अध्याय दुसरा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


परम लज्जित रावण ॥ लंकेसी आला परतोन ॥ मागुती पराक्रम धरोन ॥ म्हणे मी जिंकीन वाळीतें ॥५१॥

तों समुद्रतीरीं शक्रसुत ॥ बैसला असे ध्यानस्थ ॥ त्यासी धरावया लंकानाथ ॥ पुष्पकांतून उतरला ॥५२॥

जैसा पंचाननापुढें ॥ मार्जार दावी आपुले पवाडे ॥ कीं पंडितापुढें महामूढें ॥ वाग्वाद आरंभिला ॥५३॥

कीं रासभें ब्रीद बांधोन ॥ नारदापुढें मांडिलें गायन ॥ कीं महाव्याघ्रावरी टवकारून ॥ जंबूक जैसा पातला ॥५४॥

तैसा वाळीपुढें उभा रावण ॥ सावध होतां शक्रनंदन ॥ ग्रीवेसीं दशग्रीव धरोन ॥ कक्षेमाजी दाटिला ॥५५॥

चतुःसमुद्रीं करोनि स्नान ॥ किष्किंधेसी आला परतोन ॥ अंगदाच्या पाळण्यावरी नेऊन ॥ उफराटा रावण बांधिला ॥५६॥

क्षणाक्षणां धरोनि दाढी ॥ अंगद बाळभावे उपडी ॥ मग विश्रवा धांवोनि तांतडी ॥ भिक्षा मागे वाळीतें ॥५७॥

मग मुखासी काळें लावुनी ॥ वाळीनें दीधला भिरकावुनी ॥ लंकेंत पडिला येउनी ॥ खेद मनीं बहुत करी ॥५८॥

एकदां रावण पुसे विरंचित्तें ॥ आमुचा अंत कवणाचेनि हातें ॥ तें सत्य सांगावें आम्हांतें स्नेहचित्तेंकरूनियां ॥५९॥

विधि म्हणे अजपाळसुत ॥ त्याचें नाम विख्यात दशरथ ॥ त्यासी पुत्र होईल रघुनाथ ॥ तुझा अंत त्या हातें ॥१६०॥

रावणें केला मग पण ॥ तरी मी दशरथासी वधीन ॥ तों अजपाळपुत्राचें लग्न ॥ मांडिलें इकडे गजरेंसीं ॥६१॥

तो नारद सांगे अजपाळा ॥ जतन करी दशरथकौसल्या ॥ लग्नसोहळ्यामाजी घाला ॥ घालील अकस्मात रावण ॥६२॥

ऐसें सांगतां कमलोद्भवसुत ॥ मग जहाज घालोनि समुद्रांत ॥ लग्न आरंभिलें तेथ ॥ महागजरेंकरोनियां ॥६३॥

सागरामाजी होतें लग्न ॥ रावणें ही गोष्ट ऐकोन ॥ तंव तो अष्टवर्गाचा दिन ॥ घातला घाला रात्रींत ॥६४॥

जैसे अंतरिक्ष पक्षी येती ॥ तैसे राक्षस उड्या घेती ॥ जहाज फोडोनि चूर्ण करिती ॥ गदापर्वतघातेंचि ॥६५॥

वऱ्हाड सर्व बुडविलें ॥ रावण कौसल्येसी घेतलें ॥ जिचें स्वरूप न जाय वर्णिलें । तीस घातलें पेटींत ॥६६॥

पेटी लंकेसी नेता उचलोन ॥ राक्षसें बोलाविला एक मीन ॥ तो बाहेर आला सांगरांतून ॥ त्यासी रावण अज्ञापी ॥६७॥

ही पेटी करावी जतन ॥ कोणा न द्यावी मजवांचून ॥ लंकेत प्रवेशला रावण ॥ ती वस्तु जतन मत्स्य करी ॥६८॥

समुद्राचे गहन बेटीं ॥ जेथें न पडे कोणाची दृष्टी ॥ तेथें मत्स्यें ठेवूनि पेटी ॥ गेला आपण स्वकार्या ॥६९॥

कैंचा सोहळा कैचें लग्न ॥ लोक समग्र गेले बुडोन ॥ तरी दशरथ समुद्रांतून ॥ उफाळला अवचिता ॥१७०॥

ज्याचे पोटीं येणार श्रीराम ॥ दुर्गम तेंचि होय सुगम ॥ विष तें अमृत होय उत्तम ॥ अपाय तोचि उपाय ॥७१॥

तरी अंतरिक्ष चढे पांगुळ ॥ देव जरी होय दयाळ ॥ आंगणींच्या लता सकळ ॥ कल्पलता होती त्या ॥७२॥

दशरथ पाहे समुद्रांत ॥ तों भंगलें जहाज अकस्मात ॥ वाहात वाहात आलें तेथ ॥ त्यावरी दशरथ बैसला ॥७३॥

वायुवेगें जहाज गेलें ॥ त्याच बेटाशीं येऊनि लागलें ॥ दशरथे पेटी ते वेळे ॥ सहज लीलें उघडिली ॥७४॥

तों आंत कौसल्यानिधान ॥ पाहतां वेधला अजनंदन ॥ तो नारद अकस्मात येऊन ॥ उभा ठाके ते वेळी ॥७५॥

ज्यासी भूत भविष्य सर्व ज्ञान ॥ तेणें मुहूर्तवेळा पाहून ॥ तात्काळ दोघांसी लाविलें लग्न ॥ विधियुक्त विधिसुतें ॥७६॥

वोहरांसी आशीर्वाद देत ॥ जो वैकुंठवासी रमाकांत ॥ तो तुमचे पोटी अवतरेल सत्य ॥ भयभीत होऊं नका ॥७७॥

दोघे पेटींत बैसवून ॥ वेगें गेला ब्रह्मनंदन ॥ तों लंकेत दशवदन ॥ कमळासनाप्रति सांगे ॥७८॥

तुवां जें भविष्य कथिलें ॥ तें अवघेंचि असत्य झालें ॥ जहाज फोडूनि लोक बुडविले ॥ हिरोनि आणिलें कौसल्येसी ॥७९॥

मग बोले चतुरानन ॥ मघांच दोघांसी लाविले लग्न ॥ कदा न टळे ब्रह्मवचन ॥ कल्पांतीही दशवक्रा ॥१८०॥

येरू म्हणजे जर जाहले लग्न ॥ तरी मी तुज इच्छित देईन ॥ मग पेटी आणविली मत्स्यापासून ॥ सभेमध्यें रावणें ॥८१॥

त्यामाजी नवरी असे तत्वतां ॥ ब्रह्मा म्हण उघडी आतां ॥ तों पेटी उघडूनि पाहतां ॥ वोहरे उभयतां देखिली ॥८२॥

परम आश्र्चर्य करी रावण ॥ म्हणे खरें जाहलें ब्रह्मवचन ॥ तरी मी या दोघांसी वधीन ॥ शस्त्र घेऊन सरसावला ॥८३॥

कौसल्या जाहली भयभीत ॥ पतीचें वदन विलोकित ॥ परी निर्भय वीर दशरथ ॥ ना भी म्हणत कौसल्येतें ॥८४॥

मी सूर्यवंशीं महावीर ॥ हे मशक काय दशकंधर ॥ याचीं दाही शिरें समग्र ॥ खंडीन आतां येथेंचि ॥८५॥

मग रावणाचा हात ॥ धरिता जाहला विष्णुसुत ॥ म्हणे मज देईं इच्छित ॥ माग म्हणत दशवदन ॥८६॥

हीं दोघें वधूवरें आतां ॥ मज देईं लंकानाथा ॥ मंदोदरी म्हणे तत्वतां ॥ वचन असत्य न करावें ॥८७॥

गेला तरी जावो प्राण ॥ परी असत्य न करावें वचन ॥ यासी वधितां येथेंचि विघ्न ॥ उठेल दारुण आतांचि ॥८८॥

बुद्धीचा प्रवर्तक भगवंत ॥ ब्रह्मयासी म्हणे नेईं त्वरित ॥ तेणें पेटी उचलोन अकस्मात ॥ अयोध्येसी आणिली ॥८९॥

अयोध्येंत जाहला जयजयकार ॥ वेगें पातला शचीवर ॥ दशरथावरी धरी छत्र ॥ कर्तव्य विचित्र हरीचें ॥१९०॥

दशरथ राज्यीं स्थापून ॥ विधि आणि सहस्रनयन ॥ वेगें पावले स्वस्थान ॥ आनंदें मनी उचंबळले ॥९१॥

पुष्पकीं बैसोनि जातां दशकंधर ॥ एक देवस्त्री देखिली सुंदर ॥ तिचा बळेंचि धरिला कर ॥ तिसीं अविचार करि इच्छी ॥९२॥

तंव ते आक्रंदत नितंबिनी ॥ रावणें सोडिली तेचि क्षणीं ॥ ती ब्रह्मयापासी जाऊनी ॥ गाऱ्हाणे सर्व सांगत ॥९३॥

रावणासी सत्यलोकवासी ॥ परस्त्रीवर बलात्कार करिसी ॥ तरी शतखंडें निश्र्चयेंसी ॥ तुझें तनूचीं होतील ॥९४॥

जैसा सिंह आडांत पडिला ॥ कीं महाव्याघ्र सांपळ्यांत सांपडला ॥ तैसा रावण बांधला ॥ शापपाशेंकरोनियां ॥९५॥

रावण पाप करी दारुण ॥ गांजिले गाईब्राह्मण ॥ पृथ्वी आक्रंदल पूर्ण ॥ गेली शरण ब्रह्मया ॥९६॥

गाईच्या रूपं धरित्री ॥ आक्रंदे विरिंचीच्या द्वारीं ॥ प्रजा ऋषीगण ते अवसरीं ॥ शरण आले विधातया ॥९७॥

विधी बाहेर आला ते क्षणीं ॥ तो समस्त सांगती गाऱ्हाणीं ॥ रावणें यज्ञ टाकिले मोडोनी ॥ सत्कर्म अवनीं चालेना ॥९८॥

एक म्हणे माझिया मखां ॥ विघ्न करी नित्य ताटिका ॥ एक म्हणे सुबाहु मारीच देखा ॥ क्रतु माझा विध्वंसिती ॥९९॥

एक सांगती ऋषीश्र्वर ॥ आमचीं कुटुंबें समग्र ॥ कुंभकर्णें गा्रसिली थोर ॥ अनर्थ मांडिला विधातया ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP