अध्याय चोवीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


जितकें थोर ब्रह्मांड ॥ तैसेंच आकाश प्रचंड ॥ तेथें घट मठ हें बंड ॥ वेगळें व्यर्थ भावावें ॥१॥

तैसा निर्विकार जगजेठी ॥ न चलती द्वैतभावाच्या गोष्टी ॥ तेथें कैंची रावणाची भेटी ॥ बाह्यदृष्टी त्यजीं कां ॥२॥

मयजा म्हणे जानकीसी ॥ सर्वव्यापक अयोध्यावासी ॥ किंवा आहे एकदेशी ॥ सांग मजपाशीं निश्र्चयें ॥३॥

यावरी त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले विदेहराजनंदिनी ॥ म्हणे त्रिपुटी गेल्या जेथें विरूनी ॥ तटस्थ वाणी निगमांची ॥४॥

ध्येय ध्याता ध्यान ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ॥ नुरे भजक भज्य भजन ॥ सांग रावण तेथें कैंचा ॥५॥

जें जें दिसे ते ते नाशिवंत ॥ वस्तु एक अभेद शाश्र्वत ॥ मंदोदरी आणि सीता तेथ ॥ कोणीकडे पहाव्या ॥६॥

दोरावर दिसे विखार ॥ शुक्तिकेचे ठायीं रजत साचार ॥ तैसाच मायेचा प्रकार ॥ मिथ्याविकार जाणपां ॥७॥

मयकन्या सावध होय ॥ दृष्टीनें सर्व पाहे अद्वय ॥ निर्विकार वस्तु निरामय ॥ हाही न साहे शब्द जेथें ॥८॥

वस्तु अव्यक्त अनाम ॥ तेथें राम हेंही न साहे नाम ॥ ऐसे जयासी कळे वर्म ॥ आत्माराम तोचि पैं ॥९॥

ऐसा जो जाहला परिपूर्ण ॥ त्यास समाधि आणि विधान ॥ बोलणें आणि मौन ॥ दोनी त्याची विरालीं ॥११०॥

ऐसें जगन्माता बोलत ॥ मयजा ब्रह्मानंदे डुल्लत ॥ समाधि ग्रासोनि तटस्थ ॥ विराला हेत सर्वही ॥११॥

बोलणें आणि संवाद ॥ खुंटोनि जाहला अभेद ॥ ओतला एक ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्रुरु ॥१२॥

आनंद जिरवून अंतरीं ॥ सावध जाहली मंदोदरी ॥ जगन्मातेचे चरण धरी ॥ सद्द अंतरी होऊनियां ॥१३॥

म्हणे संशय निरसला पूर्ण ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥ विदेहकन्येचे चरण ॥ वारंवार धरी मग ॥१४॥

ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ धन्य तो दिवस साचार ॥ सत्संगें आत्मविचार ॥ सारासार होय पैं ॥१५॥

भागीरथी सर्वत्र पवित्र ॥ परी प्रयागमहिमा अपार ॥ तैसा रामविजय परिकर ॥ मंदोदरीसंवाद हा ॥१६॥

सर्वत्रां सुलभ ते भीमा ॥ परी पंढरीस अगाध महिमा ॥ स्नान करितां कर्मांकर्मां ॥ पासूनि मुक्त होईंजे ॥१७॥

असो सीतेची आज्ञा घेउनी ॥ स्वधामा गेली मयनंदिनी ॥ रावणाप्रती जाऊनी ॥ वर्तमान सांगतसे ॥१८॥

तप्तलोहावरी उदक पडलें ॥ तें माघारें निघे एकवेळे ॥ परी जानकी कदा काळें ॥ वश नव्हे तुम्हासी ॥१९॥

मृगजळी बुडेल अगस्ति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥ हेंही घडे परी सीता सती ॥ वश नोहे तुम्हांतें ॥१२०॥

जे गोष्टीनें होय अनर्थ ॥ आपले कुळाचा होय घात ॥ ऐशिया बुद्धीनें पंडित ॥ काळत्रयीं न वर्तती ॥२१॥

हातीचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंच घ्यावें शेण ॥ गोड शर्करा वोसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२२॥

मुक्तें सांडोनि परिकरें ॥ कां पदरीं बांधावीं खापरें ॥ वोसंडूनि रायकेळें आदरें ॥ अर्कीफळें कां भक्षावी ॥२३॥

याकरितां द्विपंचवदना ॥ सोडावी रामाची अंगना ॥ कायावाचामनें जाणा ॥ रघुनंदना शरण रिघावें ॥२४॥

परसतीचा अभिलाष ॥ महापुरुषास ठेवणें दोष ॥ बळवंतावरी बांधणें कास ॥ मग अनर्थास काय उणें ॥२५॥

विवसी हे परम सीता ॥ अनर्थकारक घोर वनिता ॥ हे नेऊन द्यावी रघुनाथा ॥ तरीच तुम्हां कल्याण ॥२६॥

महासर्प उशी घेउनी ॥ कैसा निजेल सुखशयनीं ॥ बळेंच गृहास लाविल्या अग्नि ॥ मग अनर्थासि काय उणें ॥२७॥

परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणोनि प्राशन करणें विष ॥ करितां परनिंदा द्वेष ॥ मग अनर्थासी काय उणें ॥२८॥

परम साधु बिभीषण ॥ तुमचा अविवेक देखोन ॥ अयोध्यापतीस गेला शरण ॥ जन्ममरण चुकविलें ॥२९॥

परम प्रतापी रघुनंदन ॥ उदधीवरी तारिले पाषाण ॥ हा प्रताप तुम्ही जाणून ॥ द्वेषबुद्धि कां धरितां ॥१३०॥

ऐशिया शब्दसुमनेंकरून ॥ मयजेनें पूजिला रावण ॥ मग प्रत्युत्तर हांसोन ॥ देता झाला ते काळी ॥३१॥

प्रिये तूं बोलसी वचनें ॥ तीं मज मानलीं बहुत गुणें ॥ परी आपुला पुरुषार्थ टाकणें ॥ तरी जिणें व्यर्थ लोकीं ॥३२॥

चिरंजीव जाहला बिभीषण ॥ प्रळयी तरी पावेल मरण ॥ तोंवरी देहलोभ धरून ॥ बैसतां काय सार्थक ॥३३॥

कल्पपर्यंत जीवूनी ॥ पडिले शरीर बंदिखानीं या पुरुषार्थासी शुभ कल्याणी ॥ मानी कोण सांगपां ॥३४॥

आदि पुरुष रघुनंदन ॥ हें मी जाणें सर्व वर्तमान ॥ तो मजसी युद्धकामना धरून ॥ सागर उतरूनि आला आहे ॥३५॥

त्याची वासना न पुरवितां ॥ कदा माघारी नेदी सीता ॥ तरी मी आपुल्या पुरुषार्था दावोनि राघवा जिंकीन ॥३६॥

ऐसें ऐकोनि ते अवसरीं ॥ चिंताक्रांत होऊनि मंदोदरी ॥ प्रवेशली निजमंदिरी ॥ क्लेशचक्रीं पडियेली ॥३७॥

असो आतां यावरी ॥ रावण चढला गोपुरीं ॥ जैसा बलाहक पर्वतशिखरीं ॥ कृष्णवर्ण उतरला ॥३८॥

चपळेहून तेज आगळे ॥ आंगी अलंकार मिरविले ॥ दाही छत्रे ते वेळे ॥ मस्तकावरी विराजती ॥३९॥

भोंवते सेवकजन बहुत ॥ उपभोग देती समस्त ॥ इकडे बिभीषण रामासी दावित ॥ रावण गोपुरीं चढला तो ॥१४०॥

श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ हा परम उंच सुवेळागिरी ॥ अवघे वळंघोनियां वरी ॥ लंकापुरी पाहूं चला ॥४१॥

ऐसें बोलतां अयोध्याधीश ॥ उठले तत्काळ कपिपुरुष ॥ सुवेळाचळीं आसपास ॥ चढले तेव्हां वायुवेगें ॥४२॥

जैशा कनकाचळावरी ॥ चढल्या निर्जरांच्या हारी ॥ तैसा वानरांसह ते अवसरीं ॥ अयोध्याविहारी चढतसे ॥४३॥

रघुपतीचे दोनी कर ॥ धरिती बिभीषण सूर्यकुमर ॥ सुवेळाचळीं रघुवीर ॥ कैसा शोभला ते काळीं ॥४४॥

उदयाचळावरी बाळमित्र ॥ ऐरावतावरी सहस्रनेत्र ॥ कैलासावरी कर्पूरगौर ॥ त्रिभुवनेश्र्वर दिसे तेवीं ॥४५॥

जो लावण्यमृतसागर ॥ स्मरारिमित्र मनोहर ॥ झळकती समुद्रदत्त अलंकार ॥ चपळेहूनि तेजागळे ॥४६॥

तेणें शोभला अयोध्यानाथ ॥ दिव्य पीतवसन विराजत ॥ असो गोपुरावरी लंकानाथ ॥ विलोकित रामाकडे ॥४७॥

वानरांसहित रावणारी ॥ शोभतसे सुवेळाद्रीवरी ॥ जैसा इंद्रादि सकळ सुरवरीं ॥ वैकुंठपति वेष्टिला ॥४८॥

कीं अनंत श्रुत्यर्थ समवेत ॥ तो वेदोनारायण विराजत ॥ किंबाहुना वृक्षांसहित ॥ कल्पद्रुम विराजे ॥४९॥

तैसा महावीरीं वेष्टित ॥ शोभतसे सीताकांत ॥ परी ते समयीं सूर्यसुत ॥ कर्म अद्भुत करिता जाहला ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP