अध्याय सोळावा - श्लोक १५१ ते २०६

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


मग उठोनि सुमित्रासुत ॥ चहुंकडे पाहे तटस्थ ॥ धनुष्य करीं घेत ॥ क्रोध अद्भुत नावरे ॥५१॥

म्हणे कृष्णे तुज उगमापासूनि ॥ निर्जळ करीन ये क्षणीं ॥ बाण काढिला विचारूनि ॥ मुखीं प्रळयाग्नि जयाचे ॥५२॥

आणोनि दे माझा रघुवीर ॥ नवमेघरंग राजीवनेत्र ॥ हें जाणोनि अहल्योद्धार ॥ निघे बाहेर ते काळीं ॥५३॥

सौमित्र चरणीं लागला ॥ ते स्थळीं शंकर स्थापिला ॥ बाहोक्षेत्र म्हणती तयाला ॥ पुढें चालिला रामचंद्र ॥५४॥

आठ राक्षस रावणें पाठविले ॥ रामासी वधूनियां सत्वर वहिले ॥ कबंधाचे कवें सांपडले ॥ तेही गिळिले क्षणार्धें ॥५५॥

त्या कबंधाचे कवेआंत ॥ सांपडले सौमित्र-रघुनाथ ॥ सांचळ ऐकतां कबंध ॥ पसरोनियां आवरिले ॥५६॥

द्वादश योजनें दोनी हस्त ॥ जैसे आड पडिले पर्वत ॥ शिर उतरलें हृदयांत ॥ वज्रघातें करूनियां ॥५७॥

नाहीं तयासी चरण ॥ बैसला दोन्ही हस्त पसरून ॥ त्याचे कवेंत राम लक्ष्मण ॥ अकस्मात सांपडले ॥५८॥

बळ जाणोनि अद्भुत ॥ धनुष्य सज्जोनि अयोध्यानाथ ॥ तीक्ष्ण शरें दोनी हात ॥ छेदोनियां पाडिले ॥५९॥

श्रीराम बाणे उद्धरला ॥ कबंध दिव्य देह पावला रघुपतीच्या चरणीं लागला ॥ उभा राहिला हस्त जोडोनि ॥१६०॥

मी दनूचे उदरीं कश्यपसुत । मद्यपानी महाउन्मत्त ॥ स्थूलशिरा ऋषि तप करित ॥ सेविलें एकांत कानन ॥६१॥

त्यासी म्यां हाक फोडून ॥ भेडसाविला तपोधन ॥ तेणें शापशस्त्रेंकरून ॥ मज ताडिलें ते काळीं ॥६२॥

म्हणे तूं चांडाळ पापखाणी ॥ कबंध होऊन पडे वनीं ॥ मग मी लागलो त्याचे चरणीं ॥ उःशापवाणी बोलिला ॥६३॥

दशरथसुत दंडकारण्यांत ॥ दशमुख वधावया जातां सत्य ॥ दशा तुझी उजळेल यथार्थ ॥ दनुपुत्रा जाणपां ॥६४॥

इंद्रपद घ्यावयासी जाण ॥ मी जपत होतों बहुत दिन ॥ वज्रधरें वज्र उचलोन ॥ मस्तकीं माझे ताडिलें ॥६५॥

मस्तक उदरांत उतरलें ॥ दोनी चरण छेदिले ॥ पूर्वकर्म फळासी आलें ॥ कष्ट भोगिले बहुवस ॥६६॥

जाहला माझा उद्धार ॥ रामा पडिलें माझें शरीर ॥ यासी देवोनि वैश्र्वानर ॥ भस्म करीं आतांचि ॥६७॥

काष्ठें मेळवून सौमित्रें ॥ अग्नींत घातले कलेवर ॥ मग तो पावोनि पुण्यशरीर ॥ विमानांत बैसला ॥६८॥

परीस झगटतां जाण ॥ होय लोहाचें सुवर्ण ॥ तैसा कबंध उद्धरोन ॥ वैकुंठधामा चालिला ॥६९॥

शंखचक्रादि चिन्हांकित ॥ चतुर्भुज विष्णुभक्त ॥ कबंध उद्धारोनि यथार्थ ॥ तोही जाहला तैसाचि ॥१७०॥

मग विमानीं बैसोनि जातां ॥ म्हणे अयोध्याप्रभु रघुनाथा ॥ सुग्रीवासी मैत्री तत्वतां ॥ करीं तूं आतां येथोनि ॥७१॥

जगद्वंद्या जनकजामाता ॥ जलदगात्रा जन्मरहिता ॥ जलजनेत्रा जलजासनताता ॥ जनार्दना जगदगुरो ॥७२॥

असो नमस्कारोनि रघूत्तमा ॥ कबंध पावला निजधामा ॥ पुढें शबरीचिया आश्रमा ॥ जगदात्मा येता जाहला ॥७३॥

परम तपस्वी शबरी ॥ तप करितां जाहली म्हातारी ॥ तिच्या आश्रमीं रावणारी ॥ राहता जाहला दिनत्रय ॥७४॥

तिणें फळें मुळें आणून ॥ भावें अर्चिला रघुनंदन ॥ म्हणे तप जाहलें पूर्ण ॥ राजीवनयन देखिला ॥७५॥

शबरीसी उपदेशिलें ज्ञान ॥ ती तात्काळ गेली उद्धरोन ॥ शरीर सांडोनि कैवल्यसदन ॥ पावली पूर्ण तत्काळीं ॥७६॥

सौमित्र म्हणे पुराणपुरुषा ॥ जगदोद्धारा अयोध्याधीशा ॥ मज निजज्ञान सर्वेशा ॥ कृपा करून उपदेशीं ॥७७॥

मग रामगीता जें आत्मज्ञान ॥ सारासार विचारनिरूपण ॥ लक्ष्मणाप्रति सांगोन ॥ निःसंशय तो केला ॥७८॥

मायिक जगदाभास पूर्ण ॥ सत्य शाश्र्वतरूप निर्वाण ॥ ते चिन्मयवस्तु आपण ॥ निजज्ञान या नामें ॥७९॥

असो यावरी रघुपति ॥ आला हंपीविरूपाक्षाप्रति ॥ पुढें पंपासरोवर निश्र्चितीं ॥ विश्रांतिस्थान शिवाचें ॥१८०॥

दिव्य वल्ली दिव्यद्रुम ॥ सदा सफळ भेदीत व्योम ॥ तेथें स्फटिकागुहा उत्तम ॥ परम आरामस्थळ जें कां ॥८१॥

स्फटिकशिळेवरी श्रीराम ॥ बैसला तेव्हां घनश्याम ॥ जेवीं कैलासी द्यावया क्षेम ॥ बलाहक उतरला ॥८२॥

सौमित्राचे मांडीवरी ॥ शिर ठेवून रावणारी ॥ श्रमोनियां निद्रा करी ॥ निर्विकारी अजित जो ॥८३॥

शेषशायी नारायण ॥ तोचि राम इंदिरारमण ॥ सौमित्राचे अंकीं शिर ठेवून ॥ त्याचपरी शोभला ॥८४॥

असो ते समयीं रघुनाथा ॥ चित्तीं आठवे जनकदुहिता ॥ श्र्वासोच्छास जगत्पिता ॥ घालोन बोले ते समयीं ॥८५॥

अहो जानकी मृगांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ सकळ लावण्यगुणनिधाने ॥ कधीं भेटसी मज आतां ॥८६॥

रामासी जाहला विरहज्वर ॥ तंव कोकिळा बाहती सुस्वर ॥ तयांसी म्हणे त्रिभुवनेश्र्वर ॥ खुंटो स्वर सदा तुमचा ॥८७॥

ते वेळीं तमालनीळा ॥ शरण आल्या सर्व कोकिळा ॥ राम म्हणे वसंतकाळा ॥ माजी शब्द फुटेल ॥८८॥

मृगमृगींस म्हणे रघुनाथ ॥ तुम्हां संघटतां पारधि वधील सत्य । तंव तीं जाहलीं शरणागत ॥ उःशाप देत तयांसी ॥८९॥

तो तुम्हांस रात्रीस वधील सत्य ॥ वरकड दिवस तुम्हांस मुक्त ॥ तंव देखिलीं गजगजी रमत ॥ काय बोलत तयांसी ॥१९०॥

दोघांसी योग होतां यथार्थ ॥ गज पडेल मूर्च्छागत ॥ सात दिवसपर्यंत ॥ अचेतन प्रेतापरी ॥९१॥

तंव तीं आलीं शरण ॥ उःशाप बोले राजीवनयन ॥ जळांत करितां मैथुन ॥ मूर्च्छा नये सहसाही ॥९२॥

मयूरासी म्हणे रघुनायक ॥ तुम्ही व्हारें नपुंसक ॥ तंव तीं शरण येती देख ॥ काय बोले जगद्रुरु ॥९३॥

नयनीं जे अश्रु स्रवती ॥ तेणेंचि वाढेल तुमची संतती ॥ चक्रवाकांस म्हणे रघुपति ॥ सूर्योदयीं भेट तुम्हां ॥९४॥

रात्रीं होय तुम्हांस वियोग ॥ तों दृष्टीं देख कागिणीकाग ॥ त्यांसी म्हणे जन्मांत संग ॥ एकदांच संसारीं ॥९५॥

मी सीतेवीणी भ्रमतों देख ॥ तुम्ही भोगितां रतिसुख ॥ यालागीं दंड हाचि निःशंक ॥ तुम्हांसी केला निर्धारें ॥९६॥

सीतावियोगें रघुनाथ ॥ म्हणे राक्षस येऊन बहुत ॥ यांच्या स्त्रिया हरोनि समस्त ॥ नेईनात सीतेऐशा ॥९७॥

रतिचेष्टा मजसमोर ॥ कांहो करिती वारंवार ॥ माझी जानकी सुकुमार ॥ मज भेटली नाहीं जो ॥९८॥

इत्यादि भाव ते समयीं ॥ दावी जनकाचा जांवई ॥ इचे गुणांस गणना नाहीं ॥ कोटि वर्षें शोधितां ॥९९॥

असो ऋष्यमूकपर्वतारूनि ॥ वानर विलोकिती चापपाणी ॥ नळ नीळ जांबुवंत तरणि ॥ कुमार पाह सुग्रीव ॥२००॥

आणि पांचवा तो हनुमंत ॥ जो अवतरला उमाकांत ॥ त्याचें जन्मकर्म अद्भुत ॥ तृतीयाध्यायीं वर्णिलें ॥१॥

रामविजय ग्रंथराशी ॥ हेचि केवळ वाराणसी ॥ रामकथा विश्र्वेश्र्वरासी ॥ प्रिय म्हणून राहिला ॥२॥

कष्ट न होतां अपार ॥ यात्रेसी धांवती मुमुक्षु नर ॥ श्रवणीं बैसती सादर ॥ संसारकार्य टाकूनि ॥३॥

येथूनि अरण्यकांड संपलें ॥ पुढें किष्किंधाकांड आरंभिलें ॥ जैसे रत्नाहून रत्न आगळें ॥ वैरागरीं निपजे पैं ॥४॥

याचे परीक्षक संतजन ॥ जे ब्रह्मानंदें परिपूर्ण ॥ श्रीधर तयांसी अनन्य शरण ॥ अभंग अक्षय सर्वदा ॥५॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ षोडशाध्याय गोड हा ॥२०६॥

॥श्रीरामचंद्रापर्णमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP