एकादशीव्रत : 'योगिनी एकादशी'

ज्येष्ठ व. एकादशी दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे आचरुन

'मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोगनिवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये ।'

असा संकल्प सोडून श्रिपुंडरीकाक्ष भगवंताचे (विष्णूचे) पूजन करावे. त्याच्या चरणोदकाने सर्वांगावर मार्जन करावे आणि उपवास करुन रात्री जागरण करावे, म्हणजे कुष्ठादी सर्व रोगांपासून मुक्त होतो.

कथा -

युधिष्ठिराने विचारले, 'हे मधुसूदना, जेष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय? आणि तिचे माहात्म्य काय? हे मला कृपा करून सांग.'

श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, सर्व पापांचा क्षय करणारे, ऐश्वर्य व मोक्ष देणारे व सर्व व्रतांत उत्तम असणारे व्रत तुला सांगतो. हे नृपश्रेष्ठा, जेष्ठ वद्य पक्षातील ही योगिनी नावाची एकादशी महापातकाचा नाश करणारी आहे. ही सनातन एकादशी संसाररुपी सागरात बुडणार्‍यांना नौकेप्रमाणे वाटते. हे नराधीषा, ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे. या एकादशीची पाप हरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो.

अलका नगरीचा राजा कुबेर शिवपूजक होता. त्याच्याकडे पूजेकरता फुले आणण्यासाठी हेममाली नावाचा माळी होता. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची पत्‍नी होती. ती फार सुंदर होती. हेममाली तिच्या कामपाशत सापडून तिच्यावर फार प्रेम करीत होता.

तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला होता. त्याने नित्याप्रमाणे मानस-सरोवरातून फुले आणली, पण पत्‍नीचे मुख पाहून तो मोहीत झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्‍नीप्रेमात गुंतून घरीच राहिला.

इकडे कुबेर देवालयात बसून पूजा करीत होता. माध्यान्ह काल होईपर्यंत तो फुलांची वाट पाहत बसून राहिला. हेममाली आपल्या घरी आपल्या प्रेयसीसह क्रीडा करीत राहिला.

यक्षराजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागावला. तो आपल्या दूतांना म्हणाला, 'यक्षांनो, तो दुराधम हेममाली अजून का येत नाही. याचा तपास करा पाहू.'

कुबेर पुन्हा पुन्हा असे म्हणाला तेव्हा यक्ष म्हणाले, 'राजा, तो स्त्रीलंपट त्याच्या घरी स्वतःच्या पत्‍नीसह क्रीडा करीत आहे.'

हे ऐकताच कुबेर क्रोधाने जणू भरून गेला. त्याने तात्काळ हेममालीला बोलावून आणले. फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेममाली घाबरला. त्याच्या नेत्रात भय दिसू लागले. तो कुबेरासमोर येऊन नमस्कार करून उभा राहिला.

त्याला पाहताच कुबेराला क्रोध आला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले. तो रागाने ओठ चावून म्हणाला, 'अरे पाप्या, दुष्टा, दुराचार्‍या तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्‍नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी (पांढर्‍या कोडाचा) होशील व येथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील !'

कुबेराचा हा शाप ऐकताच हेममालीच्या अंगात कोड भरले. आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला. त्याला प्रचंड दुःख झाले. त्या भीषण वनात त्याला अन्नपाणी मिळेना. त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना. त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात तर फार पीडा होत असे. पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली.

तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्माचे स्मरण करीत भटकत राहिला. फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला. तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयांचे दर्शन झाले. त्या मार्कंडेयाला ब्रह्मदेवाचे सात दिवस म्हणजे सात कल्पे आयुष्य आहे.

तो पापी हेममाली मार्कंडेयाच्या आश्रमात गेला. तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता. त्याने त्या ऋषीच्या चरणांना दुरूनच वंदन केले.

मार्कंडेय ऋषीने त्या कुष्ट्याला पाहिले. जवळ बोलावून ऋषीने त्याला विचारले, 'अरे, तुला असे कुष्ट कशामुळे झाले? तुझी अशी निंदास्पद स्थिती कशी झाली?'

त्यावर हेममाली म्हणाली, 'मी यक्षराजा कुबेराचा हेममाली नावाचा सेवक आहे. हे मुनी, मी कुबेराला रोज शिवपूजेच्या वेळी मानस-सरोवरातून फुले आणून देत असे. एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्रीसौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला मला उशीर झाला. ऋषीश्रेष्ठा, त्यामुळे कुबेर रागावला व त्याने मला शाप दिला. त्या शापामुळेच माझा व पत्‍नीचा वियोग झाला. माझे शरीर कुष्टाने भरले. आणि मी अरण्यात जाऊन पडलो. आता पूर्व पुण्यामुळे मी तुमच्याजवळ येऊन पोचलो आहे. साधुपुरुषांच्या अंतःकरणाचा कल नेहमीच परोपकार करण्याकडे असतो, हे तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनीश्रेष्ठा, मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा.'

मार्कंडेय ऋषी म्हणाला, 'तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो. जेष्ठ वद्य पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत तू कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल.'

मुनीचे हे बोलणे ऐकून हेममालीला फार आनंद झाला. त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनीला दंडवत घातला. मुनीने त्याला उठवले.

मार्कंडेयाच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ट गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला. त्याचा व पत्‍नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले.

नृपश्रेष्ठा, योगिनी एकादशीचे व्रत हे असे आहे. अट्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याने जे फळ मिळते, तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभते.

॥याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP