अध्याय सोळावा - श्लोक १ ते ५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


श्रीगणेशाय नमः ॥

श्रीरामकथा अति सुरस ॥ सकळ तीर्थांहूनि विशेष ॥ गंगेपरीस निर्दोष ॥ निजभक्तांसी प्रिय होय ॥१॥

इहपरत्रतीर साचार ॥ रघुवीरचरित्र निर्मळवीर ॥ दाटला पूर्ण प्रेमपूर ॥ गर्जे थोर रामघोषें ॥२॥

गंगेमाजी वाहे जीवन ॥ कथासरिता ते जगज्जीवन ॥ चित्तवृत्तिजळचरें पूर्ण ॥ माजि निमग्न तळपती ॥३॥

तेथें घडिघडी डहुळे पाणी ॥ रामकथा निर्मळ अनुदिनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळोनी ॥ पुनीत करी त्रिभुवना ॥४॥

गंगेमाजी बुडतां मरावें ॥ येथें बुडी देतां तरावें ॥ हें विशेष कर्तृत्व स्वभावें ॥ गंगेहूनि अधिक ॥५॥

रामकथा करितां श्रवण ॥ सकळही तीर्थीं केलें स्नान ॥ तें फळ आलें हाता पूर्ण ॥ विशेष जाण रामकथा ॥६॥

ऐसी रघुवीरकथा पावन ॥ परी संत श्रोते सावधान ॥ तरी वक्त्याचा हर्ष पूर्ण ॥ गगनामाजी न समाये ॥७॥

पंधरावे अध्यायीं कथा सुंदर ॥ सीतेसी घेऊन गेला दशवक्र ॥ मृग वधोनि राम-सौमित्र ॥ पंचवटीये परतले ॥८॥

मार्गीं होती अपशकुन ॥ चालतां जड जाहले चरण ॥ आश्रमांत पाहती येऊन ॥ दिसे शून्य भणभणित ॥९॥

जैसें प्राणाविण कलेवर ॥ कीं उदकेंविण सरोवर ॥ कीं नासिकाविण वक्र ॥ शोभिवंत दिसेना ॥१०॥

फळेंविण तरुवर ॥ कीं सैन्येंविण नृपवर ॥ कीं वंशीं नसतां कन्याकुमर ॥ व्यर्थ मंदिर ज्यापरी ॥११॥

कीं दयेवांचूनि ज्ञान ॥ कीं प्रेमेंविण कीर्तन ॥ कीं बुबुळेंविण नयन ॥ गुंफा शून्य तेवीं दिसे ॥१२॥

ऋषींप्रति पुसावें वर्तमान ॥ तंव ते पळाले कुटुंबें घेऊन ॥ दशदिशा दिसती शून्य ॥ रघुनंदन गहिंवरला ॥१३॥

नेत्रीं चालिल्या अश्रुधारा ॥ सीता सांग कोठें सौमित्रा ॥ ऐसें बोलतां नवपंकजनेत्रा ॥ मूर्च्छना आली ते वेळीं ॥१४॥

निचेष्टित पडे रघुनंदन ॥ वारा घाली लक्ष्मण ॥ नेत्रांस लावोनि जीवन ॥ जगज्जीवन सावध केला ॥१५॥

देवाधिदेव आत्माराम ॥ नीलग्रीव जपे ज्याचें नाम ॥ त्यासी कां जाहला मोहभ्रम ॥ नवल परम हें वाटे ॥१६॥

अंधकूपीं बुडाला दिनकर ॥ प्रळयाग्नीस बाधी शीतकर ॥ कल्पवृक्ष दारोदार ॥ मागेल भिक्षा कासया ॥१७॥

काळासी भूतें झडपिती ॥ मृगजळीं बुडाला गभस्ती ॥ म्हणोनि सीतेसाठीं रघुपति ॥ करी खंती नवल हें ॥१८॥

तो पुराणपुरुष रघुनंदन ॥ मायातीत शुद्धचैतन्य ॥ परी मायेचा अभिमान पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥१९॥

दावी वर्तोनि जगद्रुरु ॥ करोनि मायामय पसारु ॥ हें जगीं वोडंबर दावी रधुवीरु ॥ मायामय लटिकेंचि ॥२०॥

असो वसिष्ठें उपदेशिलें ज्ञान ॥ कीं सर्वद्रष्टा एक आपण ॥ हा जगडंबर भास पूर्ण ॥ मायामय लटिकाचि ॥२१॥

जैशा स्वप्नींच्या जन्मपंक्ती ॥ यातना भोगी नानागती ॥ जागा होतां निश्र्चिंतीं ॥ मिथ्यामय सर्वही ॥२२॥

स्वप्नामाजी पतिव्रता ॥ जैसें मरण देखे प्राणनाथा ॥ परी सवेंचि जागी होतां ॥ सौभाग्य पाहतां तैसेंचि ॥२३॥

घट फुटतां चंद्रबिंब ॥ तैसेंचि असे स्वयंभ ॥ तरी अवतारलीला सीतावल्लभ ॥ संपादोनि दावीतसे ॥२४॥

असो सौमित्रास म्हणे रघुनाथ ॥ भोंवतें वृक्ष आणि पर्वत ॥ यांसी पुसों यथार्थ ॥ सीताशुद्धि ते सांगती ॥२५॥

गिरिकंदरीं गिरिमाळ ॥ शोधीत जात तमाळनीळ ॥ गोदातीरीं निर्मळ ॥ शोधी सकळ सौमित्रा ॥२६॥

वनोंवनीं राम धांवत ॥ सीते सीते आळवित ॥ कुरंगनयने भेट त्वरित ॥ शोकें बहुत व्यापिलों ॥२७॥

बदक चातक राजहंस ॥ मयूर रावे साळया सरस ॥ तयांसी पुसे अयोध्याधीश ॥ कोठें डोळस जानकी ॥२८॥

मृग शार्दुळ सिंह उरग ॥ नकुळ सूकर कस्तुरीमृग ॥ कोकिळा चक्रवाकें भृंग ॥ सीतारंग पुसे तयां ॥२९॥

कोणी न देती उत्तर ॥ त्यांवरी कोपला रघुवीर ॥ सौमित्र आणी धनुष्य शर ॥ छेदीन कांतार सर्वही ॥३०॥

सौमित्र म्हणे रघुनंदना ॥ हे केवीं जाणती तुझी अंगणा ॥ यांवरी कोप राजीवनयना ॥ सहसाही न करावा ॥३१॥

सीताविरहें रघुनंदन ॥ भुलोनि बोले काय वचन ॥ लक्ष्मणासी पूसे तूं कोण ॥ काय कारण येथें उभा ॥३२॥

तेव्हां सौमित्र बोले वचन ॥ श्रीरामाचा बंधु मी पूर्ण ॥ मग बोले वेदवंद्य रघुनंदन ॥ राम तो कोण कोठील ॥३३॥

भवकोदंड भंगिलें थोर ॥ तोचि राम समरधीर ॥ मग बोले सीतावर ॥ धनुष्य कोठें भंगिलें ॥३४॥

जनकाचिया मंडपांत ॥ धनुष्य भंगिलें यथार्थ ॥ जनक कोणाचा निश्र्चित ॥ सांग मज आतांचि ॥३५॥

जानकीचा जो पिता ॥ तो जनक जाण रघुनाथा ॥ अहा जानकी गुणसरिता ॥ मज आतांचि दावीं रे ॥३६॥

सौमित्रासी म्हणे रघुवीर ॥ आमचे कोठें ग्राम मंदिर ॥ येरू म्हणे अयोध्यापुर ॥ सेविलें कांतार पितृआज्ञें ॥३७॥

वना आलों कोण कोण ॥ उत्तर देत सुमित्रानंदन ॥ तुम्ही आम्ही सीताचिद्रत्न ॥ तिघेंजण आलों वना ॥३८॥

तरी जानकी दावीं त्वरित ॥ ऐसें बोले रघुनाथ ॥ भूमीवरी पडे मूर्च्छागत ॥ सौमित्र मग सांवरी ॥३९॥

तों अस्ता गेला दिनकर ॥ रात्रींमाजी प्रगटे रोहिणीवर ॥ राम म्हणे रे जाळितो मित्र ॥ अति तीव्र बहुत कां ॥४०॥

मग बोले सुमित्रासुत ॥ स्वामी हा चंद्र नव्हे आदित्य ॥ शीतळ किरण उष्ण वाटत ॥ सीताविरहेंकरूनियां ॥४१॥

श्रीरघुनाथ देवाधिदेव ॥ दावी इत्यादि बहुत भाव ॥ जो अज अजित स्वयमेव ॥ उमाधव ध्यात जया ॥४२॥

सीते सीते म्हणोन ॥ आलिंगीत वृक्ष पाषाण ॥ तों तत्काळ ते उद्धरोन ॥ जाती बैसोनि विमानीं ॥४३॥

सौमित्रासी म्हणे रघुनंदन ॥ चला घेऊं अगस्तीचें दर्शन ॥ त्यासी सांगों वर्तमान ॥ बुद्धि तो पूर्ण सांगेल ॥४४॥

अगस्तीचे आश्रमापति ॥ तत्काळ रामसौमित्र येती ॥ तों द्वारपाळ जाऊं न देती ॥ उभे करिती तयांतें ॥४५॥

कलशोद्भवासी वर्तमान ॥ सेवक सांगती जाऊन ॥ तों सीता घेऊनि गेला रावण ॥ ऋृषीस ज्ञानीं समजलें ॥४६॥

अंतरीं विचारी मुनि ॥ राम राज्य सांडोनि हिंडे वनीं ॥ हारविली जनकनंदिनी ॥ शाकेंकरूनि व्यापिला ॥४७॥

स्त्रीविरहित रघुनंदन ॥ आतां न घ्यावें त्याचें दर्शन ॥ सेवकांहातीं सांगोन ॥ पाठविलें ते काळीं ॥४८॥

आजि दर्शन नाहीं तुम्हांतें ॥ मागुती जावें आलिया पंथें ॥ हांसें आलें रघूत्तमातें ॥ हृदय ऋृषीचें जाणोनि ॥४९॥

परतोनि चालिला रघुवीर ॥ परम क्रोधावला सौमित्र ॥ म्हणे निर्दय कठिण विप्र ॥ जगदुद्धारा परतविला ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP