कथामृत - अध्याय पाचवा

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीशारदादेव्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । भक्त प्रल्हाद नमोस्तुते ॥१॥
मागील कथेचे अनुसंधान-। राखोनि ऐका पुढिल कथन । जगन्नाथपुरी ती सोडून । स्वामी निघाले तात्काळ ॥२॥
कीं या जगदुद्धारा कारणे । स्वामींस लागे सर्व करणे । चालेल कैसे जग त्याविणे । ना तरी होय सर्वनाश ॥३॥
संत, महंत पृथ्विचे पाठीं । यास्तव चाले जगरहाटी । नाठाळांसी हाणिती काठी । निर्भय असती सिंहापरी ॥४॥
कुटिल जनांची नित्य रीती । दुर्बळां, सज्जनां सदा छळिती । जगणे तयां अशक्य करिती । नित्य आसुरी कृत्यांनी ॥५॥
मेघ वर्षती पर्जन्य । तयांपारिस हे संतजन । नातरी होते जग स्मशान । यास्तव साधू आवश्यक ॥६॥
संत देवांचे अवतार । येत हराया पृथ्विचा भार । माजतां पातके अनिवार । अवतार घेती पुनःपुन्हा ॥७॥
पाप म्हणजे दुराचार । सभ्यतेचा ना विचार । स्वार्थ साधणे कृत्य थोर । परहितासी जाणती ना ॥८॥
स्वार्थाध वृत्ती बळावता । धर्म लाथाडिती परता । नीतिन्याय विवेक नसता । सौख्य कैचेनि लाभेल ॥९॥
बसवावया जगाची घडी । दुर्जनांची मोडण्या खोडी । सत्कर्माची लावणा गोडी । सिद्ध सर्वत्र संचरती ॥१०॥
स्वामी येती हरिद्वारी । रविबिंब येतां वरी वरी । गंगाकिनारी घाटावरी । विप्र करिती स्नान, संध्या ॥११॥
नाना स्तोत्रें नाना गीतें । भक्त मंदिरीं गात होते । झांजा, मृदंग तालावरि ते । नर्तन करिती आनंदे ॥१२॥
शंख, घंटा निनादती । मंदिरीं चाले काकडारती । गुलाल, पुष्पे ते उधळितो । गायन करिती मनोहर ॥१३॥
झांजा, टाळ, तास, मृदंग । वादनीं, भजनीं चढे रंग । भक्तवृंद तो होय गुंग । चाले सोहळा भक्तीचा ॥१४॥
वृक्षीं स्वगांच किलबिलाट । नरनारींनी फुलले घाट । जलपूर्ण घेउनी डोई घट । स्त्रिया चालती गृहापती ॥१५॥
रम्य ऐशा प्रभातकाळीं । गोधन घेउनी जात गवळी । हार, पुष्पे घेउनी माळी । मंदिरां संनिध बैसले ॥१६॥
जय जय गंगे भागीरथी । ऐसी गर्जना थोर करिती । प्रसाद ध्याया पुढे सरती । थाट मोठा अपूर्व ॥१७॥
पुण्यक्षेत्र हरिद्वार । लोक वर्तती धर्मानुसार । परंतु तेथे अनाचार । सदैव करिती मल्ल द्वय ॥१८॥
तये मांडिला हाहाकार । लोक संत्रस्तले फार । मल्लां कराया तडीपार । शक्त कोणीही नसे ॥१९॥
सुंदोपसुंद ते जणू गमती । तापत्रये जन शापिती । परंतु त्यांना त्याची क्षिती । अल्पस्वल्पही असेना ॥२०॥
मनसोक्त ऐसे ते वर्तती । धनधान्य ते उद्‌ध्वस्त करिती । उद्दंडपणे गृहीं घुसती । अन्न भक्षिती सर्वस्वी ॥२१॥
द्रव्यास्तव वाटमारी । जीव घेती ते अघोरी । कामांधपणे ते परनारी । नेती ओढुनी फरफरा ॥२२॥
अनेक वर्षे जनां छळिले । दीन, दुर्बळां अति गांजिले । शुंभ-निशुंभ कीं अवतरले । सर्व भ्रष्ट करावया ॥२३॥
हरिद्वार हे पुण्यक्षेत्र । महीवरती ना अन्यत्र । धर्मपरायण जन सर्वत्र । नांदताती अहर्निश ॥२४॥
देवदुर्लभ क्षेत्र ऐसे । देवांदिकांसी लाविले पिसे । परंतु तेथे शांति न वसे । मल्ल दैत्य ते म्हणोनिया ॥२५॥
श्रीगंगेचे भव्य मंदिर । अथांग सरिता वाहे समोर । स्नान करिता, महाघोर-। राक्षस पापी उद्धरती ॥२६॥
मल्लां ग्रासिले कुबुद्धीने । विख्यात जाहले कुकर्माने । अद्वातद्वा अश्लील वचनें । नरनारींसी बोलती ॥२७॥
दुष्कार्माची होय सीमा । द्यावयासी नसे उपमा । भ्रष्ट केल्या अनेक भामा । महानीच त्या दैत्यांनी ॥२८॥
लोक प्रार्थिती जनार्दना । धावा, सोडवा दयाघना उपाय नुरला, तुमच्याविना । यावे आता सत्वरी ॥२९॥
मल्लद्वयांचे माजले बंड । संत्रस्तले ते जन उदंड । करावया या उग्र दंड । अंत आमुचा न बघावा ॥३०॥
सर्व जनांची ही प्रार्थना । ऐकू आली नारायणा । वाटे अस्वस्थ मल्लांना । रोग जडता देहासी ॥३१॥
दिवसामागून दिवस जाती । फिरे मल्लांची काळ्गती । फुटाया लागे रक्तपिती । तेणे जाहले गर्भगळित ॥३२॥
महा व्यथेने कळा गेली । विद्रूपता मल्लांस आली । कर-चरणांची अग्रे गळाली । नासिकाग्रही गेले ते ॥३३॥
अन्न मागती दारोदारी । हिंडता रडती वरचेवरी । अन्न न देता तयां दुरी । हेटाळिती सर्वही जन ॥३४॥
मलिन वस्त्रे हीन काया । अन्न जाहले दुर्मीळ तयां । ऊन, पाऊस झोडी जयां । तयां न आश्रय कोणाचा ॥३५॥
ताडिती हस्ते निज शिरासी । वैतागले ते अतिशयेसी । मरण देवा दे आम्हासी । नको नको हे परि जीवन ॥३६॥
हांसत-नाचत कर्म केले । त्याचे पाहिजे फळ भोगिले । लोकशाप ते फळा आले । आता कासया रडतासी ॥३७॥
जनमुखींचे शब्द बाण । सोसू न शकती मल्ल दोन । गाईहुनी ते हीन-दीन-। होउन करिती गयावया ॥३८॥
दया परंतु कोणी न करी । कंकर, फत्तर मारिती वरी । तळमळ करिती मार्गावरी । महा अघोरी मल्लद्वय ॥३९॥
यातना सोशितां व्याकूळले । लोक वदनी भले झाले । दुष्टांसि प्रायश्चित्त दिधले । कुकर्मांचे इहजन्मीं ॥४०॥
काळ ऐसा जात असता । अवचित उठली एक वार्ता । सर्व जनांचा दुःखहर्ता । यतिवर्य येथे आलेती ॥४१॥
नृसिंहस्वामी तिथे येतां । समुदाय दाटे तयां भवता । व्याकूळ मनें दुःख वदता । आक्रंदती कित्येक ॥४२॥
कुणासि अंगारा, तीर्थ देती । सज्जनां आशीर्वाद देती । मंत्र जपाया कुणा वदती । भक्तांनुसार नाना तर्‍हा ॥४३॥
अपायांसी उपाय कथिती । आगतांचे हित साधिती । जनां प्रेमे बोध करिती-। एकमेकां साह्य करा ॥४४॥
कुष्ठपीडित मल्ल येती । समर्थ चरनी शिर ठेविती । दुर्धर दुःखे आक्रोशती । व्याधिमुक्तहो अम्हा करा ॥४५॥
स्वामींस तदा जन वदले । मल्लद्वयांना अम्हा छळिले । द्रव्याकारने ठार केले । नरनारींसी कित्येक ॥४६॥
यांच्या कृत्यांचे वर्णन । करावया इच्छी न मन । क्रोधायमान ते व्हाल आपण । श्रवणीं पडतां दुष्कृत्ये ॥४७॥
असंख्य कृत्ये अनन्वित । स्वामी सांगती मल्लांप्रत । नरजन्मं मिळोनी तुम्हांप्रत । साधन केले नरकाचे ॥४८॥
मल्ल घेती पदिं लोळण । वाचवा हो आमुचे प्राण । व्याधिमुक्त केलियाविण  । देवा, आपण नच जावे ॥४९॥
सत्य तेची सांगती जन । असत्य त्यांचे नसे वचन । पातके केली अति महान । करु नये ती सर्वही ॥५०।
होय आम्हासि पश्चात्ताप । व्यर्थ दिला सज्जना ताप । तयांचे हे भोगतो शाप । आता परंतु वाचवा आम्हा ॥५१॥
प्रार्थोनि ऐसे आक्रंदती । चरण ह्रदयी कवटाळिती । नेत्रांश्रूंनी पद न्हाणिती । यतींद्र तेणे द्रवले की ॥५२॥
वत्सल हस्ते गोंजारिती । पुरे पुरे उठा म्हणती । पश्चात्तापे पालटे मती । हेचि आम्हा हवे असे ॥५३॥
वदोनि ऐसे श्रीदयाले । भस्म तयांचे मुखिं घातले । महाव्याधींतुनि मोकळे-। व्हाल चिंता न करावी ॥५४॥
ऐसा लाभता आशीर्वाद । हर्ष झाला, गेला विषाद । सांगाल तैसे निर्विवाद । वर्तू आम्ही या जगीं ॥५५॥
स्वामी सांगती अखिल जना । करतील हे हो देवभजना । सिद्ध असती जनरक्षणा । संशय जनहो न धरावा ॥५६॥
ऐकतां सर्वासि आनंद । रोगियां होय परमानंद । स्वामी प्रत्यक्ष ब्रह्मानंद । आनंदी आनंद निर्मिला ॥५७॥
जनसंमर्दी काढीत वाट । आला पुढे विप्र उद्धट, स्वामींस पुसे प्रश्न थेट । कोण कोठले आपण हो ॥५८॥
जादूटोण, मंत्र-तंत्र । पूजावया देतसा यंत्र । अज्ञ जनां फसविता मात्र । हे न वर्तन चांगले ॥५९॥
विद्या आपणाम काय येते । भूत, भविष्य सांगता ते । स्वामी जाहले तया वदते । सांगतो तुम्हा सर्व काही ॥६०॥
विप्रवर्गी थोर महती । विद्वान म्हणोनी असे कीर्ति । वागता परि अधम रीती । तुम्हा न शोभे विप्रवरा ॥६१॥
विद्वान आपणा कां म्हणविता । पापकर्मा नित्य रमता । आढ्यतेने जगीं मिरविता । लाछनास्पद तुम्हासि हे ॥६२॥
विप्र असुनी गाय वधिली । गोमांस खाया जीभ धजली । कृष्णकृत्ये करोनि असली । जनीं मिरविता श्रेष्ठपण ॥६३॥
जी आपणा प्रसवली माय । परलोकीं ती म्हणेल काय । लज्जास्पद हे कर्म होय । धिक्कार तुमचा शतवार ॥६४॥
स्वामींचे ते तप्त भाषण । ऐकता ह्रदयीं शिरे बाण । तात्काळ घेई पदिं लोळण । थर थर कांपे विप्र महा ॥६५॥
महादाश्चर्ये सर्व बघती । वधायासी त्यां धावती । स्वामी लोकां निवारिती । थांबा,थांबा म्हणोनी ॥६६॥
अधम विप्रा काय केले । गोमांस खाया मन भुकेले । वेदपुरुष कीं म्हणविता भले । कैसी कापिली गोमाता ॥६७॥
अरे राक्षसा म्हणावे काय । न रक्षिता मारिली गाय । घोर आता या उपाय । प्राणदंड की या द्यावा ॥६८॥
क्रोधे उसळला जनसागर । आकांत करी तो विप्रवर । ऐसे पाप ते भयंकर । करणार नाही पुनश्च की ॥६९॥
समर्थ वदती सर्व लोकां । क्रोधे ऐसे खवळू नका । जे जे होईल ते ते देखा । विवेके आपुले आवरा मन ॥७०॥
समर्थ सांगती विप्रासी । गाय मारिली त्या स्थलासी । चला घेउनी आम्हांसी । विलंब आता न करावा ॥७१॥
समर्थासवे लोक निघती । विप्र चालला सांगार्ता । येतां एका स्थलाप्रती । द्दश्य देखिले भयंकर ॥७२॥
गोरक्ताचे जाहले कुंड । गाय पडली वासुनी तोंड । कापली होती अर्धीच मुंड । पाहतां सर्व हे गहिंवरले ॥७३॥
स्वामी आता काय करिती । लक्षपूर्वक जन देखती । समर्थ पुसती विप्राप्रती । नाम सांगणे गायीचे ॥७४॥
नाम तियेचे गोदावरी । सांगता ब्राह्मण शोक करी । कृत्य हे केले मी अघोरी । धनी मात्र मी नरकाचा ॥७५॥
जलपात्र घेवोनिया स्वकरीं । तीर्थं सिंचिले गाईवरी । कर फिरविला प्रेतावरी । ऐसे समर्थ कनवाळू ॥७६॥
अये गोदे उठि सत्वरी । इतुकी निद्रा घेणे न बरी । कोपू नकोस विप्रावरी । आलो स्वये मी उठवाया ॥७७॥
अति लडिवाळे पाचारिती । गोदे, गोदे ऊठ म्हणती । गाय उठतां हंबरे ती । चाटु लागली श्रीचरणां ॥७८॥
अपूर्व ऐसे द्दश्य बघता । पुनर्जीवन तीस मिळता । स्तंभित झाली सर्व जनता । विश्वास नेत्रीं न बसे की ॥७९॥
यतिवर्य वदती विप्रासी । येणे आम्हा तव गृहासी । सकल तूझिया कुटुंबासी । शुद्ध करणे असे अम्हा ॥८०॥
गोमांस तुम्ही हो भक्षिले । हे न वाटते आम्हा भले । प्रायश्चित ते घेणे भले । सहकुटुंब ऐशा समयाला ॥८१॥
मंत्रोनिया ते गोमुत्र । गृहीं शिंपिले सर्वत्र । अखंड जपा गायत्री मंत्र । वेदपठणही नित्य करा ॥८२॥
लोकक्षोभास हो कारण । ते न करने अकारण । आपण करिता धर्मपालन । लोक वर्तती तैसेची ॥८३॥
सामान्य नव्हे समर्थ सत्ता । उठवितो जे मृत गोमाता । दत्तावतार हे गमे चित्ता । निःसंशय की सर्व जनां ॥८४॥
स्वामींस घालिती दंडवत । साश्रुनयने त्यां प्रार्थित । कृपा असावी अखंडित । हीच प्रार्थना तुम्हांसी ॥८५॥
यापुढे हो चिंता न करने । धर्मशास्त्रानुसार असणे । दुःखित जनां साह्य देणे । ज्ञानदानही नित्य करा ॥८६॥
कैसे करावे वेदपठण । स्वामी दाविती स्वयें म्हणून । स्वर उच्चार स्वष्ट करुन । अर्थ सांगती ऋचांचाही ॥८७॥
उपनिषदू, संहिता, गीता । यांची वर्णिती अति श्रेष्ठता । व्युत्पन्न व्हाया अति शुद्धता । निज आचरणीं असावी ती ॥८८॥
जगीं विप्रा भूदेव वदती । अत्यादरे जन वंदिती । अनेक विद्यांचे अधिपती-। मानुनी वागती नम्रत्वे ॥८९॥
ऐशी द्विजांची महत्तता । सर्वावरी तयांची सत्ता । आचरण परी भ्रष्ट होता । सन्मान कैसा होईल ॥९०॥
समर्थ सांगती तळमळुनी । असा परस्पर प्रेम करुनी । कलह तंटा व्यर्थ करुनी । वैर-वन्ही न चेतवा ॥९१॥
ऐसे ममत्वे उपदेशिती । जनीं सद्‌भाव जागविती । तुम्ही असावे सदैव सुखी । यांत आम्हांसि आनंद ॥९२॥
लोक करिती जयजयकार । भरले नादे गगन थोर । पुष्पे, फळे सुगंधी हार । याही पूजिले स्वामीसी ॥९३॥
आग्रहे पूजा स्वीकारितो । तीर्थ, विभुती सर्वास देती । सकल कामना पूर्ण करितो । लोक जाहले संतुष्ट ॥९४॥
जनहो आम्हा असे जाणे । तीर्थयात्रा पूर्ण करणे । निरोप द्यावा या कारणे । येतो तुम्ही सुखी असा ॥९५॥
अम्हां टाकुनी कुठे जाता । तुम्हाविणे ना अम्हा त्राता । कुडीतूनी कीं प्राण जाता । होईल आमुची तैशी स्थिती ॥९६॥
बहुत लोके आक्रोशे केला । कवटाळिले श्रीपदकमलां । मथुरेस नेता श्रीकृष्णाला । तेवि जाहला आकांत ॥९७॥
स्वामी सांगती पुनः पुन्हा । गमन करणे अवश्य अम्हां । तुमच्या स्वीकारितो प्रेमा । निरोप द्यावा आम्हासी ॥९८॥
साश्रु नयने निरोप दिधला । येणार केव्हा या पुरीला । तुम्हाविणे ना सुख आम्हांला । शपथपूर्वक सांगतो ॥९९॥
सवास करिती श्री प्रणाम । आम्हांस गाठणे असे धाम । अखंड घ्याहो प्रभुचे नाम । आग्रहे कथुनी निघती त्वरे ॥१००॥
लोकसमुदाय मागुती लोटे । स्वामींस बघतां दिसती न कोठे । जन परतले आलिया वाटे । दुःख जाहले अपार ॥१०१॥
असा यतिंचा अपूर्व महिमा । धन्य, जयांनी साधिले कामा । तयांच्या भाग्या नसे सीमा । दर्शन दुर्लभ स्वामींचे ॥१०२॥
स्मरतां स्वामींच्या दिव्य पदां । हरती सर्वाच्या आपदा । नैराश्य, कुबुद्धी अति तापदा । स्पर्शो न कुणा भक्तांसी ॥१०३॥
ऐसे प्रार्थुनी स्वामिराया । शरण रिघतो सद्‌गुरु पायां । गोड अध्याय पुढिल गाया । कवित्व शक्ती मज द्यावी ॥१०४॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०५॥
॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP