बोधकथा - भगवान

जीवनातील प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी कसे आचरण असावे याची जाणीव करून देणार्‍या कथा.


एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP