्व निश्र्चितीं ॥ काकरूपी उद्धरिला ॥११॥

उपरी सिंहावलोकनें करूनि तत्वतां ॥ श्रोतीं परिसावी मागील कथा ॥ दळभारेंसी भरत तत्वतां ॥ चित्रकूटासमीप आला ॥१२॥

तंव तो भूधरअवतार ॥ चित्रकूटाखालीं सौमित्र ॥ फळें वेंचितां तो दळभार ॥ गजरें येतां देखिला ॥१३॥

ओळखिला आपला घ्वजसंकेत ॥ आले कळलें शत्रुघ्न भरत ॥ म्हणे कैकयीनें पाठविले यथार्थ ॥ वनीं रघुनाथ वधावया ॥१४॥

हे युद्धासी आले येथ ॥ जरी रघुनाथास करूं श्रुत ॥ तरी हेही गोष्ट अनुचित ॥ युद्ध अद्भुत करीन मी ॥१५॥

माझा श्रीराम एकला वनीं ॥ हे आले दळभार सिद्ध करूनी ॥ तरी जैसा वणवा लागे वनीं ॥ तैसें जाळीन सैन्य हें ॥१६॥

रवीच्या किरणांवरी देखा ॥ कैशा चढतील पिपीलिका । कल्पांतविजूस मशक मुखा-॥ माजी केंवि सांठवील ॥१७॥

चढून प्रळयाग्नीचे शिरीं ॥ पत्रग कैसा नृत्य करी ॥ ऊर्णनाभीचे तंतुवाभीतरीं ॥ वारण कैसा बांधवेल ॥१८॥

तृणपाशेंकरून ॥ कैसा बांधवे पंचानन ॥ द्विजेंद्रासी अळिका धरून । कैसी नेईल आकाशा ॥१९॥

दीपाचें तेज देखोन ॥ कैसा आहाळेल चंडकिरण ॥ तैसा मी वीर लक्ष्मण ॥ मज जिंकूं न शकती हे ॥२०॥

भार देखोनि समीप ॥ क्षण न लागतां चढविलें चाप ॥ बाण सोडिले अमूप ॥ संख्येरहित ते काळीं ॥२१॥

वाटे गडगडितां महाव्याघ्र ॥ थोकती जेवीं अजांचे भार ॥ तैसे सोळा पद्में दळभार ॥ भयभीत जाहला ॥२२॥

त्या बाणांचे करावया निवारण ॥ वीर सरसावला शत्रुघ्न ॥ दोघांचें समसमा संधान ॥ बाणें बाण तोडित ॥२३॥

एक चंद्र एक मित्र ॥ कीं रमावर आणि उमावर ॥ किंवा ते मेरुमंदार ॥ युद्धालागीं मिसळले ॥२४॥

एक समुद्र एक निराळ ॥ एक दावाग्नि एक वडवानळ ॥ एक गदा एक चक्र निर्मळ ॥ विष्णुआयुधें भिडती कीं ॥२५॥

एक वासुकी एक भोगींद्र ॥ एक वसिष्ठ एक विश्र्वामित्र ॥ तैसे शत्रुघ्न आणि सौमित्र ॥ बाण सोडिती परस्परें ॥२६॥

एकावरी एक सोडिती बाण ॥ ते वरचेवरीं उडविती संपूर्ण ॥ बाणमंडप जाहला सघन ॥ चंडकिरण न दिसेचि ॥२७॥

रामनामबीजांकित ॥ बाण सुटती सतेज मंडित ॥ रघुनाथ नाम गर्जत ॥ सुसाटे निघत येतांचि ॥२८॥

वाटे ओढवला प्रळयकाळ ॥ वनचरां सर्वां सुटला पळ ॥ ऋषीश्र्वर पळती सकळ ॥ कडे वेंधती पर्वताचे ॥२९॥

सांडोनि गुंफा तपाचरण ॥ पळती आपुला जीव घेऊन ॥ एक धांवतां धापा दाटून ॥ मूर्च्छा येऊनि पडियेले ॥३०॥

एक म्हणती राक्षसदळ ॥ आलें रामावरी तुंबळ ॥ येणें मखरक्षणीं राक्षस सबळ ॥ वीस कोटी निवाटिले ॥३१॥

तें वैर स्मरोनि अंतरीं ॥ सत्य हे आले राघवावरी ॥ आतां सोमित्राची कैंची उरी ॥ अनर्थ निर्धारीं ओढवला ॥३२॥

असो ऋषीश्र्वर समस्त ॥ आले जेथें रघुनाथ ॥ गोष्टी सांगतां बोबडी वळत ॥ संकेत दाविती एक करें ॥३३॥

एक रुदन करूनि फोडित हांका ॥ वेगें पळवीं जनककन्यका ॥ आतां गूढ विवरीं लपवीं कां ॥ रघुनायका ऊठ वेगीं ॥३४॥

न भरे जों अर्ध निमेष ॥ चढविलें श्रीरामें धनुष्य ॥ जैसा उगवतां चंडांश ॥ गुंफेबाहेर तैसा आला ॥३५॥

ऋषींस म्हणे अयोध्यानाथ ॥ तुम्ही मनीं न व्हावें दुश्र्चित्त ॥ काळही विघ्न करूं आलिया येथ ॥ खंडविखंड करीन बाणीं ॥३६॥

पडत्या आकाशा दईन धीर ॥ रसातळा उर्वी जातां करीन स्थिर ॥ तुम्ही समस्त बैसा धरूनि धीर ॥ तपश्र्चर्या करीत पैं ॥३७॥

अथवा करावें अध्ययन ॥ न्याय मीमांसा सांख्यज्ञान ॥ पातंजल अथवा व्याकरण ॥ यांची चर्चा करा जी ॥३८॥

असो पाठींसीं घालून ब्राह्मण ॥ पुढें चालिला रघुनंदन ॥ तो ध्वजचिन्हें ओळखिलीं पूर्ण ॥ शत्रुघ्न बाण टाकीतसे ॥३९॥

आपले भेटीकारणें उत्कंठित ॥ सद्रद जाहला भरत ॥ लक्ष्मणापाशीं सीतानाथ ॥ क्षण न लागतां पातला ॥४०॥

मग म्हणे सौमित्रासी ॥ बा रे भरत आला भेटीसी ॥ तूं किमर्थ यासी युद्ध करिसी ॥ पाहा मानसीं विचारूनि ॥४१॥

ऐसें बोलतां राजीवनेत्र ॥ परी वीरश्रियेनें वेष्टिला सौमित्र ॥ सोडितां न राहे शर ॥ मग रघुवीर काय करी ॥४२॥

हातींचें धनुष्य हिरूनी ॥ श्रीरामें घेतलें तये क्षणीं ॥ सौमित्र लागला श्रीरामचरणीं ॥ हास्यवदन करूनियां ॥४३॥

श्रीरामें वरितां फणिपाळ ॥ अवघें वितळलें बाणजाळ ॥ जैसें निजज्ञान ठसतां केवळ ॥ मायापडळ जेवीं विरे ॥४४॥

भरतासहित अयोध्येचे जन ॥ सर्वीं विलोकिला रघुनंदन ॥ जैसा निशा संपतां चंडकिरण ॥ उदयचळीं विराजे ॥४५॥

तों भरतासी न धरवे धीर ॥ सप्रेम धांव घेतली सत्वर ॥ वाटेसीं साष्टांग नमस्कार ॥ वारंवार घालीतसे ॥४६॥

कीं बहुत दिवस माता गेली ॥ ते बाळकें समीप देखिली ॥ कीं गाय वनींहूनि परतली ॥ वत्सें आटोपिली धांवूनियां ॥४७॥

कीं क्षीराब्धि देखोनि त्वरित ॥ धांव घेत क्षुधाक्रांत ॥ कीं मृगजळ देखानि त्वरित ॥ मृग धांवती उष्णकाळीं ॥४८॥

कीं सफळ देखोनि दिव्य द्रुम ॥ झेंपावे जैसा विहंगम ॥ भरतें धरूनि तैसा राम ॥ चरणसरोजीं स्पर्शिला ॥४९॥

जैसें लोभियाचें जीवित्व धन ॥ तैसें भरतें दृढ चरण ॥ नयनोदकें करून ॥ केलें क्षालन रामपायां ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP